बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

व्यक्तिमत्वाची झलक

हे माझ्या बाबतीत अनेकदा झालंय प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रित्या. म्हणजे मी अनुभवलं पण आहे, वाचलं / ऐकलं आहे. माझ्या एका अगदी खास आणि अत्यंत जवळच्या मैत्रिणीचं लग्न ठरलं. अर्थात मी आमच्या काळातली हि पिटुकली गोष्ट सांगते आहे. तेव्हा ते अरेंज्ड केलेलं असं लग्न, होत. लग्न ठरलं, बोलणी झाली, साक्षगंध देखील झालं आणि एक दिवशी होणारे नवरा बायको आले समोरासमोर अतिशय व्यवस्थित ठरवून, वेळ, काळ, स्थळ ई. बूट/ जोडे घराबाहेर काढून आत यायची त्या वेळची पद्धत / अलिखित नियम होता. तसेच केले ह्या नवरदेवाने देखील. पद्धतशीर स्टाईल मधे पायात मोजे आणि एका पायावर दुसरा पाय अश्या पद्धतीने म्हणे तो बसला होता, इति माझी मैत्रीण. आणि मग तिला म्हणजे माझ्या मैत्रिणीला पेचात पडल्यासारखं झालं हसावं का रडावं ते कळत नव्हतं. विचारांचा कल्लोळ माजला तिच्या मनात. आज अगदी तस्साच नाही पण तत्सम प्रसंग माझ्या समोर घडला आणि माझी मैत्रीण अधिक अनेकवेळा वाचलेले / ऐकलेले प्रसंग डोळ्यासमोर झर्रकन उभे ठाकले.

आज मला भेटायला एक अतिशय तरुण, तडफदार, वित्त सल्लागार, भल्या मोठ्या जगविख्यात संस्थेतून शिकलेला ई. असा भेटायला आला, एक नाही, दोन नाही तीनदा विविध वेळा सांगून, ठरवून. आणि पुन्हा तेच, मी काहीही बोलण्याच्या आत एक चांगली सवय म्हणून व्यवस्थित बूट घराबाहेर काढले त्याने, आणि मला माहिती सांगणार तोच माझं लक्ष त्याच्या मोज्या बाहेर डोकावणाऱ्या पायाच्या अंगठ्या कडे सहज नकळत वेधलं गेलं. मग आमचं ठरल्या प्रमाणे बोलणं झालं ज्या करता आम्ही भेटायचं ठरवलं होत. पण मला अनेक वर्षांपासूनचे भरपूर प्रश्न पडले कि 

  • हा वेंधळा आहे का जास्त हुशार
  • कामात इतका झोकून  देत असेल कि मोज्यांकडे लक्षच नाही
  • का कंटाळा
  • का एकटा असेल, वेळ मिळत नसेल, पैसे नसतील, नवीन मोजे घ्यायला वेळ नसेल
  • का नवीन मोजे फाटले असतील....


सरते शेवटी मला काही म्हणजे काहीच पटलं नाही.

वेळ काढलाच पाहिजे, वेळेचं व्यवस्थापन जमलंच पाहिजे, तरुण आहेत तर तरुणांसारखं शिस्तीत वागलं पाहिजे, आणि हि जरी फारच पिटुकली गोष्ट असली तरी व्यक्तिमत्वार घाव घालणारी आहे / ठरू शकते. घराबाहेर पडतांना पहिल्यांदा स्वतःसाठी शिस्तीत बाहेर पडणं अत्यावश्यक आहेच. शिवाय बाकीचे देखील तुमच्याकडे बघतात, शिकतात, प्रेरणा घेतात ई. तर चांगलं उदाहरण म्हणून जगा, नवा रुपाला या. फाटलेला मोजा बरंच काही सांगून जातोय, त्यामुळे हातातून एखादी सुवर्णसंधी निसटू शकते सहज आणि हा स्वभाव जर घडला तर महागात पडेल, अजून अश्या अनेक सवयी / दार्शनिक गोष्टी घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. "असे अंगठे दिसती आणि स्मृती ठेवुनी जाती".

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

डॉक्टरांचे हस्ताक्षर

गेले काही महिने मी संपूर्ण एका डॉक्टर चमूला / वर्गाला तंत्रज्ञानाचे महत्व समजावून सांगते आहे, एक विषय शिकवते आहे. तो विषय शिकवायला सुरवातच करते मी एक वाक्य घोषित करून. वैद्यकीय आणि तांत्रिक शात्राचे अनोखे जणू लग्नच म्हणजे हा विषय होय. आणि त्या नंतर जसे शिकवणे सुरु होते तसे वैविध्य नवीन तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात कशी उपयोगी ठरू शकते, किंबहुना ठरते आहे हे उलगडून सांगत असते. बरेचसे अवघड आणि थोडेसे लक्षात ठेवायला कठीण असे ते शब्द असतात खरं आणि ते देखील डॉक्टर मंडळींना.

संपूर्ण आनंदात, मजेत आणि हलकंफुलकं शिकवण संपल आणि मग आली परीक्षेची वेळ. परीक्षा पण झाली आणि आले कि माझ्या कडे त्यांच्या उत्तरपत्रिका तपासायला. मी उडालेच अक्षरशः, एक म्हणजे मी बोललेले सगळे च्या सगळे मुलांनी उत्कृष्ट पद्धतीने लक्षात ठेवले आहेत आणि ते उतरवले देखील उत्तरात. आणि इतक्या सुस्पष्ट अक्षरात, अहाहा, डॉक्टर आणि सुवाच्य हस्ताक्षर हे थोडंस पटण्यासारखं नव्हतं मला पण मी हे विसरले होते कि हि डॉक्टर मंडळी  ह्या नवीन पिढीतील आहेत. आता काही अशक्य नाही, हे जुन्या पिढीचं समीकरण बदलले दिसतंय जी फारच चांगली सुरवात आहे. एका क्षेत्रात दिग्गज असलेल्या मंडळींनी नवीन क्षेत्रातले शिकणे म्हणजे फारच कौतुकास्पद आहे माझ्या दृष्टीने. अर्थात कुठल्याच क्षेत्रातल्या मंडळींना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाहीच म्हणावं आता, पण मला संपूर्ण तो विषय शिकवणे ते उत्तर पत्रिका तपासणे हा प्रवास फारच समाधान आणि अत्यानंद देऊन गेला. असेच डॉक्टर्स येती आणि स्मृती ठेवुनी जाती.


चार डोळे

मी सातवीत होते, आमच्या शाळेत वार्षिक संमेलन सुरु होत आणि घाईत पळत असतांना माझा पाय घसरला भल्यामोठ्या जिन्यातून आणि मी सरळ वर पासून शेवटच्या पायरीवर आदळले. खूप लागलं, डोळा कसाबसा वाचला आणि तेव्हापासून मला दोन नवीन डोळे प्राप्त झाले, दोनाचे चार झाले. तेव्हा पासून तो चार डोळ्यांचा प्रवास खूप काही शिकवून गेला. त्या वेळी डोळे तपासायला जायचे, मग नवीन चष्मा भेट मिळायचा आणि मग तो मिरवायचा हा नियमित उपक्रम होता, पण तो फारच आगळा वेगळा असा होता. का कुणास ठाऊक पण नवीन चष्मा करून आणला आणि तो परिधान केला कि त्या दिवशी किंबहुना दुसऱ्या दिवशी देखील नदीत चालल्यासारखं किंवा तळ्यात पडल्यासारखं च वाटायचं. बाप रे. कशामुळे कोणास ठाऊक. पण ते दोन दिवस इतके मज्जेशीर जायचे ना, वा, पर्वणीच जणू. असं मी का म्हणतेय? सांगते हो. मला निश्चित माहिती नाही पण आज खूप वर्षांनी मला हे प्रकर्षाने जाणवलं. आज देखील मी नवीन चष्मा करून घेतला, तो परिधान केला पण माझी पाऊलं अगदी सरळ पडली हो जमिनीवर, काही वर ना खाली, ना तळ्यात ना मळ्यात. आश्चर्यच आहे नाही? असं काय बदललं असेल? मी तीच, चष्मा तोच, जमीन पण तीच आणि पाऊलं देखील, मग तो अनुभव का बदलला?

असो, बरच आहे, आता जर नदीत पडल्यासारखं जाणवलं असतं तर ते परवडण्यासारखं नव्हतंच. आणि हो, ते जुने दिवस "झोपाळ्यावाचून झुलायचे" असेच होते ना, म्हणून असेल कदाचित. पण एकाच जगण्यात दोनाचे चार होणे, वैविध्य प्रकारचे असंख्य कंदील घालता येणे, नदी ते जमीन ह्या चालण्याची मजा चाखता येणे हे बहुतांशी तंत्रज्ञानामुळे साध्य झाले असावे. अशीच तंत्रज्ञानाची उत्तरोत्तर प्रगती होवो हि सदिच्छा.

२१

एकेवीस हा तर आपल्या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असा आकडा. अर्थात सगळेच आकडे उत्तमच असतात, जसं बघू तसं आहेच, पण आज २१ बद्दलच लिहायचं ठरवलं म्हणून ती सुरवात केली हो. ह्या वर्षा च्या सुरवातीलाच अंदाज बांधला होता कि बाप्पाच्या कृपाशीर्वादाने हे देखील वर्ष भन्नाट जाणारच, आणि तस्सेच झाले. कसे? सांगते ऐका.

आमच्या पहिल्या मालकीच्या घराला नवीन साज चढला आणि लवकरच ते आमच्या आगमनाची वाट बघत आहे. राहतं घर विकण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्याचं धाडस करता आलं लेकाचे शिक्षण अडथळ्याशिवाय व्हावं म्हणून.

आज तागायत १९९५ पासून शिकवण्याचा सुरु झालेला प्रवास हा फक्त आधीपासून स्थापन झालेल्या संस्थेतच सुरु होता. स्वप्नवत वाटणारी संधी चालून आली आणि सत्यात उतरवता आले असे कधीही न बघितलेले स्वप्न एक अख्ख नवीन तांत्रिक शिक्षण संस्था चालू करण्याचं. सप्टेंबर ते डिसेंबर ह्या अवघ्या काही महिन्यात प्रचंड पाठबळामुळे, उत्कृष्ट अश्या सह पाठ्यांमुळे आणि मुळातच संस्थेचं / विद्यापीठाचं नावच इतकं मोठं आहे कि त्यामुळे मला शक्य झालं. ह्या चार महिन्यांच्या प्रवासात किती म्हणजे कित्ती वैविध्य व्यक्तिमत्व बघता, वाचता आणि समजावून घेता आले. सुवर्ण नव्हे प्लॅटिनम संधी होती माझ्या साठी. एक साधी लेक्चरर ते डेप्युटी डायरेक्टर ह्या पदापर्यंत मजल गाठता आली.

४ महिने सलग पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत पंचतारांकित वसतिगृहात राहायला मिळालं, चारीठाव आयतं आणि वैविध्य खायला मिळालं, प्रसिद्ध लढाऊ वैमानिक ज्याने आपल्या देशाची तब्बल ३७ वर्ष सेवा केली अश्या व्यक्तिमत्वाशी फक्त ओळखच नाही झाली तर एक जगावेगळं नावीन्याने नटलेलं भाऊ-बहिणीचं नातं निर्माण झालं, माझ्या अगदी अत्यंत प्रिय अश्या नागपूर शहरात पुन्हा एकदा वास्तव्य करता आलं आणि सगळ्या जुन्या मित्र मैत्रिणीची पुन्हा भेट झाली, शेजारी, त्या गल्ल्या, ती शाळा, ते विद्यालय आणि बाकी बऱ्याच आठवणीना उजाळा मिळाला, सोन्याचा अजून एक मुलामा चढवता आला.

जनसंपर्क आणि त्याचा इतक्या वर्षाचा साठा इतका भला मोठा आहे हे माहित होतंच, पण अजूनही नवीन नाती चटकिनी भरभक्कम अशी उभी राहतील असं वाटलंच नव्हतं, पण तसं झालं आणि ते आश्चर्य रित्या संपूर्ण अनभिन्य व्यक्तींशी जोडलं गेलं देखील. एक फारच आगळीवेगळी मैत्रीण लाभली, तिच्या हातचे चविष्ट पदार्थ न मागता चाखायला मिळाले, तब्बल ३ दिवस सलग, कविता + गप्पा चा छोटासा फड रंगला आणि अनेक वर्षांनंतर कचेरीच्या आवारात प्रथमच तुलसी विवाह साजरा झाला.   

माझ्या दोन्ही मुलांची १२ सारखी मौल्यवान पायरी पार झाली आणि ते पुढील दिशेने पदक्रमण करते झाले, दुचाकी अत्यंत शिताफीने चालवायला शिकले, छोटे छोटे पैशाचे व्यवहार स्वतंत्रपणे करायला शिकले. अहाहा, तेच पण नव्याने पुन्हा उमगलेले असे तरुण दोस्त माझे.  

माझ्या मोठ्या दिरांच अनेक वर्षांचं स्वतःच्या भव्य दिव्य घराचं स्वप्न साकारलं ह्या २१ मधे आणि आम्ही सगळे त्या मौल्यवान क्षणांचे साक्षीदार झालो.

माझ्या लाडक्या मोठ्या पुतण्याची फार नावाजलेल्या महाविद्यालयात ऍडमिशन झाली आणि तो फार उत्कृष्टपणे तेथे रुळाला देखील. अगदी बाळ म्हणूनच सातत्याने लक्षात राहिलेला, किंबहुना तसाच बघितलेला आज स्वतंत्रपणे एकटा राहून सगळं सांभाळतो आहे हे बघून उर भरून आल्याशिवाय राहील नाहीच.

थोड्या प्रमाणात पण २ वर्षांपासून थांबून राहिलेले प्रवास सुरु झाले आणि आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद उपभोगता आला.

माझे दोन अत्यंत हुशार आणि जगावेगळे विद्यार्थी / सहपाठी PhD झाले ते देखील ह्याच २०२१ ला.

अनेक नवीन मंडळी माझ्या कपाटात स्थानापन्न झाली अगदी कपाट दुथडी भरून वाहत आहे. लायकीपेक्षा कैकपटीने "त्याने" कित्ती जास्त देऊ केलं आहे हे बघून डोळे तर दिपलेच, पण फारच वेगळ्या पातळीचं समाधान लाभलं. पाय घट्ट पुन्हा एकदा जमिनीवर स्थिर झाल्याची / असल्याची  जाणीव झाली.

अनेक प्रकारे छोटेखानी वाढदिवस साजरे झाले माझ्या ह्यांचे / मुलांच्या वडिलांचे, कारण त्यांनी ह्या वर्षी त्यांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यामुळे जगभर विखुरलेल्या ह्यांच्या मित्रांशी - मैत्रिणीशी ऐकता / बघता आलं.

आई गेल्यामुळे जगाकडे बघण्याचा नवीन नजरीया उमगला आणि त्यामुळे भरपूर ताकदिनिशी लढायला नव्याने शिकता आलं, कुठल्याही  छत्राशिवाय. अत्यंत कठीण होत ते, एक दिवस देखील डोळे डबडबल्याशिवाय सरला नाहीच, पण ती आसवे शिताफीने लपवणे पण नव्याने शिकवलं ते ह्याच २१ ने.   जगापुढे दिवस भर स्मितहास्य कायम टिकवून ठेवायचं, भरपूर काम करायचं आणि दिवस मावळला कि न कळत येणाऱ्या तिच्या आठवणीत तासंतास डोळे टिपायचे, हे देखील जमलं, जमवावं लागलं.

२१ च्या पहिल्या दिवशी मी २० ते २१ प्रगितिशील वर्ष असेल असं लिहिलं होत आणि ते फारच उत्कृष्ट रित्या साकारलं गेलं आणि मलाच संपूर्ण एका वर्षाचा आढावा इथेच मांडता आला आज हे समाधान हि जगावेगळं आहेच. https://drpreetimulay.blogspot.com/2021/01/blog-post.html

बेरीज वजाबाकी नेहेमी प्रमाणे चालूच होती ह्या ३६५ दिवसात पण त्यामुळे शिकता आलेले गुणाकार आणि भागाकार ह्या आधी कधीच अनुभवला नव्हता. सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे पुढील येणारे नववर्ष इतक्या जोशात, आनंदात आणि स्वस्थ असे सुरु होऊ दे माझ्या साठी, माझ्या कुटुंबियांसाठी, माझ्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसाठी आणि सर्वांसाठी च कि सगळ्या जगवासियांना प्रत्येक दिवस आणि त्यातला प्रत्येक क्षण उपभोगता आला पाहिजे, हीच ईशचरणी प्रार्थना, अगदी मनापासून. 

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

ऊर्जेचे स्तोत

आपण अनेकदा बघतो कि घरी  छोटी मोठी रिपेअर ची काम करायला जेव्हा एखादा व्यक्ती किंवा चमू येते  आणि त्यांना विजेची आवश्यकता असते तेव्हा ते थेट वायर प्लग मधे घालतात. बास, आणि हे नेहेमीचंच आहे, अनेक वर्षात तसूभरही बदल नाहीच.

देवा पासले दिवे, किंवा छोटेखानी लाईट ची वायर आणि प्लग हा दोन पिन वर चालतो. ज्या वस्तूंना कमी वीज लागते ते छोटे ३ प्लग पिन वर चालतात, आणि चार्जे पण होतात सहज. जास्त ऊर्जा लागते तेव्हा पिन मोठी होते आणि त्याच्या दाताचा आकार देखील. हे झालं आपल्या घरच्या वस्तूंचं. पण कारखान्यात अजून भले मोठे प्लग असतील, नाही का. असाच एक मोठा आणि नवीनतम प्लग सध्या मी टीव्ही च्या एका जाहिरातीत बघते आहे. तो म्हणजे हुंदाई कार चार्ज करण्यास वापरलेला, बाप रे.

वस्तूंचा आकार लहान का मोठा, ऊर्जा तीच, पिन ची जाडी कमी जास्त होते आवश्यकतेनुसार. अगदी सभोवतालच्या नात्यांसारखं नाही? पिन, आकार, ऊर्जेची गरज, वस्तू / नात्यांचे प्रकार, प्रसंग ई. बदल घडवत घडवत पुढे प्रस्थान करायचं. कधी आपण ऊर्जेचं स्तोत व्हायचं नाही तर गरज भासल्यास चार्ज  घ्यायचा, किती गोड संकल्पना आहे नाही. तर मंडळी शोधून आणि जपून / शिंपून ठेवा आपआपले वैविध्य प्लग्ज.  

लहानपण देगा देवा

मी बाळ असतांना माझ्या गोऱ्या गोमट्या पिटुकल्या हातात घालायला माझ्या आजीआजोबांनी मला सोन्याचे वळे / कडे घेतले होते. अर्थात ती अनेक पिढ्यांची परंपरा आहेच, कारण मी माझ्या पोरांना देखील माझे आणि त्यांचे नवीन आळीपाळीने घातले होते, अनेक वर्ष. एक सोन्याचा मणी आणि एक काळा मणी अशी त्याची रचना असायची साधारण. ते कडे परिधान केल्यामुळे मुलांच्या हाताला तर शोभा येतेच पण असं म्हटलं जातं कि दृष्ट पण लागत नाही. असो. माझा तर अजून एक दृष्टिकोन असा आहे कि आजीआजोबांचा आशीर्वाद लाभतो, आईचं वळ घालायला मिळत आणि गुंतवणूक होते जन्मापासून ती वेगळीच. अर्थात थोडीशी / छोटीशी गुंतवणूक ती पण काही का असेना सुरवात तर होतेच ना. आज हा विषय का म्हणताय मंडळी? तर आज माझी स्वारी माझ्या प्रिय मैत्रिणीला म्हणजेच माझ्या डॉक्टर ला भेटायला गेली होती आणि माझं संपूर्ण लक्ष तिच्या उजव्या मनगटाकडे च होत, किंबहुना वेधलं गेलं, कारण अगदी म्हणजे अगदी तस्संच काळं सोनेरी मण्यांचं हातातलं तिने घातलं होत. ते आधुनिक काळातलं आणि सध्या फॅशन मध्ये असलेले मंगळसूत्र होत.

जेव्हा मी बाळ होते किंवा माझी मैत्रीण बाळ होती तेव्हा आम्हाला कुठे आठवतं
आम्ही / आमचे हात कसे दिसत होते ते हे कडं घालून? नाही का? मग तेच सोनेरी क्षण पुन्हा एकदा आनंदाने जगण्याची संधी / अलभ्य लाभ आहे हा नावीन्याने नटलेला असा.

मला अजूनही आठवतंय प्रकर्षाने माझी लेक बऱ्याच वेळा तिच्या मनगटाकडे कौतुहलाने टकमक बघत असायची, फोटो पण आहेत, कि काय आहे हे माझ्या हातात, असं का आहे, निघत का नाही आहे ई. मी पण असंच काही करत असणारच ना लहानपणी, अर्थात सगळेच करत असणार. त्या सगळ्या मुलींना मिळालेली अजून एक संधी आहे हि आणि ती सगळ्यांनी पट्टाकिनी साधली पाहिजे.

चला तर मग, एक लहानपणीची आठवण जगण्यासाठी, हाताची शोभा द्विगुणित करण्यासाठी, हक्काचा दागिना मिरवण्यासाठी आणि गुंतवणूक म्हणून घेऊ या हे मनगटी मंगळसूत्र आणि झकास मिरवूया देखील.

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

राणी सारखी

माझं सध्याचं नवीन कचेरीतलं वास्तव्य जेथे आहे तेथे मी पाहुणी म्हणून राहते आहे, गेस्ट हाऊस मधे. ती एक  ४ मजली इमारत आहे आणि बरेच पालक किंवा इतर ठिकाणचे कर्मचारी येतजात असतात सतत. पालक प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान त्यांच्या पाल्यांना सोडायला येतात तेवढेच काही दिवस वास्तव्य. मी आले राहायला तेव्हा तर १-१.५ महिना अक्षरश: शुकशुकाट होता, मी एकटीच होते, मग आले भरपूर, गेले देखील. हे बघून एकदा काहीजणांनी मला काळजी पोटी बोलायला / सांगायला सुरवात केली कि "अगं काय तु संपूर्ण इमारतीत एकटीच असतेस, भीती नाही वाटत का? असं कसं ई." तेव्हा मी सहज विचार केल्यावर मला हे आढळलं कि गेस्ट हाऊस ला २४ तास एक सिक्युरिटी गार्ड असतो, साफसफाई करणाऱ्या ठराविक चमू असतात, लिफ्ट आहे, गरम पाण्याची अख्खी यंत्रणा आहे, मॅनेजर आहे आणि बाकी मदतनीस आहेत. ह्या माझ्या ४ महिन्यांच्या वास्तव्यात बहुतांशी हि सगळी भिस्त फक्त आणि फक्त माझ्यासाठीच होती जणुकाही, नाही का? जशी कि राणीच. मग जर राणी ची वागणूक मिळते आहे तर मग मी अरेरे एकटी कशी? अजिबातच नाही. सांगा बरं ह्या आधुनिक जमान्यात किती जणींच्या वाट्याला अशी रॉयल पद्धत अनुभवता येते. अशक्यच. माझ्या सारखी भाग्यवान मीच, फक्त एक, ह्या जगावेगळी. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज एक नवीन तांत्रिक महाविद्यालय उभारण्यात माझा हातभार लावता आला, कुठल्याही शाही दरबार / राजधानी उभारण्याच्या कामापेक्षा छोट नव्हतंच ते, मग त्याला राणीच योग्य नाही का?


पोहे

महाराष्ट्रात आमच्या पिढी पर्यंत प्रचलित बघण्याचा कार्यक्रम म्हणजे निश्चित कांदेपोहेच. का? खरंच माहित नाही. पण मोठी झाले ते हा वाक्प्रचार ऐकूनच. पण मला आजही कुतूहल हे आहे कि उपमा / शिरा / सांजा किंवा इतर भरपूर पदार्थ आहेत, मग पोहेच का? पोह्यात पण दडपे पोहे, तिखट-मीठाचे पोहे, मेतकूट पोहे, दूध पोहे आणि बरेच प्रकार.

शोधता शोधता इतक्या वर्षांनी आज लिहिण्याचा आणि विचार करण्याचा जेव्हा योग आलाच तेव्हा असं लक्षात आलं (हे सर्वश्रुत आहे खरं) पोहे सोडले तर बाकी सगळ्या पदार्थात पाणी घालावं लागतं, भाजावं लागतं त्यामुळे ते पदार्थ बिघडण्याची शक्यता असते. शिवाय पोहे हा प्रकार बहुतांशी सगळ्यांनाच भावतो कारण तो प्रसन्न दिसतो, रंगीबेरंगी असतो, पौष्टिक, पोटभरीचा देखील आणि चटपटीत. खास काही तय्यारी शिवाय पटकीनी होणारा असा. वाटाणे, मिरच्या, कोथिंबिरीचा हिरवा, गाजर आणि तिखटाचं लालसर, हळदीचा पिवळा आणि थोडेसे कांदे करपू दिले तर त्याचा कथ्था, मोहोरीचा काळसर आणि जिऱ्याचा तपकिरी ई. वैविध्य रंगानी नटलेले. तिखट, आंबट, गोड, खारट चव असेलेले मऊ पहिल्या वाफेचे आणि अधेमधे चवीला बहार येण्यासाठी आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी शेंगदाणे / काजू, बारीक शेव कुरकुरीत आस्वाद देणारी आणि ओल्या नारळाने पांढरा रंग चढवून पौष्टिकता बहाल करणारा असा हा एकमेव पदार्थ, अगदी आयुष्यासारखाच. पोहे करणं सोप्प दिसत असलं तरी देखील सगळं साग्रसंगीत व्यवस्थित प्रमाणात घातलं गेलं पाहिजे नाहीतर हवी तसे चविष्ट होणार नाहीत. हे दर्शवण्यासाठी म्हणून कदाचित दोन कुटूंबियांची ओळख होतांना पोहे साक्षीदार असतात, माझ्या मते आणि त्यापुढील वाटचाल पण मग तशीच चविष्ट चवदार होते, टिकते, राहते आणि बहरते देखील. बहरते ह्या करता कारण संपूर्ण कुटूंबीय, सदस्य, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारपाजार आणि इतर सगळे एकत्र तुमच्या आयुष्याचे, त्यातल्या प्रत्येक क्षणांचे साथीदार असतात आणि राहावे तरच पोह्याला चव येणार ना? हे प्रत्येक घटक महत्वाचेच. 

https://www.lyricsmarathi.in/2021/08/kande-pohe-ayushya-he-chulivarlya.html


शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

नाण्याची दुसरी भक्कम बाजू

आज सकाळी माझी ध्यानसाधना आटोपल्यावर एकांसोबत फोन वर बोलणं झालं. फोन च्या संपूर्ण संवादात त्यांचा एक विशिष्ट सूर लागला होता. तो थोडासा काय प्रचंड नाराजीचा होता. आता ते आहेत जेष्ठ नागरिक. त्यामुळे वाढत्या वयोमानानुसार आपल्याला नको असलं / किंबहुना आवडत नसलं, तब्येत ठणठणीत असली  तरी देखील आरोग्य विम्याचे पैसे वाढतातच, काहीही तरणोपाय नाहीच. त्यांच्या म्हणण्यानुसार मागल्या वर्षीपेक्षा साधारणतः दुप्पट भरावे लागले ह्या वर्षी असं  काहीतरी. सूर इतका तारसप्तकातला होता कि काही शब्द न कळत गाळले गेले माझ्या कडून. असो. न राहवून सरते शेवटी मी त्यांना शांत स्वरात / लयीत आणि तालात समजावून सांगितलं कि तुमची ऐपत आहे, "त्याने" तुम्हाला सक्षम ठेवलं आहे हे विम्याचे पैसे भरण्या करता मग हि बाजू बघा. कित्येक असे लोक आहेत ज्यांना साधं वैद्याकडे जाणं परवडत नाही. मग ह्या बद्दल तक्रार करायची का समाधान मानायचं? तुमचं तुम्हीच ठरावा. हे माझं वाक्य त्यांना फक्त पटलंच नाही तर मनापासून आवडलं आणि नाण्याची खणखणीत दुसरी बाजू नेहेमी असते हे देखील खात्रीशीर सिद्ध झालं पुन्हा एकदा, फक्त तशी दृष्टी हवी. 

हात हलवत येणे

"वाक्यात प्रयोग करा" अश्या पद्धतीचे प्रश्न आम्हाला शाळेत विचारले जात असत प्रश्न पत्रिकेमधे. आम्ही असंख्य शब्दांचे आणि म्हणींचे वाक्य तय्यार ठेवत असू त्या प्रश्नाचं चोख उत्तर द्यायला. तेव्हा हे वाक्य होत कि नाही माहित नाही पण हि एक म्हणण्याची पद्धत आहे किंवा निरीक्षण आहे.

आज आमच्या नवीन कॉलेज चा प्रत्यक्ष्य वर्ग भरण्याचा पहिलाच दिवस. विद्यार्थी माझ्या मते साधारणतः दोन एक वर्षांनी आली महाविद्यालयात आणि वर्गात शिकवण्याचा थोडक्यात आनंद मिळाला. थोडक्यात ह्याच्या साठी कि अर्धे विद्यार्थी घरी होते आणि बाकी माझ्या डोळ्यादेखत. सर्व प्रथम जी मुलगी आली क्लास अटेंड करायला ती फक्त आली आणि तीच आली हो, महद आश्चर्य वाटलं मला, हात हलवत, काहीही म्हणजे काहीही नाही सोबत. जगावेगळा भरोसा त्या मोबाईल वर. शिकायला आलो म्हणजे विद्यार्थी होण्याचे काही चिन्ह नको, एखादी सुंदरशी बॅग, त्यात टिपायला काही पेन, कागद ई. त्या महामानवाला लागेल तर चार्ज करण्यासाठी चार्जर, तहान लागली रस्त्यात किंवा कुठेही तर छोटेखानी पाण्याची बाटली, स्वतःला किंवा मित्र मैत्रिणींना भूक पण लागू शकते, तेव्हा थोडासा खाऊ, पैस्याचे अँप चालले नाही तर थोडीशी सोय... काहीही म्हणजे काहीही नाही. मला नाही पटलं आणि म्हणून हा पंक्ती प्रपंच. आणि त्यातल्त्यात ती घरून आली होती, मग घरचे काही म्हटले नसतील? "जो दुसऱ्यावरी विसावला त्याचा कार्य भाग बुडाला" असं ऐकलं आहे मी, मग जाणंयेण्यासाठी अँप वर, भुकेसाठी कॅन्टीन वर आणि शिक्षणासाठी मोबाईल वर का संपूर्णपणे अवलंबून राहायचं? आणि जरी भेदभाव नको ठेवायला पण तरी देखील मुलगी म्हटली म्हणजे अजून काही वस्तू ठेवाव्याच लागतात, कधी गरज पडेल सांगता येत नाही. ह्या उपर तिच्या नंतर जे सगळे मुलं वर्गात आले त्यांच्या कडे त्यांची शिस्तीत बॅग होती. असो, शाळेत असतांना काही शब्द वापरून एक वाक्य लिहावं लागत असे पूर्ण मार्क मिळवण्यासाठी.  आणि आता मस्त छोटेखानी पण हवी तशी अनुकथा उभी करता आली. क्या बात है? ती हात हलवत आली आज पण मला ह्या कथेसाठी विषय देऊन गेली.   


शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

माया

ह्या अत्यंत प्रिय, छोटेखानी आणि गोंडस शब्दांचे अनेक अर्थ आहेत मराठी भाषेत, अर्थात जसं वापरू तस्स. हाच शब्द नाही तर बाकी इतर बरेच शब्द आणि भाषा अश्याच असतात, ती खासियत आहे भाषेची, नाही का? तर आज मी येथे मला उमगलेले आणि प्रचलित असलेले अर्थ / मतितार्थ येथे मांडते आहे. माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे प्रेमळ किंवा काळजी आई सारखी, माया म्हणजे कदाचित मऊ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

माझ्या कानावर अनेकदा पडलेले एक वाक्य असे कि जर एखादा ड्रेस किंवा ब्लॉउज थोडं घट्ट झालं (कापड असल्यामुळे किंवा वजन वाढल्यामुळे) तर त्याला पट्टाकिनी उलट-सुलट करून तपासलं जातं "माया आहे का?" हे म्हणत. अर्थात खूपच आधीपासून हा वाक्प्रचार कानावर पडल्यामुळे असेल मी हा एक अर्थ आपसूक मान्य देखील केला. फारच मजेशीर अर्थ आहे पण आहे. माया असणं म्हणजे जास्तीची शिवण, किंवा शिल्लक / जास्तीचं कापड / जागा ई. माया म्हणजे एका पेक्षा जास्त मुद्दाम दिलेल्या शिवणी. त्यातली सर्वात आतली उसवली कि जास्तीची जागा तय्यार होते आणि जो ड्रेस घट्ट होत असतो त्यात सहज मावलं जातं. मायेने तोच आवडीचा ड्रेस पुन्हा परिधान करता येतो / मिरवता येत. हि माया शिवतांनाच विचारपूर्वक आणि अर्थात जास्त कापड असेल तर निश्चित राखीव ठेवली जाते. टेलर ला शांतपणा आणि आनंद घेत शिवता आलं तर २-३ शिवणी आधीच मारून ठेवल्या जातात, प्रेमापोटी, पैसा वसूल अश्या पद्धतीने.

महागडे कपडे हे फक्त सूत नसून प्रचंड आठवणी, आशीर्वाद आणि आपुलकी असते. ती अनेक वर्ष टिकावी म्हणून माया फार महत्वाची, नाही का? तर अशी हि माया, अदृश्य पण अत्यंत उपयोगी. आताशा रेडिमेड च्या जमान्यात पण माया टिकून राहावी नावीन्याने हे अपेक्षा. नवीन पिढीला पोट धरून नक्की हसू येईल ह्या मायेबद्दल ऐकून हे निश्चित. 

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

दिल से दिल तक

ऑफिस च्या कामाच्या निमित्याने मी नागपुरच्या वास्तव्यात विविध लोकांना, माझ्या आप्तस्वकियांना भेटायचं ठरवलं आणि ते हळू हळू सुरू केलं देखील. प्रत्येक वेळी कोणाच्याही घरी जाते वेळी मी हल्दीराम चे विविध पदार्थ घेतले. असेच मागल्या रविवारी एकांकडे जाते वेळी हल्दीराम च्या काही वस्तू ऑर्डर करतांना माझ्या साठी चाऊ-म्याऊ पण मागवलं. एक प्रकारची भुजिया होती आणि नवीन वाटली म्हटलं खाऊन बघावं आणि मला नेहेमीच असं नवनवीन चाखायला आवडत, प्रचंड. झालं काही वेळात आला  कि तो माणूस डिलिव्हरी करायला. मी ते सगळे सामान बघून थोडी अवाक झाले, म्हटलं माझंच सामान आहे ना? कारण मी भुजिया ऑर्डर केली होती आणि ती एका छोट्याश्या पिशवी वजा पॅकिंग मध्ये येणार हि अपेक्षा होती नेहेमी प्रमाणे. पण काय सुखद छोटंस आश्चर्य, एक सुबक सुंदर देखणा डब्बा आला. नीट बघितलं तर तीच भुजिया, उघडून बघितलं तर त्यात एक विचारपूर्वक पॅक केलेलं पाकिट. काय आनंद झाला मला डब्बा + पाकीट हि अपेक्षाच नव्हतीच. एकदा पाकीट उघडलं कि कुठे काढून ठेवायचं हा यक्ष प्रश्न आणि रबर बँड्स लावले तरी सरदतात पदार्थ. त्यामुळे काही का असेना, हल्दीराम ने ह्या डब्याचे पैसे माझ्याच कडून जरी घेतले असले तरी माझी झालेली सोय मला जास्त भावली. ज्यांनी कोणी हा विचार केला आहे, ज्याच्या कोणाच्या डोक्यातून हि कल्पना सुचली आहे त्यांना प्रणाम. हलका, द्यायचा म्हणून, नाजूक, कमकुवत असा डब्बा नाही बरं का तो. ती भुजिया मटकी वापरून तय्यार केली आहे, अतिशय पौष्टिक अशी आहे, डब्बा दणकट आणि नाव त्याहून जगावेगळं "करोडपती भुजिया". एकंदरीत भावलेलं प्रॉडक्ट आणि प्रचंड औत्सुक्ययुक्त आनंद देऊन गेलेलं असं. शेव ह्या प्रकारातलं अनोखं असं नवखं पॅकिंग "दिल से दिल तक" पोचणार असं. 

प्रेम

अनेक दिग्गज कवींनी हा प्रश्न विचारला आहे / मांडला आहे त्यांच्या काव्यातून / लेखणीतून "प्रेम म्हणजे नक्की काय?", ते प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष पणे दिसतं / नजरेस पडतं हे त्या बघणाऱ्यालाच किंवा अनुभवणाऱ्यालाच ठाऊक. आज मला एका प्रेमाची नव्याने अनुभूती आली आणि ती इतकी प्रकर्षाने जाणवली कि मी लेखणी उचलली आणि माझ्या भावना मांडायच्या ठरवल्याचं.

तर त्याच असं झालं कि आज मला माझ्या खानसाम्याने फोन केला कि आज मी तुम्हाला दहीभात पाठवला तर चालेल का? त्या सोबत साधा भात पण देतो ई. म्हटलं दहीभात असेल तर साधा नको आणि शिवाय दहीभात पण थोड्या प्रमाणात पाठव, जास्त नको. पडत्या फळाची आज्ञा जशी त्याने ताबडतोब डब्बा भरून पाठवला. मी आणि माझी एक सखी मिळून आज डब्बा खायला सुरवात केली आणि त्या दहिभाताची जगावेगळी चव चाखून अवाक झालो. आज पर्यंत असंख्य वेळा मी स्वतः दहीभात केला आहे आणि खाल्ला देखील पण आज काही रसायनचं वेगळं होत. तो इतका अप्रतिम चविष्ट झाला होता कि ते शब्दात गुंफण म्हणजे अशक्य आणि अपमानचं जणू. तो आंबेमोहोराचा भन्नाट सुगंध, दह्याचा आगळावेगळा गोडवा, कढीपत्त्याची / फोडणीची खुसखुशीत चव आणि लाल मिरचीचा लालचुटुक ठसकेबाज देखावा. ते साग्रसंगीत दृश्यच इतकं विलोभिनीय होत कि ताबडतोब फडशा पडलाच त्याचा. पण प्रत्येक घासागणिक भातशेतीचा शेतकरी, ती गाय / म्हैस जिच्या दुधाचं ते दही होत, तो इतर मसाला, दहीभात तय्यार करणारे हात ई. च्या कष्टाला आणि आशिर्वादाला नतमस्तक झालेच न-कळत. प्रत्येक घटक जादुई मायेने घडला होता त्यामुळे संमिश्रित प्रेम दृश्य झालं होत. सर्वांना मनापासून धन्यवाद आणि संपूर्ण जीवसृष्टीला असेच प्रेममय पदार्थ नेहेमी चाखायला मिळो हि प्रार्थना. अप्रत्यक्ष्य प्रेमाची परिभाषा नव्याने कळली / उमगली आणि चाखता पण आली आज. माझ्या सारखी भाग्यवान मीच, नाही का मंडळी?

रंगीत तालीम

माझं शालेय शिक्षण हे मराठमोळ्या वातावरणात झालं आणि घरी  तर इंग्लिश भाषेचा शिरकाव पण झाला नव्हता. असो. 

त्यावेळी माझे शाळेचे आदरणीय शिक्षक अतिशय मेहेनत घेऊन विषय तर शिकवायचेच परंतु वैविध्य उपक्रमातून कळत न-कळत माणूस घडवायचे. असंख्य उपक्रम असायचे शाळेत, वर्षाच्या शेवटी गॅदरिंग असायचं, त्यात विविध कलागुण सादर होत असतं. प्रेक्षकांसमोर संपूर्ण कार्यक्रम सादर करण्या आधी त्याची रंगीत तालीम घेतली जात असे. त्यामुळे खूप फायदा व्हायचा, विद्यार्थ्यांना, प्रेक्षकांना, स्टेज ज्यांनी सजवलं आहे त्यांना आणि एक प्रचंड मोठा उत्साह / जोश / आत्मविश्वास निर्माण व्हायचा तो वेगळाच. काही दिवसांपूर्वी अशीच विस्मृतीत गेलेली रंगीत तालीम पुन्हा अनुभवयाला मिळाली आणि हा लेख लिहिता आला. तर त्याच असं झालं कि मला एक अनोखे वोर्कशॉप घेण्याची संधी प्राप्त झाली पण हातात कचेरीच्या कामामुळे अजिबात शांत असा वेळ नव्हता. त्यामुळे माझ्या सोबत संशोधन करत असलेल्या दोन विद्यार्थिनींना मी विनंती केली आणि त्यांनी पण अगदी मनापासून मदत केली देखील त्यांच्या व्यस्त दिवसात देखील. त्यातल्या त्यात एक जण तर इतक्या उत्साहाने आणि हिरीरीने उतरली त्यात आणि वेळेआधी सगळी माहिती मिळवून दिली आणि शिवाय तिच्या घरी घेऊन जाऊन व्यवस्थित वेळ देऊन रंगीत तालीम पण करून घेतली. अहाहा. ह्यालाच प्रेम असे नाव. पुन्हा एकदा रंगीत तालीम कित्ती म्हणजे कित्ती उपयोगी ठरते हे प्रकर्षाने जाणवलं. त्यामुळे उत्साह तर आलाच पण एक वेगळा प्रचंड कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि ४१ वैविध्य स्तरावरच्या दिग्गज अधिकाऱ्यांना "कृत्रिम बुद्धिमत्ता" चे फायदे त्यांच्या क्षेत्रात  काय आहेत ह्या विषयी उस्फुर्तपणे समजावून सांगता आलं. अहाहा, फारच जगावेगळा अनुभव होता तो. मला मज्जा आली. माझी लेक मला लहान असून सतत सांगते "मम्मा तुला आवडतंय ना मग बिनधास्त कर". असेच अनेक अजून छोटेखानी वोर्कशॉप्स करायला मला आवडेल नक्की. नजीकच्या भविष्य काळात संधी मिळेल आणि अजून बरेच जण माझ्या सारखे आनंद घेतील त्या वर्गाचा हि खात्री. आज एका स्थानिक वृत्तपत्रात ह्या वोर्कशॉप विषयी छापून आलं त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला. रंगीत तालीम चे अनोखे रंग असेच उधळत राहोत नेहेमीच. 


 


सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

गणवेश

मला नक्की आणि पक्की खात्री आहे कि माझ्या सारखेच बहुतेक सगळे विचार करत असणार. शाळेत असतांना कॉलेज ला जायचं एक  महत्वपूर्ण कारण म्हणजे गणवेश पासून सुटकारा. रंगीबेरंगी कपडे आपल्या आवडीचे घालणं म्हणजे कॉलेज असं होत माझ्या दुनियेत. नाण्याला नेहेमीच दोन बाजु असतात हे क्षणभर विस्मृतीत गेलं होत  माझ्या. आवडते कपडे घालण्याची मुभा मिळणं म्हणजे पण भलं मोठं काम होत. रंगसंगती बघा, काय सध्या फॅशन मधे आहे त्याकडे लक्ष ठेवा, दररोज स्वतः काय घालतोय ते ध्यानात ठेवा, रंग योग्य आहेत का नाही ते बघा आणि बरेच काही, जसे कि त्यांची शिस्तीत देखरेख ई. दर दिवशी काय परिधान करायचं हाच मोठा यक्ष प्रश्न. कितीही जोडी कपडे असले तरी देखील आपल्या कडे काहीच नाही हि भावना. पण कॉलेज हे बाकी इतर कारणांसाठी आवश्यक आहेच, त्यामुळे दररोजचा पोशाख, फॅशन आणि बाकी इतर गोष्टी आत्मसात केल्या / झाल्या ह्या अनेक वर्षात. तसेच मग नोकरी सुरु झाली आणि शिक्षकी पेशात गणवेश नसल्यामुळे पुन्हा रंगांच्या दुनियेचे नव्याने ओळख झाली आणि ती अनेक वर्ष टिकली देखील. आज कचेरीत आले तेव्हा आमच्या दोन मजल्यावर नेमलेल्या गार्ड ताई दिसल्या आणि त्यांचे डोळे सहज वाजता आले. आमच्या कडे गार्ड ताईंना गणवेश घालावा लागतो रोज. त्यांचे डोळे मला असं सांगत होते कि "काय ना सगळ्या मॅडम आणि सरांना दररोज वैविध्य रंगांचे / तर्हेचे कपडे घालून ऑफिस ला यायला मिळत, आम्हाला नाही". आणि कदाचित त्याच मुळे असेल त्या सगळ्या गार्ड ताई फार उत्साहाने त्यांचे फोटो मोबाईल वर काढलेले मला आणि बाकी सगळ्यांना दाखवतात, त्या विषयी सांगतात / बोलतात आणि त्या प्रत्येक फोटोत त्या फारच उत्साहाने तय्यार झालेल्या आढळतात.  कारण ते त्यांना अगदीच कधीतरी करायला मिळतं, संपूर्ण आठवडा काम असल्यामुळे किंवा अनेक वेगवेगळ्या वेळेच्या ड्युटीज पण असतात. आणि त्यांच्या गार्ड च्या ड्युटी मुळे त्यांचा शाळेत गणवेश ते अजूनही गणवेश हा प्रवास लांबला आहे, किंबहुना सुरूच आहे त्यामुळे असेल कदाचित. गणवेश रोज परिधान करायचा म्हणजे वैविध्य फॅशन च्या गोष्टींवर खर्च वाचतो, रोज काय घालायचं ह्या वर शक्ती खर्च होत नाही, पण कधी कधी कंटाळा येतो हे मात्र आहे. ह्यालाच पॅकेज म्हणतात, आवडो अथवा ना आवडो. माझे बाबा नेहेमी म्हणायचे चहा ची पावडर विकत घेतांना पुडा पण विकत घ्यावा लागतोच इच्छा असो नसो, पॅकेज शेवटी, नाही का? गणवेश ज्यांना घालावा लागतो कामावर त्यांचं कपाट मात्र फार फार खुश राहत असेल, कारण त्याला मोकळा श्वास घेता येत असणार, प्रचंड कपड्याच्या व्हरायटी नि ओसंडून वाहत नसणार.

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

अलार्म अक्का गजर

 "अलार्म काका सोसायटी सोडून गेले का..." हि जाहिरात आठवते का मंडळी. माझ्या घरी पण माझे बाबा माझे अलार्म होते. सांगायची गरजच पडायची नाही वेळेच्या आत यायचे उठवायला स्वतः ची झोप मोड करून, सतत अनेक वर्ष.

"कोंबडा आरवणे" हा एक अलार्म चा जगप्रसिद्ध प्रकार होता जुन्या काळी, कारण त्यावेळी आधुनिक घड्याळं अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे बऱ्याच वेळी अनेकांची फजिती देखील झालेली बघितली / अनुभवली आहे मी. आमच्या एका काकांना शेजारच्यांनी पाळलेला कोंबडा आरवला कि उठायची आणि मग फिरायला जायची सवय होती. एक दिवशी नेहेमीच्या सवयी प्रमाणे आरवला कोंबडा, काका उठले, फिरायला गेले पण त्यांना काही तरी वेगळंच वाटतं होत सतत. पण अहो विश्वास त्या कोंबड्यावर. त्या दिवशी तो कोंबडा पहाटे च्या ऐवजी मध्य रात्री आरवला होता आणि अंधारातच काका फिरून आले देखील.

काही जणांना वर्षानुवर्षांची एका ठराविक वेळेला उठायची इतकी सवय झाली असते कि त्यांच शारीरिक + मानसिक घड्याळच त्यांना आपोआप उठवत दररोज. त्यामुळे इतर कुठल्या गजराची गरजच पडत नाही.

घरच्या कामाचे, शेजारच्या घरातील स्वयंपाकाचे, रस्त्याच्या / शाळेच्या / देवळाच्या आजूबाजूला घर असेल तर त्याचे, असे अनेकविध आवाज म्हणजे बऱ्याच जणांचा गजर असतो.

गजर लावून बंद करून पुन्हा लोणणारे अनेक व्यक्तिमत्व देखील असतात, मी त्यातलीच एक बरं का.

अभ्यासासाठी, व्यायामासाठी, इतर कामांसाठी ठरवून गजर लावला जातो. तो वाजला रे वाजला कि ताबडतोब उठता यावं आणि अभ्यासाला जोमाने बसता यावं म्हणून माझी एक अत्यंत प्रिय मैत्रीण तिच्या मैत्रिणीच्या घरी जायची अभ्यासाला. ज्या खोलीत झोपायच्या त्या खोलीत आणि दूरच्या दुसऱ्या खोलीत देखील त्याच वेळेचा गजर लावायचा दररोज. म्हणजे उठून दूर चालत गेलं कि झोप मोड होईल हि अपेक्षा. अर्थात तसं कधीच झालं नाही, झोप आपल्या जागी, गजर त्याच्या आणि माझ्या मैत्रिणी जैसे थे.

माझे बाबा नेहेमी म्हणायचे "झाडा सारखं व्हावं, देत राहावं...". अलार्म पण कुठेही कमी नाही हं मंडळी, चावी दिली, वेळ ठरवली कि त्या वेळी होत्याच नव्हतं होवो तो वाजणारच, उठवणाराच, त्याच काम तो करणारच, कधीच त्याला वाटत नसेल का थोडं लोळावं, आळस करावा, १० मिनिटांनी वाजाव, नाही वाजलं तर? पण कदापी नाही हो, नेहेमी त्याच ठोक्यावर शिस्तीत वाजणार म्हणजे वाजणारच. तो त्याच काम करून मोकळा होतो, अपेक्षा ठेवत नाही, मी उठवलं हा अभिमान तर नाहीच, मी नाही उठवलं तर ह्यांचं काय होईल असा विचार देखील त्याला कधीच शिवत नाही. त्यामुळे "अलार्म सारखं व्हावं आणि ठोका कधीच चुकवू नये".

अस्तर

अगदी अगदी काल पर्यंत मला अस्तर ह्या शब्दाची ओळख फक्त एवढीच होती कि जरीच्या ब्लॉउज च्या कपड्याला, किंवा सुळसुळीत ड्रेस च्या कपड्याला आतून पातळ लावलेलं कापड. बास. त्या व्यतिरिक्त काही माहित नव्हतं. आणि त्या मागचं शास्त्रीय कारण म्हणजे भरजरी किंवा कॉटन सोडून बाकी सगळ्या कपड्यांना शिवण बसत नाही जर अस्तर चा आधार दिला नाही तर. किंवा एखाद कापड फारच पातळ असेल तरी देखील एक जोड असावी मजबूत शिलाई साठी म्हणून अस्तर. अस्तर अगदीच तलमली, मऊ, पातळ कापडाचं असतं जेणे करून तो ड्रेस किंवा ब्लाउज परिधान केल्यावर टोचू नये आणि एक समाधान वाटावं म्हणून, ते भरजरी महागडं कापड जास्त भारदस्त दिसावं आणि टिकावं म्हणून देखील.

अजुन एक महत्वाचा ड्रेस जो घरी सहसा वापरला जातो तो म्हणजे गाऊन / कप्तान. बहुतांशी असं आढळलंय कि गाऊन चा परकर हा एक खास सोबती असतो. पहिल्यांदाच बघण्यात आलं कि गाऊन ला पण अस्तर लावलंय. कदाचित रात्रभर मऊ अस्तराच्या सानिध्यात स्वस्थ झोप लागावी म्हणून असेल, किंवा फक्त एक हलका फुलका गाऊन चढवला कि झालं, अश्या सोयीसाठी असेल. आधी नाही तर फार मोठी यादी असेल हा ड्रेस घालण्या आधी, आणि बऱ्याच घरी दररोज चा मामला.  परकर आणि गाऊन हे दोन कपडे वेगळे शोधा, रंगसंगती लक्षात घ्या, घाला, धुवा, बांधा ई.  कारणं माहित नाहीत पण मला भावली ती कल्पना. सध्या सगळंच रेड़ीमेड उपलब्ध आहे मग हे का नाही?

