माझ्या महाविद्यालयाच्या दिवसात बऱ्याचदा फक्त एक वही हातात मिरवत आणणारे दिज्जग होते. त्यामुळेच असेल कदाचित थोडिशी मोठी आकाराची वही / रजिस्टर निघाले ज्यात बरीच पाने असायची. त्या पानांची वरच्या उजव्या कोपऱ्यात मग छोटेसे भाग कापून प्रत्येक विषयाला काही पाने राखून ठेवायची. अर्थात घरी जाऊन, किंवा वाचनालयात बसून त्या टिपून घेतलेल्या मुद्द्यांवर विचार करून नोट्स तय्यार होत असतं. त्यामुळे आधी छोटी वही, एक संपली कि दुसरी मग तिसरी अश्या पद्धतीने, मग मोठे रजिस्टर असे वापरले जायचे. त्या वह्या किंवा रजिस्टर जसे कसेही वापरले जायचे, कुठेही ठेवले जायचे, बऱ्याचदा अवस्था असायची त्याची, हातात पकडलेले अगदी सहज असे, अगदी तसेच आता मला लॅपटॉप किंवा आय पॅड बद्दल होतांना दिसतंय, माझ्या चार डोळ्यांना ते बघवत नाही अजिबातच. तेव्हा जश्या आई वडिलांना हव्या तेवढ्या वह्या घेऊन द्याव्या लागत असतं आता हवा तो लॅपटॉप घेऊन द्यावा लागतोय, फरक इतकाच काय तो. वह्यांच्या किमतीत येत नाही हा पठ्या पण कदाचित त्या वेळची वह्यांची किंमत आणि आताची साध्या लॅपटॉप ची कदाचित विद्यार्थ्यांना सारखीच वाटत असणार.
दृश्य बघा हं, एका हातात चालता चालता वापरायचा असा तो मोबाईल, पाहिजेच काहीही झालं तरी आणि दुसऱ्या हातात घडी केलेला तो लॅपटॉप. कधीही, कुठल्याही अवस्थेत, घाईत बंद केलेला लॅपटॉप. तो इतका सहजतेने पकडलेला असतो जशी कि वही, किंवा कागदांची फाईल, जी पडली तरी काही होणार नाही, तोडफोड / नुकसान होणार नाही. महाविद्यालयात चालतांना, लक्ष नसतांना, कोणीही कुठेही धडकू शकतं, समोर येऊ शकतं, लक्ष नसल्यामुळे पाणी असू शकतं, काहीही शक्य आहे. इतकी मोठी बॅग दिली असतांना हातात का धरायचा लॅपटॉप? यक्ष प्रश्न आहे. शिस्त का नाही पाळायची, व्यवस्थित बंद करून मग का नाही निघायचं? सरते शेवटी तो प्रचंड महाग लॅपटॉप आहे, नाजूक आहे, काही झालं तर त्यात असलेला डेटा नाहीसा होऊ शकतो, बिघडू शकतो मग काय करायचं? बिघडल्यावर दुरुस्त करून घेण्यापेक्षा किंवा नवीन विकत घेण्यापेक्षा काळजी घेतली तर? आणि शेवटी तो विद्यार्थ्याला सहज मिळाला आहे काहीही न करता, अभ्यासासाठी. मग कमीत कमी चार वर्ष किंवा जेवढा अभ्यासाचा कालावधी आहे तो वर तरी जपला पाहिजे ना? दुसरा लॅपटॉप हा नोकरी लागल्यावर कंपनीने दिला पाहिजे, असं काही का नाही येत मनात विचार? इतका निष्काळजीपणा का? नोकरी लागल्यावर, कमवायला लागल्यावर कोणालातरी इतकं महागडं काही तरी घेऊन द्या, आणि त्याने ते असं-तसं वापरू द्या म्हणजे मग कदाचित कळेल कसं वाटत ते.
अजून एक म्हणजे फडकं काय मारत नाहीत त्यावर कधी हे बापडे. स्क्रीन काळी ठेवलेली असते, बोलावं तेवढं कमीच आहे. असो.