बुधवार, ३१ जुलै, २०२४

१९६२: धूप दीप कापूर


मला अगदी स्पष्ट पणे आठवतंय अगदी शाळेपासून दररोज संध्याकाळी घरी दिवेलागणीच्या वेळी आई देवापाशी दिवा, उदबत्ती लावत असे आणि त्यानंतर संपूर्ण घरात, अंगणात उदबत्ती फिरवली जायी मग तुळशीपाशी ती लावत असे. अगदी तसेच अधेमधे कोळसा तापवून त्यावर धूप घालून तो सर्वत्र फिरवला जात असे.  कित्येक वर्ष हा उपक्रम न चुकता चालला होता. तेव्हा माझ्या आजूबाजूला सर्वत्र सारखं वातावरण होतं त्यामुळे सर्वांच्या घरी असेच होत असे, ठराविक वेळी, दिवशी, अगदी जसे कि ठरलेलेच आहे. 


त्या नंतरची आठवण म्हणजे नवरात्रीचे दिवस, नऊ दिवस, नऊ संध्याकाळी भरपूर प्रमाणात धूप दाखवला जायचा. बहुतांशी प्रत्येक घरात नाही पण खूप ठिकाणी देवीची स्थापना होत असे आणि त्यामुळे तिचा जागर आणि आरती म्हणजे धूप, दीप, कापूर खूप प्रमाणात. फक्त नवरात्रच नाही तर प्रत्येक सणाला अशीच पूजा अर्चा, होम हवन, होत असे. छोट्या मोठ्या देवळात देखील अश्याच पूजा व्हायच्या, तेथे देखील मोठ्या प्रमाणात धूप दीप कापूर लावला जायचा. शिवाय काही ठिकाणी खायचा कापूर प्रसादातून सेवन होत असे. सर्रास पूजा होत असल्यामुळे ठराविक प्रसाद दिला आणि सेवन केला जायचा त्यात खडीसाखर, सुंठ, केळ असे खास पदार्थ असायचे. 


पूजा आणि आरती म्हणजे टाळ्या आल्याचं, संपूर्ण लक्ष देऊन अगदी दररोज किंवा ठराविक दिवशी देवाचे तालबद्ध पद्धतीने नामस्मरण केले जायचे. पाठ असेल तर स्वतः म्हणून किंवा सगळे कानावर पडायचे. तो महाप्रसाद पण सातत्याने सेवन केला जायचा जो त्या मंत्रोचारांमध्ये तय्यार होत असे. 


ह्या सगळ्या धार्मिक आणि आनंदी वातावरणामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य टिकून राहायचं. डासांची पण निर्मिती कमी प्रमाणात होत असे किंवा ह्या संपूर्ण धूप दीप कापूर ह्या मुळे ते जवळपास फिरकत नव्हते. आरतीमध्ये सामील झाल्यामुळे असेल कदाचीत कपड्यांना पण तो सुगंध टिकून राहत असे, त्यामुळे आरती नंतर सुद्धा डासांचा एवढा धोका होता हे कानावर पडले नाही तेव्हा, कित्येक वर्षे. आता सगळंच लोप पावलंय, त्यामुळे डासांना आयतं खाद्य मिळालं आणि संपूर्ण स्वास्थ्य कोलमडलं बरेच जणांचं. 


प्रत्येक सणवार मोठ्या प्रमाणात होणे नाही आता, किंवा नेहेमी देवळात जाणे पण कदाचित सहज शक्य होणार नाही बऱ्याच जणांना, कृत्रिम सुगंध / सुवास जास्त प्रभावित करतात कि काय ह्या डासांना, त्यामुळे ते आपला आस्वाद घ्यायला येतात. असो. जमेल तेवढी काळजी घ्या, घरी दररोज एखादी आरती म्हणा, तीर्थ प्रसाद सेवन करा, टाळ्या वाजवा, नतमस्तक व्हा, आनंदी राहा, आनंद वाटा / द्विगुणित करा, कदाचित फरक पडेल, जाणवेल आणि दिसेल देखील. 

१९६१: मान डोलवणे


मला परवा एक निरोप आला आपल्या व्हाट्सअप वर. त्यात माझी मी अमुक अमुक दिवशी तमुक वेळेला उपलब्ध आहे का हे विचारलं होतं आणि त्याला मी अंगठा दाखवला. म्हणजे आजकाल व्हाट्सअप वर आलेल्या निरोपाला काही क्षण धरून ठेवलं कि तो ईमोजी च्या स्वरूपात थोडक्यात आणि पट्टदिशी उत्तरे देऊ देतो. गेली ५-६ महिने झाले हि सुविधा उपलब्ध आहे, आणि मोठ्या आनंदाने मी ती वापरत आहे. नवीन गोष्ट वापरण्यासाठीच दिलेली असते, ती सोयीची असते म्हणून उपलब्ध केलेली असते जन सामान्यांसाठी ना? मी उत्तर देऊन मोकळी झाले आणि ते माझ्या पट्टाकिनी विस्मृतीत पण गेलं, कारण ते काम मी केलं होतं. हे सगळं सकाळी घडलं आणि संध्याकाळी आला कि बांबू, ओरडा पडला मला, व्यवस्थित उत्तर द्यायला का जमत नाही तुम्हाला? जरा हो नाही म्हणायचं असेल तर शब्द वापरा, लिहा, असे अंगठे फक्त दाखवू नका, दिसत नाही ते पट्टाकिनी किंवा तुम्ही उत्तर दिलं आहे, अंगठा उंच केला आहे हे उमटत नाही  उत्तरासारखं प्रकर्षाने. त्यामुळे घोळ होतो, ते टाळा. मी हो म्हणून गप्प झाले आणि मला तिचा तो बाण रुतला, काही आठवलं. 


माझे कंपनीतले दिवस, अमेरिकेतला उत्कृष्ट काळ आणि मी हे सगळं वेळोवेळी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलेले वर्ग, सगळं आठवलं. आपण भारतीय, बहुतांशी प्रत्येक वेळी, नेहेमीच मान डोलावतों, हालवतो, हो ला पण तशीच आणि नाही ला पण तशीच दिसते ती अनेकांना आणि मग घोळ होतो. असा हा घोळ टाळता येऊ शकतो. बाहेर देशातल्या संस्कृती मध्ये हे असं माना डोलवणे ठाऊक नसल्यामुळे पंचाईत होते, समजत नाही समोरच्याला तुमची काय प्रतिक्रिया आहे ते. त्यामुळे स्पष्ट हो किंवा नाही म्हणा, मान न हलवता ते होऊ शकतं. स्वाभाविक आहे, अनेक वर्षांची सवय आहे, नकळत होतं पण ते झालं तरी बोला, हे जास्त महत्वाचे आहे. 


आपण परदेशी पणा अनेक पद्धतीने आनंदाने आणि अभिमानाने स्वीकारला आहे, मग ते खाण्याच्या बाबतीत असो, वेष आणि केश भूशा असो, बोलणं असो, वागणं असो, मैत्री च्या नावाखाली असो, छंद असो, सिनेमे असो, अगदी म्हणजे अगदी प्रत्येक ठिकाणी आपल्याला बाहेरच्या गोष्टी अंगिकारल्या आहेत हे लक्षात येतंच. किंबहुना ते अभिमानाने दर्शवलं जातं, मग हि छोटीशी सवय अंगिकारायला असा कितीसा वेळ लागेल? खूप थोडा. सवयीने होईल, प्रयत्न करून बघाच.  आपल्याला त्यांच्या सोबत काम करायचं म्हणजे हे करणं आलंच, सुखकर होईल. 


हि एक माझी फक्त विनंती माझ्या नजरेस पडलं, मी अनेकदा अनेकांना ते सांगितलं आणि लिहावसं वाटलं म्हणून हा पंक्ती प्रपंच. 

१९६०: सेहत का राज


"आजि सोनियाचा दिनु  

वर्षे अमृताचा घनु  

 हरि पाहिला रे हरि पाहिला रे"


माझी आज एकंदरीत अशी अवस्था झाली हो, कारणे? अनेक आहेत. देते एक एक करून. 

अगदी कळत्या वयापासून फर्ग्युसन महाविद्यालयाबद्दल खूप म्हणजे खूप ऐकलं होतं. ह्या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश, उदिष्ट आणि माणसं हि जगावेगळी होती. पण त्या वेळी मी नागपूरकर होते आणि "इथे विद्यार्थी दुरुन दुरून शिकायला येतात", "आहे त्याचं सोनं करा" असा पिंड होता. वसतिगृहात जाऊन राहणे हे तितकसं मान्य नव्हतं आणि ते देखील मुलीला. त्यामुळे मी गप्प राहिले पण इच्छा मात्र खोलवर जिवंत राहिली. मग अनेक वळणं आणि, बऱ्याच टप्प्यांवर निर्णय घेतले पण FC दूरच राहिले. त्या महाविद्यालयाच्या समोरून जातांना सगळं आठवायचं. आणि आज मला पुन्हा एकदा बोलावण्यात आलं त्याच किंवा FC च्याच एका नवीन संस्थेमधे बोर्ड सदस्य म्हणून. 

"काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण" अशी माझी अवस्था FC बद्दल लिहिण्यासाठी. पण राहावलंच नाही, म्हणून हे काही शब्द. तिथली वास्तू, तिथले वातावरण, ऊर्जा, माणसं, शिक्षक, विद्यार्थी हे सर्व इतके वेगळे का असतात? हे मात्र नेहेमीच जाणून घेण्याची उत्सुकता होतीच. चार दा जाणं झालं माझं त्या परीसरात, उदघाटनाला, भूमिपूजनाला, विद्यावाचस्पती (PhD) मुलाखतींसाठी वगैरे. आज मी ऑनलाईन हजर होते, आणि सगळं म्हणजे सगळं आत्मसात करण्याचा प्रयत्न होता. सरते शेवटी मला हवे ते उत्तर मिळालेच, आणि बाकी सगळ्या मोठ्या कारणां व्यतिरिक्त एक अजून पिटुकले कारण समजले. BoS ची मीटिंग म्हणजे एक बड प्रस्थ असतं. ती उभी करणे म्हणजे बराच अभ्यास, कागदं, माणसं, आमंत्रणं आणि सल्ले असे भरपूर काही असतं. अश्या मीटिंग मधे सर्वांसाठी  पाणी हे तांब्या पेल्यात / वाडग्यात देण्यात आलं, टेबल वर ठेवण्यात आलं, अहाहा च. म्हणजे इतकी काळजी अगदी प्रत्येकाची, अप्रूप आहे. प्लास्टिक च्या छोट्या बाटल्या असणं मीटिंग मधे हे गृहीत धरलं गेलं आहे. प्लास्टिक कुठल्याही पद्धतीत घातकच. जे महाविद्यालय इतकी मस्त सर्वांची मनःपूर्वक काळजी घेते, तिथले सगळेच काय भन्नाट असेल फक्त विचार करा? "शितावरून भाताची परीक्षाच" नाही का? मी तरी हे दृश्य आज पहिल्यांदा बघितलं. मी इतक्या वैविध्य ठिकाणी जात असते पण हे अवर्णनीय असे होते माझ्या साठी. काही नक्की म्हणतील "काय त्यात?" पण नाही, "खूप काही त्यात". उगाच नाही इतकी वर्ष सर्वार्थाने एक नंबर वर आहे हे विद्यापीठ, प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घडवलेत. FC मध्ये प्रवेश मिळणं हि सन्मानाची गोष्ट आहे, अजूनही, इतक्या दशकानंतर सुद्धा. क्या बात है? 

आणि अश्या FC / DES मधे माझ्या सारख्या छोट्या शहरातून आलेल्या, मराठी भाषेत शिक्षण झालेल्या मुलीला एक भाग होता आलं हि खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठं भाग्य माझं. आणि हे फक्त माझ्या चार डोळ्यांना दिसलेलं, मला भावलेलं असं हो.  

FC / DES च्या अप्रतिम "सेहत का राज" आज मला समजलं. इथे मी सर्व स्तरावरची सेहत समबोधते आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक ई. 

प्रत्येक विद्यार्थी हा समग्र, सर्वकष स्वरूपाचा घडावा म्हणून जी सर्व शिक्षकांची धडपड होती ती आज दिसून आली, वेळोवेळी दृष्टीस पडलीच. प्रत्येकापर्यंत "तो" म्हणजे "बाप्पा" किंवा "हरी" पोचू शकत नाही, त्याचे बोट धरून मार्ग दाखवू शकत नाही म्हणून शिक्षकांची "त्याने" निर्मिती केली आणि त्याच प्रत्यंतर आज आलंच. खूप विचारपूर्वक अभ्यासक्रम मांडला होता, आणि त्यात काही बदल करण्यास तय्यारी पण दिसली. सगळंच वाखाणण्यासारखं. 

मंगळवार, ३० जुलै, २०२४

१९५९: नो उपवास


माझ्या वडिलांचा गुरुवारी उपवास असायचा, श्री दत्त परंपरा आहे घरी त्यामुळे. शनिवारी पण असायचा, का कुणास ठाऊक आणि मी कधीच विचारण्याच्या भानगडीत पडले नाहीच कारण यथेच्छ उपवास आणि नॉन उपवास पदार्थांवर ताव मारता यायचा त्या निमित्याने. म्हणजे माझी कोणे ऐके काळी ख्याती होती कि मध्यरात्री जर मला उठवायचे असेल तर साबुदाणा खिचडी केली आहे, खाणार का एवढं विचारायचं, बास. इतकी म्हणजे इतकी मनापासून मला ती आवडायची.  पांढरी शुभ्र, मस्त तिख्खट आणि उगाच साखरेची चव असलेली, भरपूर कोथिंबीर आणि उत्कृष्ट दाण्याचे कूट, कधी कच्चा बटाटा घालून तर कधी उकडलेला, अहाहा च. क्या पदार्थ है? आई शपथ !!!


इतकी वैविध्यता होती आणि आहे उपवासाच्या पदार्थांमध्ये, कि आई खूप प्रकार करायचीच आणि त्यामुळे माझी मज्जा होती. त्यातलाच एक म्हणजे भगर आमटी.  आईला मागे लागून जास्त आमटी करायला सांगायची. कारण? अहो सोप्पं आहे, उपवासाच्या दिवशी भगरी सोबत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारीला म्हणून ती शिळी दाण्याची आमटी आणि गरमागरम पहिल्या वाफेचा भात, भरपूर तूप, क्या बात है? लै भारी, जगावेगळी ती चव. 


मी म्हणजे पट्टीतली खाणारी, अगदी येऊ द्या पद्धतीची, त्यामुळे खूप मज्जा यायची. आज हे लिहिण्यामागचं प्रयोजन असं कि काल आठवण आली म्हणून भगर आमटी  केली होती रात्री, ती जास्त केली, आज सकाळी उठल्या उठल्या सकाळची कामे उरकल्यावर आधी भात लावला आणि कधी एकदा ती कालची आमटी आणि भात फस्त करते असं झालं होतं मला. पर्वणीच हो, कुठलीही उपमा देता येणारच नाही ह्या अश्या नवख्या / अनोख्या पदार्थाला. जगातली सर्वोत्तम चव, असं वाटतं होतं कि तो कालवलेला भात संपूच नये. 

1958: माझे नितांत प्रेम


खरं बोलू का? माझे नितांत प्रेम आहे रवा दोस्यावर, साधा करा आणि भाजी, सांबर, चटण्यांसोबत मिटक्या मारत फस्त करा, किंवा भरपूर भाज्या घालून करा आणि नुसता गरम गरम आनंदाने खा. त्याच्या सोबत काहीही नसलं तरी निभावतं, एखादी पुडी चटणी, ताबडतोब होणारी देखील पुरते, किंवा कोरडी चटनी पण चालते. मी तर आळशी, डोसा झाला कि त्यावरच भुरभुरते कोरडी चटणी किंवा सांबार मसाला, माझ्या आईची पद्धत.  सोप्पा आहे करायला, बास तो रवा भिजवा कि लगेच फुलतो, फुगतो नाही हा मंडळी. सगळं सामावून घेतो, भिजवणे नाही, मिक्सर नाही, फुगणे नाही, रात्रभर लवाजमा नाही आणि पौष्टिक भरपूरच. त्यामुळे मज्जा येते. अजून एक खासियत म्हणजे तव्यावर टाकला रे टाकला कि मस्त स्वतःच पसरतो, फिरवत बसायला नकोच, कुठलेही कौशल्य वगैरे दाखवायला नको आणि उगाच ऐकून घ्यायला नकोच, कि गोलच डोसा झाला नाही, नीट पसरला नाही, जाडच झाला ई. अजून यादी भली मोठी आहे. 

अगदी तसेच भगरीच्या दोस्याचे देखील आहे, झट कि पट भिजणार, मस्त भरपूर काकड्या, हवा असेल तर बटाटा, बारीक चिरलेल्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर असं सगळं साग्र संगीत घालून तो इतका चविष्ट होतो कि ज्याचं नाव ते. आणि अगदी रव्या सारखा स्वतः मस्त फैलणारा, कौशल्य दाखवायची गरज नाहीच. आणि पौष्टिकता तर शिगेला पोचलेली. शिवाय काहीही आंबवायला नकोच, आधीच आदल्या दिवशीपासून धडपड नाहीच, त्यामुळे माझं नितांत प्रेम आहे ह्या दोघांवर आणि सारखा ताव मारत राहते मी त्या वर. 

अगदीच खूप उत्साह असेल तर महिन्याचा किराणा आला कि रवा आणि भगर थोडीशी भाजून, पीठ करून ठेवायची. मग काय ताबडतोब डोसे तय्यार. साधी दाण्याची चटणी पण पुरेशी आहे, काहीही नसलं तरी आताच इतका माल घातला आहे कि तो पुरेसा आहे. किंवा जास्तीत जास्त लोणचं चवीला. अहाहा च. 

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

1955: हिशोब

 

मला एका संस्थेने त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता बोलावले होते. खूप दूरचे ठिकाण होते. माझ्या स्वभावानुसार १) मी बहुतांशी विचारत नाही कि किती पैसे देणार वगैरे  २) मला नक्की खात्री असते कि ते योग्यच देतील म्हणूनही असेल कदाचित, आणि देतात देखील. काही संस्था जाण्या-येण्याचे पण पैसे देतात आणि काही नाही.  ठीक आहे, काहीच फरक पडत नाही. ह्या संवादासाठी मी टॅक्सी ने जाण्याचे ठरवले कारण इतक्या दूर मी गाडी चालवत नाही, आणि तो कार्यक्रम दुपारी होता त्यामुळे परत येतांना मी एकांना विनंती केली होती कि मी त्यांच्या सोबत अर्ध्या रस्त्यापर्यंत येईल आणि ते हो पण म्हणाले होते. हे मला आधीच ठाऊक असल्यामुळे, ३-४ तासांचे बोलणे होणार असल्यामुळे आणि उभे पण राहावे लागणार, अंतर फार, त्यामुळे मग मी हिशोब मांडला मनातल्या मनात.  एकंदरीत जाण्या-येण्याचे कित्ती होतात पैसे? आणि मला एक अंदाज आला. येतांना अर्धेच खर्च होणार होते, त्यामुळे मी त्या बेरजेनुसार, बेरजेच्या कक्षेत राहून जातांना जरा आलिशान गाडी निवडली, अर्थात ती महागडी होती. नेहेमी पेक्षा जास्त पैसे मोजावे लागले पण समाधान म्हणजे काय हे खरंच क्षणो क्षणी अनुभवता आले, गाडीची उत्तोमोत्तम स्थिती, चालक, पोटातले पाणी न हालू देता केलेला प्रवास, कुठंही घाई न करता वेळेआधी पोचलेले मी, हे सगळं समिकरण इतकं समाधान देऊन गेलं कि ज्याचं नाव ते. खूप म्हणजे खूप वेगळं वाटलं मला. हा माझा वाढदिवसाचा महिना, त्यामुळे जसे कि मीच मला बक्षीस दिले असे काहीसे झाले. 


एक नवीन टॅक्सी चे अँप आहे, ज्यावर किंमत कमी करता येते, १० किंवा २० रुपयांनी. आणि मी ती सुविधा वापरते, कधी उपयोग होतो कधी नाही. पण सुविधा आहे, मला साधारण अंदाज आहे किती पैसे होतील मग का नाही वापरायची ना? माझ्या फोन वर दोन अँप आहेत आणि मी त्या दोन्ही वर आधी किंमत बघते आणि मगच टॅक्सी किंवा ऑटो बोलावते. अशी मी थोडक्यात, आणि आज चक्क महागडी गाडी घेतली, आणि ते देखील मस्त ठरवून, बाप रे, काय म्हणायचं ह्याला. मी जवळपास दोन्ही वेळचे पैसे एकाला दिले. पण मज्जा आली. माझ्यातला हा बदल नावीन्याने नटलेला आहे ह्यात शंकाच नाही. मला खरंच साध्या गाड्यांचा मनापासून कंटाळा आला होता. पावसाळ्यात खरंच नको वाटतं होतं त्यात बसायला, म्हणून पण असेल कदाचित. पण काहीही असो मला एका महाराणी सारखं वाटलं मला, मोठ्या गाडीत बसून जातांना, जसे कि ह्या राज्यातली जनता माझ्या अंगावर फुले उधळत आहेत, माझ्यासाठी वाट मोकळी करून देत आहेत, उगाचच, काहीही कारण नसतांना. कोण म्हणतं फुलायचे, झुलायचे दिवस फक्त एकदा येतात? छे छे, आज माझा झोपाळ्यावाचून झुलायचा दिवस निश्चित होता. 

गुरुवार, २५ जुलै, २०२४

१९५३: भोक


माझे एक पहारेकरी काका आहेत, जे सातत्याने आमच्या संपूर्ण वसाहतीची काळजी घेतात, अहोरात्र अशी. प्रत्येक इमारतीला तरी दिवस आणि रात्रपाळीचे पहारेकरी बदलतात पण हे मुखिया असल्यामुळे सातत्याने हजर असतातच. काही वेळेपुरते ते त्यांच्या खोलीवर जाऊन येतात, पण बऱ्यापैकी आमच्याच सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे त्यांनी. एकदा मला म्हणतात कसे कि मॅडम मला पाय मोजे ऑनलाईन मागवून द्या, माझ्या नावावर म्हणजे मी इथे आल्यावर त्यांना पैसे देईन. सध्या पावसामुळे कपडे वाळत नाहीत आणि मोजे लागतात. मला बूट मोज्यांशिवाय घालायला नको वाटतात. त्यांच्यासाठी मग त्यांनी सांगितलेल्या किमतीत मोजे मी शोधायला सुरवात केली ऑनलाईन. शोधता शोधता मला अनेक प्रकार आढळले. आजकाल तर वैविध्यतेने नटलेत दुकानं, बाजार. मोज्यात इतके प्रकार मी कधीही बघितले तर नव्हतेच पण विचार देखील केला नव्हता. मला एक प्रकार दिसला तो म्हणजे फक्त टाचेपासून ते पायांच्या बोटांच्या सुरवाती पर्यंतच असलेले मोजे. म्हणजे पायाची बोटे मोकळी, मोज्यात बंदिस्त नाहीत. वा, क्या बात है? कोण वापरत असेल हा प्रकार? असा मला प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाहीच. सर्वप्रथम म्हणजे का, किंवा कसला विचार करून हे असे मोजे बाजारात आणले असतील? कशासाठी? माझ्या छोट्याश्या मेंदूला बराच त्रास दिला पण अनुत्तरीतच राहिले सरतेशेवटी.  


त्या वरून मला एक दोन किस्से आठवले. एक म्हणजे मोज्यांचे भोक आणि दुसरं म्हणजे व्यक्तिमत्व. कदाचित पायांच्या बोटांची नखं वाढली कि, किंवा मोजे व्यवस्थित सांभाळले नाही कि, किंवा जुने झाले असले फारच, जर्जर म्हणायचं आहे मला, कि हमखास मोज्याला भोक पडतच. असे भोक खरं तर कोणाला दुसऱ्याला दाखवू नयेच आणि दिसण्याच्या आत मोजे नवे घ्यावेत हा एक अलिखित नियम आहे. उच्च विद्याविभूषित, मोठ्या पदावर काम करणारा, मोठ्या अंतर्देशीय कंपनीत आणि होणारा नवरा जर असे भोक असलेले मोजे घालत असेल तर त्या मुलीने तेथेच नकार द्यायला हवा होता, कारण ते भोक फार म्हणजे फारच सांगून जाते त्या व्यक्तिमत्त्वाबद्दल. इशारा असतो तो, सावधानतेचा. पुढे काय होऊ शकतं हे दर्शवतो तो भोक पडलेला मोजा. जर तेव्हा निर्णय घेतला नाही तर मग पस्तावा निश्चित आहेच पुढे. असो. 


तर हे असे नवीन पद्धतीचे मोजे काढण्यामागचं कारण प्रकर्षाने समजलं मला. भोक पडणारच नाही, म्हणजे मग सगळे पुढचे प्रश्न बाद. अहाहा च. क्या बात है?  कित्ती हुशारीने समस्या हरण केलं ज्याने हे असं विचारपूर्वक डिझाईन निर्माण केलं. मला खूप म्हणजे खूप मज्जा तर आलीच पण आता व्यक्तिमत्व ओळखण्याची नवीन क्लुप्ती शोधून काढावी लागेल हे देखील समजलं.   

तेथे कर माझे जुळती


माझे पाय आता हळूहळू ताळ्यावर येऊ लागलेत, काही अंशी बरेच बरे आहेत असे म्हणायला हरकत नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे दररोज ची थांबलेली धावपळ, दगदग आणि ताणतणाव. काम करायला मी कधीच मागे राहिले नाही, त्यामुळे कामे करायला माझी कधीच ना नव्हती, पण ती योग्य पद्धतीने आणि गतीने होणे माझ्यासाठी, माझ्या पायांसाठी गरजेचेच होते. पाय ताळ्यावर यायला लागले कि एक नाही, दोन नाही तर चक्क तीन नवीन पाहुणे येऊन टपकले अचानक.  थोडीशी डॉक्टर ना शंका होतीच पण तिचे निरसन करणे आवश्यक होते ते झाले. काही स्नायूंना गतबंधन करून राहावेसे वाटले असेल आणि मग काय मिठीच मारली कि त्यांनी, चक्क तीन ठिकाणी. अश्या मिठ्या मारत आत दडून बसले तर कसे चालणार, लपूनछपून काय एकत्र बसायचं ना? बिनधास्त वावर कि, मारा मिठी पण ती तात्पुरती, हि म्हणजे जरा जास्त वेळाची  झाली हो. असो. त्या करता आता लक्षात आल्यामुळे पुढील तीन महिने म्हणे मला ढिशुम ढिशुम करत बसावे लागणार आहे, औषधांचा मारा, व्यायाम, मस्त वैविध्य शिस्तीत खानपान आणि भरपूर ध्यानधारणा. सोप्प आहे, मी लागणार लवकरच कामाला. हे सगळं आज पासून सुरु करायचं आहे. ह्या मिठ्या जरा मला भारी पडल्या आहेत, जरा जास्त त्रासदायक हो. त्यात मला एक खास बोलावणे आले एका संस्थेकडून. खूप दिवस झाले ते आमंत्रण मी स्वीकारून. पण अगदी ज्या दिवशी माझे उभे राहून शिकवण्याचे काम आहे त्याच दिवशी ह्या नवीन पाहुण्यांनी त्यांचं डोकं वर काढलं.  त्यांच्या अपेक्षेनुसार मला जरा सावकाश, संथ आणि न गडबड करता राहणे अत्यावश्यक आहे. पण समोर उभं ठाकलेलं काम पूर्ण होणं देखील अतिशय महत्वाचे.  "त्याला" माझा स्वभाव पूर्णपणे ठाऊक आहेच. त्यामुळे त्याने एक युक्ती शोधून काढली. मी अशी तशी मानणारी तर नव्हतेच मग काय त्याने संपूर्ण शहरात इतका पाऊस पाडला कि सगळे ठप्प झाले. बरोबर इतक्या वेळ होता तो पाऊस कि जोवर माझ्या कामाची वेळ निघून जात नाही. मला टुकटुक करत म्हणतो कसा, बस चुपचाप घरी आता, पुरे झाले काम, आराम थोडासा आत्ता हवा आहे, बघतोच मी तू कशी जातेस ते.  बाप रे, म्हणजे कित्ती काळजी बघा माझी त्याला. तो पाऊस कुठे, माझ्यातल्या मिठ्या कुठे, त्याला कसं कळलं असेल असं वागायला? धन्य झाले मी त्याचे हे विचारपूर्वक वागणे बघून, माझ्यासाठी जे केलयं ते  बघून. माझ्या सारख्या अनेक जणींना आज हमखास सुट्टी आणि आराम मिळाला असावा. धन्यवाद. आणि ज्यांना ह्या कृतीमुळे त्रास सहन करावा लागला त्यांना मनापासून सॉरी. क्षमा करा, माझ्या ध्यानी मनी नसतांना हे असं सगळं घडलं. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण".  

मंगळवार, २३ जुलै, २०२४

त्या खास गप्पा


मी पक्की नागपूरकर. मला जो अंधुकसा तिथला खूपच गोड असा पाऊस आठवतो तो म्हणजे बहुतांशी कोणालाच त्रास न देणारा. अर्थात रात्री पडून जाणारा, रस्ते आणि मॅनहोल्स इतके अप्रतिम बांधलेले कि सकाळी सगळं व्यवस्थित, पाणी निसरून गेलेलं असं. मग माझी रवानगी ह्या माझ्या पुण्यात झाली. जशी जशी माणसं बदलली, माणुसकी पूर्णपणे रसातळाला गेली, नाहीशी झाली, तसेच वातावरणात, पर्यावरणात देखील निश्चित बदल घडले. किंबहुना ह्या आपल्या माणसांनीच घडवून आणले. अर्थातच त्याचा परिणाम पावसावर पण झाला, कधी अगदीच नाही तर कधी ढगफुटी, अशी टोके गाठली त्याने. पावसाळा जो आधी मस्त वाटायचा, कारण तो त्रासदायक नव्हताच मुळी शिवाय दारावर भुट्टे झणझणीत हिरवी चटणी लिंबू लावलेले यथेच्छ हादडता यायचे. हे काय कमी होतं म्हणून मग उकडून भाजलेल्या शेंगांवर ताव मारता यायचा. आई गृहलक्ष्मी असल्यामुळे तिला कधीही म्हणजे कधीही सांगावे लागलेच नाही कि मस्त वैविध्य भजी कर ती उत्कृष्ट चटण्या सोबत पुढ्यात असायचेच. क्या बात है? 


पण जशी मी आई झाले, लहान मुले अश्या ह्या आगंतुक पाऊसात गरज नसतांना शाळेत जाऊ लागली, मला गुढग्या भर पावसात बाहेर पडावं लागायचं, गाडी चालवावी लागायची तेव्हा मात्र मी अथक संवाद सुरु केला, आणि तो सुरु ठेवला. मग मला कोणी स्वार्थी म्हटले तरी चालेल. आणि त्या गोष्टींचे सार म्हणता येईल, कि माझी मुलं तर मोठी झालीच, ती काळजीपूर्वक स्वतः जा-ये करू लागली, माझे बाहेर पडणे थांबले, तसा आमचा संवाद कमी झाला, मी त्याला त्रास देणं कमी केलं जे आधी अविरत सुरूच असायचं.  पण त्याने ऐकलं माझं. माझी नाहीत पण बाकी लेकरं तर जातात ना शाळेला? आया बाहेर पडताचच ना चाकरमाने असल्यामुळे, मग? त्यांची काळजी कोण घेणार. आणि ह्या आपल्या पुण्य नगरीच्या पावसाचा स्वभाव खरा असा नाहीच. तो म्हणजे अगदी पिरपिर, थोडासा, अगदी कोणाला म्हणजे कोणाला मार पडू न देता संथतेने पडत असतो. आणि गेले दोन दिवस असाच शांत पणे तो त्याचे कार्य करतो आहे, माझ्या विनंतीला मान देऊन, माझ्या सारख्या असंख्य माउलींच्या हाकेला ओ देऊन आणि त्याचा मूळ पदावर येऊन, इतकं सुखावह वाटतंय म्हणून सांगते कि ज्याचं नाव ते. मस्तच. खूप धन्यवाद माझ्या ह्या अश्या पावसाला, ढगांना आणि संपूर्ण पाण्याच्या चक्राला. 

कसं असतं नं !!!


मला अजूनही आठवतं मी लहान मुलांच्या शिकवण्या घ्यायची, मी लहान असतांना, माझी दहावी झाल्या झाल्या. तेव्हा मला खोटं वाटेल पण फक्त पन्नास रुपये मिळायचे एका मुलाचे एका महिन्याचे. पण ते देखील स्वकमाईचे म्हणजे अप्रूपच होतं मला. त्या नंतर किंचित उडी मारली मी, डिग्री हातात यायचीच होती आणि पिटुकली नोकरी मिळाली काहीसे पंधराशे असे मिळायचे महिन्याला. मग ते व्यवस्थित महाविद्यालयात शिकवायला लागल्यावर दुप्पट झाले महिन्याला, पण अकराचं महिने मिळायचे. असं करता करता गाडी सुरु झाली. हळू हळू पगारवाढ झाली, कदाचित अनुभव आणि पुढील शिक्षण होतं गेलं, कुठेतरी वरिष्ठांना समजलं कि हे शिक्षकी रसायन आहे, त्यामुळे द्या थोडं नियमात बसेल तसं. सरकारने पण मग मनावर घेतलं कदाचित त्यांना उमगलं असेल कि महागाई शिक्षकाला पण सुटली नाही त्यामुळे स्थिती सुधारली. त्यावेळी खूप उड्या मारणं माहित नव्हतं शिक्षकी पेशात. बे-एके-बे, मस्त मज्जेत चालू असायची गाडी, अर्थात हे मला माहित असलेल्याचं फक्त सांगते आहे हो. आता लाखात कमाई आहे, असावीच लागते ह्या वाढत्या आणि वेगळ्या जगात तक धरून राहायला.  हे सगळं होतं असतांनाच मला माझ्या पायांनी खुणा केल्या बऱ्याच, पण मी ढकला - ढकली करत राहिले, जवळपास तब्बल पाच वर्ष. आणि मग निर्णयाची वेळ आली, घेतला बाप्पाचे नाव घेऊन. त्या नंतर मग मुक्त विहार सुरु झाला. असंख्य महाविद्यालयं आहेत पुण्यात, बरेच खाजगी विद्यालयं पण आहेत, त्यामुळे मी इथून तिथे, जसे पाय साथ देतील तसे सुरु आहे मार्गक्रमण. आणि "बालपण देगा देवा" किंवा "एक चक्र पूर्ण होतं", ती सायकल पूर्ण होते इथेच असं म्हणतात ना अगदी माझे तसेच झाले आहे. त्या संस्थेला जमेल तेवढे देतात मानधन, काही जण येण्या-जाण्याचे देतात, त्यामुळे जेथून सुरवात झाली होती त्या मूळ पदावर मी येऊन पोचले पैशाच्या दृष्टीने. अर्थात तेव्हाचे पन्नास म्हणजे आज हजारोत आहेत पण तरी "फुलाची पाकळीच" ती. त्या मुक्त संहाराने मला खूप काही दिले, देत आहे, देत राहतील. खूप वेगवेगळी ठिकाणे, रस्ते, जागा, इमारती बघायला मिळतात. असे देखील विद्यार्थी असतात हे समजतं. नवीन, तरुण, उत्साहाने सळसळते शिक्षक बघायला मिळतात. नवनवीन सिल्याबस पण आहेत हे समजतं. वर्गांचे प्रकार, बाक, फळे, गणवेष, आणि असे इतर अनेक बाबी. क्या बात है!!! मस्तच. माझ्यासारखी भाग्यवान मी च. शिकवायचं जाऊन फक्त, बाकी काही नाही, जे मला मुळात माहिती होतं ह्या पेशा बद्दल. त्या नंतर कालानुरूप खूप म्हणजे खूपच बदल झाले, व्हायलाच हवेत, किंबहुना शर्यतीत टिकायचं म्हणजे जगापुढे राहायलाच हवे ना? मला ते भावलं नाही म्हणून मी काढता पाय घेतला, अक्षरशः. ते वर्तुळ पूर्ण झालं ह्याचा आनंद आहे, खूप नवीन चेहेरे पाहायला मिळतात, नवीन साड्या, नव्या जागा आणि संपूर्ण स्वातंत्र्य, हवे तेव्हाच काम करायचे.  सुरवात केली तेव्हा देखील बाप्पाचं होता सद्बुद्धी द्यायला आणि आता देखील बाप्पाचं घडवून आणतोय सगळं, मी फक्त दिसते, असतो तोच शिकवायला. अजून काय हवंय. पावलं सगळं. 

काठ वदले


आपल्या भारतातले महावस्त्र म्हणजे साडी, अगदी अंगभर आणि प्रत्येक मुलीला शोभून दिसणारे असे. त्यात पाचवर आणि नऊवार असे दोन प्रकार. आधी तर साडी पटकिनी आणि चापचूप नेसणं म्हणजे एक कला होती. त्या नंतर काळानुसार त्यात किंचित बदल झाले आणि आताशा साडी चढवली जाते, नेसली नाही. अर्थात हे प्रमाण कमी आहे, काही तरुण किंवा घाई असलेल्या व्यावसायिकांना लागू आहे. बऱ्याच जणी अजूनही साडी नेसतात, अगदी व्यवस्थित आणि टप्याटप्याने. प्रत्येक साडी ला दोन किनारे असतात असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. एक जो पायघोळ असतो आणि दुसरा जो साडीचा आधार असतो, वर आणि खालचा किंवा फॉल चा भाग असं म्हणायला हरकत नाही. ऊन, वारा, पाऊस, पाणी, धूळ, माती ह्या सगळ्यांशी चार हात करत तो फॉल चा काठ लढत राहतो, तक्रार न करता, अविरत. आणि ह्या अश्या साडीची घडी घातली, कपाटात ठेवली म्हणजे हँगर ला लावून अथवा किंवा व्यवस्थित इस्त्रीसारखी गुंडाळून, तरी हे दोन किनारे एकत्र येतातच. एका कडे धुळीची ताजी चव तर दुसरीकडे बहुतांशी पावडर किंवा अत्तराचा सुगंध. पण तरी देखील पर्याय नसतो एकत्र राहण्याशिवाय. अगदी प्रत्येक वापरानंतर साडी धुतली जातेच असे नाही, धुतली म्हणजे घरी किंवा दारी. तरी पण बिनतक्रार कश्या दोघी अत्यानंदाने बागडतात एकत्र.  एकदाका फॉल चढवला कि वरचे खाली आणि खालचे वर पण होऊ शकत नाहीच ना. मग आपण माणसे का असं शिकत नाही? जगी, स्थळी, पाषाणी असंख्य पद्धतीची माणसे आढळतात, संपर्कात येतात, काही कदाचित धुळीची ऍलर्जी घेऊन येतात तर काही अत्तराचा निर्मल सुगंध, काही ओलावा, तर कधी चिखल, आणि सरते शेवटी माणसांना माणसंच लागतात हो. मग काय हरकत आहे ह्या दोन पॅरलल, भिन्न वृत्तीच्या किंवा वातावरणात राहिलेल्या काठांसारखे राहायला? सगळे आपलेच आहेत ना? आणि कोणाचंच कोणाशिवाय अडत नाही असं नाही. बघा जमलं तर ह्या वैविध्यतेने नटलेल्या काठांकडून काही बाळकडू घेता आलं तर?

बुधवार, १७ जुलै, २०२४

अडथळ्यांची शर्यत (race with obstacles)


माझ्या लहानपणी शाळेत  अडथळे असतांना, मांडले असतांना शर्यत कशी जिंकायची, त्यातून मार्ग कसा काढायचा सहज रीत्या हे शिकवले जायचे. कदाचित तो फक्त एक व्यायामाचा भाग होता, किंवा चुस्ती, स्फूर्ती, तंदुरुस्ती साठी असावा. पण सर्वांनाच त्यात भाग घ्यावा लागायचाच.  तेव्हा प्रत्येकाचं खूप कौतुक किंवा अंजारणे - गोंजारणे होत नसे. NCC ची तुकडी होती आमच्या शाळेची, त्यामुळे देखील असेल कदाचित. किंवा त्या पल्याड काही वेगळं. शारीरिक, मानसिक अशी संपूर्ण प्रगती व्हावी म्हणून पण असेल कदाचित. तेव्हा गुरुजनांनी, PT च्या सरांनी सांगितले आणि आम्ही केले, बास. कुठलाही प्रश्न नाही, आडकाठी तर नाहीच नाही, शिवाय मस्त भन्नाट मस्ती करत करत शिकलो सगळं. खूप म्हणजे खूपच मज्जा यायची. ते अडथळे पडू न देता, कधी सरळ, तर कधी वाकडी करून, अर्थात बाकी सोबत धावणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन, कधी थोडीशी उडी मारून तर अनेक अश्या क्लुप्त्या वापरून ती शर्यत पूर्ण करायचा मानस असायचा. जिंकायचंच असं नाही, पण त्या अडथळ्यांना पार नक्की करायचं हे ठरलेले असायचे. आज इतक्या वर्षांनी, अर्धशतकी वाटचाल झाल्यावर  अचूक अर्थ समजला मला, कि हे असे अडथळे पार करणे आमच्या शिक्षणाचा महत्वपूर्ण भाग का होता ते?


आज मस्त पाऊस पडत होता, साधारण साडेसात वाजले होते संध्याकाळचे आणि मी आषाढी एकादशीचा कार्यक्रम आटोपून घरी येत होते. माझ्या आजूबाजूला बहुतांशी चाकरमाने होते. प्रत्येकाला प्रचंड घाई होती घरी पोचायची, ते देखील वेळेत, वेळेच्या आत. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, भल्यामोठ्या आकाराच्या गाड्या, त्यात समोर उत्कृष्ट पद्धतीची नावीन्याने भरपूर अशी स्क्रीन, मोबाईल तर आहेतच, हे सगळं सांभाळत वाट काढायची. बरे हे काय कमी होतं तर त्यात भर ध्वनी प्रदूषणाची, प्रत्येकजण फेविकॉल ने हात चिकटल्यासारखे हॉर्न वाजवत गाडी चालवत आहेत. कारण नसतांना हॉर्न का? आणि तो देखील इतका सातत्याने, गरज नाहीच पण असो. म्हणजे बघा हं, पाऊस, खड्डे, भरपूर गाड्या, रस्त्यावर चाललेले बांधकाम, दिवसभराचा थकवा, भूक, हॉर्न, आणि असे इतर अनेक उभे केलेले नाही तर खरोखरचे अडथळे.   


मस्त पाऊस पडत असल्यामुळे असेल कदाचित, किंवा भुकेची वेळ झाली होती म्हणून, थकवा दिवसभराचा घालवण्यासाठी किंवा अजून काही कारणांनी बहुतांशी सगळी खाऊ ची दुकानी दुथडी भरून वाहत होती. कोणतेही दुकान रिकामे नव्हतेच. मस्त भिजत लोक खाण्याचा, पिण्याचा यथेच्छ आस्वाद घेत होते. थंडी जाणवत असेल,  किंवा सवय म्ह्णून सिगरेट पण पिणे सुरु होते ठिकठिकाणी. आता बघा ना, ती न पिणाऱ्यांसाठी, अश्यांच्या श्वासाला, किंवा श्वास घेण्याच्या एकंदरीत संस्थेला किती पळवाट काढावीच लागत असेल, सदोदित. म्हणजे जमल्यास शुद्धच हवा वापरायची, अशुद्ध च्या वाटेल फिरकायचे पण नाही, इकडून तिकडून, वाकडी वाट करून पण जमल्यास मस्त हवा श्वास म्हणून उपलब्ध करून द्यायची. कित्ती ती कसरत, मेहेनत ना? त्याचमुळे बहुतांशी म्हणतात  वाटतं कि पॅसिव्ह स्मोक हा जास्त घातक आहे. 


तेव्हा सुपीक डोक्यात प्रकाश पडला कि शाळेत इतक्या वर्षांआधी का ती शर्यत शिकवली, करवून घेतली आणि उभी केली ते? क्या बात है!!! इतक्या वर्षांनी ते शिकवलेले उपयोगात येईल हे ठाऊक नव्हतं. आणि हे सगळं करायचं ते शांत डोक्याने. 


आज तर मी रिक्षात बसले होते, पण मी जेव्हा गाडीचे स्टिअरिंग व्हील हातात घेते तेव्हा मात्र निघायच्या आधी पेटपूजा करून घेते, फोन ला विश्रांती देते, अजिबात घेत नाही कोणाचा आलंच तर, घरच्यांना सांगून निघते, त्यामुळे ते फोन करत नाहीत, मोबाईल डेटा बंद करते, म्हणजे अडथळ्यांची शर्यत हि आनंदाची होऊन जाते, अडथळे होते का? असा प्रश्न पडतो मला. बघा म्हणजे काय ताकतीने शिकवलं आहे मला / आम्हाला शिक्षकांनी. 

मंगळवार, १६ जुलै, २०२४

खरे कारण


फ्लॅट संस्कृतीला का लोकांनी थारा दिला, का त्यांना बैठे घर पद्धतीपेक्षा फ्लॅट भावाला? असंख्य कारणे आहेत, काही ठळक: सुरक्षा, सोयी, शेजार, समुदाय, वैविध्य कार्यक्रम, देखभाल आपोआप होते, स्वच्छता, आणि बरेच काही. पण ह्या सर्वांच्या पल्याड पण एक कारण आहे. फ्लॅट्स म्हणजे गगनचुंबी इमारती. एका प्लॉट वर अनेक कुटुंब राहतात. बैठे घर म्हणजे एका छोट्या किंवा मोठ्या प्लॉट वर / जागेवर फक्त एकच कुटुंब. इथे जमीन मालकीची नसते, पण अनेक जण त्यावर राहत  असतात. ते मागे पुढे राहायला येतात, एकाच वेळी नाही. काही जण फ्लॅट्स विकतात, खरेदी करतात आणि असे अनेक वेळा होते. त्या एका जमिनीच्या तुकड्यावर जेव्हा एक कुटुंब राहते तेव्हा फक्त एकदाच त्या वास्तूची पूजा होते, झाली असते कितीतरी आधी जेव्हा ते घर बांधले असते आधीच्या पिढीने.  पण फ्लॅट म्हणजे जितकी कुटुंबे तितक्यावेळी त्या एका प्लॉट वर पूजा. आपल्या भारतातले पुजारी मोठ्या आवाजात पूजा सांगतात, करतात, मोठ्याने आरती म्हणतात, त्यामुळे फक्त ज्या फ्लॅट मधे पूजा होत असते फक्त त्यांनाच नाही तर आजूबाजू, वर खाली अगदी सर्वांना ते मंत्रोच्चार कानावर पडतात, एक सुंदर, भावपूर्ण, भक्तिमय वातावरण निर्मिती होते आणि त्याचा उपयोग खूप दिवस दिसतो, कळतो, आणि पोचतो देखील सर्वांना, सर्व सजीवांना. ह्या महत्वाच्या कारणासाठी देखील फ्लॅट जास्त भावत असतील प्लॉट पेक्षा. असा माझा अंदाज तर आहेच पण ती वास्तू देवता देखील जास्त प्रमाणात आणि चांगल्या कुटुंबीयांना नक्कीच बोलवत असणार, साद घालत असणार, त्या शिवाय हे घडणे नाहीच. 

अँप चा वेढा


सध्या अगदी सगळेच जण आप-ला असं म्हणणं पूर्णतः विसरले आहे. आपले घर, गाव, माणसं, मित्र, सखा आणि इतर. आता देखील आहेत, भरमाढ आहे पण वास्तवात नाहीत आणि आताशा अस्तित्वात नसलेले पण आहेत, AI च्या कृपेने. असंख्य अँप ने अक्षरशः वेढले आहे सर्वांना सर्वत्रच. शब्दांमध्ये मांडण्या पल्याड असे आहे सर्व. जो बघावं तो फक्त अँप ची भाषा बोलतो, अँप वर असतो, त्यांच्याशीच हुतगुज करतो, संपर्कात राहतो, गरज नसल्यास देखील. असो. कालाय तस्मै नमः !!! काळाचा महिमा अगाध. आणि हे सर्व दूर पसरलेले आहे, फक्त शिक्षितच नाहीत, ह्या किंवा त्या गटातले नाही तर सगळेच एका माळेचे मणी असे झालेत. म्हणजे व्यापारी पण त्यांचा फायदा किंवा व्यापार वाढवण्यासाठी त्यांच्या पद्धतीचे, किंवा त्यांच्यासाठी तय्यार केलेले अँप वापरतात, आणि आपण जे ग्राहक असतो ते वेगळे व्हर्जन. 


काही दुकानांसमोर तर अँप शी सलंग्न असलेले आणि सामान पोचते करणारे च जास्त घेरलेले असतात, इतकी घाई असते त्यांना जगावेगळी कि तेच काय ते फक्त काम करतात बाकी सगळे रिकामटेकडे. 


आणि अश्या स्थितीत, अश्या वेढलेल्या जगात जर मी तुम्हाला सांगितले कि एक असा अवलिया आहे जो मस्त पैकी धंदा करतो आहे गेले अनेक वर्षांपासून, त्याच्या कडे ओंलीने पेमेंट ची सुविधा आहे, कार्ड मशीन आहे, अत्याधुनिक दुकान आहे, माल खूप चांगल्या दर्जाचा ठेवतो आणि एक सातत्य आहे. उगाच नको ते तो ठेवतच नाही किंबहुना तय्यारच करत नाही. त्याच्या कडे जाऊनच माल आणावा लागतो. मी मागल्यावेळी गेले तेव्हा विचारले कि तुम्ही घरी पाठवू शकाल का काही मागवलं तर. तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. ज्यांना यायचं आहे ते येथेच येऊन घेऊन जातात मॅडम. नको ते अँप्स. आणि खरंच त्याचे दुकान / बेकारी कुठल्याही अँप वर नाहीच आहे. कोणाला तरी पाठवा किंवा स्वतः घेऊन जा, बास. अँप वर न राहता धंदा करता येतो, खप होतो, व्यापारी आनंदाने जगू शकतो,  हे सगळं लक्षात येतं ह्या दुकानदाराकडे बघून आणि खूप समाधान मिळतं. जे आहे ते खूप आहे हा कल आवर्जून आवडला मला त्याचा. वाहवत नाही गेला तो हे  करणं अवघड आहे जेव्हा आजूबाजूची सगळीच दुनिया भलत्याच्या पाठिमागे धावते आहे तेव्हा.  माझ्या दृष्टीने एकंदरीत सुरक्षा, न हपापता धंदा करणे, आणि तो उत्कृष्ट रित्या चालवणे गुणवत्ता सांभाळून हे अँप शिवाय आधी पण चालत होतं आणि आता देखील चालतंय.   

सोमवार, १५ जुलै, २०२४

काटेकोर


मला आज  एका शासकीय कचेरीत काम होते. त्या साठी एक व्यक्ती म्हणे मला मदत करणार होता. त्याचा नंबर मला त्याच्या बॉस नी पाठवला शनिवारी आणि म्हणाले कि ह्या व्यक्तीला संपर्क करा तो तुमचे काम करण्यासाठी मदत करेल. मग काय साधारणतः ९.३० च्या सुमारास मी त्यांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांना निरोप पाठवला, म्हणजे मेसेज केला तरी देखील काहीच उत्तर नाही. मग पुन्हा काही वेळाने प्रयत्न केला, केले पण व्यर्थ. मग न राहवून त्या व्यक्तीच्या मालकांना फोन करून विचारले कि ते ठीक आहेत ना? ते येणार आहेत का? का कोणी अजून मला मदत करणार आहेत? ई.  तेव्हा मला मिळालेले उत्तर अवाक करणारे होते, अर्थात खूप छान आहे हे असं काटेकोर राहणं. कचेरीची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच अशी आहे. मग ते त्या आधी का फोन उचलतील? कचेरी सुरु झाली कि मगच फोन सुरु होणार त्यांचा. मी हे ऐकून खरंच अवाक झाले. मला असं अजिबात नाही म्हणायचं कि वाटेल तेव्हा त्यांनी फोन वर हजर राहणे अत्यावश्यक आहे. पण सोमवार, एका नवीन हफ्त्याची सुरवात आणि दहाच्या ऐवजी ९.३० वाजले होते. फोन नका उचलू, मेसेज ला तर उत्तर द्या पण नाही म्हणजे नाहीच. शिस्त आवडली काय भावली मला. खूप वेगळं वाटलं ह्या अश्या सातत्याने फोन वर राहणाऱ्या जगात असे अवलिया पण तक धरून आहेत हे मस्त आहे एकंदरीत. त्यांनी दहा ला मग मला फोन केला माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि अश्या रितीने मी एक नाविन्यपूर्ण सवय अनुभवली.  ठरवलं तर काहीही चांगलं असं करूच शकतो माणूस. आधी मला किंचित राग नाही पण वेगळं वाटलं मला. म्हटलं गाडी चालवत असेल, रस्त्यात असेल, कशाला उगाच फोन उचलायला लावायचा. पण हा नियम समजला आणि काय बोलू असं झालं, थोड्या संमिश्र अश्या भावना उत्पन्न झाल्या मात्र.  

गुरुवार, ४ जुलै, २०२४

एक सहज मनात आलेला विचार


माझ्या मते साधारणतः १९९४ किंवा १९९५ पासून भारतीय शिक्षित मुलं परदेशी जाऊ लागली, किंबहुना त्यांच्या कंपन्या त्यांना पाठवू लागल्या. हि सगळी सॉफ्टवेअर तय्यार करणारी मंडळीच होती. ह्या कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेत तरुण आणि बाकी सर्व वयोगटातील मुलं पाठवत असतं कारण कलायन्ट्स तेथील होते, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या गरजा समजणे आवश्यक होते, म्हणजे मग यथायोग्य बदल करून त्यांना हवी तशी सिस्टिम देता येईल. म्हणजे सगळेच खुश. ह्या व्यतिरिक्त अजून एक उद्देश होता इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय मंडळींना पाठवण्याचा. आधी मोठ्या प्रमाणात फक्त मुलं पाठवली जायची, नंतर मुलींनी पण नंबर लावले आणि जिंकल्या देखील. तो उद्देश असा होता कि तिथली संस्कृती, किंवा खूप सुंदर गोष्टी आत्मसात करून भारतात रुजवणं, मग त्या सामाजिक असो, वयक्तिक असो नाही तर वैचारिक असो. कुठल्याही थरावर असतो पण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाकडून काही ना काही तरी शिकण्यासारखे नेहेमीच असते. उदाहरणार्थ, अमेरिकेचे म्हटले तर तेथे मला जाणवलं तेवढं च इथे नमूद करते आहे, तेथे दुसऱ्यांचा आदर आहे, शिस्त आहे, स्वच्छता आहे, दुजाभाव किंवा दुय्यम वागणूक नाही मुलं आणि मुलींमधे, त्यामुळे घरचे सगळेच सगळीच कामे नेटाने करतातच. त्यांना तारीफ करणं मस्त जमतं. प्रत्येक काम तेथे महत्वाचे आहे, एखादा व्यक्ती स्वकमाईने खातोय हे जास्त महत्वाचे आहे. मुन्ना भाई त्याच्या चित्रपटात म्हणतो तशी जादू कि झप्पी तेथे सर्रास दिली जाते. रस्त्यावर एखादी व्यक्ती जर रस्ता ओलांडत असेल, मग कुठल्याही वयाची असो, तेथे हॉर्न वाजवून भंडावून सोडत नाहीत चारी दिशांनी पायी चालणाऱ्याला. 


मुंबईची वेस ओलांडली कि ताबडतोब म्हणजे क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण जग हिंडलेली व्यक्ती टिपिकल भारतीय, मध्यम वर्गीयांसारखी कशी काय वागू शकते ह्याचं महद आश्चर्य वाटतं मला. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, कुठल्याही थराला काहीच कसा बदल होत नाही, अनेक वर्ष तिथल्याच लोकांबरोबर काम करून सुद्धा?  किती तो दुटप्पी पणा. मला ह्या वरून भारतीय मध्यम वर्गीय सासवा आठवल्या ज्यांना फक्त हवं तेवढंच ऐकू येतं हवं तेव्हाच. कशासाठी इतके चेहेरे घेऊन / बाळगून फिरायचं? काय मिळतं हे सगळं करून? बरं फक्त कामासाठी नाही तर फिरायला म्हणून किंवा इतर काही कारणांनी पण खूप जणं जाऊन आली आहेत अनेक देशात, ह्या २०२४ साला पर्यंत. मग देश पातळीवर तर सोडाच साधा घर किंवा  समाज पातळीवर पण यत्किंचित बदल नाही हो. जैसे थे.  तेथे जाऊनच शिकता येतं का? तर नाही. इतके सिनेमे बघितले जातात त्या देशात तय्यार केलेले, वेब सिरीज आहेत, व्हिडीओ आहेत, तरी देखील बदल शून्य. नको ते बरोबर उचलले जातेच, मग त्याच बरोबरीने चांगले का नाही? आणि तरी देखील स्वतःला सुधारक म्हणून मिरवतात, मी कित्ती मोकळा आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे ह्याचेच पाढे सतत. उपवाद आहेत, पण नगण्य आणि अदृश्य स्वरूपात, सहज नजरेस पडत नाहीच. १९९५-२०२४ म्हणजे जवळपास ३० वर्षांचा काळ गेला, सरला पण स्थितीत सुधारणा नाहीच. आज पासून जमल्यास इतरांच्यात नाक खुपसणे सोडा, सर्वांनां आदर देऊन तर बघा, घरची कामे व्यायाम म्हणून करून बघा स्वतः, हॉर्न न वाजवता थोडेसे आधी घरून निघून बघा जमतंय का (इतकी वर्ष मी चारचाकी चालवते आहे न हॉर्न वाजवता भारतीय रस्त्यांवर, भारतीय चालकांमधे), रस्त्यावर घाण करू नका आणि इतर असे अनेक मुद्दे आहेत. क्षमस्व, मी फक्त माझ्या डोक्यात आलेले विचार मांडले आहेत, सळसळत मला जेव्हा मी हे असे धेडगुजरे लोक बघते. असो. "तबला हि माझा आणि डग्गा सुद्धा". 

मंगळवार, २ जुलै, २०२४

चिकित्सक, वैद्यकीय व्यवसायी ह्यांचा दिवस


काल सर्वत्र सर्व सजीवांना सुधृढ ठेवणाऱ्या अवलियांचा दिवस होता, डॉक्टर्स डे ह्या नावाने तो प्रसिद्ध आहे. ह्या निमित्याने माझी जीवनरेषा ज्यांनी सांभाळली आहे त्या सर्वांना मी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ह्या अद्भुत व्यवसायाशी अनेक म्हणी संलग्न आहेत. त्यातली एक अशी कि डॉक्टर ला बघितले कि अर्धा आजार बरा होतो, असं त्यांचं फक्त व्यक्तिमत्वच नसतं तर त्यांचा अनुभव खूप बोलका असतो. त्यांना शिताफीने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ह्यांना सांभाळण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची कला अवगत झाली असते. किंवा त्यांना तसेच राहावे लागते हा त्यांच्या व्यवसायाचा मूळ सिद्धांत आहे. अंतर्बाह्य बरं करण्याची जबाबदारी असते ह्या सर्व निष्णात डॉक्टरांवर. त्या ते बखुबी निभावतातच. सातत्याने वेदना जे धैर्याने हाताळतात मग त्यांच्या समोर जातांना प्रत्येकाने सुबक सुंदर, म्हणजे साध्या पण शिस्तीत वेष आणि केशभूषा करून का जाऊ नये? माझ्या मते तरी येणार रुग्ण बघूनच डॉक्टरचा असला नसला थकवा दूर गेला पाहिजे. त्यांना मरगळ येत काम नये.  


दुसरा मुद्दा असा कि फक्त शारीरिकच व्याधी नसतात ना सर्वांना? मानसिक पण असू शकतात. किंबहुना काही संशोधन कर्ते म्हणतात कि बहुतांशी मानसिक गरजा किंवा व्याप जास्त असतात, शारीरिक कमी. पण व्याधी होण्याकरता हे खताचे काम करते. तेव्हा मानसिक स्वास्थ्य जपणे अतिशय महत्वाचे असते. हे जपण्याकरता, म्हणजे स्वतःचे आणि इतर जनांचे देखील फक्त डॉक्टरचं कमी येत नाहीत, तर व्यायाम, कामात व्यग्र ठेवणे, साधना, छंद, उत्तर शोधणे पसंद करणे, अडथळ्यांभोवती फिरत न राहता, आणि असे अनेक मार्ग आहेत. गुरूशी संवाद साधणे हा त्यातील एक सर्वोच्च मार्ग. गुरु म्हणजे कुठे तरी हिमालय पर्वतात स्थानापन्न असायलाच हवा असे नाही. आपले अनेक गुरु असू शकतात, किंबहुना असतातच. गुरूंना, गुरुजनांना, थोरा मोठ्यांना, अनुभवी व्यक्तींना प्रश्न उद्भवल्यावर आणि त्याची उत्तरे शोधल्यावर नेमके कुठले जास्त योग्य आहे हे समजले कि मग "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे" अशी स्थिती निश्चित होतेच. गुरुजन म्हणजे आपले आई वडील, आई वडिलांसारखे, शेजारी, मैत्रिणी, आधुनिक आध्यात्मिक गुरु / गाढे अभ्यासक असे. गुरुजनांच्या संपर्कात राहणे, मेडिटेशन च्या मार्गावर चालणे, वागणे आणि बोलणे ठेवले, सातत्य जपले तर मग मानसिक स्वास्थ निश्चित लाभतेच. फक्त वर वर गुरूंचा सल्ला घेणे नव्हे. माझ्या दृष्टीने हे सर्व गुरुजन म्हणजे मला डॉक्टरांच्या जागी आहेतच. ते प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने समजावून सांगतात, मार्ग दाखवतात, बरोबर राहतात, आणि गडबड झालीच तर सांभाळून कसे पुढे जायचे ते देखील सुचवतात. मग हे डोस पण अतिशय महत्वाचे ठरतात, नुसते, किंवा पारंपरिक औषधांसोबत सुद्धा.  कारण फक्त गोळ्या घेऊन चालत नाहीच, वरच्या मजल्यावर तश्या हालचाली होणे, विचार होणे, कृती होणे अत्यावश्यक आहेच. त्यामुळे मला लाभलेल्या अश्या योग्य डॉक्टर्स ना साष्टांग नमन. तुमचे मार्गदर्शन असेच सातत्याने लाभू द्या, माझे बोट तुम्ही कधीही सोडू नका हि प्रार्थना आणि विनंती सुद्धा.  आधी फक्त वैद्य होते, कुटुंबांचे पिढ्यांपिढ्या एकाच डॉक्टर असायचे. त्यामुळे आजीचा बटवा + एकत्र कुटुंब पद्धती, थोरामोठ्यांचे मार्गदर्शन हेच जास्त कमी पडत होते. प्रत्येक घरोघरी सगळं सांभाळून घेतल्यामुळे असेल त्यावेळी कदाचित एखादा दुसरा वैद्य असायचा संपूर्ण गावात. आता गल्लीत दहा आहेत.   थोरामोठयांचें ऐका, आधुनिक संतांची शिकवण अंगिकारा, त्यांच्या सानिध्यात राहा आणि फरक अनुभव शारीरिक आणि मानसिक पातळीवर.   

सोमवार, १ जुलै, २०२४

श्रीती


आज मी एक व्हिडिओ बघितला युट्युब वर. फोटो, मथळा / शीर्षक आणि अवधी मस्त होता, म्हटलं बघावं. त्यात एक लग्न सोहोळा चित्रित करून दाखवला आहे. लग्नाचे सारे विधी भारतीय पद्धतीने विधियुक्त केलेले दिसतं आहेत. लग्न लागल्यावर, वर माला झाल्यावर मोठ्यांचे आशीर्वाद घेतांना देखील दिसले रिवाजाप्रमाणे. ज्या आजी आशीर्वाद देत होत्या त्या नव्वदीच्या पुढच्या वाटल्या. आणि सगळेच फार म्हणजे फार खुश दिसत आहेत. गुरुजी पण मनःपूर्वक शास्त्रोक्त पूजा सांगतांना ऐकू आले, बघितले देखील. मंडप, सजावट, साड्या, दागिने, हार, हळद समारंभ, मेहेंदी ई. सगळंच साग्रसंगीत झालेलं आढळलं. हे सगळं बघते वेळी खूप खास वाटतं होतं आणि अनेक मस्त प्रश्न मनात आलेच. माझ्या मते श्रुती आणि नीती ह्यांचे ते लग्न होते, म्हणून त्यांना श्रीती असं प्रेमाने बोलवत होते. दोघीही खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होत्या. त्या व्हिडीओ तरी सगळ्यांनाच हे मान्य होते हे देखील आढळले. 


ह्या बाबतीत सासर कुठलं? कोण सासू म्हणून हुकूम चालवणार? कोणी मंगळसूत्र घालायचं? दोन माहेर आहेत, लाभलेत त्यांना, पण सासरचं काय? कोण कोणाच्या घरी राहायला जाणार आपलं घर सोडून? का त्या तिसऱ्याच घरी स्थायिक होणार? जे विधी करून घेतले गुरुजींनी त्यात काही फरक होता का? कारण वचनं फेऱ्याप्रमाणे असतात, मग येथे काय होतं? घर सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? कोण नमतं घेणार? सर्वसाधारण पणे आधी असं गृहीत धरलं जायचं आणि तसंच वागलं जायचं कि मुलगा बाहेर जाऊन कमवणार आणि मुलीने घराकडे जास्त लक्ष द्यायचं, नोकरी करणारी असली तरी देखील. येथे सुनेकडून अपेक्षांचं काय? जावयाचा मान कोणाला? लग्नाची बोलणी झाली तेव्हा इतकी चांदी, सोने द्या ई. कोण म्हटलं असणार? आणि असे ढीगभर प्रश्न उभे ठाकलेत माझ्या पुढ्यात. 


तुम्ही नक्की मनात म्हणत असाल कि काय झालंय हिला? हे काय प्रश्न आहेत? अगं हा एक खास लग्न सोहोळा आहे, त्याला का ठराविक मोजमाप लावतेस? आणि कुठल्या जमान्यात वावरते आहेस. ह्या २०२४ मधे असं काहीही नसतं. 


अगदी बरोबर. २०२४ काय, लग्न म्हणजे खरं तर असं काहीच नको. एकमेकांना लागणारी, हवी असलेली साथ देणे हे होय, ज्याला बॉटम लाईन असे संबोधतात.  एकमेकांना सांभाळून पुढे जायचे. प्रत्येकवेळी खंबीर पणे उभे ठाकायचे.  दोघेही अगदी प्रत्येक ठिकाणी एक आहेत, कोणीही वरचढ नाहीच हे दर्शवायचे. दोघांनी मिळून घर चालवायचे, फुलवायचे, आदर्श ठेवायचा, जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या, उणेदुणे ला थाराच न ठेवता, सासुरवास न घडवता, सततच्या अपेक्षा न बाळगता, घालून पाडून न वागता ई. हक्काचा साथीदार जो कधीच गैरसमज करणार नाही, झालाच तर दूर करेल आणि सर्वतोपरी साथ देईल, हे म्हणजे लग्न संस्था.  आधीच्या कुटुंबीयांनी मुलांना आणि मुलींना भेदभाव करून लहानाचे मोठे केले. समाजाने देखील फक्त मुलांना जास्त महत्व दिले, एक दंभ तय्यार केला, टिकवला, आणि सगळंच रसातळाला गेलं. अपवाद आहेत, पण फारच कमी. मुलींना सामान हक्काने, प्रेमाने वागवलं असतं, लग्नाच्या मूळ संकल्पनेला जीवापाड जपलं असतं तर? तेच आता नावं ठेवायला मागे पुढे बघत नाहीत. मुलींना किती दिवस "तो" खालच्या थराला बघू शकणार. म्हणून मग आता त्याने त्याची शस्त्रे काढली आहेत असं दिसतंय आणि मूळ पदावर आणून ठेवलंय सर्वांना. घ्या म्हणावं आता. उत्कृष्ट सगळं सुरळीत सुरु होतं, स्वहस्ते घालवलं उगाचच, आणि अनेक इतर कारणांसोबत हे कारण घेऊन वाटचाल सुरु आहे, कायदा आला आहे आणि अश्या दृष्टीने, मूळपदावर येऊन सगळे कुटुंबव्यवस्था सुरु ठेवत आहेत. मुख्यत्वे भारतीय समाजाने, मुलांनी जागे होण्याची वेळ निघून गेली आहे,  आता तरी डोळे उघडा, मुलींना मान द्या, कामं करा, शांतात नांदू दे  घरात. पुन्हा एकदा सांगते उपवाद आहेत, बदल घडत आहेत, पण अगदी हळुवार. 

Life lines


I guess in 2002, I started visiting a place called a hospital or clinic. Precisely in January 2004, I was admitted to the special ward for around 10 days with very few drops of water here and there. That’s it. So from, I guess, May 2003 to February 2004, the special team of four gynacs worked with me tiredlessly with their expertise. I am visiting my memory lanes while jotting down these words. My newborns were taken care of so well by these experts that I am not able to describe it in words.

Then again, from September 2018 to date, the meetings with the most unique personalities in the world continued. Today I am standing on my own feet again, the second time, all because of a special team who worked with me, listened to me, were there in my thick and thins always, and motivated me by their deeds. They took my case, or, I must say, my nut case, as a challenge, and here I go, standing tall again, walking, climbing, and moving ahead.

I was extremely surprised to know why my most beloved son chose the toughest path of study—his MBBS. It was only because he never wanted to see any mother suffer in the future. I became speechless when I found out about it. What a thought at such a tender age, indeed? Pats on his back.

So doctors are uniquely different personalities, weaved holistically with great expertise to handle all living beings, even the toughest ones like me. Salutes to all who worked tiredlessly for my legs. It was not at all easy for them. I bow down in front of them always, every day for sure. Wishes of Doctors Day to all my life lines. 

@drgaurijoshi @drleenaauty @drpriyankawalzode @dranjalibhide @drumaalurkar @drdyanadachitale @drvedmulay

https://www.linkedin.com/posts/dr-preeti-mulay-536b43a9_life-lines-i-guess-in-2002-i-started-visiting-activity-7213468832802213888-317w?utm_source=share&utm_medium=member_desktop


2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...