ज्याला हि अतिशय उपयुक्त आणि सुबक सुंदर कल्पना सुचली तो कदाचित ह्या अस्तरासारखा असेल, अदृश्य अस्तित्व असलेला, भक्कम साथ देणारा / जोडणारा, हळुवार मऊ स्पर्शाची जाणीव करून देणारा आणि जो बोचरा नाहीच असा. अहाहा. फार पटला मला त्याचा / तिचा स्वभाव आणि कल्पना. असेच जर सगळे जगले तर जग कित्ती सुंदर होईल ना सर्वत्र. साधी कल्पना केली तरी अस्तराचा अनन्य साधारण महत्व जाणवलं प्रकर्षाने. चला तर मग अस्तर रुपी वास्तव ठेवण्याचा प्रयत्न करू या नेहेमीच.

आहे मनोहर तरी

"And Pine for what is not"  हे  इंग्लिश मधील समानार्थी वाक्य आहे " आहे मनोहर तरी" , असेल. माझ्या, फक्त माझ्या दृष्टीने ह्या मराठी ओळीचा अर्थ असा आहे कि व्यावसायिक म्हणून एखादा व्यक्ती अतिशय प्रसिद्ध असतो, हवा-हवासा असतो, वेगळी छाप असते पण तोच व्यक्ती कदाचित स्वतःच्या कुटुंबासोबत अगदी वेगळा असू शकतो, कधी कधी असतो देखील. किंवा उलट पण सहज शक्य आहे. सरतेशेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती, नाही का?

काही कुटुंबामधे मनोहर नावाचा पदार्थ होतो, किंवा त्या पदार्थाचं टोपणनाव मनोहर असं आहे. मनोहर म्हणजे पोळीचा चिवडा, कुटके, तुकडे, आणि बरीच नाव आहेत. मनोहर हे नाव का पडलं असेल, त्यावर सहज सुचलेलं मांडते आहे. पोळीच्या चिवड्याचा परमानंद उपभोगायचा असेल तर आणि मुळात तो शिळ्या पोळ्यांचाच होतो, आदल्या दिवशी च्या उरलेल्या किंवा सकाळच्या उरलेल्या. पोळ्या शिळ्या नसतील तर बारीक तुकडे किंवा चुरा करणं अवघडच. आणि शिवाय फोडणी झाली कि मोकळा पण नरम देखील झाला पाहिजे ना. त्या मुळेच सरते शेवटी ज्यांना आवडतो त्यांना चविष्ट लागत असला तरी तो पदार्थ असतो शिळ्या, उरलेल्याच, कुस्करलेल्याच पोळ्यांचाच, नाही का?. झणझणीत फोडणी, साग्रसंगीत कांदे, दही / लिंबू, साखर, भरपूर कोथिंबीर, आणि चिमूटभर प्रेम हे मसाले मिसळले कि जगावेगळी चव येते, पण........ अगदी चपराख मनोहर सारखं, दोन चेहेरे, लपवा छपवी पण हवी हवी शी.  

एकाद्या बड्या संस्थेत काम करणं, एखाद्या दिग्गज कुटुंबात राहणं, उच्च जागी स्थित असलेल्या माणसासोबत काम करणं ई. काहीही किंवा कुठेही "आहे मनोहर तरी" हा अनुभव येतो बरेचदा. अर्थात "दुरून डोंगर साजरे" हे म्हण हि तितकीच योग्य आहे. प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्याने परिधान केलेला चष्मा फक्त त्याचा असतो, त्यामुळे त्यातून त्याला जे जग बघायला मिळत, किंबहुना तो बघू इच्छितो तसंच ते दिसत. त्यामुळे कोणीच शंभर टक्के नेहेमीच बरोबर / योग्य नसतं, आपण बघू / घेऊ तसं आहे. त्यामुळे योग्य चष्मा निवडा आणि निवडत राहा. "घराचा पौष्टिक नाश्ता, आईच्या हातचा" vs "शिळ्या पोळ्यांचे तुकडे" काय निवडायचं ते ठरवा. 

आधुनिक लग्न प्रथा

तुम्हाला माहित आहे का मंडळी एक छोटेखानी चॉकलेट आहे आणि ते खाल्याने म्हणे आपण आपोआप हवेत उंच उचलले जातो, अशी जाहिरात आहे. अर्थातच त्या जाहिराती मधे लग्न सोहोळा सुरु असतो. नेहेमी प्रमाणे नवरदेवाला त्याची मित्र मंडळी वरमाला घालायच्या वेळी उंच उचलतात आणि मुलगी चॉकलेट तोंडात टाकताच मुलाच्या वरचढ जाते. थोड्याफार प्रमाणात असं दृश्य अनेक लग्नात प्रत्यक्ष्य देखील बघायला, अनुभवायला मिळतं गेली अनेक वर्षे. असो तो एक गंमतीचा भाग आहे, उत्सुकता असते, एक वेगळीच ऊर्जा असते मित्राच्या लग्नात, थोडीशी ताकद प्रदर्शीत करता येते ई. URL of advertisement : https://youtu.be/pWKAVvMHId4


लग्नाच्या आधीचा टप्पा म्हणजे साखरपुडा / साक्षगंध थोडक्यात तरुण पिढी मागणी घालते तो. माझ्या मते बाहेरील देशातील एक नवीन पद्धत आली आहे येथे, लग्नाची मागणी घालतांना मुलाने गुढग्यावर बसायचं, अंगठी एका विशिष्ट पद्धतीने सरप्राईज अशी द्यायची ई.

आज सहज मला सोबत असावी म्हणून काम करता करता टीव्ही सुरु ठेवला आणि मराठी वाहिनी सुरु होती, कुठली हे आता मला आठवत नाही. लॅपटॉप वर काम करता करता सहज फोन आला आणि टीव्ही कडे लक्ष गेलं. आणि माझं मलाच सुचेना, एक भन्नाट दृश्य बघितलं मी. मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही. म्हणून सगळं बाजूला टाकून टीव्ही कडेच बघत राहिले आणि काही मिनिटातच ती जाहिरात पुन्हा बघायला मिळाली. अहो त्यात एक लग्नाचा प्रसंग दर्शवला आहे आणि त्यात वरमाला / अंतरपाट ई. नंतर चक्क नवरा मुलगा गुढग्यावर बसतो आणि नवरी मुलगी त्याच्या गळ्यात हार घालते. अहाहा. "सुख म्हणजे नक्की काय असतं" ह्या सिरीयल ची ती जाहिरात होती. माझ्या कल्पने पलिकडलं होत ते दृश्य, साधं पण वेगळं, मला प्रचंड भावलं. ज्याला हे सुचलं त्याला सलाम. एकमेकांना हार घालतांना उंच उचलायची मजा औरच पण गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि त्यात चढाओढ देखील. पण ह्या जाहिरातीत दाखवल्या प्रमाणे एक शांत, सरप्राईज देणारी, कुठल्याही प्रकारची दुसऱ्याची मदत न घेता, चढाओढ च प्रश्न न उद्भवु देता आणि आधुनिक मागणी घालण्याची फॅशन जपली आहे. अहाहा. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण" असं झालयं थोडक्यात माझं आज. प्रचंड इच्छा आहे त्या प्रसंगा बद्दल ज्याला सुचलं त्याला भेटायची. बघू या योग कधी येतो ते.

नवीन पिढी अश्याच प्रथा आत्मसात करू दे आणि उत्कृष्ट पद्धतीने जुन्या-नव्याचा मेळ सांभाळू दे म्हणजे झालं. 

https://youtu.be/WzfXiN0EBwI


2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...