बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

फॅशनच्या नावाखाली

ताज्या हवेचा, कोवळ्या ऊनाचा, सकाळच्या उत्साहाचा आणि ऊर्जेचा आस्वाद घेत आहे मी सध्या, अगदी हमखास दररोज. काही वेगळाच अनुभव आहे तो, शब्दांच्या पलिकडला असा. हे सगळं नैसर्गिक अनुभवत असतांना अनेक जण दिसतात, गप्पा होतात, हश्या पिकतो आणि दिवसाची सुरवात भन्नाट होते. दररोज घाईत बाहेर पडणारे चाकरमाने, शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयाचे तरुण तरुणी पण लगबगीत जात असतात. पिटुकल्या, नुकत्याच शाळा नावाचा प्रवास सुरु केलेले छोटे दोस्त आणि त्यांचे पालक देखील नजरेस पडतात. आमच्या सोसायटीत बऱ्याच लहान मुली आहेत. त्यांना जवळपासच्या शाळेत / छोट्या गटात टाकलंय असा माझा अंदाज आहे. शाळा आणि घर ह्याचे अंतर कमी असल्यामुळे मग दुचाकीवर सोडण्याकडे कल दिसतो. मी आपली माझ्या चार डोळ्यांनी टिपते जे सहज नजरेस पडतं ते.


काही वर्षांपासून सर्वत्र, सर्व स्थरावर आणि बहुतांशी प्रत्येकवेळी केस मोकळे सोडणे म्हणजे तरुण होणे, किंवा तरुण दिसणे किंवा काळाबरोबर चालणे हे गृहीत धरले आहे. किंबहुना तशीच कृती झालेली दिसते सदोदित. केस मग कसेही असोत, ते मोकळेच सोडायचे. अनेक तास त्याला मोकळे सोडण्यास योग्य करण्याकरता घरी किंवा दारी (वाया) घालवायचे. केस बांधले म्हणजे जुन्या काळातले किंवा आजीबाईंसारखे म्हणतात म्हणे. असो. हे झालं मोठ्या मुली, बायका, आज्या आणि सगळ्याचं जणींचं. 


शाळेत जायला सुरवात केलेल्या पिटुकल्या कळ्या ज्यांना सगळंच बहुतेक सांभाळायला कोणी ना कोणी लागतं त्या देखील शाळेत, पुन्हा एकदा वाचा मंडळी शाळेत जातांना केस मोकळे सोडून जातात? माझ्या कल्पने पल्याड आहे हे सगळं. का? कश्यासाठी? काय मिळतं हे असं करून, केस मोकळे ठेवून शाळेत? असं शाळेत जाऊ शकतो? अर्थात एक उत्तर मिळालं आहे मला. सध्या सगळेच बहुतांशी विभक्त कुटुंबात राहतात. आई आणि बाबा दोघे पूर्णवेळ कामाला घराबाहेर जातात, वेळ नसतोच कश्याच साठी. मग आई किंवा बाबांनी एक पिटुकला कंगवा फिरवला त्यांच्या आणि पिलूच्या केसांवर कि झालं, काही सेकंदांचं काम. आणि त्यांनतर दुचाकीवर तर स्वार व्हायचं आहे, मग विस्कटणारच केस तसेही, मग काय फरक पडतो? लहान मुलींचे केस खूप मऊ असतात, छानच दिसतात कसेही ठेवले तरी. सारखे मोकळे केस डोळ्यासमोर आले तर ह्या लहान मुली अभ्यास, खेळ, खाणं कसं खातं असतील हो? आमच्या वेळी म्हणायचे, केस डोळ्यावर सारखे आले तर डोळे खराब होतील, वाकडं तिकडं बघायला लागेल मुलं ई. आता तसं काही होतं नाही का? का खेळ, खाणं आणि अभ्यास करतांना सारखे केस आवरणे हे गृहीत धरलंय किंवा रुटीन झालंय? वेगळं काही किंवा चुकीचं तर नाहीच? मला गलबललं हा सातत्याने होत असलेला प्रकार बघून, माझा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतांना. प्रत्येकवेळी प्रवाह पतित होणे अशक्य आहे मला. फक्त टीव्ही त आणि फक्तच नायिका किंवा सिनेतारकांचेच हवेशी संवाद साधणारे केस का बघायचे मी? हे असे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिसत असतांना. 


माझ्या लहानपणी सर्वत्र जसे एक सारखे वातावरण होते, आता पण तसेच आहे. सर्वत्र सारखे. गेले बहुतेक ते तेलाचे, दोन वेण्यांचे, रिबिनींचे, जाडजूड गजरा  माळायचे (स्पर्धा जणू), वेण्या ओढून पळण्याचे, असे ते घनदाट केस धुणे-वाळवणे-उन्हात बसणे ई. रविवारच्या उत्सवाचे दिवस. 

ओझं

माझ्यावेळी शाळेत शिकवले होते विज्ञानाच्या संदर्भात आणि त्या नंतर बऱ्याचदा वाचनात देखील आले कि शक्यतो ज्ञानेंद्रिय/ संवेदना अवयवांवर जास्त भार द्यायचा नाही. अनेकवेळा सर्वजण छोटासा  प्रयोग करतात आणि तो खूप उपयोगी ठरतो. ज्यांना सततचा चष्मा आहे त्यांनी तो थोडावेळ काढून ठेवला कि अतिशय हलकं आणि ओझं उतरल्यासारखं वाटतं, हायसं वाटतं. हा अनुभव बहुतांशी सर्वांनीच घेतला असेल कधी ना कधी. चष्मा काढला कि फक्त कानालाच नाही तर नाकाला आणि डोळ्यांना देखील हायसं वाटतं. दररोज वापरात असल्यामुळे आणि सातत्याने कामाकडे लक्ष असल्यामुळे चष्म्याचे वजन जाणवत नाही. पण खूप वेळ काम झाल्यावर किंवा कचेरीतून घरी पोचाल्यावर, म्हणजेच त्या दिवसाचे काम संपल्यावर ते पिटुकले का होईना ओझे जाणवते निश्चित. म्हणूनच असेल कदाचित काही जण एक तर शश्त्रक्रिया करून घेतात, किंवा लेन्स आत घालून घेणे पसंद करतात शक्य असल्यास किंवा लेन्स वापरतात. म्हणजे डोळ्यांना मस्त दिसेल आणि कान + नाकावर भार येणार नाही. बरेच फ्रेम्स आता पिसासारखे हलके पण उपलब्ध आहेत, खूप महागडे पण आहेत.  असो.  


अनेकदा मी छोट्या मुलांना पालक शाळेत सोडतांना बघते. छोटे म्हणजे नुकतीच शाळा सुरु केलेले असे. दुचाकी वर स्वार होऊन जातांना नजरेस पडतात हे पालक आणि मुले. बहुतांशी सर्व मुले देखील काळा चष्मा परिधान केलेले असतात. इतक्या लहान वयात काय गरज आहे चष्म्याची? माझ्या तरी आकलनाच्या पल्याड आहे हे. दररोज ते देखील दुचाकीवर जातांना तो वयाच्या आणि चेहेऱ्याच्या मानाने अवजड चष्मा टाळणे सहज शक्य आहे. रस्त्यावरून जातांना खाच खळगे लागणार, त्यामुळे कदाचित तो चष्मा अजूनच किंचित आपटला जाणार. आणि होऊ नये पण दुखापत होण्याची शक्यता किंवा मार लागण्याची शक्यता नाकारता येणार नाहीच.  कारण नसतांना अवेळी हे उगाच ओझं कश्यासाठी मग? बघा जमल्यास टाळा. नंतर मग सगळे तज्ज्ञ डोक्याचा भुगा करतात कि नक्की कारण काय काही आजार उद्भवले तर. मूळ अनेक वर्षांपूर्वी पण पेरलेले असू शकते अश्या काही कारणांमुळे. 

आमच्या वेळी तर इतकी कडक शिस्त होती म्हणून सांगते कि शाळेत उपयोगी अश्याच गोष्टी दप्तरात किंवा स्वतः सोबत बाळगायच्या, अवांतर नाहीच. अर्थात खूप वर्ष निघून गेलीत मधे. तरी मनाला ते पटत नाही कारण ते अवास्तव आहे, निरूपयोगी आणि उपद्रवी असे आहे म्हणून.   

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

हरी योगा

मी अगदी योग्य आदर राखून हे माझे विचार येथे मांडते आहे. 

हरी शिवाय तर पान देखील हलतं नाही, अशक्यच आहे ते आणि हे सर्वश्रुत देखील आहे. मग उगाच लोकं "मी केलं" असं का म्हणतात कोणास ठाऊक. असो. त्यांचं त्यांच्या बरोबर. 

तर गेली अनेक वर्षे मला स्वतःला योगा हा व्यायाम प्रकार जमला करायला. काही दिवस मी गेले क्लास ला कारण असं ऐकिवात होतं कि एकट्याला योगा करणं अशक्यच आहे, कदापि जमणे नाही, त्यामुळे वेळेचे नियोजन झाले आणि मी ग्रुप क्लास केले. हळूहळू अनेकविध गोष्टी घडत गेल्या आणि मी घरीच योगा करणं पसंद केलं कारण योगा होणं महत्वाचं होतं. जमलं एकट्याने करायला कारण तेवढा पण अवधी किंवा उसंत नव्हती विचार करायला कि मी एकटी योगा करते आहे.  तो होतोय आणि त्याचा बहुआयामी उपयोग होतो आहे हे जास्त महत्वाचे ठरले माझ्यासाठी. मी प्रत्येक योगाचा प्रकार करून बघितला, अनुभवला आणि फारच अत्यानंद पण उपभोगला त्याचा. अदृश्य परिणाम जाणवले. त्या सगळ्या प्रकारात होते अष्टांग योगा, अय्यंगार योगा, पतंजलीचे वेगळे मार्ग, क्लास मधे शिकवलेले, माझ्या गुरूंनी करून घेतलेले, खुर्चीवरचे, आणि हि यादी भली मोठी आहे. हे सगळं करतांना मी अजून एक योंग प्रकार करतंच होते पण त्याचं वेगळं नाव असेल किंवा त्याला वेगळ्या नावाने संबोधावं हे कधीच मनात आलं देखील नाही हो. माझ्या हातून सगळं घडत राहील एवढंच. पण आज अचानक पुन्हा एकदा योगसाधना करत असतांना कुठून कोणास ठाऊक एक सौंज्ञा डोळयांसमोर उभी ठाकली, "हरी योगा". दररोज गेली अनेक वर्षे माझ्या हातून घड्याळ्याच्या काट्याकडे लक्ष ठेवून, सतत कोणत्या ना कोणत्या वेळापत्रकाचा विचार डोक्यात आणि डोळ्यासमोर ठेवून हात, पाय, डोकं आणि इतर अवयव हालचाल करत होते. आज फक्त एवढंच, उद्या फक्त तेवढंच, आता पुरे, पळते आता आणि इतर असे अनेक घटक, अत्यंतिक महत्वाचे असायचे. त्यामुळे तो हरी योगा कधी सुरु व्हायचा आणि कधी, कसा संपायचा कोणास ठाऊक. पण तरी देखील समाधान आणि आनंद होताच. 


आता "दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे" असं काहीसं झाल्यामुळे मी अगदी हवेत आहे. "आकाशात घिरट्या घालणे" म्हणजे नक्की काय ते मनापासून अनुभवते आहे.  पंख नसतांना उडणे सुरु आहे. कुठलेही आणि कुणाचेही वेळापत्रक मला आता साद घालत नाही आहे.  त्यामुळे मग प्रत्येक नस, अणुरेणू आणि अवयवांशी सुप्त संवाद साधत, तो ताण श्वास - उश्वासावर संपूर्ण भर देत योगसाधना उपभोगते आहे. तेव्हा "नाहरी" योगाची माहिती पटली. "स्वानुभवातून आत्मप्रचिती" म्हणतात ना ते तसं, काहीसं थोडक्यात. 


बघा म्हणजे दोन नवे योगाच्या प्रकारांना नामकरण करण्याकरता मला पंख अनुभवावे लागले, झोका झुलावा लागला आणि टाइम टेबल बाजूला सरावे लागले.  हे आधी पण सहज करता आलं असतं मला पण ते ठाऊक नव्हतं म्हणा किंवा तेवढा देखील वेळ नव्हता विचार करायला. चला तर मग तुम्ही हरी हरी करा मी नाहरी योग (no hurry yoga) अनुभवते. 

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

रंगछटा

लहानपणी पासून कानावर पडलेली एक म्हण "पाणी हेच जीवन". ह्या म्हणीला, वाक्यांशाला एक सुंदर आणि गहन अर्थ आहे. अनेक पैलू आहेत ह्या वाक्याचे. मला गवसलेला नावीन्यपूर्ण अर्थ असा. 


थोडक्यात नमूद करायचं झालं तर आज माझे फारच जवळचे जिगरी दोस्त त्यांची उपस्थिती दर्शवत होते, जाणीव करून देत होते. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव  हे सातत्याने करून देत होते आणि माझी कामं नेहेमी प्रमाणे गोगल गाईच्या संथ गतीने पुढे सरकत होती. प्रत्येक दिवस वेगळा आणि नाविन्याने भरपूर आणि परिपूर्ण असा असतो माझ्यासाठी.  आज देखील होता. इतका मस्त कि ज्याचं नाव ते. माझ्या मार्गावर आज एका भलत्याच ठिकाणी गाडी लावणं होतं. मग एक उंच चढाव चढावा लागला, रॅम्प हो, तदनंतर कोणासाठी तरी खास अशी भेटवस्तू घेण्याची धडपड होती. त्या ठिकाणी पोचण्याकरता १० एक पायऱ्या चढाव्या लागल्या. पट्टदिशी भेटवस्तू घेतल्यावर मग पुन्हा रॅम्प पुन्हा चढून उतरून, भलामोठा वळसा घालून गाडी गाठली. त्या नंतर पुन्हा एक मजला चढावाच लागला कारण उद्वाहक अक्का लिफ्ट बंद होती. मग काय सुरु झाले माझे घट्ट मित्र बोलायला. 


आधी दुपारी लिंबू पाणी सेवन केलं, मग पौष्टिक जेवण, त्यानंतर ताक. संध्याकाळी गवतीचहा युक्त वाफाळलेला चहा. रात्री नारळ पाणी आणि मग कडत पाण्याने शेक असा प्रवास झाला तेव्हा कुठे दोघे जरा नरमले. पाण्याचे महत्व पुन्हा एकदा नजरेस पडले आज. त्याच्या वैविध्य छटांमुळे त्याची उपयुक्तता वाढवली, वृद्धिंगत केली. हे सगळे माझ्या पायांना फार फायदेशीर ठरले आज. सर्वांना शतशः धन्यवाद. 

पाठिराखा

हा शब्द आणि त्याचा शब्दप्रयोग मी अगदी शाळेत असतांना शिकले होते. तेव्हा आमच्या मराठीच्या शिक्षिकेने सांगितलेला अर्थ म्हणजे देव. तो जो आपली सर्वांची सातत्याने रक्षण करतो. प्रेत्येकाचा लेखा जोखा त्याच्या कडे असतो आणि तो बारकाईने लक्ष ठेवतो, पाठराखण करतो. आणि हे त्रिवार सत्य आहेच. ह्याचा अनुभव मला इतकी वर्ष सलग आला आहे. पण ह्या पल्याड जाऊन अजून एक पण ह्या शब्दाचा अर्थ असू शकतो किंबहुना ह्या नवीन जमान्यात तो जन्माला येऊ शकतो हे मला ठाऊक नव्हतं. पण मला तो उमगला. "त्याची" तुलना तर कोणाशीच होऊ शकत नाही. त्याच्या ऐवजी पण कोणी नाहीच. फक्त ह्या मराठी शब्दाचा अजून एक जाणवलेला अर्थ / उपयोग आहे. एवढंच. 


पुणे हे दुचाकीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं हे म्हणणं सपशेल चुकीचं ठरेल. पुणे हे दुचाकींचे शहर आहे. आताशा काय गेली ५-१० वर्षे जेथे बघावं तेथे सगळे दुचाकी स्वार. पहाट म्हणू नका, दिवस, दुपार, संध्याकाळ आणि हो शनिवार रविवार तर उधाण येतं ह्या सर्वांना. अगदी लहान वयातील, ते मध्यम आणि जेष्ठ देखील. काही दशकांपूर्वी चाकरमाने मजल दरमजल करत कसे तरी कचेरी गाठायचे ह्या दुचाकींवर. आणि आता हजार ते लाख ह्या अश्या किमती आहेत. असो. तर अश्या ह्या भव्य दिव्य, "विनाकारण राजकारण" सायकली चालवायच्या म्हणजे त्याच्या किमतीला शोभेल असे गणवेश, खास कपडे, भारी कपडे आलेच. अर्थात हे असे कपडे अत्यावश्यक हो. बरीच कारणे आहेत त्या मागची. एक म्हणजे कल, शैली अक्का स्टाईल ई. अहो म्हणजे ते तसे कपडे घातलेच पाहिजेत. असो. त्या सदऱ्याला एक खिशा असतो, मोठ्ठा, आडवा आणि त्या खिश्याच तोंड उघडं नसतं. इलास्टिक / स्थितिस्थापक लावलं असतं. तो खिशा खास विचारपूर्वक तय्यार केलेला असतो.  म्हणजे मग त्यात माणसाचा सर्वात महत्वाचा एक अवयव ठेवण्यात येतो. मोबाईल ला व्यवस्थित पहुडता यावं म्हणून राखीव जागा असते ते.  तो आहे ह्याची सतत जाणीव व्हावी म्हणून तो अगदी पाठीला चिकटून स्थापित केला जातो. दुचाकी चालवतांना होणारे अपार कष्ट जे सुदृढता राखण्यास मदत करतात  ते क्षणोक्षणी टिपण्याचे काम हा अवयव करत असतो. त्या दिवशी ठरवलेलं किंवा कुणी निष्णात माणसाने सांगितल्या प्रमाणे लक्ष गाठलं रे गाठलं, दुचाकी वरून उतरल्या उतरल्या आधी दर्शन ह्या अवयवाचे. कदाचित त्याला घाई झाली असते हो शाबासकी द्यायची आणि दुचाकी स्वाराला ती घ्यायची.  आणि मग तेथेच सर्वत्र पसरावयाचं कि आजची घौड दौड. 


तर असा हा पाठिराखा. सदोदित सोबत असणारा असा. "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". प्रत्येक अन प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे नोंद ठेवणारा. स्वतःला माहिती नाही इतकी जास्त माहिती नमूद केलेला, करत राहणारा, आतली बाहेरची सगळी कडची. आहे कि नाही गम्मत आणि नवीन अर्थ शब्दाचा. पाय व्यग्र दुचाकी चालवण्यात, हात ती रस्त्यावर नीट उभी ठेवण्यात व्यस्त, घामासाठी आणि स्टाईल म्हणून बाकी ठिकाणी ठेवता येणं अशक्य म्हणून मग ती पाठीची जागा. 

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

तो रिकामा रकाना

१९९५ पासून ते २०२३ पर्यंत, मधे साधारण एखाद वर्ष वगळले तर मला दोन रकाने सातत्याने भरलेले दिसायचे. रकान्यातले सगळेच खाणे नाही तरी बहुतांशी ये-जा असायचीच. किंबहुना ह्या सगळ्या खाणे आणि रकान्यांनी एक नकळत सवय लावली मला. भरलेले, बहरलेले रकाने बघायची, अनुभवायची आणि त्यामुळे शांत राहण्याची. शांत म्हणण्यापेक्षा स्थिर. एक भरोसा होता कि ते रकाने भरत राहणार आहेत. हालचाल होत राहणार आहे. ती हालचाल, किंवा त्यातला एखादा देखील रकाना कधी रिकामा होईल हे स्वप्नात देखील अनुभवलं नव्हतं. कधीच होणार नाही हि खात्री होती. तो भरोसा दांडगा होता. मला माझ्यात ती शक्ती त्याने बहाल केली होती. डोकं चालू ठेवलं होतं आणि पराकोटीची त्याची कृपा कि सर्वांपासून तसं बघितलं तर अलिप्त पण ठेवलं होतं. एक स्वच्छंद राहण्याची सवय तरी देखील हात राखून सगळे व्यवहार. 


पाच वर्षांपूर्वी एक दिवस आला आणि मार्ग बदलला. हळू हळू अनपेक्षित बदल घडत गेले, डोळे खाड्कन उघडतं गेले आणि वेगळे ना भूतो ना भविष्यती असे अनुभव, प्रसंग उभे ठाकले. माझे सर्व प्रेमळ सहपाठी, कचेरीतले, घराजवळचे, शाळेतले, इतर मित्र-मैत्रिणी सर्वतोपरी धावून आले, प्रचंड प्रोत्साहन दिलं. त्यामुळे गाडी रुळावर आली पण संथगतीने, संथगतीसोबत. ते देखील पचवायची ताकद दिली त्याने. आणि आता मात्र त्या दोन रकान्यांपैकी एक रिकामा झाला. भरेल संथगतीने ह्यात शंका नाहीच. पण रिकामा रकाना बघायची सवय नाही. रिकामा रकाना बघावा लागेल कधी मला हे माझ्या खिजगणतीत नव्हतंच. अर्थात हे पचवण्याची ताकद देखील तोच देईल ह्या वर २०० टक्के खात्री आहे. मी वाट बघत नाही पण अनेक महिन्यांपासून एक फुलाच्या पाकळी एवढी रक्कम येऊ घातली होती. माझ्या डोक्यातून निघूनच गेली होती. आज लक्षात आलं म्हणून तपासून बघितलं. हा महिना, मागचा महिना, पण नाही, रकाना रिकामा होता. पुढील महिन्यात येईल ह्याची खात्री आहे आणि आता पाकळी पेलायचीच ताकद उरली आहे. त्यामुळे येणार, सातत्य राहणार त्यात आणि गोगलगाई सारखी गती मिळणार हे निश्चित. तो पाठिशी असतांना मी कोण काळजी करणारी हो. पण ह्यातून एक लक्षात आलं कि अगदी जे आपले असतात, अगदी प्रेमाचे, जवळ पेक्षा जवळचे अश्यांचे रकाने रिकामे राहू देऊ नयेत कधी. फुलाची पाकळी द्यावी ताकद असल्यास. आज माझे आई आणि बाबा हयात असते तर त्यांनी हे निश्चित केलं असतं कुठेही गवगवा न करता, आपसूक. माझ्यात देखील त्याने ताकद द्यावी, टिकवावी म्हणजे मला कोणाला तरी रकाने भरायला मदत करता येईल, ताकदीप्रमाणे. "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" आज समजला आणि उमगला ह्याचा अर्थ.  

ह्याचा अर्थ असा नाही कि काहीही करून फक्त तो रकाना भरण्यासाठी आटापिटा करायचाच, नावडीचे काम करत आणि जुंपलेले राहायचे. शारीरिक आणि मानसिक क्षमते बाहेर जाऊन गाडी चालू ठेवायची. नाही. त्यामुळे रकाने अजून सपाट्याने रिकामे होऊ शकतात. त्यामुळे सजग राहा आणि योग्य ते कर्म करत राहा. 


स्वानुभवातून आत्मप्रचिती

अगदी ताजी आज सकाळची गोष्ट, अनुभव, पिटुकला पण महत्वाचा. मला आज दुपारी आणि संध्याकाळी बाहेर जायचे आहे काही कामानिमित्य. त्यामुळे सकाळची ताजी हवा खायला, मित्र मैत्रिणी, आप्तस्वकियांशी भेटायला मिळणार नाही, खाली चक्कर मारायला जाता येणार नाही हे त्रिवार सत्य होतं. इतक्यांदा खाली वर करायला आता माझे पाय मला परवानगी देत नाहीत. हरकत नाही. इतकी वर्ष दिली हे खूप झालं. बऱ्याचश्या गोष्टी मार्गी लावल्या त्याने. मग पर्याय काय. सकाळची ताजी हवा तर हवी होती. लांब श्वास, खोल श्वास आणि त्या प्रदूषण-विरहित, शुद्ध हवेशी संवाद साधायचा होता. भली मोठी खिडकी ची जाळी ची बाजू उघडी होती, मी अगदी जाळीजवळ जाऊन खात्री करून घेतली तरी हवा जाणवत नव्हती. म्हटलं काय करावं? मग ती जाळीची बाजू सताड उघडली तर जादूच झाली जणू. ती शुद्ध हवा जशी काय वाटचं पाहत होती कि कधी मी ती जाळी उघडते आणि तिला आत घेते, तिचं स्वागत करते, तिला अनुभवते, पूर्णपणे, मनसोक्त. तो जगावेगळा अनुभव घेण्यात मी इतकी गुंग झाले कि ज्याचं नाव ते. मग विचार केला काय घडलं नक्की. तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. ती जाळी, इतक्या बारीक आकाराची आहे आणि मी स्वतःच आता घरी असल्यामुळे जमेल तशी साफ करत असते. माझा हात नेहेमीच फिरत असतो त्यामुळे धूळ बसत असली तरी जाळ्या नाहीत किंवा खूप धुळीने माखली नाही ती जाळी. तरी पण बघा ना, साधी हवा यायला तिने अडथळा निर्माण केला. 


थोडक्यात काय माझ्या चार डोळ्यांना ती अतिसुक्ष्म जमलेली धूळ नजरेस पडली नाही. किंवा असे धुळीचे कण देखील जाळीचे चौकोन बंद करू शकतात हे ध्यानात नाही आलं माझ्या. पण बघा जे दिसतं नाही ते उभं असतं प्रत्यक्षात. 


ह्या कथेचा गमक असा कि १. सातत्याने न चुकता जाळे, जळमटं, अतिसुक्ष्म धुळीचे कण, अडथळे दूर करा, दूर सारा. ते दूर सारण्यासाठी देखील वेळ द्या, कष्ट करा. २. हे असं नाही केलं तर तुम्ही शुध्दते पासून दूर राहाल. ३. जगावेगळे स्वानुभव मिळणार नाहीत. जे स्व-प्रगती करता, सुधृढ राहण्याकरता बहुमूल्य ठरतात.  


तर चला उठा आणि लागा कामाला पदर खोचून ताबडतोब.  

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

मस्त बदल

माझी राणी, माझी प्रिय गाडी सध्या फक्त एकाजागी उभी असते. मी इतक्यातच स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे तिचा पण दिनक्रम बदलला पूर्णपणे. पण तरी देखील मी माझ्या पायांना व्यायाम म्हणून, गाडी चालवायची सवय राहावी म्हणून, गाडी चालवत ठेवावी म्हणून आणि ताजी हवा खाण्यासाठी जमेल तेव्हा तिला बाहेर काढतेच, बहुतांशी सकाळी, कारण रहदारी जराशी कमी असते. कधी देवळात तर कधी बाजारात तर कधी विनाकारण चक्कर असे माझे प्रकार सध्या सुरु आहेत. त्यात मला सर्वांशी पोटभर गप्पा मारायला प्रचंड आवडतात आणि हि माझी राणी तर माझं कित्येक वर्ष ऊन, वारा, पाऊस, थंडी ह्या सर्वांपासून फक्त रक्षणच करत नाही तर मला हवं तेथे हवं तेव्हा नीट ने आण करते आहे सातत्याने गेली कित्येक वर्ष. मग अश्या माझ्या राणीशी मी नाही बोलणार हे अशक्यच ना. सुरवातीला मी फक्त गाडी चालवणं ह्याचा उपभोग घेतला. मग विविध रस्ते न्याहाळले. अनोळखी रस्ते पादाक्रांत केले, नवीन दुकाने, त्यांचे फलक ई. बघण्यात मज्जा आली आणि तदनंतर मग राणीशी संवाद साधणारच इतक्यात जणू काही तिचाच मला फोन आला हो. तिला बोलायचं होतं म्हणे. म्हणते कशी, इतकी वर्ष सतत एकाच मार्गावर आपण जात-येत होतो. तोच रास्ता अगदी क्वचित बदलत होता. पण आता नवनवीन रस्ते, सावकाश आनंदाने आणि कुठलीही घाई न करता चालवणे / चालणे मी पण खूप म्हणजे खूप एन्जॉय करते आहे, थँक यू. 

अगदी तस्सेच आज पुन्हा एकदा घडले. माझी एक मैत्रीण आहे तिने मला एक योगाच्या व्हिडीओ ची लिंक काल पाठवली आणि हक्कने म्हणाली कि बघ आणि कर पण. सलग चौदा दिवसांचे आव्हान आहे, ते नक्की कर. म्हटलं काय हरकत आहे, फायद्याचं आहे, घर बसल्या करायचं आहे आणि इतक्या प्रेमाने सांगितलं आहे, तो शिक्षक प्रचंड लोकप्रिय आहे, मग चला. आणि आज बरोबर साडे सहा ला सकाळी मी योग करायला सुरवात केली. तो म्हणेल तसे पण मला मानवेल तसे देखील, म्हणजे माझ्या पायांना साजेसे बहुतांशी सगळेच प्रकार मी केले. आणि महद आश्चर्य घडलं. पायांचा ताबडतोब फोन आलाच. रोज तेच तेच व्यायाम प्रकार करून आम्ही बदलाची वाटच बघत होतो आणि तो आज तू दिलास, अहाहा च. मज्जा आली. 

तर असे हे माझे सगळे, प्रेमाने आणि ताबडतोब निरोप देतात किंवा धाडतात हो, आणि ते मला ऐकू पण येतात, फ्रिक्वेन्सी किंवा कंप्रता कसली जुळली आहे म्हणून सांगते आमची. 

त्या माझ्या मैत्रिणीला, त्या योग गुरूला, यू ट्यूब ला, इंटरनेट ला, मोबाईल ला सर्वांना शतशः मनापासून धन्यवाद. बदल मस्त आहे.  

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

कंपने / लहरी

पुण्यातल्या सोमेश्वरवाडी ह्या भागात माझं वास्तव्य आहे. ह्या भागाला सोमेश्वरवाडी संबोधलं जातं कारण ह्या परिसरात श्री. सोमेश्वरांचं मंदिर आहे, पुरातन असं. त्या मंदिराची एक प्रथा आहे. मी ह्याची साक्षीदार आहे २००५ पासून, तब्बल १८ वर्ष झाली. दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता मोठ्या आवाजात ध्वनियंत्रणा लावून आरती केली जाते, ऐकवली जाते. सुंदर उपक्रम आहे, त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्याच रहिवासांच्या कानावर आरती पडते आणि ती स्पंदने, कंपने, त्या उत्कृष्ट लहरी अनुभवता येतात आपसूक, काहीही न करता, घरी बसून. इतक्यातच मी ते प्रकर्षाने अनुभवायला सुरवात केली. सगळं प्रकर्षाने जाणवायला लागलं, त्या लहरींचे साक्षीदार होता आलं. नाहीतर आधी सकाळची आरती तर कधीच ऐकू यायची नाही कारण बरोबर ८ वाजता किंवा त्या आधीच मी कचेरीत प्रवेश केलेला असायचा. आणि रात्री ८ वाजता कचेरीतुन आल्यावरची रेंगाळलेली कामे, स्वयंपाक किंवा अभ्यास ई. मध्ये तितकसं लक्ष कधीच गेलं नाही आणि त्यामुळे मी त्या स्वानुभवांना मुकले, त्याची प्रचिती घेता आलीच नाही. त्याचं महत्व कधीच पटलं नाही. पण आज तो फरक जाणवतो आहे. मला एक प्रश्न विचारतात आताशा "मग आता काय? काय करता फावल्या वेळात? निवृत्ती नंतर काय?" माझी एक मोठी यादी तय्यार आहेत ज्यात दररोज निर्माण होणाऱ्या ह्या लहरींमधे अक्षरशः नहाणं अग्रगणी आहे. कधी कधी तर मी प्रत्यक्ष अनुभव घेण्यास मंदिरात पण पोचते. अहाहा च. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". 


गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

दगडाचे बांधकाम

आदरणीय जिजामातांच्या हातचं एक बांधकाम म्हणजे आमच्या सोमेश्वरवाडीचं देऊळ / संस्थान. अर्थात मी असं ऐकलं आहे त्या संस्थानाबद्दल, कि ते कित्ती पुरातन आहे ते. अनेक वर्षे मी त्या देवळात जाते येते आणि ते संपूर्ण दगडी बांधकाम बघते देखील. म्हणजे भिंती, पायऱ्या, आजूबाजूचा परिसर, वृक्षांभोवती बसण्यासाठी किंवा त्यांच्या संगोपनासाठी बांधलेले कट्टे देखील दगडांचे आहेत. एक एक दगड भला मोठ्या आकाराचा आहे आणि अर्थात जड देखील असणारच. त्यामुळे कदाचित आणि मागे नदी वाहात असल्यामुळे, झाडं झुडपं असल्यामुळे देखील एक अनोखा थंडावा आहे देवळात, गाभाऱ्यात आणि  संपूर्ण परिसरात. आज दर्शनाकरता गेले असतांना एक नवीन अनुभव आला, किंबहुना जागृती झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज नव्याने समजलं मला कि देवळात अनवाणी का जायचं आणि हे देऊळ इतक्या सुंदर संकल्पनेवर का उभारलं आहे ते, म्हणजे दगडांचा सदुपयोग सर्वत्र. माझ्या दृष्टीने अक्युप्रेशर अक्का सर्व मर्मबिंदू यथोचित दाबले जावेत म्हणून. आणि अर्थातच हे घडल्याने मग सगळेच सुदृढ राहणार ह्यात शंकाच नाही. केवढा तो पुढचा विचार, काय ती दूरदृष्टी, अद्भुतच. 

देवाचं वास्तव्य आहे, तेथील लहरी जगावेगळ्या आहेत, एक भक्तिमय वातावरण आहे आणि चुंबकीय परिणाम देखील, ह्या सर्वांच्या परे, आणि जास्तीचे ते विचारपूर्वक केलेले बांधकाम. दररोज किंवा नेहेमी जाऊन, प्रदक्षिणा घालणे स्वास्थ्याचे नक्की ठरणार. त्यावेळी बरं झालं सिमेंट ने जोडणाऱ्या आधुनिक गुळगुळीत  फारश्या नव्हत्या ते. आताशा अंगण नाही, घरी दारी सातत्याने पायात वहाणा, आणि अत्याधुनिक गुळगुळीत फारश्या मग पायांचे काही प्रमाणात आजार होणारच, परिणाम / दुष्परिणाम दिसणारच / दिसत आहेत. म्हणून जमल्यास ह्या आमच्या देवळात या, जेथे कोठे असे दगडी बांधकाम आहे तेथे जा, थोडेसे अनवाणी फिरा, जे देवळाचा परिसर आरशासारखा लख्ख ठेवतात त्यांना मनापासून धन्यवाद द्या, कदाचित फायदा होईल. आणि हो, सोमेश्वरवाडी देवळात तर याचं पण माझ्या घरी गप्पा मारायला / टेकायला यायचं विसरू नका.  

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

मानवलंय

एक सौंज्ञा कानावर पडायची नेहेमीच "लग्न झाल्यावर मानवलंय", "बाळंतपण मानवलंय", "सासर मानवलंय" ई. मानवलंय म्हणजे जे सर्वश्रुत आहे तेच, वजन वाढलंय, तेज आलंय, आनंदी आनंद आहे चोहीकडे, सगळे खास काळजी घेत आहेत असे बरेच काही. आपलं शरीर म्हणजे प्रचंड हुशार, ताबडतोब व्यक्त होतंच. थोडसं काही चांगलंचुंगलं तोंडात टाकायला मिळालं कि, चार चांगले स्वर कानावर पडले कि, उत्कृष्ट नाही तर आनंदाचे शब्द ऐकायला आले कि, बास. कांती चकाकायला काय लागते, उगाच हसू काय येत, चार घास जास्त काय जातात आणि परिणामी होत्याचं नव्हतं होत, गुटगुटीत दिसणं. वजन काटा नंतर दर्शवतो आधी कपडे बोलायला लागतात. आज हा विषय अतिशय महत्वाचा ठरला माझ्या साठी कारण सध्या मला देखील मानवलंय काही तरी. छे छे, वर दर्शविल्या सारखं काहीच नाही, वेगळ्या धाटणीतलं काही तरी, वेगळ्या पठडीतलं असं. माझ्या बाबतीत घडलंय मग वेगळं असणारच नाही का? तर सध्या मला माझं निवृत्त होणं मानवलंय, खूपच, इतकं कि ज्याचं नाव ते. मस्त गोलमटोल. का सांगू? अहो काही तरी काम हवं का नक्को. आता हे वाढीव प्रकरण कमी करणं हे घरबसल्या मोठं काम. 

चला तर मग, लागते कामाला.  "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ची उलटी नवखी बाजू". 

 

स्वभाव

आज सकाळी माझं आणि माझ्या मावशीचं झालेलं संभाषण मला एक लिहायला कारण देऊन गेलं. त्यांनी डाळीचा कुकर लावला, नेहेमी प्रमाणे शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला, उघडून बघतात तर काय डाळ शिजली नव्हतीच. झालं आधीच आमच्या मावशींना सतत म्हणजे सतत स्वतःशी बडबडण्याची सवय आहे त्यात आता हे कारण मिळालं. त्यांचं पुढचं काम हे समीकरण असतं. मग काय बिच्चारी डाळ, तो गलितगात्र कुकर, गॅस, पाणी, आणि सगळ्या म्हणजे सगळ्यांना लाखोली मिळणार होती, पण माझी तेव्हा नेमकी स्वयंपाक घरात उपस्थिती होती, ती त्यांना जाणवली आणि त्या कश्या तरी नाईलाजाने गप्प राहिल्या. मग त्यावर मी त्यांना म्हटलं, डाळीचा पण एक स्वभाव असतो. तुम्हाला आता ठाऊक आहे कि हि डाळ शिजत नाही, मग तुम्ही काय जास्तीचे प्रयत्न करत आहात? मला तर काहीच दिसत नाही. व्यवस्थित हिंग हळद घाला, थोडसं तेल मीठ घाला, गरम पाणी घाला थंड च्या ऐवजी, गरम पाण्यात तुम्ही आलात कि ५-१० मिनिटे भिजवून ठेवा, त्या डाळीशी धुतांना संवाद साधा आणि तिला सांगा नीट शीज म्हणून, एवढं आलटून पालटून करा आणि बघा ती कशी शिजत नाही ते. गेले ते दिवस जेव्हा फक्त एक वाण्याकडून वर्षानुवर्षे सामान आणलं जायचं. त्यामुळे त्या वाण्याकडच्या डाळीचा स्वभाव माहित झालेला असायचा. आता तसं नाहीच. वैविध्य प्रकारच्या डाळी येतात. एका पुड्यात एकाच शेतकऱ्याची, एकाच शेतात उगवलेली डाळ असेल असं नाहीच. विविध डाळी वैविध्य ठिकाणांहून एकत्र केलेल्या असण्याची दाट शक्यता आहे, कारण सरते शेवटी हा धंदा आहे. 

ह्या पिटुकल्या संवादावरून मग मला अनेक जणांचे स्वभाव आठवले, सगळे सजीव बरं का, पण काहींना दोन पाय, काही चार पायांचे तर काही बिना पायाचे देखील (हि डाळ, सजीवच नाही का? पेरलं कि नवीन डाळ जन्माला येतेच). दिवसागणिक देखील स्वभाव बदलण्याची उदाहरणे देता येतील सहज. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्थात फक्त माझ्या दृष्टीने हो, हवा तो परिणाम साधण्यासाठी आधी स्वभाव जुळावे लागतात. का माहित नाही, पण आज तागायत जेव्हा जेव्हा मी कुकर लावला तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी डाळ व्यवस्थित शिजली आहेच. तीच डाळ तोच कुकर तेच स्वयंपाक घर आणि तोच गॅस, पण फरक आहे. गम्मत आहे नाही सगळी स्वभावाची. 

आत्ता पर्यंत असंख्य आधुनिक गुरूंना ऐकलं आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात. ते त्यांच्या अगाध ज्ञानाने, प्रचंड अनुभवानुसार फक्त दोन पायांच्या च स्वभावाबद्दल सूतवाच्य करतात, बाकी सजीव जे आपल्या अवतीभोवती असतात त्यांचं काय? ते पण बोला कि मंडळी कधी. सगळं सुकर होईल.  

एक अनोखा आश्रम

माझ्या लहानपणी वर्गमैत्रिणी, खास मैत्रिणी, मैत्रिणीच्या मैत्रिणी, गल्ली मैत्रिणी अश्या अनेकविध पसरलेल्या मैत्रिणी असायच्या. त्यामुळे खूप जणींशी दोस्ती असायची, त्यांची खासियत समजायची, त्यांची साथ संगत लाभायची आणि खूप मज्जा यायची. अशीच एक माझी मैत्रीण. एवढ्यातच पुन्हा संपर्कात आली खूप वर्षांनी. ह्या सोशल मेडिया ची कमाल अजून काय. मग काय विचारात पुन्हा एकदा ऑनलाईन रमलो  जुन्या दिवसात. ती माझ्या पेक्षा बरीच मोठी, लग्न, संसार, मुलंबाळं सगळं आधी झालं, आणि आता स्वेच्छा निवृत्ती पण घ्यावी लागली काही कारणांनी. तिच्या सासूबाईंनी म्हणे तिचं लग्न झाल्यावर आणि त्यांनतर बऱ्याचदा एक वाक्य सांगितलं होतं कि स्वतःच्या पायावर नक्की उभी राहा, माझ्यासारखी राहू नकोस. अर्थात माझ्या नागपूरचं पाणी ते, मागे थोडीच पडणार होतं. घरचं जमेल तस्स सांभाळून चार पैसे पदरात पडतील ह्या कडे पण तिने लक्ष दिलं. आज आहे थोडी जमापुंजी गाठीशी. परवा बोलता बोलता बोलली ती, अर्थात मी काही विचारलं नव्हतं, पण तिनेच आपणहून सांगितलं म्हणून कानावर पडलं. म्हणते कशी, बरं झालं त्या शक्तीने, परमेश्वराने मला शारीरीक आणि मानसिक शक्ती प्रदान केली इतकी वर्ष कि आता मी माझ्या घरी "फुल ना फुलाची पाकळी" खर्च करू शकते, नियमीत कमाई थांबल्यावर देखील. उद्या कोणी म्हणायला नको कि फुकट खाते ते.  त्यापेक्षा आधीच भाडं दिलेलं बरं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. सिनियर सिटिझन आश्रमात गेलं तरी पैसे मोजावे लागणार, इतर जणांसोबत सामावून, समजावून घ्यावं लागणार आणि सरते शेवटी व्यवहार म्हणून घर / प्रॉपर्टी कोणाच्या तरी नावावर असावी लागते, उगाचंच का लोक आपलं हे आपलं ते मोजत बसतात कोणास ठाऊक. एवढं सोप्प आहे ते.  मग आपल्या माणसांसाठी किंबहुना स्वतःच्या हात-पायात जोर आहे हे सातत्याने जाणीव होण्यासाठी इथेच राहावे अलिप्त आणि वैविध्य तऱ्हेचे कार्य अखंड चालू ठेवावे "त्याच्या" मर्जीने. 

आत्ता समजलं मला, मुली नोकरी करण्यासाठी बाहेर पडण्याचं अजून एक कारण. 

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

आवड निवड

अगदी कळायला लागल्या पासून मी रंगसंगती जगले आहे. आईच्या मागे मागे राहून घरच्या अंगणातल्या बागेतली फुले जगवण्यास मदत केली आहे, हलक्या हाताने काळजीपूर्वक तोडून आणून ती देवाला वाहतांना आधी बघितली, आत्मसात केलं, लक्षात ठेवून मग वाहिली, आजतागायत सगळं म्हणजे सगळं लक्षात आहे, राहिलं आहे. मला बाकीच्यांचं माहिती नाही पण महाराष्ट्रात तरी बाप्पाला लाल फुल + दुर्वा, शंकराला पांढरं आणि बेल, श्री कृष्णाला तुळस, विठ्ठलाला देखील तुळशीचा हार, ई. प्रत्येक फुल हे देवाला वाहतात असे नाही. त्यामुळे ठरावीक फुलं शोधणे हे देखील आलंच. बाप्पाला लाल किंवा लालसर फुलं म्हणजे मग तगर, गुलाब, शेवंतीची एक जात, जास्वंद ई. आणि ह्यातलं कुठलंही. 

अगदी न कळत वयात हे सगळं आपण का शिकलो, का आपल्या दृष्टीने हे सगळं टिपलं, किंवा हे सगळं रंग, आवड निवड, ज्याला जे लागतं किंवा हवं तेच द्यायचं, किंबहुना वाहायचं हे दर दिवशी सकाळी घडलं, सणासुदीला प्रकर्षाने जाणवलं, त्यावेळी सर्वत्र एकसारखं वातावरण असल्यामुळे घरी आणि दारी पण तेच आढळलं हे का? ह्याचा उलगडा आज झाला मला, प्रकर्षाने. देव दिसत नाही, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर फक्त मूर्ती किंवा फोटो असतो तरी देखील आपण सर्व त्याची आवड निवड जपतो. त्यामागे एक श्रद्धा आहे, जवळीक आहे, आपलेपणा आहे, तो आहे ह्या वर विश्वास आहे, त्याची मनापासून / मनोभावे भक्ती केली कि किंवा यथासांग पूजा केली कि तो नक्की त्याचा आशीर्वाद आपल्या पाठिशी ठेवतो, पाठिशी सदोदित उभा राहतो, सगळ्या इच्छा पूर्ण करतो. 

ह्या बरोबर आपल्याला आई वडिलांनी, शिक्षकांनी, पुस्तकांमधून, थोऱ्या मोठ्यांकडून अजून एक मोलाची शिकवण मिळाली आहे कि सर्वात देव आहे (किंवा सर्वोच्च शक्ती म्हणा हवं तर). तो मानावा, त्याचं अस्तित्व सर्वत्र आहेच आणि कुठल्याही रूपात तो भेटतो, मदत करतो ई. मग जर असं सगळं आहे, तर प्रत्येक जण आपल्या संपर्कातल्या सर्वांना हवं नको ते का पाळत नाही, रंगसंगती का लक्षात ठेवत नाही, ह्या नाहीतर त्या प्रकारे तो रंग आणायचा आणि समर्पित करायचं ह्या कडे भर का नसतो, प्रत्येक वेळी? आणि ते देखील निरपेक्ष. लहानपणीची शिकवण विस्मृतीत जाता कामा नये कधीच. देव पण अडी अडचणीला मानव स्वरुपातच धावून येतो मदतनीस म्हणून. स्वतःच्या समाधानासाठी तरी सातत्याने करत राहिलं आपल्या शक्ती नुसार तर कित्ती सोप्पं होईल ना सगळं ? विचार आणि पटल्यास हळूहळू का होईना पण कृती / "प्रयोग" करून बघूया सगळे जण. काय म्हणताय मंडळी?  

सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

What's behind the name?

 I guess our smartest forefathers, with lots of thinking and foresight, suggested various religions. This division could be because of equal classification of work, labour, respect, and to prove that all occupations are important. With due respect to all religions, I am writing this as I heard the most uniquely different experience recently. No one knows who is driving the train, bus, or flying the aircraft; a chef or cook belongs to which religion; food production is done by which category of farmer; who baked bread for you; who milked the cow for the cup of tea in your hand? Above all, we breathe air, which is a mix of everyone's breaths, coming from and going out of the bodies of living beings from different religions. Everyone in India enjoys cricket on extravagant levels; all types of games are played against all different countries, including Pakistan. We cheer on marathon runners too. With all these tiny facts and figures, background, truths, and basic science, I was thrilled to know a resident of a Muslim-led city for ages is objecting to pronouncing a non-Marathi name for kids at home as a pet name or nice name, used very casually. Wow.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...