"दृष्ट लागली" किंवा "दृष्ट नको लागायला" किंवा "दृष्ट काढली" ई. वाक्प्रचार माझ्या लहानपणी माझ्या कानावर पडतं असतं नेहेमीच. त्यावेळीच एक मनात पक्क झालं होतं कि विश्वसुंदरी असायला हवी व्यक्ती / मुलगी दृष्ट लागायला. काही वर्षानंतर उमगलं फक्त गोंडस मुलींनाच, सौंदर्यवतींनाच दृष्ट लागते असं काही नाही. कोणालाही, कधीही, केव्हाही आणि कुठल्याही पातळीची दृष्ट लागू शकते आणि त्याचे परिणाम होतात. कदाचित असं देखील असेल कि "कावळा बसायाला आणि फांदी तुटायला" एकच गाठ पडली. पण प्रत्येक वेळी असंच काही होईल हे सांगता येत नाही ना?. त्यामुळे काही क्षण गृहीत धरूया कि दृष्ट लागणे हि संकल्पना अस्तित्वात आहे. कारण आपण सगळेच व्हायब्रेशन्स / लहरींच्या जमान्यात वावरतो आहे. मोबाईल नावाच्या घट्ट मित्राची सगळी भिस्त ह्या स्पंदनांवर / लहरींवरचं तर टिकून आहे. सिग्नल मिळत नाही, रेंज नाही म्हणजे काय वेगळं हो? दोन मोबाईल जगाच्या पाठीवर कुठेही असोत एकमेकांशी संपर्क साधतात, कश्यामुळे? तंत्रज्ञानामुळे जे ह्या सो कॉल्ड व्हायब्रेशन्स / लहरीं वर चालतात. हे व्हायब्रेशन्स / ह्या लहरीं गडबडल्या कि मग संपर्क होत नाही, आणि हे कदाचित हवामानामुळे किंवा असंख्य कारणांमुळे, अधेमधे असलेले बरेच साधंनामुळे / बिघाडामुळे होऊ शकतं. अगदी आपल्या शरीराचा रिथम बदलला कि कसं होतं तस्स.
त्यामुळेच तर सांजवेळी प्रत्येक घरात आरती करण्याची पद्धत होती, अलिखित नियम होता कि घरातल्या सर्वांनी उपस्थित राहावं कारण
१. ऍक्युप्रेशर होतं नकळत,
२. जर असे काही वाईट प्रसंग / घटना किंवा दृष्ट लागण्यासारखं काही होऊन जर कंपने बिघडली असतील तर तिची साखळी तुटावी आणि नवीन चांगली व्हायब्रेशन्स तय्यार व्हावीत प्रत्येक व्यक्तीच्या अवतीभोवती, बास.
त्याला देवाच्या नावाची देखील एक झालर चढवली होती, दिवसभरच्या थकव्याचा रामबाण इलाज, एकत्र वेळ घालवण्याचा एक उपाय, पाठांतर होण्याचा सोपा पर्याय, जमिनीवर अनवाणी पायानी उभं किंवा बसण्याचा हक्काची वेळ ज्यामुळे अर्थिंग पूर्ण होतं असे ई. अनेक.
दृष्ट दोन प्रकारची लागते
१. गोड: जी आईमुळे मुलाला / गुटगुटीत तान्हुल्याला लागू शकते, जी साखरेने काढावी म्हणतात, यदाकदाचित लागलीच तर,
२. गडबड: जी मिठाने, मीठ-मोहोरीने, मीठ-मोहोरी-लाल मिरचीने, झाडूने, किंवा केरसुणीने / देवाच्या छोट्याश्या झाडूने ई. काढतात.
आता मला असं वाटतंय कि हि अशी दृष्ट कोणाहीमुळे कोणालाही लागू शकते, कधीही. आईसमान मोठ्या स्त्रीनेच काढावी हि अशी लागलेली दृष्ट म्हणे. माझ्या मते जर कोणाची जळफळाट झाली, चुकीच्या नजरेने बघितलं तर त्या वलयांना तोडण्यासाठी दृष्ट काढली जाते. एकदा का हि चुकीच्या वलयांची शृंखला तुटली कि पुन्हा एकदा चांगल्या कंपनांना जागा मिळेल आणि सर्व पूर्ववत होते.
मला हे सगळं किती खरं खोटं ह्यात पडायचं नाहीच, अंधश्रद्धा तर मुळीच नाही, फक्त हेच कि दृष्ट काढणाऱ्याच्या वयाची अट का? आता वयस्क आईसमान व्यक्ती विभक्त कुटुंबात कुठून आणायची? प्रत्येक गोष्ट औषधाने बरी होत नाहीच कॉम्बो उपाय हवेतच. अती नको पण जमेल तेवढं विश्वासाने करावं जमल्यास.
ह्या सगळ्यातनं एक धडा घ्यावा प्रत्येकाने. जर असे दृष्ट लागतील असे विचार जरी शिवायला लागलेच चुकून न कळत दुसऱ्यांबद्दल यदाकदाचित तर ते थांबवण्याचा प्रयत्न करा, तेथून निघून जा, विषय बदला किंवा काहीही करा पण आपल्यामुळे दुसऱ्याला दृष्ट लागू देऊ नकाच प्रयत्नपूर्वक. "प्रिव्हेंशन इज बेटर द्यान क्युअर" हि काय म्हण तय्यार केली आहे नाही, मस्तच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा