माझा लेक सध्या एका वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. हे महाविद्यालय आधी सरकारी होते आता निमसरकारी आहे. अतिशय जुनं, ८०+ वर्षांपूर्वी स्थापन झालेली हि संस्था असल्यामुळे सगळं बांधकाम पण तसंच जुनं आहे. वैद्यकीय महाविद्यालय सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी असलं तरी देखील त्याला सलंग्न असलेले रुग्णालय हे बहुतांशी गरजूंसाठी स्थापलेले असते. मोफत उपचार दिले जातात त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा फायदा होतो. काही वैद्यकीय महाविद्यालयांसोबत खाजगी किंवा मोफत उपचार न देणारे दुसरे रुग्णालय पण असते पण त्यात फक्त नावाजलेले डॉक्टर्स काम करतात, विद्यार्थी नाही. महाविद्यालयाची इमारत कशीही असली तरी देखील विद्यार्थी दशेत असतांना अगदी साध्या रुग्णालयातच काम करायला सुरवात करावी लागते, ज्याची इमारतच काय पण सगळ्या सोयी सुविधा देखील साध्याच असतात. बऱ्याचदा रुग्णांची, डॉक्टरांची आणि त्यांची सेवा करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय होते पण काहीही पर्याय नसतो. डॉक्टरांना रुग्ण बरा करायचा असतो, रुग्णाला बरं व्हायचं असतं, विद्यार्थ्यांना शिकायचं असतं, कर्मचाऱ्यांना नोकरी आणि सेवा करायची असते, त्यामुळे साध्या ठिकाणी देखील अविरत कामं सुरुचं राहतात, ठेवावी लागतात.
माझ्या लहानपणीपासून अर्धशतकी वाटचाल होईपर्यंत वातानुकूलित यंत्रणा घरी कधी बसवली नाही, त्यामुळे वापरली नाही आणि त्याची गरज पण भासली नाही कधीच. त्यामुळे त्यावर अवलंबून राहणे तर नाहीच. नागपुरात असतांना प्रचंड ऊन असल्यामुळे भले मोठे डेसर्ट कूलर होते घरी, त्यानंतर पुण्यात तर अगदी पिटुकल्या कूलर नि काम भागतं, पंखा पण पुरेसा असतो.
वातानुकूलित यंत्रणा घेण्याची तय्यारी तर आहे, पण का घेतली नाही ह्याचं खरं कारण मला आज उमगलं. बाकिच्यांच मला माहित नाही पण मी तरी आई म्हणून एक व्यक्ती म्हणून माझा लेक तिकडे वसतिगृहात प्रचंड उन्हात साध्या पंख्यावर भागवतो आहे तर मी कशी AC मधे अराम करणार? त्या करता मला सद्बुद्धी तर झाली नाहीच AC यंत्रणा विकत घेऊन वापरायची. सुर्यबाप्पाने अजून काही वर्ष तरी पुण्यावर अशीच कृपा ठेवावी म्हणजे फक्त मी नाही, बाकी सर्वांना त्याचा फायदा होईल. ज्या लोकांचे काम सतत उन्हात असते, फिरावे लागते त्यांना, पक्षी, प्राणी सर्वांना सुकर होईल. माणसांना पण सुबुद्धी मिळो कि त्यांनी पण सुर्यबाप्पा जास्त तळपणार नाही ह्याची खबरदारी नक्की घ्यावी. झाडं टिकवावी, सिमेंटचे जंगल कमी करावे प्रयत्नपूर्वक, म्हणजे सगळ्यांचा फायदाच फायदा, नाही का? चला तर मग लागू या कामाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा