बुधवार, ३ जून, २०२६

२४७६: मौन


मी तीन-साडेतीन दशकांपासून शिक्षिका आहे. सगळ्या स्तरांवर शिकवले आहे आणि आता देखील थोड्या प्रमाणात शिकवते आहे. त्यामुळे मला ऐकता येतं, पण कमी. आणि त्यातल्या त्यात सुमधुर, ऐकावंसं असं काही असेल तरच खरं ऐकावंसं वाटतं. सुंदर, प्रख्यात, विद्वान असे अनेक वक्ते आहेत आणि त्यांपैकी ठराविकच मला भावतात. बाकीचे पण उत्कृष्टच बोलतात. कदाचित ते मला तितकंसं समजत नसेल असं म्हटलं तरी चालेल.

अलीकडे "मौन" ह्या विषयावर एक व्याख्यान ऐकलं. मला जितकं माहिती होतं, त्यापेक्षा खूपच जास्त मौनाबद्दल आणि त्याच्या प्रकारांबद्दल त्या दिवशी समजलं. अर्थातच माझ्या फार आवडत्या अशा आदरणीय डॉ. धनश्री लेले बोलणार म्हटल्यावर काय विचारता? माझ्यामते त्या बोलायला लागल्या की श्रोते अर्थातच मौन बाळगतात. पण ते मौन असं तसं नाही बरं का. संपूर्ण एकाग्र होऊन, कान देऊन, एका जागी बसून केलेलं ते श्रवण. भक्तिभावपूर्ण बोल आणि संपूर्ण आशीर्वादात्मक अनुभूती. असं कानी पडणं म्हणजे सुद्धा भाग्य लागतं हो. इतकी मोठी अभ्यासक किंवा आध्यात्मिक बैठक असलेली मी नाही. त्यामुळे एक पूर्ण दिवस मौन, किंवा त्यापेक्षा जास्त, हे माझ्यासाठी अवघड. त्यामुळे आदरणीय लेले ताईंना तासभर शांतपणे ऐकत बसणं हे देखील माझ्यासारखीला पुरेसं आहे, नाही का? कारण जरी आपण मौनाच्या कारणांमुळे तोंड बंद ठेवलं, तरी सामान्य माणसांची अंतर्गत खळबळ सुरूच राहते. पण लेले ताई बोलायला लागल्या की तसं होत नाही. अंतर्बाह्य मौन पाळलं जातं एक तासाकरता किंवा जितका वेळ त्यांचा कार्यक्रम असेल तेवढा वेळ.

मौन पाळण्यास सुरुवात केली की त्याचा परिणाम ताबडतोब दिसत नसेल कदाचित. त्यामुळे मी पण थांबणार आहे. अजून अनेक विषय लेले ताईंकडून समजावून घेणार आहे. मग नक्कीच ह्या प्रकारच्या मौनाचा परिणाम दिसेल. अर्थात परिणामासाठीच हे चाललंय असं नाही.

अजून एक मौनाचा प्रकार मला आढळला. मी बरेच ऑनलाइन वर्ग घेते. त्यात विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक असतात. ऑनलाइन पद्धतीत समोरचा श्रोता मला दिसत नाही. मी आधी एखादी पद्धत किंवा प्रकार समजावून सांगते आणि मग त्यांना करायला पुरेसा वेळ देते. त्यानंतर जेव्हा मी विचारते, "काही प्रश्न आहेत का?" किंवा "काही अडचणी आहेत का?" तेव्हा अक्षरशः शांतता पसरते. जणू काही कोणीच उपस्थित नाही. मग अनेकदा विचारल्यावर एखादं उत्तर येतं. माझ्यामते हे दोन, चार किंवा सहा तासांचं मौनच नाही का? इतका वेळ मौन पाळणं म्हणजे देखील कमाल आहे. काही विद्यार्थी तर असे असतात की ते बोलत नाहीत म्हणजे नाहीतच. आधी मला जरासा त्रास व्हायचा. त्यांना कळतंय का नाही, हेच समजत नसे. पण आता नाही मी त्रास करून घेत. कारण मला आता मौनाचं महत्त्व पटायला लागलं आहे.

अर्थात आताशा बरेच जण बाह्यरूपाने मौन पाळताना दिसतात. ते बोलत नाहीत, सतत ऑनलाइन काहीतरी पाहत असतात, कधीतरी काही टाइप करतात आणि बाकी संपूर्ण मग्न असतात. ह्या सगळ्यातून त्यांनी अंतर्गत मौन, आंतरिक शांतता, संयम आणि इतर अनेक चांगल्या गोष्टी कमवाव्यात म्हणजे मिळवलं. बाहेरून शांत राहून अंतर्गत खळबळ वाढायला नको, एवढंच.

https://www.youtube.com/watch?v=vt2ezz09k6k (Dr Dhanashree Lele's video)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४७८: आता काय करायचं?

तर त्याचं काय झालं, आजचीच गोष्ट हो. सकाळी नाश्ता व्यवस्थित झाल्यावर मला एक गोळी नित्यनेमाने घ्यायची असते. मग काय, मी पाण्याचा पेला भरला, गोळ...