सोमवार, ३ एप्रिल, २०२३

डा पा - वही

माझ्या महाविद्यालयाच्या दिवसात बऱ्याचदा फक्त एक वही हातात मिरवत आणणारे दिज्जग होते. त्यामुळेच असेल कदाचित थोडिशी मोठी आकाराची वही / रजिस्टर निघाले ज्यात बरीच पाने असायची. त्या पानांची वरच्या उजव्या कोपऱ्यात मग छोटेसे भाग कापून प्रत्येक विषयाला काही पाने राखून ठेवायची. अर्थात घरी जाऊन, किंवा वाचनालयात बसून त्या टिपून घेतलेल्या मुद्द्यांवर विचार करून नोट्स तय्यार होत असतं. त्यामुळे आधी छोटी वही, एक संपली कि दुसरी मग तिसरी अश्या पद्धतीने, मग मोठे रजिस्टर असे वापरले जायचे. त्या वह्या किंवा रजिस्टर जसे कसेही वापरले जायचे, कुठेही ठेवले जायचे, बऱ्याचदा अवस्था असायची त्याची, हातात पकडलेले अगदी सहज असे, अगदी तसेच आता मला लॅपटॉप किंवा आय पॅड बद्दल होतांना दिसतंय, माझ्या चार डोळ्यांना ते बघवत नाही अजिबातच. तेव्हा जश्या आई वडिलांना हव्या तेवढ्या वह्या घेऊन द्याव्या लागत असतं आता हवा तो लॅपटॉप घेऊन द्यावा लागतोय, फरक इतकाच काय तो. वह्यांच्या किमतीत येत नाही हा पठ्या पण कदाचित त्या वेळची वह्यांची किंमत आणि आताची साध्या लॅपटॉप ची कदाचित विद्यार्थ्यांना सारखीच वाटत असणार. 

दृश्य बघा हं, एका हातात चालता चालता वापरायचा असा तो मोबाईल, पाहिजेच काहीही झालं तरी आणि दुसऱ्या हातात घडी केलेला तो लॅपटॉप. कधीही, कुठल्याही अवस्थेत, घाईत बंद केलेला लॅपटॉप. तो इतका सहजतेने पकडलेला असतो जशी कि वही, किंवा कागदांची फाईल, जी पडली तरी काही होणार नाही, तोडफोड / नुकसान होणार नाही. महाविद्यालयात चालतांना, लक्ष नसतांना, कोणीही कुठेही धडकू शकतं, समोर येऊ शकतं, लक्ष नसल्यामुळे पाणी असू शकतं, काहीही शक्य आहे. इतकी मोठी बॅग दिली असतांना हातात का धरायचा लॅपटॉप? यक्ष प्रश्न आहे. शिस्त का नाही पाळायची, व्यवस्थित बंद करून मग का नाही निघायचं? सरते शेवटी तो प्रचंड महाग लॅपटॉप आहे, नाजूक आहे, काही झालं तर त्यात असलेला डेटा नाहीसा होऊ शकतो, बिघडू शकतो मग काय करायचं? बिघडल्यावर दुरुस्त करून घेण्यापेक्षा किंवा नवीन विकत घेण्यापेक्षा काळजी घेतली तर? आणि शेवटी तो विद्यार्थ्याला सहज मिळाला आहे काहीही न करता, अभ्यासासाठी. मग कमीत कमी चार वर्ष किंवा जेवढा अभ्यासाचा कालावधी आहे तो वर तरी जपला पाहिजे ना? दुसरा लॅपटॉप हा नोकरी लागल्यावर कंपनीने दिला पाहिजे, असं काही का नाही येत मनात विचार? इतका निष्काळजीपणा का? नोकरी लागल्यावर, कमवायला लागल्यावर कोणालातरी इतकं महागडं काही तरी घेऊन द्या, आणि त्याने ते असं-तसं वापरू द्या म्हणजे मग कदाचित कळेल कसं वाटत ते. 

अजून एक म्हणजे फडकं काय मारत नाहीत त्यावर कधी हे बापडे. स्क्रीन काळी ठेवलेली असते, बोलावं तेवढं कमीच आहे. असो. 


रविवार, २ एप्रिल, २०२३

डा पा - वातानुकूलित यंत्रणा

माझा लेक सध्या एका वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. हे महाविद्यालय आधी सरकारी होते आता निमसरकारी आहे. अतिशय जुनं, ८०+ वर्षांपूर्वी स्थापन झालेली हि संस्था असल्यामुळे सगळं बांधकाम पण तसंच जुनं आहे. वैद्यकीय महाविद्यालय सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी असलं तरी देखील त्याला सलंग्न असलेले रुग्णालय हे बहुतांशी गरजूंसाठी स्थापलेले असते. मोफत उपचार दिले जातात त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा फायदा होतो. काही वैद्यकीय महाविद्यालयांसोबत खाजगी किंवा मोफत उपचार न देणारे दुसरे रुग्णालय पण असते पण त्यात फक्त नावाजलेले डॉक्टर्स काम करतात, विद्यार्थी नाही.  महाविद्यालयाची इमारत कशीही असली तरी देखील विद्यार्थी दशेत असतांना अगदी साध्या रुग्णालयातच काम करायला सुरवात करावी लागते, ज्याची इमारतच काय पण सगळ्या सोयी सुविधा देखील साध्याच असतात. बऱ्याचदा रुग्णांची, डॉक्टरांची आणि त्यांची सेवा करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय होते पण काहीही पर्याय नसतो. डॉक्टरांना रुग्ण बरा करायचा असतो, रुग्णाला बरं व्हायचं असतं, विद्यार्थ्यांना शिकायचं असतं, कर्मचाऱ्यांना नोकरी आणि सेवा करायची असते, त्यामुळे साध्या ठिकाणी देखील अविरत कामं सुरुचं राहतात, ठेवावी लागतात. 

माझ्या लहानपणीपासून अर्धशतकी वाटचाल होईपर्यंत वातानुकूलित यंत्रणा घरी कधी बसवली नाही, त्यामुळे वापरली नाही आणि त्याची गरज पण भासली नाही कधीच.  त्यामुळे त्यावर अवलंबून राहणे तर नाहीच. नागपुरात असतांना प्रचंड ऊन असल्यामुळे भले मोठे डेसर्ट कूलर होते घरी, त्यानंतर पुण्यात तर अगदी पिटुकल्या कूलर नि काम भागतं, पंखा पण पुरेसा असतो. 

वातानुकूलित यंत्रणा घेण्याची तय्यारी तर आहे, पण का घेतली नाही ह्याचं खरं कारण मला आज उमगलं. बाकिच्यांच मला माहित नाही पण मी तरी आई म्हणून एक व्यक्ती म्हणून माझा लेक तिकडे वसतिगृहात प्रचंड उन्हात साध्या पंख्यावर भागवतो आहे तर मी कशी AC मधे अराम करणार? त्या करता मला सद्बुद्धी तर झाली नाहीच AC यंत्रणा विकत घेऊन वापरायची. सुर्यबाप्पाने अजून काही वर्ष तरी पुण्यावर अशीच कृपा ठेवावी म्हणजे फक्त मी नाही, बाकी सर्वांना त्याचा फायदा होईल. ज्या लोकांचे काम सतत उन्हात असते, फिरावे लागते त्यांना, पक्षी, प्राणी सर्वांना सुकर होईल. माणसांना पण सुबुद्धी मिळो कि त्यांनी पण सुर्यबाप्पा जास्त तळपणार नाही ह्याची खबरदारी नक्की घ्यावी. झाडं टिकवावी, सिमेंटचे जंगल कमी करावे प्रयत्नपूर्वक, म्हणजे सगळ्यांचा फायदाच फायदा, नाही का?  चला तर मग लागू या कामाला. 

डा पा - खरं कारण विदर्भ

माझ्या बाबांची सरकारी नोकरी आणि त्यामुळे सततच्या बदल्या. ह्या मुळे आम्ही खूप ठिकाणी वास्तव्याला होतो. निवृत्तीच्या आधी बरीच वर्ष म्हणजे अगदी माझ्या शालेय टप्प्याच्या प्रारंभापासून मग नागपुरात राहणं झालं सलग. नागपुरतंच इतकी वर्ष का राहायला मिळालं ह्याच खरं कारण मला आज समजलं, त्या मागचं गमक, त्याची पूर्वतय्यारी, प्लांनिंग म्हणा हवं तर. नागपुरात एक खास पद्धत आहे, पंगतीत किंवा ताट वाढतांना आवर्जून तिखट वाढलं जातं पानात किंवा तिखटाचं तेल.  उदाहरणार्थ पालक किंवा मेथीची पातळ भाजी असली कि त्यावर खाते वेळी तिखटाचं तेल घेण्याची पद्धत, किंवा अलिखित नियम म्हणा हवं तर.  ह्या मागचं फारच सोप्प कारण किंवा विचार असा कि नागपूर म्हणजे प्रचंड तिखट आणि प्रत्येकाच्या चवीप्रमाणे एक भाजी होणे कठिण. म्हणून सर्वसाधारण चवीची भाजी करायची, किंवा पदार्थ करायचं आणि त्यावर ज्यांना हवं त्यांनी जास्तीच तिखट घ्यायचं, तक्रार करायची नाहीच मुळी कि "किती मिळमिळीत भाजी आहे, तिखटाचा पत्ताच नाही, काही करता येत नाही, किंवा आईने काही शिकवलंच नाही...." ई. नकोच. पानात जर यदाकदाचित वाढायचं राहील तर सर्रास मागून घेतलं जातं तिखट तेथे.  मस्त आहेत माणसं. 

आता अनेक वर्ष नागपुराबाहेर राहून देखील हि तिखट तेलाची प्रथा माझ्या घरी सुरूच आहे अविरत. पातळ भाजी करायची ठरली किंवा सरते शेवटी गॅस बंद करण्याआधी तिखटाचं तेल केलं जातंच, हाताला, जिभेला ती सवय लागली आहेच कायमची. अहाहा च. आणि त्यात आता मला माझ्या लेकीची पण साथ, मग काय विचारता. एक तिखट पार्टनर माझी, नेहेमीसाठीची. 

माझ्या ह्यांना एक तर तिखट नकोच, मसालेदार तर नाहीच नाही आणि टाकलंच तर अगदी चिमूटभर तिखट, प्रत्येक पदार्थात. आणि मी म्हणजे दुसरं टोक, प्रचंड तिखट, ठेचा, वरून तिखट नेहेमीच. काही वर्ष चिडचिड झाली, ह्यांना त्रास झाला, मग दोन वेगळे तिखट असलेले पदार्थ पाळले गेले, वेगळे काढले गेले, कधी कधी मला संपूर्ण विसर पडला कि मी माझ्या विदर्भाची आहे, तिखटावर हात असलेली. अश्या वेगवेगळ्या प्रयोगाअंती आता प्रकाश पडला कि अशी वरून तेलाची, ठेच्याची सवय माझ्या लहानपणीपासून का जडली? माझी जडण घडण नागपुरात का झाली? अगदी नकळत वयापासून? कारण मला, माझ्या हाताला हि वरून घ्यायची सवय असावी, हवं तेवढं, नावापुरतं तिखट, मसाले घालून पदार्थ करता यावे ई. अहाहा च. काय म्हणावं त्याला? कित्ती वर्षापूर्वी त्याची तय्यारी सुरु झाली आणि आपण सगळेच उगाचच म्हणतो "देव कुठे आहे? तो काय करतो?". काय करतो? बघा म्हणावं, काय नाही करत, उगाचच दोष द्यायचा "त्याला" इतकं प्लांनिंग करून, सवयी लावून, विचारपूर्वक कृती करून, सातत्याने कार्यरत राहून केवळ तुमच्या प्रत्येकाकरता. मी तर "त्याच्या" प्रेमात होतेच, पण आज प्रकर्षाने ते प्रेम कित्तीतरी प्रमाणात वाढलं. आणि फक्त हेच नाही, अजून बऱ्याच अश्या गोष्टी आता स्फटिकासामान स्पष्ट व्हायला लागल्यात.           


2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...