मी गुरुवर्यांकडून, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साधकांकडून आणि संशोधकांकडून असे ऐकले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट तास किंवा दिवस सातत्याने ध्यान, जप, मंत्रोच्चार किंवा पठण करते, तेव्हा त्याचे सकारात्मक तरंग अनेक सजीवांपर्यंत पोहोचतात आणि ते सर्वांसाठीच उपयुक्त ठरते. मला खात्री आहे की 'सजीव' या शब्दांमध्ये प्राणी, पक्षी, झाडे, फुले, वेली, फळे, भाज्या आणि पिकाऊ जमीन या सर्वांचा समावेश होतो. "वसुधैव कुटुंबकम्" या उक्तीप्रमाणेच, सर्व सजीव एकमेकांच्या साथीने प्रगती करतात. याचा अर्थ रामनामाचा, जपाचा आणि मंत्रोच्चारांचा महिमा खूप मोठा आहे. काही संशोधक तर या सकारात्मक लहरी सुमारे बत्तीस हजार लोकांपर्यंत पोहोचू शकतात असे आकडेवारीसह सांगतात. कदाचित याच कारणामुळे पूर्वीच्या लोकांना या गोष्टीची माहिती असल्यामुळे ते होम-हवन आणि इतर पूजा-अर्चा मंदिराच्या किंवा घराच्या प्रांगणात करत असत, जेणेकरून त्याचे लाभ शक्य तितक्या लवकर सर्वांपर्यंत पोहोचतील.
आज आपण आधुनिक जीवनशैली स्वीकारली असली तरी, प्रत्येकाने नित्यनियमाने एक माळ जप, मानसपूजा किंवा स्तोत्र पठण यांसारखे उपक्रम करायला हवेत. हे केवळ काही ठराविक लोकांसाठी किंवा समुदायांसाठी नाही, तर आपल्या स्वतःसाठी आणि वातावरणाच्या शुद्धतेसाठी तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.
माझी आई ताक, खीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ बनवताना आणि रवी फिरवताना सतत "राधा कृष्ण गोपाळ कृष्ण" असे म्हणायची. ते पाहून नकळतपणे आम्हालाही ती सवय लागली. आता तर वरण बनवतानासुद्धा सहजपणे कृष्णाचे नाव घेतले जाते. लहानपणी सकाळी उठल्याबरोबर जात्यावरच्या ओव्या, "कराग्रे वसते लक्ष्मी...", भूपाळी आणि त्यानंतर तुळस पूजन व्हायचे, मग देवाची पूजा आणि मग हे गोपाळ कृष्णाचे नामस्मरण. नैवेद्य दाखवताना मंत्रोच्चार आणि जेवायला बसताना "वदनिकवळ घेता..." म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये त्याचे स्मरण होत असे. मुलांची नावे घेतानाही त्याचे नाव मुखात येत असे. विविध माध्यमातून, प्रत्येक सणाला आणि व्रतवैकल्यांना घरोघरी प्रत्येकाकडून नाम घेतले जायचे. आता धावपळीच्या जीवनात हे सर्व मागे पडले असले तरी, जमेल तसे आणि जमेल तेव्हा याचा प्रयत्न नक्की करावा.
ब्रह्मकुमारी आश्रमाने सांगितल्याप्रमाणे, दर तासानंतर एक मिनिट डोळे मिटून शांत बसण्याचा आणि बाहेरची हिरवळ पाहण्याचा नियम ठेवा. मीटिंगमध्ये असाल तरी पुढील तासाच्या कामासाठी हा छोटा ब्रेक खूप महत्त्वाचा आहे. शक्य असल्यास या वेळेत प्रार्थना करा, स्वतःशीConnect व्हा आणि 'त्याच्याशी' एकरूप होण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी, रविवारी काही क्षण आपल्या पृथ्वी मातेसाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी नक्की द्या. दोन हस्तक आणि एक मस्तक पुरेसे आहेत; कुठेही आणि कधीही नामस्मरण करा, पण एक निश्चित ठिकाण आणि वेळ पाळा आणि सकारात्मक लहरी निर्माण करा.