अगदी कळायला लागल्या पासून मी रंगसंगती जगले आहे. आईच्या मागे मागे राहून घरच्या अंगणातल्या बागेतली फुले जगवण्यास मदत केली आहे, हलक्या हाताने काळजीपूर्वक तोडून आणून ती देवाला वाहतांना आधी बघितली, आत्मसात केलं, लक्षात ठेवून मग वाहिली, आजतागायत सगळं म्हणजे सगळं लक्षात आहे, राहिलं आहे. मला बाकीच्यांचं माहिती नाही पण महाराष्ट्रात तरी बाप्पाला लाल फुल + दुर्वा, शंकराला पांढरं आणि बेल, श्री कृष्णाला तुळस, विठ्ठलाला देखील तुळशीचा हार, ई. प्रत्येक फुल हे देवाला वाहतात असे नाही. त्यामुळे ठरावीक फुलं शोधणे हे देखील आलंच. बाप्पाला लाल किंवा लालसर फुलं म्हणजे मग तगर, गुलाब, शेवंतीची एक जात, जास्वंद ई. आणि ह्यातलं कुठलंही.
अगदी न कळत वयात हे सगळं आपण का शिकलो, का आपल्या दृष्टीने हे सगळं टिपलं, किंवा हे सगळं रंग, आवड निवड, ज्याला जे लागतं किंवा हवं तेच द्यायचं, किंबहुना वाहायचं हे दर दिवशी सकाळी घडलं, सणासुदीला प्रकर्षाने जाणवलं, त्यावेळी सर्वत्र एकसारखं वातावरण असल्यामुळे घरी आणि दारी पण तेच आढळलं हे का? ह्याचा उलगडा आज झाला मला, प्रकर्षाने. देव दिसत नाही, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर फक्त मूर्ती किंवा फोटो असतो तरी देखील आपण सर्व त्याची आवड निवड जपतो. त्यामागे एक श्रद्धा आहे, जवळीक आहे, आपलेपणा आहे, तो आहे ह्या वर विश्वास आहे, त्याची मनापासून / मनोभावे भक्ती केली कि किंवा यथासांग पूजा केली कि तो नक्की त्याचा आशीर्वाद आपल्या पाठिशी ठेवतो, पाठिशी सदोदित उभा राहतो, सगळ्या इच्छा पूर्ण करतो.
ह्या बरोबर आपल्याला आई वडिलांनी, शिक्षकांनी, पुस्तकांमधून, थोऱ्या मोठ्यांकडून अजून एक मोलाची शिकवण मिळाली आहे कि सर्वात देव आहे (किंवा सर्वोच्च शक्ती म्हणा हवं तर). तो मानावा, त्याचं अस्तित्व सर्वत्र आहेच आणि कुठल्याही रूपात तो भेटतो, मदत करतो ई. मग जर असं सगळं आहे, तर प्रत्येक जण आपल्या संपर्कातल्या सर्वांना हवं नको ते का पाळत नाही, रंगसंगती का लक्षात ठेवत नाही, ह्या नाहीतर त्या प्रकारे तो रंग आणायचा आणि समर्पित करायचं ह्या कडे भर का नसतो, प्रत्येक वेळी? आणि ते देखील निरपेक्ष. लहानपणीची शिकवण विस्मृतीत जाता कामा नये कधीच. देव पण अडी अडचणीला मानव स्वरुपातच धावून येतो मदतनीस म्हणून. स्वतःच्या समाधानासाठी तरी सातत्याने करत राहिलं आपल्या शक्ती नुसार तर कित्ती सोप्पं होईल ना सगळं ? विचार आणि पटल्यास हळूहळू का होईना पण कृती / "प्रयोग" करून बघूया सगळे जण. काय म्हणताय मंडळी?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा