शनिवार, २९ जून, २०२४

नाटकाच्या तीन घंटा


नाटक हि एक फारच वाखाणण्यासारखी कलाकृती आहे. प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष सादरीकरण म्हणजे कस लागत असणारच. प्रचंड पाठांतर तर हवेच शिवाय तो अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोचवता आला पाहिजे.  त्या करता फक्त कलाकाराचं नाहीत तर अख्खी चमू अतोनात मेहेनत करतेच, नैपथ्य असो, स्टेज ची सजावट, संगीत आणि बरेच काही. असंख्य तालमी, वेशभूषा, केशभूषा, नाटकाचा विषय, तिकिटाचे दर, प्रवास आणि प्रयोगानंतर प्रयोग हे सगळं जेव्हा सादर होते प्रेक्षकांसमोर तेव्हा सगळ्यांनी अत्यादर राखलाच पाहिजे. आधीच्या काळी बरे होते. फोन नव्हते, दर्दी प्रेक्षक होते कारण बाकी खूप मनोरंजनाची साधने नव्हती आणि त्यांना तिकिटावर खर्च केलेल्या पैशांची जाणीव देखील होती. 


पण आता चित्र किंचित बदलले आहे. मोबाईल फोन अगदी सर्वांकडेच असल्यामुळे बऱ्याचदा त्याची घंटी वाजण्याची शक्यता असते. प्रेक्षक फोन घेण्याकरता, किंवा बोलण्याकरता नाट्यगृह सोडून बाहेर जाणं येणं पण करातांना दिसतात. अश्या मुळे मग तो कलाकार विचलित होऊ शकतो पेक्षा निश्चितच त्यांना त्रास होऊ शकतो. नाटकाची लय बिघडू शकते, आणि जे खरंच नाटकाचा आनंद उपभोगायला आले आहेत त्यांना पण मग त्रास होतो. हे सगळं टाळण्यासाठी कदाचित तीनदा घंटी वाजवली जाते. ती फक्त प्रेक्षांसाठीच नाही तर कलाकार आणि चमू साठी पण असते. पण खास करून प्रेक्षकांना सांगण्यासाठी. बाहेर बसलेल्या वडापाव आणि तत्सम पदार्थ तय्यार ठेवण्यासाठी पण. पहिली घंटा कदाचित "तय्यार व्हा" असं दर्शवत असणार, दुसरी म्हणजे "जागी स्थानापन्न व्हा, मोबाईल चा आवाज शांत ठेवा", तिसरीला तर पडदा उघडतोच. 


अगदी ह्याच धरतीवर जरी माझ्या लेकीने कधीही प्रत्यक्ष नाटक बघितले नाही, तिला ह्या तीन घंटा ठाऊक नाहीत तरी ती बहुतांशी दररोज तीच वापर करतेच. इतक्या वर्षांचा अनुभव कथन करते आहे मी. पहिली घंटा म्हणजे "चला पहाट झाली, उठायला पाहिजे" आणि "मी काही वेळेत उभी टाकीन तुझ्या समोर माते" असं दर्शवणारी, दुसरी जी काही वेळानी वाजते "उठायलाच हवं का? काय हे? का उठायचं? इतक्या लवकर?" असं काहीसं आणि त्यानंतर तिसरी च्या वेळी स्वारी हळुवारपणे भानावर येते, बसते / टेकते, उपयुक्त कामे आटोपते अगदी शिस्तीत, शांतपणे ई. अजूनही विद्यार्थी दशेत असल्यामुळे घाई नाही. त्यामुळे तीन घंटा अत्यानंदाने उपभोगणे सुरु आहे. दररोज आधुनिक नाटकाची सुरवात मला अनुभवायला मिळते त्या मुळे हो, मज्जा येतेच. असो, पण जेव्हा काम असते, परीक्षा असते, कुठे वेळेत जायचे असते तेव्हा घंटेची गरज पडत नाही, जबाबदारी डोकं निश्चित वर काढते आणि ताबडतोब कृती होते, हे कित्ती छान आहे बघायला. मस्तच. 

   


फवारा


सध्याच्या आधुनिक जगात प्रत्येक स्नानगृहात शॉवर किंवा फवारा असतोच. त्या फवाऱ्याचे पण अनेकविध प्रकार आहेत. हातात धरण्याचे, भिंतीवर आरूढ झालेले आणि काही तर चक्क डोक्यावर म्हणजेच छतावर विराजमान असतात. ह्या प्रत्येक फवाऱ्याचे आकार वेगवेगळे असतात, काही पिटुकले, गोल, अंडाकृती तर काही फारच भलेमोठे. अगदी धबधब्याखाली उभे आहोत असा अनुभव देणारे. 


माझे एक खास स्नेही होते आधीच्या कचेरीत काम करणारे. त्यांना कोणीही सांगितले नव्हते पण तरी देखील जागरूक नागरिक म्हणून, किंवा पाण्याचे महत्व जाणणारा व्यक्ती, एक सजग माणूस किंवा त्यांची आवड म्हणून त्यांनी एक खास संशोधन केले होते. विविध व्यक्ती, वेगवेगळे वयोगट, भिन्न ठिकाणी काम करणारे, अनुभवी किंवा नवशिखे असे अनेक. बरेच दिवस का महिने हा प्रयोग सुरु होता. त्याला आधीच्या काही संशोधन पत्रांची जोड पण मिळाली आणि मग काय बादलीत पाणी काढून का शॉवर? कोणत्या मार्गाने पाणी कमी लागते? असा काहीसा तो प्रयोग होता. त्यामुळे पण मग मला विविध पेहेलू ध्यानात आले, समजले पहिल्यांदा. 


तर माझ्या घरी पण आहे शॉवर, प्रत्येक स्नानगृहात. इतक्यातच उन्हाळा, किंचितशी पाणी टंचाई, लोकांची वाया घालवण्याची प्रवृत्ती ई. मुळे एक तर दुष्फेन जल / अफेनद पाणी येऊ लागले आमच्या नळांना. त्यामुळे का कुणास ठाऊक एक वेगळा वास होता. पाणी जात होते बऱ्याच दा, त्यामुळे साठा करून ठेवावा लागत होता. कदाचित हे माझ्या बादल्यांना समजले नाही, लक्षात आले नाही आणि आवडले तर नाहीच नाही. त्या कित्ती वर्षांपासून आहेत माझ्या सोबतीला पण ह्या वेळी अगदी खूपच झाले. त्यामुळे त्यांनी त्यांचे रंग ढंग दाखवायला सुरवात केली. बादल्यांवर काही थर साचलेले आढळले. म्हटलं काय होतंय हे? त्यांना मी अंघोळ घालायचा बेत आखला. पण त्यांची गत बघून साधी अंघोळ पुरेशी नव्हतीच मुळी. मग काय विचारात पेशल अंघोळ घातली गेली, चक्क शॉवर खाली. असं कोणी म्हटलंय कि शॉवर हा फक्त माणसांनाच उपयोगी आहे? मुळीच नाही हो. काय अत्यानंद झाला त्यांना म्हणून सांगते. अगदी कात टाकल्यासारख्या चमकू लागल्या आहेत पठ्या. किती नखरे असावेत? कमाल आहे खरंच. असो पण त्यामुळे एक वेगळा उपयोग समजला मला त्या शॉवरचा. 


माझ्या लहानपणी आमच्या घरी पोपट होते. त्यांना उन्हाळ्यात पाईपने शॉवर समान अनुभव देण्याचा मी रोज प्रयत्न करायचे आणि ते त्याचा संपूर्ण आनंद उपभोगायचे. त्या वेळी शॉवर असते तर आणखीनच सोप्पे झाले असते आणि पोपटांना पण मजा आली असती अजून. पाईपने पाणी उडवत बसावे लागले नसतेच. 

शुक्रवार, २८ जून, २०२४

एक अनोखे सौंदर्य


मी नागपूरकर किंवा नागपूर वासी असतांना माझी एक शिस्त होती. शनिवारी कचेरीतुन येतांनाच पेट्रोल भरून यायचं, म्हणजे पुढला आठवडा रांगेत थांबायला नको. सोमवार आणि गुरवार देवासाठी हार आणायचे. घरी मोठ्ठं देवघर होतं, त्यामुळे हार घातले कि पूजा संपन्न झाल्यासारखी वाटायची. घरची फुलं तर होतीच, पण हार महत्वाचे असायचेच. सण वारानुसार, ठराविक रंगांची फुले, पत्री, ई. पण हरवाल्याकडे मिळायचे हमखास. तो इतका मस्त ओळखीचा झाला होता कि त्याला पण माझी रोजनिशी पाठ झाली होती.  


आता माझ्या ह्या घरी पण खूप देव आहेत, मुर्त्या आहेत, फोटो आहेत. त्यांना मस्त स्वच्छ साफ करून, देवघर साफ करून हार घातले, फुलं वाहिली, त्यांचे आसन बदलले कि दृष्ट लागण्यासारखे देखणे दिसतात ते सर्व मला. बघत बसावसं वाटतं, खास करून तेव्हा जेव्हा मोगरा किंवा निशिगंधा विराजमान होतो. क्या बात है. जमेल तशी त्यांची जागा पण मी बदलते, म्हणजे अजून चार चांद लागतात. आज पण अगदी तसेच झाले. त्यांचे आसन बदलले मी. खास माझ्या मैत्रिणींनी जी माझी टेलर आहे तिने शिवून दिले होते मला. खूप विविध प्रकार आहेत. आज म्हटलं ते अंथरावे. का कुणास ठाऊक पण कण भर जास्त गोड दिसू लागले देवघर आज. थोडासा विचार केला तर लक्षात आले कारण. ते असे: मी नागपूरला सिम्बिओसिस च्या एका कॉलेज ची सुरवात करण्या करता गेले होते. तिथल्या वास्तव्यात खूप जणांची ओळख झाली. एक खास अगदी जवळची मैत्रीण देखील लाभली त्या थोडक्या दिवसात हो. परत येते वेळी तिने मला जगातली भारी साडी प्रेमळ  भेट आणि आठवण  म्हणून दिली. ती माहेरची साडी माझ्या साठी काय आणि कित्ती महत्वाची आहे ह्याची कोणालाच माहिती नसणार आणि कळणार पण नाही.  त्यात एक मस्त ब्लाऊज पीस होतं खरं त्या साडीला शोभेसं पण ती साडी आणि तो पीस खूप मोठा होता माझ्यासाठी. त्यामुळे मग टेलर नि तो मला परत केला मस्त झकास शिवून. आज मी तो अंथरला देवघरात आणि म्हणून शोभा प्रचंड वाढली त्या जागेची. एक वेगळी ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटलं मला.  आणि ह्याच सगळं श्रेय माझ्या सखीला, नंदिनीला. काय मस्त साडी पसंत केली आहे, झकास रंग, शाही बाज, उठून दिसणारे त्यावरचे नक्षीकाम... अहाहा च. जणू काही ती फक्त माझ्याच साठी तय्यार केली होती विणकाम करणाऱ्याने, सगळ्या कारागिरांने. "काय वर्णू तव गूण, अल्पमती नारायण", अशी अवस्था झाली आहे माझी. "डोळ्यांचे पारणे फिटले" ह्या म्हणीचा अर्थ समजला मला अजून एकदा आज, आणि असा अर्थ मला माझ्या राहत्या घरी उमगेल हे माहित नव्हतं. असा हा माहेरचा महिमा. 

गुपचूप


माझ्या लहानपणी जसे बैठे घर होते, मोठा बगीचा होता, फुलं आणि फळांची विविध झाडे होती, शिवाय मस्त भाज्या पण लावल्या जायच्या. घराचा बगीचा सांभाळणे हा नित्यनियम होता, माझा आणि माझ्या बाबांचा. आम्हा दोघांना खूप आवड हे सर्व करण्याची. ती बाग बहरली कि काय तृप्त करून जाते, सुखावून जाते म्हणून सांगू. आणि आणखीन एक म्हणजे जागा मोठी होती, खूप वाव होता प्रयोग करत बसायला, सर्वात महत्वाचे म्हणजे बघणाऱ्यांच्या डोळ्यात जे कौतुक दिसायचं ते खूप काही सांगून जायचं. त्यामुळे मस्त जोमाने काम होत असे बगिच्यात. अर्थात तेव्हा हे असे दृश्य सर्वत्रच बघायला मिळत असे. बहुतांशी सर्वांचीच बैठी घरे त्यामुळे अंगण आणि बगीचा असायचाच.  माझ्या सासरी पण उपवाद नव्हताच. बाग मस्त होती, कारण आता ती नाही. नवीन पद्धतीने तेच घर पडून बांधल्यामुळे सगळी झाडे गेली. लावली आहेत थोडीफार पुन्हा. ह्या सगळ्या प्रकारामुळे असेल कदाचित आमच्या छोट्याश्या फ्लॅटच्या बाल्कनीत माझ्या  ह्यांना ते जुने त्यांच्या अंगणातले नंदनवन पुन्हा उभे करावेसे वाटले. त्यामुळे तेव्हा जी जी म्हणून झाडे होती ती ती सर्व आणून कुंडीत लावली. ह्यांची दिनचर्या म्हणजे  सकाळी भरपूर पोटभर व्यायाम, मग नाश्ता, पूजा, कचेरी दिवसभर. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा काही तर तोंडात टाकायला, आणि मग जी मिटींग्स जी सरबत्ती सुरु  व्हायची ती संपण्याचे नावाचं नसायचे. त्यामुळे कित्येक वेळा रात्रीचे जेवण हे कामाच्या टेबलावरच. मी पण संपूर्ण वेळ नोकरी करणारी, मुलं आपल्या क्षेत्रात व्यग्र, आणि बाल्कनीलाच लागून ह्यांची कामाची खोली त्यामुळे त्या बागेकडे दुर्लक्षच झाले खूप म्हणजे खूपच दिवस. अगदी विद्रुप झाली होती एकंदरीत झलक. आताशा हे नाविन्यपूर्ण कामानिमित्य वेगळ्या शहरात गेले आहेत. काही महिने तेथेच मुक्काम करावा लागणार दिसतोय. मी पण स्वेच्छा निवृत्ती घेतली. मग काय विचारात, बाल्कनी आली माझ्या हातात. जी स्वच्छता मोहीम राबवली म्हणून सांगते, कि हात दुखायला लागला, ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि ८ दिवस लागले. कालच माझ्या मैत्रिणी म्हणतात कश्या मला बघितल्या बघितल्या, बरं झालं गं तू बाल्कनी स्वच्छ केलीस, आता मस्त दिसते आहे. हे सगळं करते वेळी मी आधी माझ्या घरी काय काय झाडं ठेवायची, काय देऊन टाकायची हे आधी ठरवलं, जागा बघून, हालत बघून आणि अक्षरशः तुलशीबाग अवतरली होती ती बघून देखील. एक निरोप धाडला सोसायटीच्या ग्रुप वर आणि बास द्यायची ठरवलेली झाडे, कुंड्या वाटून मोकळी झाले. उरलेल्या किंवा ठेवलेल्या  झाडांना नवं संजिवनी दिली, नवीन वेगळ्या आकाराच्या, बारीक, नावीन्याने भरपूर तरुण दिसणाऱ्या कुंड्यांमधे रवानगी केली. त्यामुळे उत्कृष्ट डिझाईनर फारशी, झाडे, कुंड्या आणि संपूर्ण बाल्कनींनी जणू कात टाकली म्हणायला हरकत नाहीच. पावसाळा संपला कि तेथे मी कृत्रिम गवत पण आणून लावणार आहे. 


हे सगळं मी केलं खरं पण आता एक प्रश्न उभा ठाकला माझ्या समोर. जेव्हा हे नवीन काम संपवून येतील तेव्हा काय? ओरडा बसणार, तो कोण खाणार? मग त्यावर माझ्या डोक्यातून सुपीक कल्पना सुचली. मी ते जेव्हा येणार असे समजेल तेव्हा काही दिवसांकरता देऊन टाकलेली झाडे भाड्याने आणेन आणि सजवून ठेवीन.  बास. मग हळूच सांगून बघू काय होतंय ते? नाहीतर ज्यांना दिली ते माझ्याच आजूबाजूला आहेत, त्यांच्या कडून आणून सजवून ठेवू जसेच्या तसे पण मस्त स्वच्छ हटके पद्धतीने. आहे कि नाही मज्जा? ते येतील तेव्हा बघू. आता तर मोकळा श्वास घेताहेत सगळे. माझ्या कचेरीत जेव्हा काही कार्य असायचं तेव्हा  मी बघितलं आहे, निरीक्षण केले आहे, हवी तशी, हवी त्या आकाराची, प्रकारची झाडे आणून सजवतात. "बदल हाच स्थिर असतो" असं म्हणतात हे कित्ती खरं आहे नाही. 


माझ्या दृष्टीने झाडांना जीव असतो, त्यांना पण मुलांसारखं सांभाळावं लागतं, नुसतं पाणी घालून चालत नाही, मस्त वेळ द्यावा लागतो, गप्पा माराव्या लागतात, वाळलेली पाने, फांद्या काढून टाकाव्या लागतात आणि बरेच काही. आपल्याला असं सांभाळणं जमत नसेल तर त्या भानगडीत पडूच नये आणि काही तरी भलतं करू नयेच. कामाचे स्वरूप बघून, आवड निवड लक्षात घेऊन पावलं उचलावीत माणसाने नेहेमीच. लहानपणीची बाब वेगळी होती, त्यावेळचं वातावरण पण भिन्न स्वरूपाचं होतं, वेळ होता, जागा होती, इतक्या पद्धतीचे अनावश्यक कीड प्रकार उदयास आला नव्हता, क्रतू ठराविक असतं, त्यामुळे शक्य होतं बगीचा असणं, राखणं, सांभाळणं आणि आनंद उपभोगणं. सद्य परिस्थितीत सगळ्यांना जमेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक देऊन टाकलेल्या झाडांना क्षमस्व. पण मी त्यांच्या साठी खुश पण आहे एका अर्थी कि त्यांना प्रेम करणारी माणसे मिळाली, नवीन जागा राहायला / बागडायला लाभली, कित्ती मस्त ना? माझ्या बाल्कनीत आता मला सांभाळता येतील एवढीच मोजकी झाडे मी जपली आहेत. त्यांच्याशी गप्पा सुरु आहेत, दररोज सकाळी वेळ घालवणं आणि चहा पिणं देखील. अहाहा च. 

गुरुवार, २७ जून, २०२४

गिऱ्हाईकी


कुठलेही काम किंवा धंदा सोप्पा नाहीच. प्रत्येक ठिकाणी आव्हानं आहेतच, मग तुम्ही कितीही मोठे व्हा. प्रत्येक गिऱ्हाईक नवीन प्रेरणा आणि मागण्या घेऊन येतोच. त्याला पूर्ण करणे इतके सोप्पे नसतेच मुळी.  पण अनेक वर्षांच्या अभ्यासामुळे गिऱ्हाईक आला कि त्याची बोली भाषा, शारीरिक ठेवणं, किंवा हावभाव ह्या सर्वांवरुनच समजत असणार कि हे फक्त वेळ काढू पणा करायला आले आहेत, कि बघायला आले आहे, चाचपडायला किंवा खरंच घ्यायला. फक्त मालकंच नव्हे तर मुरलेला दुकानात काम करणारा पण ओळखत असावा नक्कीच. त्या नुसार मग कित्ती वेळ द्यायचा, काय काय दाखवायचे, कोणी दाखवायचे हे ठरत असणारच. गळ्यात मारायची खुबी जमली पाहिजेच. समोरच्याच्या स्वभावानुसार विविध क्लुप्त्या वापरून त्यांना आनंदाने हाताळणे अत्यावश्यकच आहे. सरते शेवटी अतिथी देवो भव! नाही का? माणूस ओळखता आला पाहिजे, माणूस हाताळता आलाच पाहिजे, बॉडी लँग्वेज वाचता आली पाहिजे, खर्च किती करणार आहेत ह्याचा अंदाज बांधता आला पाहिजे, किती वेळ घेणार का पट्टाकिनी घेऊन मोकळे होणार हे देखील समजले पाहिजे, पुन्हा घेतलेले परत करायला येणार का? हे दिसलं पाहिजे त्यांच्या चालीत आणि असे बरेच काही. एकंदरीत काय एका वेगळ्या प्रकारे गिऱ्हाईकी काय कशी होणार हे जाणवलं पाहिजे. कित्ती प्रकारची माणसे सांभाळतात नाही हे व्यापारी? देवा, कमाल कमाल च आहे सर्वांची. 

चाखणे


माझ्या आई कडे घरी प्रत्येक केलेला पदार्थ हा पहिल्यांदा देवा समोर ठेवला जायचाच, काहीही झालं तरी. जसा पदार्थ तय्यार झाला कि आधी त्याच्या साठी काढून ठेवायचा, नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण खायला घ्यायचा. इतक्या वर्षाची जुनी सवय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष होती माझ्या साठी. किंबहुना तेव्हा मला एवढंच ठाऊक होतं कि हे असंच असतं सगळीकडे, कुठलाही बदल नाहीच, कारण तो आहे, महत्वाचा आहे. मग बदल असणं शक्यच नाही. ह्या अश्या पार्श्वभूमीमधून मी जेव्हा सासरी गेले तेव्हा अगदी म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट / पदार्थ होण्याआधीच तो असंख्य वेळा चाखून बघितला जायचा.  उदाहरणार्थ, काकडीची कोशिंबीर करण्याआधी काकडी तुरट किंवा वेगळ्या चवीची आहे का हे तपासलं जायचं. मग दह्याची बारी, मीठ घातल्या घातल्या, फोडणी टाकल्यावर आणि मग कूट घालून, कोथिंबीर पेरून सगळं झालं कि पुन्हा एकदा / दोनदा कमीतकमी. बाप रे, हे काय? इतकं नवल होतं माझ्यासाठी कि ज्याचं नाव ते. हे असं का करायचं हे पण आज पर्यंत समजलं नाहीच मला. भाजी, आमटी, चटणीची पण तीच गत. फक्त पोळी, भाकरी, भात चाखून बघितला नाही जायचा. असो. तेव्हा समजलं कि जैसा देश तैसा भेस. प्रत्येक १० मैलावर म्हणे संस्कृती बदलते तशी ह्यांच्या घरी सुद्धा अशी पद्धत होती, अगदी आदरपूर्वक मी हे सांगते आहे. वावगं नाही काहीच. 


पण आज प्रकर्षाने एक गमक उमगलं. मी आधी भाजी ची चव घेतली, मग आमटीची बारी होती खरी. पण नक्की चव समजण्याकरता मधेच मी कोशिंबीर चाखून पहिली. तेव्हा कुठे आमटी काय म्हणते आहे हे प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या. बघा म्हणजे घरच्या प्रत्येकाला पानात वाढण्या आधी ते चविष्ट आहे हि खात्री करण्यासाठी चाखून बघणं अत्यावश्यक आहे. "शबरीची बोरं" जशी. मस्त वाटलं मला. 


आणखीन एक. त्या काळी आधी पुरुष मंडळी तटावर बसायची आणि मग शेवटी घरच्या बायकांची बारी यायची. तो वर का पोट रिकामं ठेवायचं ना? म्हणून चवीच्या नावाने पहिल्या वाफेचे थोडेसे तोंडात टाकले तर काय बिघडलं? काहीच नाही. कच्ची काकडी सलाड म्हणून खाऊन टाकायची. म्हणजे जर ४ काकड्यांची कोशिंबीर करायची असल्यास ८ तुकडे कमीतकमी तोंडात जाऊ शकतात. मस्त आहे कि नाही हे सगळं. म्हणजे तब्बेत पण सांभाळली गेली सगळ्यांची, चविष्ट वाढलं पण गेलं आणि उशीर जर झालाच तर भूक लागून त्रास होणार नाहीच. पुरी किंवा काही गोड केलं तरी चाखून बघायला हरकत नाहीच. अगदी मनापासून आवडला मला हा अँगल. हुषार होत्या / आहेत मागील पिढीतील बायका. भन्नाटच. लगे रहो. 

मंगळवार, २५ जून, २०२४

सोय आहे म्हणून


तंत्रज्ञान फारच सुंदर पद्धतीने विकसित झाले आहे. प्रत्येक वयस्कर आई वडिलांना त्यांच्या मुलांना, नातवंडांना पाहण्याची सोय झाली आहे. व्हिडिओ कॉल मुळे अगदी सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद उपभोगता येतो. स्पर्श नाही आहे अजून पण अनुभवता येतं हे पण खूप सुंदर आहे, एक वेगळी भावना आहे हे निश्चित. आताशा कामामुळे लांब असतात प्रियजन तेव्हा ह्या अश्या सुविधांमुळे मग जवळीक भासते, टिकते ई. सातत्याने रस्त्यावरून जातांना आताशा रस्ते दिसतंच नाहीत, तर सर्वत्र फक्त जुंपल्यासारखी माणसं. ती कशाला जुंपली असतात, किंवा कशाच्या पाठिमागे वेगाने धावत असतात हे एक गूढ आहे. जेथे बघावं तेथे, आणि जेव्हा बघावं तेव्हा फक्त पळापळ. बास. आणि नुसती पळापळ नाही तर एक-हस्ती अशी. कारण दुसरा हात हा व्यग्र असतो ना त्या मोबाईल नामक अवयवाला धरण्यासाठी. मान बोलली असती तर? असा कधी कधी मला प्रश्न पडतोच. एखादा व्यक्ती सोडला तर सगळेच रस्त्यावर गाडी चालवणाच्या आनंद घेण्यासाठी असतात का फोन वर बोलण्यासाठी हे एक गमक आहे. का? घाई, गती, खड्डे, भल्यामोठ्या आकाराच्या गाड्या, तो फोन, वाकडी मान, सतत बडबड, हॉर्न चे आवाज ..... अरेरे. काय हे दृश्य? आणि काय शिकवतो आहोत आपण लहान मुलांना? काय गरज आहे इतकं महत्वाचं आहे का बोलणं आणि अश्या पद्धतीने मल्टि टास्किंग करणं?


आताशा तर बरेचसे महानुभाव विडिओ कॉल वर बोलत बोलत गाडी चालवत असतात. नाहीतर काही तरी बघत बघत, क्रिकेट मॅच, बातम्या असं काहीसं. कशाला? तुम्ही असा आलेला फोन घेताच का? किंवा असं काही लावता का? त्या दुसऱ्या व्यक्तीला काहीच वाटतं नाही का कि रस्त्यावर महागाची, कष्टाच्या पैशानी घेतलेली गाडी चालवत असतांना बोलू नये म्हणून? जरा झोप कमी करा, जेवणाचा वेळ कमी करा आणि मग थोडक्यात बोला. रविवारी बोला, घरी असतांना बोला, गाडी बाजूला घेऊन बोला, कशाला स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात? कित्ती त्या कानांना त्रास द्याल? ऑटो मधे असतांना त्या गाडीचाच आधी आवाज, त्यात बाहेरचे आवाज आणि त्यात गप्पा, देवा, वाचाव बाबा. कसं ऐकू येतं ? आणि काय मजा येते कोणास ठाऊक? तंत्रज्ञानाने काही शोध लावले आहेत ते असे कधीही कुठेही वापरायला नाहीच मुळी. उपलब्ध आहे म्हणजे वापरलंच पाहिजे सतत असे नाही? काय दाखवू इच्छिता हे असं वागून? असे एकावेळी अनेक कामे / बिनकामाची कामे नकोत मुळी. तंत्रज्ञानाचा योग्य वापर होऊ द्या. शिस्त लावा स्वतःला वेळेची, बोलायची, सोशल मीडिया वापरायची, व्यायामाची... जितकी जास्त वेळ तुम्ही आताशा देता स्क्रीन ला तेवढा व्यायाम होतो का जास्त? नाही ना? मग? 

सोमवार, २४ जून, २०२४

संशोधनाची पहिली छोटी पायरी

 नवीन लोणचे घातले कि त्यात सुरवातीला भरपूर प्रमाणात तेल घातलेले असते. ते जास्तीचे तेलाचे आणि मीठाचे प्रमाण प्रिझर्वेटिव्ह चे काम करते, लोणचे टिकवून ठेवायला जणू. पण तो खार जास्त महत्वाचा असतो, कित्येक जणांना, मला धरून हो. नव्या कोऱ्या लोणच्याचा खार आणि गरम मऊ भात, अहाहा च. अप्रतिम असे ते मिष्टान्न तय्यार होते. वाढायला सोप्पे म्हणून थोडे लोणचे छोट्या बरणीत काढले जाते. तेव्हा काही दिवसांनी त्यात पुन्हा पुन्हा फोडणी घालावी लागते, अर्थात ह्या वेळी चव वृद्धिगत करण्यासाठी किंवा खार वाढण्यासाठी. फोडणी करून ती थंड व्हावी लागते लोणच्यात घालण्याआधी पुन्हा पुन्हा. त्यामुळे जरासा वेळ लागतो हे करायला आणि संयम लागतो तो वेगळाच. परवाची गोष्ट. लोणचे कोरडे झाल्यासारखे दिसले, म्हटलं फोडणी घालणं आता अत्यावश्यकच आहे. पण भूक लागली होती. आता काय करायचं? थोडेसेच लोणचे उरले होते छोट्या रोजच्या बरणीत. आणि माझ्या चार डोळ्यांना तेव्हाच काही वेळापूर्वी काही जिन्नस तळून ठेवलेली कढई दिसली. म्हटलं चला. एक छोटासा नवीन प्रयोग करून बघुयात आज. फोडणी तर नेहेमीच घालतो, आज तळेलेले तेल जे थंड झाले आहे ते घालून बघुयात. मग काय, घातले आणि फस्त केले देखील. फोडणीची सर नव्हती त्याला पण "दुधाची तहान ताकावर" अशी पर्वणी साधता आली मला सहज आणि ताबडतोब, न वाट पाहता, तेल / फोडणी थंड होण्याची हो. फोडणीत जरी मोहोरी, हिंग हळद तापलेल्या तेलात घातलेले असले तरी तापलेले तेल जास्त प्रमाणात असते आणि महत्वाचे असते. सगळं माल मसाला मुरलेला असतोच आधीच त्या लोणच्यात त्यामुळे जास्तीचे, संपवलेले तेल घालणे महत्वाचे. हा साधा विचार केला आणि कृती करून मी मोकळी झाले. हे सगळं अर्थात माझी लेक बघत होती आणि तिने तिच्या डोक्यावर हात मारला. बास. 


तर मंडळी अश्या छोट्या छोट्या क्लुप्त्या करून बघाच हो, काय भन्नाट मज्जा येते ते. वेगळं काही तरी पानात वाढलं जातं आणि त्याची चव काही निराळीच मिळते / लाभते. ह्यालाच तर संशोधनाची पहिली छोटी पायरी म्हणायला हरकत नाही किंवा काम साध्य करण्याची वेगळी पद्धत, नाही का? 

एक जरासा वेगळा अनुभव


परवा का माहित नाही पण मला श्री तिरुपती बालाजी संस्थानचा प्रासादिक लाडूच खायचा होता, तेव्हाच्या तेव्हाच. नंतर नाही. इतके डोहाळे देखील नव्हते लागलेले मला, इतक्या प्रकर्षाने ते खायचेच होते, ताबडतोब. कितीही तंत्रज्ञान पुढे सरकले तरी माझी अशी हि हटके इच्छा पूर्ण होणे त्या वेळी शक्य नव्हतेच. हे मला ठाऊक होते. मग  माझी धडपड सुरु झाली, काय काय करता येईल हे विचारचक्र सुरु झाले आणि मार्ग मिळत गेले, ताबडतोब. अनायसे दुसऱ्या दिवशी रविवार होता. म्हटलं चला, हि पर्वणी साधून घेऊ या. केतकावळे, श्री बालाजीचे देवस्थान तेथे जायचे मनात आले. चौकशी सुरु केली, अगदी वाहनचालक बघितले, किती खर्च होतील ह्याचा अंदाज घेतला, वेळ किती लागेल हे पण बघितलं आणि मग माझा मोर्चा माझ्या लेकीकडे वळला. तिला हे सगळं सांगितलं आणि तिला यायला भाग पाडलं माझ्या सोबत. अर्थात ती जगावेगळी माझी मैत्रीण आहे, त्यामुळे कुठलेही आढे वेढे न घेता ती तय्यार झाली, ह्या सगळ्यात कुठलाही रस नसतांना, बिच्चारी. बाकी दोन एक ठिकाणी पण तस्साच प्रसादाचा लाडू उपलब्ध असतो हि पण नाविन्यपूर्ण माहिती समोर आली आणि अख्खा प्रोग्रॅम आखला गेला. आम्ही दोघी निघालो. श्री कृष्णाचे मंदिर आमच्या घरापासून खूप दूर आहे. त्यामुळे पुणे दर्शनच घडले ह्या निमित्याने. मग फक्त माझ्याच साठी नाही तर अनेकांसाठी लाडू आणले आणि भरपेट फस्त केले. 


ह्या पिटुकल्या प्रवासात मला असं जाणवलं कि सिमेंटचं जंगल फारच वेगाने वाढते आहे. इतके कि महाराष्ट्र राज्यात जे नव्हतं ते माझ्या चार डोळ्यांना दिसलं. माझे वडिल स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत होते, त्यामुळे काही नियम माझ्या कानावर पडले होते. आणि अर्थात आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने, हवा खेळती राहावी म्हणून ते आखले गेले होते. प्रत्येक घराच्या आजूबाजूला ठराविक जागा मोकळी सोडायचीच. आता फ्लॅट्स आहेत जागोजागी. तेथे पण तो नियम लागू असावा.  पण ते दुर्श्य आता संपूर्णपणे बदलेले दृष्टीस पडले. इतके चिटकून चिटकून गगनचुंबी इमारती उभ्या केल्या आहेत कि ज्याचं नाव ते.  मग माझ्या मनात एक विचार आला. महाराष्ट्रात मी राहिले असल्यामुळे फक्त तेच अनुभवले, कि आपल्या घरात झालेला एखादा मस्त पदार्थ आपण शेजारी देतो, चव बदल म्हणून, किंवा खास म्हणून. हे कुठेतरी लोप पावत चाललं होतं, दुर्मिळ झालं होतं. पण ह्या अश्या इंच इंच जागेचा सदुपयोग करून बांधलेल्या इमारती बघितल्या आणि त्या मागचं खरं कारण उमजलं. अच्छा, म्हणजे हि आपली जुनी पद्धत लोप पाऊ द्यायची नाही आहे तर? मस्त. आणि त्यात आता सगळ्या प्रांतांचे लोक आले आहेत आजूबाजूला वास्तव्याला, त्यामुळे हा तर दुग्ध शर्करा योगच जणू. क्या बात है? ज्यांनी असा विचार करून हि घरं बांधली त्यांना शिरसाष्टांग नमन. आवडलं मला. जेथे माझी नजर जात होती तेथे असेच दृश्य बघायला मिळाले त्या दिवशी. आणि अर्थात पुढे येऊ घातलेले नवीन बांधकाम देखील अगदी त्याच धरतीवर सुरु असलेले देखील बघितले. किती मस्त ना? फक्त आपल्या स्वयंपाक घरातून हात बाहेर काढायचा कि दुसऱ्याचेच घर, पदार्थ अगदी सोप्प्या पद्धतीने सुपूर्त. देवाण घेवाण परंपरा सुरु राहील सहज. पण मंडळी हे सर्व साधतांना स्वतःच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष असू द्या. सकाळच्या रम्य वातावरणात बाहेर पडा. स्वच्छ हवेचा आस्वाद दररोज घ्यायला अजिबातच विसरू नका. मोकळ्या ठिकाणी व्यायाम करा म्हणजे मज्जा येईल. 

शुक्रवार, २१ जून, २०२४

दुग्ध शर्करा योग


बघा म्हणजे ह्या शब्दात सुद्धा योग च आहे, गम्मत आहे नाही. महाराष्ट्रात अगदी लहानपणापासून रहात असल्यामुळे मी वटसावित्रीची पूजा अगदी जवळून पहिली, अनुभवली. पूजा म्हणण्या पेक्षा व्रत म्हणावं. व्रत ह्या करता कारण पूजेची तय्यारी, गुरुजी, उपवास, वडाची पूजा, कथा, इतर लहान-थोरातांसाठी संपूर्ण स्वयंपाक नेहेमीसारखा, मेहेंदी, बांगड्या आणि इतर बरेच टप्पे, म्हणून. इतकं साधं, सोप्पं नाहीच ते. त्या वेळच्या मुली, बायकाच करो जाणे असे व्रत. निर्जली पण काही जणी असतात वडाची पूजा करे पर्यंत. घराची कामे झाली, देवांची पूजा झाली, आवरा सावरी झाली कि मग वड पूजा. अनवाणी पायांनी, ठरावीक प्रदक्षिणा, तो उदबत्तीचा मंद सुगंध, वडाच्या सानिध्यात केलेली पूजा, सुद्धा हवेचे सेवन आणि वडाचे आशीर्वाद भरभरून असे. आणि हे सर्व पावसाळ्याच्या सुरवातीला म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ लाभणार. माझ्या मते हे पूजेचे टप्पे म्हणजे एक प्रकारचा योगाचा. दर दिवशी बऱ्याच जणी घरी न चुकता योगासने करतात, कोणी क्लास ला जातात. बहुतांशी ठराविक आसनेच करून घेतली जातात चार भिंतींच्या खोलीत. पण निसर्गाच्या सानिध्यात, मैत्रिणीं सोबत, त्याला अध्यात्माची जोड, अनेक वर्ष ऐकलेली कहाणी आणि ह्या पूजेचे सामर्थ्य ई. मुळे होणारा योगा हा जास्त प्रभावी ठरणार हे निश्चित. त्यामुळेच माझ्या मते आज हा दुग्ध शर्करा योग साधला गेला. आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि वटसावित्रीचे व्रत एकाच दिवशी आले. यदा कदाचीत काही कारणास्तव कोणाला योग दिवस साजरा करता आला नसेल तर अजिबात काळजी नसावी. तुमच्या प्रदक्षिणा म्हणजेच आजचा योग समजा. व्रत पण करता आले नसेल तरी देखील काहीही हरकत नाही. उद्या पासून नक्की मस्त योगासने कराच दर दिवशी, न चुकता, न थांबता, विविध आसने करत तज्ज्ञांच्या मदतीने. मरगळ असेलच तर दूर पळते, स्फूर्ती येते, कामे वेगाने होतात, आणि गोळाबेरीज म्हणजे अंतर बाह्य बदल होतोच. नुसता विचार नको, विचारपूर्वक कृती करायला सुरवात करा.  

गुरुवार, २० जून, २०२४

एक छोटीशी बचत


रात्रीचे जेवण वाढण्याचा कार्यक्रम सुरु होता माझ्या घरी. ताट, वाटी, पेला, चमचा ई. घेता घेता भाकरी करण्याकरता पाणी कोमट करायला घेतले आणि बाकी जिन्नस गरम करायला ठेवले.  लेकीची खास फर्माइश होती आज भरपूर भाज्या घालून वेगळा भात आणि कोशिंबीर. त्या भाताची कढई गरम करायला ठेवतांना का कुणास ठाऊक त्यावरचं झाकण मी काढून ठेवलं बाजूला. अर्थात मला डावाने / भात वाढीने ते एकदा सारखं करायचं तर होतंच आणि शिवाय फायनल चाखून पण बघायचं होतं वाढण्या आधी.  पण जसे मी ते झाकण उचलले तस्से माझ्या गालावर खुद्कन हसू उमटले. मला खूप मस्त वाटलं आणि एका नवीन गोष्टीचा जणू शोधच लागला. झाकण ठेऊन पण गरम केले जाऊ शकत होते, म्हणजे वाफेवर खरं तर छान एकसारखा तो गरम झाला असता, कदाचित मऊ पण झाला असता वगैरे.  पण झाकण उघडावे असे मला ह्या साठी वाटले कि उगाच गॅस का वाया घालवायचा ते झाकण देखील गरम करायला? काहीच उपयोग नाही ना. कढई गरम होतेच, डाव त्यात ठेवला तर तो देखील ऊर्जा ओढून घेतो किंचितशी आणि शिवाय त्यातला जिन्नस गरम करायला लागते ती इंधन वेगळेच.  "थेंबे थेंबे तळे साचे", हि जर म्हण माहिती आहे, ह्या म्हणीचं महत्व देखील ठाऊक आहे तर मग अश्याच पद्धतीने एक तर इंधनाची बचत होणार किंवा मग अगदी जेवायच्या वेळीच पदार्थ करा आणि थेट पानात वाढा. असं केल्याने स्वाद वृद्धिंगत होईल कारण पहिल्या वाफेचे चाखायला मिळेल, अतिशय पौष्टिक असे, आणि पुन्हा गरम करत बसायची गरज नाहीच. 


गरम करावे लागलेच तर फक्त पदार्थ गरम होऊ द्या, बाकी नको. मला ठाऊक आहे कि असं केल्याने काय मोठं पारितोषिक मिळणार आहे, किंवा काय अशी बचत होणार आहे? पण किंचित विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. आपल्या भारतात जवळपास सर्व मध्यम वर्गीयांच्या घरी ३-४ वेळा खायला पदार्थ तय्यार होतातच. इतक्या स्वयंपाकघरात कणाकणाने असे प्रयोग केलेत तर मज्जा येईल नक्कीच. करून बघायला काय हरकत आहे? ताबडतोब नाही, पण कधी तरी निश्चित फरक जाणवेलच. रोज करा असे म्हणत नाही, कधी तरी आणि हो झाकण, डाव, वाढायचा चमचा ई. तापलेले असते, त्यामुळे छोटासा चटका पण लागू शकतो. सगळेच पदार्थ शिजतांना झाकण ठेवूनच शिवायचे असे थोडेच आहे, विविध प्रकारे होतो स्वयंपाक. चला तर मग, मोबाईल नावाचा अवयव बाजूला ठेवून स्वयंपाक घराचा आनंद उपभोगुयात, सर्वांसोबत गप्पा मारत जेवू या, आणि गॅसची बचत देखील करून बघू या. 

बुधवार, १९ जून, २०२४

लग्नाचा बस्ता


मला माझ्या अमेरिकेने अंगावर अक्षरशः काटे आणणारे, चांगल्या अर्थाने, अनुभव दिले. ते इतके मोठे होते, ते इतके गोड होते, जगावेगळे होते, पहिल्यांदाच चाखले होते त्यामुळे त्या बद्दल काय आणि किती बोलू असं झालंय मला अक्षरश:. स्वप्नात देखील बघितलं नव्हतं मी असं काही माझ्या समोर उभं ठाकलं. माहितंच नाही, कल्पना पण नाही असे काहीसे झाले जेव्हा मी माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीसोबत एका दुकानात गेले. 


मला आज पर्यंत फक्त लग्नाचा बस्ता ठाऊक होता, ती संकल्पना म्हणजे फक्त माझ्या वेळची किंवा त्या आधीच्या पिढीची. मुलीची खरेदी म्हणजे लवाजमा नेणे, आधी तिचे महत्वाचे सगळे कपडे घेणे, तेथे काही वेळेला रुसवे फुगवे होत असतं, काही वेळा रंगांवरून, पैशावरून, पोत चांगले नाही म्हणून ई. कसे बसे मग एकदा किंवा अनेकदा जाऊन सगळे कपडे घेतले जायचे, बस्ता बांधला जायचा. मग तो पाच सवाष्णींना बोलावून व्यवस्थित रित्या उघडून दाखवला जायचा, देवा समोर ठेवला जायचा आणि मग तिच्या कपड्यांचे पुढील लागणारे अत्यावश्यक सोपस्कार होत असतं. 


माझ्या सगळ्या उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या मैत्रिणी मिळून ज्या दुकानात गेलो होतो ते बघून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. इतके कि एक तर मोठ्या आकारात उघडलेले तोंड बंद होत नव्हते आणि हात लावायची सुद्धा भीती वाटत होती. काहीही कारण नसतांना एक अनुभव म्हणून आम्ही सगळ्याजणी तेथे गेलो होतो.  स्वच्छ पेक्षा पुढे कुठला पांढऱ्या रंगाचा पर्याय असेल तर तश्या भन्नाट रंगात ते भले मोठे लग्नाचे गाऊन उत्कृष्ट पणे मांडून, रचून ठेवले होते. पांढरेच नाही  तर बाकी सगळे नाजूक, फुलांसारखे रंग देखील होते. त्या वरचे नक्षी काम, मोती, काच तत्सम वस्तू लावून केलेली सजावट वाखाणण्यासारखीच होती.  कितीही प्रयत्न केला तरी न विसरण्यासारखे दृश्य होते ते. आमच्या साठी किमती पण खास होत्या. अर्थात घ्याचंच नव्हतंच पण बघूनच अवाक व्हायला झालंच. 


मग हा असा अनुभव फक्त माझ्या पुरता मर्यादित का ठेऊ म्हणून मग मी भारतात परत आल्यावर आणि मुलं समजण्यासारखी झाल्यावर त्यांना TLC नावाच्या खास चॅनल वर प्रस्तुत केला. आई शपथ, त्यांना पण इतका तो प्रकार आवडला म्हणून सांगते. 


आज माझी मुलगी मला खास घेऊन बसली, म्हणते कशी, तुला आवडेल असं काही दाखवायचं आहे. चल बघू. "से येस टू द गाऊन" हा प्रोग्रॅम सुरु झाला आणि मी पुन्हा एकदा त्याच अमेरिकेच्या दुकानात चक्कर मारते आहे कि काय असं भासलं. होणाऱ्या नवरीला घेऊन आई, मैत्रिणी, बहिणी आणि इतर काही खास मंडळी येतात. मुलगी काही गाऊन घालून दाखवते आणि एका ला पसंती देते. इतके म्हणजे इतके सगळे खुश असतात, हसत खेळत सगळी प्रक्रिया पार पडते. क्या बात है, एक उत्कृष्ट अनुभव बस्ता बांधण्याचा.  

रविवार, १६ जून, २०२४

करुणालय


कालच्या वृत्तपत्रात एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांचा लेख आहे. त्यात त्यांनी अनामिक अश्या घटना नमूद केल्या आहेत. त्यात थोडक्यात सांगायचे झाले तर मानसोपचार करण्याची खास शैली त्यात दिली आहे. आधीच तो रुग्ण असतो, ते देखील अदृश्य स्वरूपाचा आजार असलेला. त्यामुळे त्याला आधी उपचार सुरु झाल्यावर बोलतं करायचं आणि त्याच्या बद्दल चार शब्द चांगले बोलायचे, त्याने काय छान साध्य केलं आहे हे प्रकर्षाने आधी सांगायचं आणि मग बदल सुचवायचा त्याला किंवा त्याच्या कडून विविध गोष्टी करून घेणाऱ्याला. त्याची प्रगती ऐकली कि मनाला उभारी येते आणि तो अधिक परिश्रम घेऊन आजारातून बरा होण्याचा सचोटीने प्रयत्न करतो, आणखी जोमाने. मला हि पद्धत फार भावली. 


मला एक सांगा जो कोणी मनोरुग्ण होतो तो काही एका रात्रीत होत नसावा. त्या मागे काही ओळीने झालेल्या घटना कारणीभूत असाव्यात. माझ्या मते, जरी माझा ह्या विषयात खोल, सखोल अभ्यास नसला तरी ओळीने घटना घडण्यासाठी फक्त जवळचेच जबाबदार असणार खात्रीने. 


तसं पहिला गेलं तर "पहिली शाळा म्हणजे घर आणि पहिली शिक्षिका म्हणजे आई किंवा आई-वडिल" अशी एक म्हण आहे, आणि ते खरं देखील आहे. प्रत्येक घरच्या व्यक्तीने समोरच्याचे उणे-दुणे सातत्याने काढत राहण्यापेक्षा आधी बऱ्याच वेळी पाठीवर थाप द्यावी, गोड बोलावं किंवा टोचून तरी बोलू नये, सतत नाक खुपसू नये.  तुम्ही एखाद्याबद्दल अनेक वेळा जर व्यवस्थित बोललात, त्याला मानसिक आधार दिलात, पुढे जाण्यास प्रवृत्त केलेत तर कुठे तुम्हाला अधिकार मिळतो रागवायला, नाहीतर नाहीच. तसं करूच नये. तुम्हाला काय माहिती "अंदर कि बात". प्रत्येकासोबत काय घडतंय हे जाणून घेण्या आधीच जर तुम्ही अविचारी वागलात, सरबत्ती सुरु केलीत तर प्रत्येकाला ते निभवायला किंवा इग्नोर करायला जमत नाही, तेवढी ताकत किंवा शक्ती उरलेली नसते त्यांच्यात आणि मग अशी हि मानसिक आजाराची ठिणगी पडते. एका मराठी सिरीयल मधे दाखवलं आहे कि आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्र बसायचं एक हातात कागद घेऊन. त्या कागदावर एका किंवा अनेक कुटुंबियांचे चांगले गूण नमूद केलेले असणार आहेत. ते मोठ्याने वाचून दाखवायचे. साध्या सोप्प्या शब्दांचा वापर करायचा. मागचं काहीही ध्यानात न ठेवता.


त्या नंतर एक आधुनिक संत आहेत. त्यांनी सांगितलेली पिटुकली क्लुप्ती बघा. एक कागद आणि पेन उशा खाली ठेवायचे. त्यात आपल्या मुलांच्या चांगल्या गोष्टी, सवयी, त्यांचे तुम्हाला आवडलेले गुणधर्म ह्या सगळ्यांची यादी करायची. एकदा नाही तर भर घालत राहायची त्यात, सातत्याने, किंवा जेव्हा नवीन गूण दिसेल किंवा आठवेल तेव्हा. म्हणजे त्याचा प्रचंड उपयोग होतो आणि टिकतो. त्याने आपल्याच मुलांना दहा हत्तीचं बळ येतं, ऊर्जा मिळते, मिळत राहते. कित्ती सोप्प आहे आणि हे करायला, नाही का? मग उचला पेन आणि कागद आणि सुरु व्हा आत्ताच. 

एखादी सासू, बॉस, किंवा अजून कोणी तुम्हाला रागावलं तर ते आत धुमसत ठेऊ नका, त्याचा राग तुमच्या पेक्षा वयाने, मानाने आणि शक्तीने लहान असण्यांवर काढू नका कारण ते योग्य नाहीच. तुम्ही स्वतः शांत होण्याचं बघा. एक तर ज्यांनी तुम्हाला डिवचलं त्यांना बघून घ्या, किंवा स्मित हास्य करून तो विषय सोडून द्या, ध्यान करा, खिडकी बाहेर बघा, निसर्गाची स्तुती करा, निसर्गात रमा, चहा प्यायला जा, पाय मोकळे करा, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधे लिहा आणि डिलिट करा, कागदावर लिहा आणि फाडून टाका, काहीही करा पण शांत राहण्याचा प्रयन्त कराच. दुसऱ्यांची मदत घ्या तुम्हाला एकट्याला शांत होता येत नसेल तर. पण राग येऊ देऊ नका, आला तर दाबून टाकू नका आणि पसरवू नकाच. शांत होण्याचं सूत्र शोधून काढा तुमचं तुम्ही. 


असे छोटे छोटे बीज जर घरच्यांनी पेरले तर प्रत्येक जण कित्ती सुखी होईल बघा.


आपण कचेरीत किंवा बाहेरच्याला इतके टोकतो का सतत? नाही, अजिबात नाही. कारण तेथे घरच्या सारखे कदाचित संबंध नसतात, ते कदाचित आपले नसतात आणि असं बोलणं किंवा उणंदुणं काढणं वाईट दिसतं, आपलं आणि बाकीच्यांचं त्यात नुकसान होऊ शकतं. मग घरी हा नियम का नाही लागू पडत? किंवा घरच्यांशी नरमाईने वागून तर बघा, पाठीवर सतत थाप देऊन तर बघा तुम्हाला त्याचा किती फायदा होतो ते. पुढच्यांच सोडा, आधी तुमच्यातला बदल अनुभवा, कित्येक पटीने ऊर्जा मिळते, समाधान मिळते ते बघाच. साधा प्रयोग करायला काही पैसे लागत नाही किंवा खूप वेळ वाया जात नाही. फक्त कधी तरी शाब्बास म्हणा, सहज थोपटा, मेसेज करा, फक्त स्मित हास्य द्या, वरच्या दिशेने अंगठा दाखवा, एखादं चॉकलेट आणा, फुल आणा किंवा तुम्हाला सोयीचं ते करा, पण कराच, अगदी आत्तापासूनच. म्हणजे मग सर्वत्र सुदृढता नांदेल, निश्चितच आणि लवकरच. मानसिक त्रास होई पर्यंत ताणू नका मंडळी. 

https://www.esakal.com/saptarang/muktangan-vysanmukti-kendra-addiction-free-pune-pjp78


शनिवार, १५ जून, २०२४

गजर


"जागते राहा" अशी आरोळी ठोकली जायची आमच्या लहानपणी आणि त्या सोबत शिट्टी पण वाजवली जायची.  अर्थात ती शिट्टी नसायची पण शिट्टीचे धावते संगीत कारण गुरखे सायकल वर जेव्हा आमच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालायचे तेव्हा शिट्टी आणि सायकल दोन्ही वेगात असायची. त्यामुळे म्हटलं असं. जे गुराखी पायी फिरायचे रात्रभर अक्षरशः तेव्हा ते काठी आपटायचे सातत्याने. अलार्म हा शब्द इटली ह्या देशातल्या सैनिकांनी सशस्त्र तय्यार राहावे ह्या साठी वापरला गेला होता. सर्व सामान्य जनतेला सांभाळण्याची, देशाचे संरक्षण करण्याची त्यांची जबाबदारी होती म्हणून जसे कि माझ्या लहानपणी हे आदरणीय गुराखी. सोप्पं नाहीच ते, आपल्या घरच्यांना सोडून, दूर राहून रात्रपाळी करणे. 


अलार्म किंवा गजर हा शब्द वापरात आला तेव्हा फक्त घडाळ्यावर तो लावला जायचा आणि वाजायचा. सकाळी लवकर किंवा वेळेवर उठवण्याचे कार्य ह्या गजराने अथक कित्येक शतक केले आहे. आधी म्हणे खास वेळी म्हणजे सूर्य उदय झाला कि सर्वात पहिल्यांदा कोंबड्याला समजायचे आणि तो आरवायचा. त्याचे ते नीरव शांततेतले आरवणे ऐकले कि उठायचे सगळे तेव्हा. मंदिरात भूपाळी किंवा काकडआरती होत असे ती पण कानावर पडून उठणे व्हायचे. घरी जात्यावर दळण दळतेवेळी ज्या ओव्या गायल्या जायच्या त्यांनी पण गजराचे काम केले नकळत. अर्थात हे सगळं कदाचित घड्याळ नव्हतं तेव्हा होत असेल किंवा घड्याळ उठवेल ह्या वर जोवर सगळे अवलंबुन नव्हते तेव्हा. 


सूत तय्यार करून, धागे विणून कपडे तय्यार करण्याच्या मिल होत्या तेव्हा माझ्या लहानपणी.  ह्या शिवाय अनेक सरकारी कचेरीत किंवा बाकी ठिकाणी भोंगे लावलेले असायचे आणि ते ठराविक वेळेला वाजायचे. ते पण एका अर्थाने गजराचे काम करत होते. 


अजूनही शारीरिक घड्याळाचे ऐकून बरेच जणं आपोआप जागे होतात आणि दिवसाची मस्त सुरवात करतात. बाकी मोबाईल नामक वस्तू वापरतात, म्हणजे मोबाईल मधे पण  घड्याळ आहे, त्यावर फक्त अलार्म वाजवला जात नाही तर तो पाच मिनिटांकरता तात्पुरता बंद करण्याची आणि पुन्हा ऐकण्याची सुविधा पण आहे. आणि ते खूप जणं वापरतात सर्रास. 


माझ्या शाळेच्या दिवसात आमच्या घरी एक पिटुकला पोपट होता, पोपटाचे पिल्लू होते. त्याची नजर आणि बुद्धी इतकी तीक्ष्ण, धारदार, भन्नाट, आणि तल्लख होती म्हणून सांगते. माझी आई माझा डब्बा करत करत, बाकी सकाळची कामे आटपत मला उठण्यासाठी आवाज देत असे. हे त्या पिल्लूने काही वेळा ऐकले आणि मग माझ्या आईला सुट्टी दिली. बास, तो इतक्या मोठ्याने अगदी आई जशी हाक मारायची तशीच हाक मारून मला उठवत असे. जो वर मी उठत नाही तो वर सातत्याने, विविध प्रकारे, आवाजाची चढ उतार करत पठ्या मला हाका मारत असे. बाप रे, दमत असेल नक्की, आणि रोज हो. मी कुठली सरळ, साधी आणि पट्टाकिनी उठणारी होते. बिच्चारा. 


मी महाविद्यालयात होते तेव्हा माझे बाबा माझे गजर होते. मी निश्चिन्त झोप काढत असे आणि ते बहुतांशी रात्रभर जागून मी सांगितलेल्या वेळी मला न थकता, स्नूझ पद्धतीने फक्त उठवतं नसतं तर कधी चहा, कधी गरमागरम फेसाळलेली कॉफी पण आणून देत असतं कारण मी अभ्यास करण्यासाठी उठलेले असायचे. कधीच त्यांनी मला नाही म्हटलं नाही ह्या करता.  


दिवसभरातल्या येणाऱ्या मिटिंग, काही महत्वाची कामे, आणि इतर गोष्टींची आठवण करून देण्याकरता, जागे व्हा, उठा, हे ठरलेलं काम तुमची वाट पाहत आहे हे दर्शवण्याचे काम पण मोबाईल मधला अलार्म करतो. सद्यस्थितीत माझ्याच मोबाईल वर बरेच अलार्म सेट करून ठेवले आहेत. वामकुक्षी ठराविक वेळेची व्हावी म्हणून देखील अलार्म लावला जातो, फक्त रात्री झोपून उठाय करता नाही.  


मी "अबसेन्ट माईंडेड प्रोफेसर" म्हणजे विसरभोळी शिक्षिका म्हणून जेव्हा कार्यरत होते तेव्हा मला डायरीत टिपून ठेवून, मोबाईल वर नोंद करून कधी कधी भागात नसे कारण एखादे काम, मिटिंग इतकी महत्वाची असायची कि ते विसरून चालणे शक्य नसायचे. तेव्हा मग मी माझ्या सोबत विद्यावाचस्पती साठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कामावर लावायची. ते बिचारे त्यांच्या मोबाईल वर माझ्या साठी अलार्म लावायचे. हे काय कमी होतं, एकाच इमारतीत आम्ही सगळे असायचो त्यामुळे मला प्रत्यक्ष सांगायला पण यायचे. 


माझ्या घराच्या अगदी जवळ एक शंकराचे मंदिर आहे. तिथली एक खास परंपरा आहे. सकाळी आणि संध्याकाळी आठ वाजता मोठ्याने आरती होते. एक वेगळी ऊर्जा देणारे स्पंदनं तर त्यामुळे पसरतातच, भक्तीमय वातावरण निर्मिती होते, आरती न चुकता कानावर पडते आणि माझ्या मते काही जणांसाठी अलार्मचे काम करते सकाळी. 

मोती साबणाची जाहिरात मी कशी काय विसरले ज्यात "अलार्म काका" दाखवले आहेत, जे नरकचतुर्दशी दिवशी अगदी पहाटे सर्व चाळीला उठवायची जबाबदारी घ्यायचे. 


तर अशी मी, कित्ती जणांची ऋणी आहे, कित्ती वेगवेगळे गजर वापरले आहेत, ज्यामुळे माझी कामे वेळच्या वेळेवर पूर्ण झालीत. शतशः धन्यवाद सर्वांना. 


काय काय प्रकारचे अलार्म आहेत नाही आपल्या वापरात? मस्तच. 


शुक्रवार, १४ जून, २०२४

कलियुग


माझा जनसंपर्क खूप मोठा आहे अगदी आधीपासूनच. कसा? ते ठाऊक नाही. आई वडिलांनी, असंख्य गुरुजनांनी, अनुभवांनी शिकवलेले कित्ती खोटे आहे ह्याचा का कुणास ठाऊक पण पदोपदी प्रत्यय येतोय. काही पोथी मधे पण नमूद केलेले वाचनात आले कि अभक्तांना साहाय्य का करतो "तो" नेहेमी? भक्तांची काळजी घेतो, पदोपदी साथ देतो, पण कधी कधी असा वागतो कि उकल होत नाही. 


कलियुग कित्ती वर्ष चालणार आहे कारण जवळपास ६० वर्ष आधी किंवा गेले ६० वर्ष सलग जे चुकांवर चुका करत आहेत, घोड चुकां पेक्षा हि कित्तीतरी पटीने मोठे अपराध करत आहेत सातत्याने ते अत्यंत सुखी आहेत, पैसा अडका आहे, तब्बेत ठणठणीत आहे, म्हणजे इतकी कि साधी सर्दी पडसं पण शिवत नाही त्यांना. घर दार आहे, सगळं जग हिंडून आले आहेत, कुठेही वाकणं / झुकणं ठाऊक नाहीच. कशाचीही कमतरता नाहीच. कधीच काहीच बोचत नाही कि चुकलं आहे. त्यांच्या मुळे दोन माणसांचा जीव गेला किंवा घेतला म्हणायला हरकत नाही. त्यांची पोरं बाळं, अख्ख कुटुंब उघड्यावर पडलं पण ह्यांच्यात यत्किंचित बदल नाहीच.  

ह्याच्या विरुद्ध एक व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर. संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी घालवलेला, पेशाने डॉक्टर आणि एक नया पैसा न घेता औषादोपचार करणारा. देवाचा परम भक्त. त्याच्या पायी सतत नतमस्तक. अविरत साधना,न चुकता केलेली आयुष्यभर, कमीतकमी ५५ वर्ष वगैरे. मितभाषी, मौन व्रत धारण करून, फक्त घराचे साधे अन्न सेवन करून राहणारा. सर्वांशी मैत्री, सतत मदतीचा हात पुढे. इतके यश लाभून सुद्धा कुठे म्हणजे कुठंही गवगवा नाहीच. आणि आता अचानक कर्करोग झाला आहे. हा कसला त्याचा न्याय? इतकी वर्षे विविध गुरूजांनी सांगितलेले सगळे सपशेल खोटे ठरले आहे. एक असे उदाहरण पुरेसे आहे.  काय हा कलियुगाचा महिमा? आणि ह्या अश्या देवासम व्यक्तीलाच का हा त्रास? आणि दुसरा व्यक्ती का सुटला? म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं नाही कि  शिक्षा व्हायला हवी.  पण काडीमात्र फरक नाही. असं ऐकलं होतं कि एकतर चाळीशी पार केली कि, किंवा निवृत्त झालो कि कृतज्ञता अंगी येते, नतमस्तक होतो माणूस, पण येथे तसे तिळमात्र नाहीच. सतत ताठ मान. 

मागल्या जन्मीचे प्रारब्ध / भोग ई. जरी म्हटलं तरी ५५ वर्षांची पूजा, अर्चा, तपश्चर्या आणि इतर सगळे पुण्य पुरेसे नाही का ते सरून जायला? 

पहिले वर्णन केलेले महानुभाव ह्यांच्या तोंडी सतत शिव्या, सारखं दुसऱ्यांबद्दल उणे दुणे काढणे, तक्रारी, नावं ठेवणे, स्वतः किती महान फक्त हेच मिरवणे, अन्नदान नाही, श्रम नाहीत, सर्व सुखसोईंनी युक्त प्रत्येक क्षण. 

काकांचे फक्त सुमधुर बोलणे, आचरण, बोलणं, कृती, वागणं काहीही म्हणावं सगळ्यात मेळ, शिवी माहिती देखील नाही, अहो अगदी मोजून तर शब्द वापरतात. विविध भागातून अनेक वर्ष दिग्गज सल्ले घ्यायला येतात, भेटीला येतात कारण कीर्ती आहेच मोठी. 

मला त्याचा हा असला हिशोब अगदीच पटला नाही. दोघे व्यक्ती अगदीच माझ्या जवळचे त्यामुळे खूप व्यवस्थित ओळखते मी त्यांना. म्हणून अस्वस्थ व्हायला झाले हि बातमी समजली तेव्हा. कर्करोग मुक्त ते पट्टाकिनी होऊ देत हि ईश चरणी प्रार्थना, अगदी मनापासून. 

मंगळवार, ११ जून, २०२४

इडियट बॉक्स

 दूरदर्शन, दूरचित्रवाणी किंवा इंग्लिश भाषेत टेलिव्हिजन हा संच माझ्या घरी खूप म्हणजे खूपच लवकर आला, आमच्या कुटुंबाचा भाग झाला. त्या वेळी अगदी ठराविक वेळेपुरता तो चालत असे. त्यामुळे त्या वर कार्यक्रमांची मेजवानी सुरु झाली कि पडद्यावर मुंग्या दिसेस्तोवर आमची त्याला चिटकून बसत असू. तो काळच फार वेगळा होता. तेव्हा ह्या संचाला "इडियट बॉक्स" असे संबोधले जायचे प्रेमाने. पण माझी आई म्हणायची कि घर बसल्या मला सगळ्या दिग्गज कलाकारांना ऐकता येतं, सगळे कार्यक्रम बघता येतात, माहिती मिळते, मुलाखतींचा आनंद उपभोगता येतो मग हा नक्कीच बहू उपयोगी असा संच आहे. हा नसता तर घराबाहेर पडा, कार्यक्रमास्थळी जा, वाहन शोधा, तिकीट काढा आणि परत यावेळी या हे सगळं जमवावं लागलं असतं. पण टीव्ही मुळे हे काहीही न करता अनुभवता येतं. 


एवढ्यातच सतत वर्तमानपत्रात एक जाहिरात झळकते आहे एका मस्त कार्यक्रमाची. खूप विचारपूर्वक आखलेला नजराणा आहे तो माझ्या दृष्टीने. संगीत उपचार ह्या विषयावर उहापोह आहे थोडक्यात त्या ठिकाणी. पण एक तर कार्यक्रमाचे ठिकाण खूप दूर आहे, अवेळी आहे, परत यायला वाहन मिळेल कि नाही अश्या विचारात तो कार्यक्रम उपभोगता येणार नाही. त्यामुळे मग मी ठरवलं कि वाट बघायची, काही दिवस, महिने. कधी ना कधी तरी तो टीव्ही वर प्रसारित होईलच ना? आणि आताशा टीव्ही म्हणजे फक्त एक वाहिनी नाही तर असंख्य पर्याय आहेत. कोणी ना कोणीतरी माझ्या सारख्या प्रेक्षकांसाठी हे सोया निश्चित करेलच. त्यामुळे वाट बघणे हेच काय ते माझ्या हातात आहे आणि ते मी आनंदाने स्विकारले आहे. कुठेही काहीही तक्रार नाहीच, यत्किंचितही. 


मी अनेक वेळा माझ्या विविध कार्यशाळेत गम्मत म्हणून हा प्रश्न विचारते सर्वांना, कि संगणक किंवा तंत्रज्ञान म्हणजे काय? एका शब्दात उत्तर द्या. किंवा संगणक किंवा तंत्रज्ञान ह्याला एक सामानार्थी शब्द काय? लोकं विचारात पडतात आणि बरेच पर्याय सुचवतात जे त्यांना योग्य वाटतात. माझ्यामते फक्त एक पर्यायी शब्द आहे आणि तो म्हणजे संयम / पेशन्स. तसं पाहायला गेलं तर सगळंच आपल्या हातात आहे असं आपल्याला वाटतं तंत्रज्ञानामुळे. पण छे हो मुळीच नाही. संगणक चालेल, वाय फाय चालेल, पट्टाकिनी गुगल उत्तर देईल किंवा सगळी कामे ठरल्यावेळी होतीलच असे नाहीच. काय खात्री आहे कितीही महागडी यंत्रणा असली तरी शाश्वती नाहीच. त्यामुळे मी ह्या क्षेत्रात राहून पेशन्स टिकवणे, ठेवणे अगदी मनापासून एन्जॉय करते, नेहेमीच, आज तागायत. त्यामुळे हा मला मनापासून बघायचा जो कार्यक्रम आहे तो देखील घर बसल्या दिसेस्तोवर संयम बाळगणार आणि मग त्याचा पुरेपूर आस्वाद घेणार, त्यातून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करणार, भाष्य करणार आणि त्याची आठवण / स्मृती जपणार, खूप जणांना त्या बद्दल सांगणार, मला काय आवडलं ते, का तो कार्यक्रम बघावा ते, किंवा तो का आखावासा वाटला हे पोचवेन ई. 


आज २०२३ चा दिवाळी पहाट हा कार्यक्रम आणि त्या नंतर एक भन्नाट मुलाखत ऐकली यूट्यूब वर आणि मला अगदी धन्य झाल्यासारखे वाटले. त्याचे नियोजन इतके अप्रतिम होते कि मला असं वाटलं कि मी गुलाबी थंडीची मजा घेत पहाटे एखाद्या भव्य पटांगणातल्या सोफ्यावर बसून तो बघते आहे. जून महिन्यात पुन्हा एकदा दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने उपभोगता आला मला. "काय वर्णू तव गूण..." असं म्हणावसं वाटतं ह्या टीव्ही संचाबद्दल आणि त्या अख्या चमू बद्दल ज्यांनी हे माझ्या समक्ष मांडलं / पेश केलं. अहाहा च.    

सोमवार, १० जून, २०२४

Liberal base

Looking back, I definitely say that "I was born with a golden spoon in my mouth," though not literally. But if I think about it now, it was no less than a golden spoon. Initial care by my grandmom, mom, and most senior relatives made me what is my base. My grandmom then used to help research scholars think innovatively related to their niche domains. Then it was the turn of my first ever school: my mom's handholding, which made my base more stronger. My father was the entire university for me, and his preaching(s) still hold true, and they are with me, deeply impacted. Then it was the turn of my pre-school teachers, and the way they handled me and all children was out of this world. They practically showcased all the basic concepts with multiple examples until we all understood. Those were the days without any technological interventions or gadgets. We never learned geometry lessons in the four walls of the classroom. It was always in the open playground. Hats off to my respected teachers for introducing me to such playful techniques.


With growing years, at the apt time, a uniquely different preaching entered in the form of a new motivator. It was then the time of one of my mamaji, whose Guinness record is still intact. I wish I would have received more moments with him to absorb the universe. What a personality indeed! He sowed the seed of indirect ways to narrate the technically strong titles. I used to feel mesmerised by his use of words and phrases and manoeuvring the vehicles, his boundless knowledge.... Storytelling was the forte of my mavsi, who was, fortunately, my neighbour too. The great-connect was established due to the distance and her continuous contribution via her speeches to the betterment of society at large.


Almost all my friends—parents, siblings, neighbors, and colleagues—had cool personalities. They used to take things lightly, perform quietly, and move on consistently. Hardly any used to crib; otherwise, all were full of josh, enthusiasm, innovative approaches, linguists, artists, time management specialists, and loving personalities by default. I was surrounded consistently by such gurus all over for years together. Now I am realising their importance more and more. And I am failing to describe their worth in building me. I know I am not ruling the world or a country. I am a tiny person, but still, all credit goes to them, to my liberal, strong base.

शनिवार, ८ जून, २०२४

महत्व


एखाद्या मित्राने आपल्यासाठी जर काही केले, मदत केली, वेळेवर धावून आला तर आपण देखील त्याची परतफेड करतोच, कणभर जास्तच प्रमाणात. मित्रच कशाला कोणीही असो माणूस म्हणून आपण सदैव तत्पर मदतीसाठी, नातेवाईक, शेजारी-पाजारी, कचेरीतले कोणी, ओळखीचे, मित्राचे मित्र ई. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ह्यात भरच पडली आहे, असे म्हणायला हरकत नाही. एक मेसेज टाकला कि बहुतांशी सगळेच धावून येतात.  अनाहूत पणे पण झकास मदत मिळते, काही संस्था फक्त ह्या साठीच कार्यरत असतात. थोडक्यात काय "एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ". माणुसकी म्हणून, कोणी आपल्यासाठी काही केलं तर ताबडतोब त्याची परतफेड म्हणून सगळेच धडपडत असतातच. कोणी कष्टाने, तर कोणी पैशाने कार्यरत राहतातच. ह्या आधुनिक जगात खरं तर कोण कोणासाठी काही फुकट करतं सांगा? सगळेच फक्त फायदा बघत असतात. पण जर मी सांगितले असे एक जण आहेत जे सातत्याने दुसऱ्यांसाठी झटत असतात, यातना सोसत कार्यरत असतात, आणि हे सगळं कुठलीही अपेक्षा न ठेवता, एक महत्वाचे कर्तव्य म्हणून, जबाबदारी म्हणून, सगळे आपल्यावर अवलंबून आहेत ह्याची जाण म्हणून आणि अशी इतर अनेक कारणांसाठी. ऐका तर मग त्या अवलिया बद्दल थोडेसे, कारण त्याचे कार्य शब्दात सामावणारे नाही, चार ओळी पुरेश्या नाहीतच. 


पाण्याची शृंखला तर आपण सगळे जाणतोच, ढग कसे तय्यार होतात, पाऊस कसा पडतो, बाष्प आणि पुन्हा ढग ई. हे असे अविरत सुरूच असते कार्य. नाही का? पाऊस पडला कि जलाशय भरली जातात, मग त्या नद्या असतो, सागर, तळे, विहिरी, कालवे, समुद्र किंवा जमिनी. विविध प्रकारे पाण्याची नैसर्गिक साठवण पण होते आणि तेच साठलेले पाणी पुन्हा पाऊस पडलाय, लागणारे बाष्प तय्यार करण्यास मदत करते. प्रत्येक सजीवाला अत्यंत आवश्यक असे ते स्तोत आहे. "पाणी हेच जीवन" असे म्हटले आहे हे काही खोटे नाहीच. अगदी शेती साठी, अन्न शिजवण्यासाठी, तहान भागवण्यासाठी, स्वच्छतेसाठी, बांधकामासाठी, आणि इतर अनेक ठिकाणी पाणी हे अत्यावश्यक घटक आहे. 


बंधारे, धरणं बांधून पाणी अडवले जाते, म्हणजे साठा राहील, जवळपासच्या शेतीला उपयोगी होईल, वीज निर्मिती होईल, जमिनीत पाणी मुरले जाईल आणि पाण्याची पातळी वाढायला त्याची मदत होईल, अश्या अनेक कारणांसाठी. धरणाचे अजून एक महत्वाचे फायचे हे शहरातील लोकांसाठी आहे. त्यांना अविरत पाण्याचा पुरवठा होण्यासाठी.  नदीतलं पाणी एका दिशेने, विविध गतीने, खडक आणि इतर वनस्पती, वळणं सांभाळत वाहते. सोप्पं नाही हं ते, दिसतं फक्त आपल्याला कि हि एक साधी नैसर्गिक बाब आहे पण नाही. समुद्रातले पाणी आपल्या चवीची काळजी घेण्यासाठी, मीठ तय्यार करण्यासाठी आणि इतर कारणांसाठी आत-बाहेर करत राहते, ते देखील विविध उंची वर, गतीने, काळ-वेळेनुसार. प्रचंड कष्टमय कार्य ते. जमिनीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्ग शोधात वाहात राहणे, अधे मधे मुळांना शोषण करणे, प्राणिमात्रांची तहान भागवणे हे देखील आहेच. पिण्या योग्य पाणी तय्यार होण्याची प्रक्रिया पण सर्वश्रुत आहेच. त्यात काही औषधे मिसळली जातात, गाळले जाते, टाकीत सोडले जाते, आधी भल्यामोठ्या पाईप मधून प्रवास करायला पाण्याला भाग पडले जाते, त्या नंतर गरजे नुसार उभे-आडवे-तिरके-वर-खाली प्रवास सुरूच. ह्या टाकीतून त्या टाकीत, भल्या मोठ्या ते थोड्या वेगळ्या आकाराच्या, मग अगदी बारीक, मग प्युरीफायर कडे, प्युरिफायर च्या अतिसुक्ष्म पाईपातून नको असलेले बाहेर आणि काय काय सांगू तो त्याचा प्रवास. आणि हा प्रवास म्हणजे खाच खळगे, मार, इकडे झुकणे, तिकडे वळणे, इथे अडथळा तिथे मार्ग काढणे. एवढे अविरत कष्ट सोसत ती गंगा मैय्या आपल्या दारात उभी असते सदोदित, आपल्या साठी फक्त, आपल्या गरजेसाठी. आपण तिच्या साठी काय करतो? मनःपूर्वक दररोज, न चुकता, अनेकदा किंवा जेव्हा जेव्हा तहान भागते तेव्हा तेव्हा धन्यवाद तरी देतो का? पाण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे हे माहिती असून प्रत्येक वेळी पाणी पितांना संवाद साधतो का? लक्ष देऊन पाणी पितो का? बसून एका जागी, शिस्तीत, शांतपणे पाणी पिण्याचा अनुभव घेतो का? ते महत्वाचे आहे हे शरीर चालू राहण्यासाठी हे पाण्याला दर्शवतो का? माझ्यामते फारच कमी वेळा आपण हे सर्व करतो.  ज्या पाण्याने तुमच्यासाठी इतके केले आहे, करत राहणार आहे त्यासाठी काही क्षण राखीव पाहिजेतच प्रत्येकाकडे. आपण केलं तर पुढची पिढी करणार आणि त्यांना देखील हे पाणी मिळणार. धन्यवाद देऊन तर बघा मित्रहो, मनातल्या मनात. 

अजून एक तरणोपाय असा आहे कि सगळीकडे म्हणजे अगदी सर्वत्र, घरी-दारी, हॉटेल, भोजनालय, रेस्टॉरंट्स ई.  मोठ्या आकाराच्या पाण्याच्या पेल्यांऐवजी फुलपात्र वापरली पाहिजेत. म्हणजे एकावेळी थोडे पाणी भरले जाईल, वाया जाणार नाही, फेकले जाणार नाही. काय भन्नाट नाव ठेवलं आहे बघा, फुल आणि पात्र, असे पाणी पिण्याचे भांडे जे भरून पाणी प्यायले कि समाधान मिळतेच. इकडे तिकडे नेण्यासाठी योग्य, सांभाळायला, रचून ठेवायला सोप्पे. क्या बात है? 

काही जण झाडं लावत आहेत, काही त्यांची निगा राखत आहेत, काही संस्था जमिनीत पाणी मुरवण्याकडे भर देत आहे, काही नद्या साफ करत आहेत, काही नद्या जोडणीचे कार्य करत आहेत, काही पाऊस अधिक चांगला कसा पडेल ह्या कडे लक्ष वेधत आहेत... आपण हात जोडूयात फक्त, मोबाईल बाजूला ठेऊन, दररोज रात्री झोपतांना, किंवा सकाळी उठल्यावर, कधीतरी जमेल तेव्हा. हि माझी कळकळीची विनंती आहे, आग्रह नाही. आपल्यासाठी, आपल्या पुढील येणाऱ्या काळासाठी, समाजासाठी तरी कराच. ह्या अश्या पाण्यासाठी तक्रारी करणारे जास्त आहेत.  

गुरुवार, ६ जून, २०२४

आदरणीय बहिणाबाई


मला अनेक अर्थपूर्ण कार्यक्रम बघायला आवडतात दूरदर्शनवर. हे कार्यक्रम म्हणजे कधी संपूर्ण पल्ल्याचे चित्रपट मराठी, हिंदी किंवा इंग्लिश भाषेतले, लघुकथांवर आधारीत लघुपट, विद्यार्थ्यांनी तय्यार केलेले छोटेपट, विविध दिग्गज कंपन्यांच्या जाहिराती, मुलाखती ई. खूप म्हणजे खूपच जबरदस्त शिकवून जातात हे सगळे कार्यक्रम मला, अत्यानंद मिळतो तो निराळाच. तर अशी मी, एक शाब्दिक मेजवानी उपभोगत होते इतक्यात. त्यात आदरणीय बहिणाबाईंचा संदर्भ दिला गेला. अर्थात त्यांनी खूप डोंगराएवढं मोठ्ठं काम करून ठेवलं आहे त्यातील एक वाक्य ऐकवले गेले संदर्भ म्हणून. ते असे होते कि "मुलीला माहेर लाभावं म्हणून माय सासरी जाते". चट्टकिनी डोळ्यात पाणी उभे राहिलेच माझ्या. किती छोटेसे वाक्य पण संपूर्ण सार कथन करून गेले. ह्या साराची पात्र होती आई, लेक, आयुष्य, पिढ्या, सासरकडची वागणूक, माहेरची आठवण, आपली माणसं, जुळवून घेणं, अथक कार्य सुरु ठेवणं आणि पेरणं. आई संबंधी असे बोल मी पहिल्यांदा ऐकले आणि कृतार्थ व्हायला झाले. "आई कुठे काय करते?" हा प्रश्न ज्यांना पडतो किंवा भविष्यात पडेल त्यांचा वरचा मजला रिकामा नसेल तर त्यांना हे उत्तर मिळेल. माहेर घडतं हे माहिती होतं पण आता निश्चित झालं. ते कोणामुळे खास करून आणि ते देखील लाडक्या लेकीसाठी? हे उमजले. आईचा सहवास, तिचे अस्तित्वच पुरेसे असते. 


सगळं जग तंत्रज्ञानाच्या नावाने जरी खडे फोडत असले तरी माझी एक खास मैत्रीण नेहेमीच त्याची तारीफ करत असते. ती म्हणते माझ्या आई वडिलांना, मित्र मैत्रिणींना, प्रेमाच्या माणसांना "ह्याची देही ह्याची डोळा" बघता येत, मनात येईल तेव्हा ह्याच तंत्रज्ञानामुळे. त्यामुळे त्यांचा जसा काही सहवास लाभतो आहे दूर असून सुद्धा हे अनुभवता येतं, ह्या पेक्षा अजून काय हवं आहे. क्या बात है? नाही? अशी ती आई, किंवा आई समान व्यक्ती, ज्या नकळत, किंवा अदृश्य असे खूप काही पेरत असतात, कार्यमग्न असतात, उहापोह न करता. अश्या सर्व माउलींना आणि आदरणीय बहिणाबाईंना मानाचा मुजरा आणि नमस्कार. सगळ्यांचा आदर द्विगुणित झाला किंवा पटीने वाढला आता माझ्या देखत.   

बुधवार, ५ जून, २०२४

रिकामटेकडी


हा शब्द जरा जास्तच वापरात आहे माझ्या सध्या, कारण खरंच मी रिकामटेकडी आहे, कामचं नाहीत. स्वेच्छा निवृत्ती पत्करल्यामुळे तर अधिकच रिकामी आहे. काल अपरात्री मला अचानक एक विचार मनात आला कि हा शब्द कसा घडला असेल. कारण माझ्या मराठीच्या शिक्षिकेने तर शब्दाचे मूळ कधीच कथन केले नाही, मी देखील ते कधीच विचारले नाही आणि फक्त ते वाक्यात उपयोग करत गेले, आज पर्यंत. नद्या आहेत, सागर आहे, समुद्र आहे, झाडं आहेत आणि असे बरेच जण आहेत, मग रिकामा व्यक्ती शी टेकडी हा शब्द प्रयोग का करावासा वाटला असेल कोणाला? मला जे समजलं, उमजलं ते मी आता इथे देत आहे. रिकामा आणि टेकडी मिळून तय्यार झालेला शब्द. टेकडी म्हणजे डोंगरासारखे आणि अर्थात स्त्रीलिंगी शब्द. कारण डोंगर हा "तो" आणि "ती" टेकडी. "दुरून डोंगर साजरे" आणि इतर म्हणी तय्यार झाल्या आहेत ह्या भल्या मोठ्या आकाराच्या नैसर्गिक रित्या तय्यार झालेल्या ठिकाणाला किंवा जागेला धरून किंवा संबोधून, सगळ्याच भाषांमधे. उंचच उंच, खडकाळ, रुक्ष, कोरडे आणि सातत्याने उभे, हेच काय ते टेकडीचे महत्व. अर्थात जंगली वनस्पती किंवा हिरवळ उगवते त्यावर पावसाळ्यात, पण त्या शिवाय काहीच नाही.  डोळ्यांना सुंदर दिसतात ते डोंगर, किंवा त्या टेकड्या, काही उत्साही त्यावर चढून जातात, व्यायाम करण्यासाठी जातात, उंच भाग म्हणजे स्वच्छ हवा, ह्या करता जातात, कारण त्याला "उंच हवेचे ठिकाण" असेच संबोधले जाते. माझ्या मते गावाला, शहराला जर टेकड्यांनी वेढले असेल तर शुद्ध आणि गार हवा वाहते.  असे काहीसे उपयोग आहेत त्या टेकडीचे. पण सर्वानुमते एक स्थिर वास्तव्य, ह्या पल्याड काहीच नाही. थोडक्यात काही जण निरुपयोगी असे पण म्हणतील. कारण नदी सातत्याने वाहते, तिच्या तळाशी जलजीव वस्ती असते, वनस्पती असतात, तसेच समुद्राचे, मागे पुढे, ने आण सुरूच, मीठ तय्यार करण्याची प्रक्रिया सातत्याने आणि जीवसृष्टी असते ते वेगळंच, खूप कुटुंब पोसतो तो समुद्र. झाडे हालतात, ऑक्सिजन, कार्बोन डाय ऑक्साईड वैगरेंना मदत करतात. थोडक्यात काय, खास असं काहीच टेकडी करत नाही, बाकीच्यांसारखं, हा दोन पायांच्या बुद्धिवान लोकांचा पवित्रा. 


आधीच्या काळी स्त्रिया उत्तम घर चालवायच्या, प्रत्येकाच्या प्रकृतीची त्यामुळे काळजी घेतली जायची. सातत्याने घर एके घर आणि स्वयंपाकघर हे काय ते त्यांचे स्थान, काम आणि ओळख होती. खूप कमी स्त्रिया कामावर जायच्या. सध्या सगळ्याच बहुतेक बाहेर पडल्या आहेत आणि स्वतःची ओढाताण करून घेत आहेत. कारण सासरच्यांना सून कमावणारी हवी आणि घरचं सगळं करणारी देखील. ती बाहेर पडून अर्थाअर्थी स्वयंसिद्धा झाली कारण मागील पिढीपासून तिला ऐकावं लागलं कि तू काय रिकामी, घरी काय काम असतं? कमवायची अक्कल नाही? बाहेर जाऊन काम करणं म्हणजे काय ठाऊक आहे का? ई. आणि अनेक असे वाक्य. अहो पण २०२४ मधे कमावून आणणाऱ्या स्त्रीला सुद्धा हे ऐकावं लागतं म्हणजे आश्चर्यच आहे, नाही का? ह्या सगळ्या पार्श्वभूमी वरून  मला असं वाटतंय कि रिकामी ती जशी टेकडी म्हणून हा जोडशब्द तय्यार झाला असावा. कार्यक्षम काय तो "तो", डोंगर पण तो, मग ह्या दोघांचा मिळून का नाही शब्द  तय्यार झाला? हे मला ठाऊक नाही.  कधी कधी रिकामटेकडा असा शब्द कानावर पडतो, पण जास्त करून तिच्या बद्दल जास्त बोललं जातं. जगातल्या सर्व टेकड्यांना आता अशी विनंती आहे कि तुम्ही जे काही कार्य करता, तुमचा हा निसर्ग, माणसे, सृष्टी ई. चालवण्यात जो वाटा आहे त्याबद्दल बोलत्या व्हा. म्हणजे कदाचित तुमच्या पायथ्याशी, किंवा तुमच्या पायाची जिला सर आहे तिला देखील कदाचित मान मिळेल, मिळवावा लागणार नाही, व्यर्थ ऐकून घ्यावं लागणार नाही.  बघा काय करता येतंय ते.  

सोमवार, ३ जून, २०२४

थापलाट


महाराष्ट्रियन घरी थालिपिठाची एक वेगळीच परंपरा आहे. ताजे ताजे तिखट असे थालिपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा, अहाहा च. काय विचारता? पर्वणीच आहे / असते ती. काही जण तूप घेतात तर काही दही, लोणचे. आवडीप्रमाणे. थालिपीठाची खास भाजणी असते, म्हणजे दोन्ही प्रकारची, उपवासाची वेगळी आणि कांदा, भाज्या वगैरे मिसळून करण्यासाठी खास अशी. हे झाले ठरवून / घाट घालून केलेले न्याहारीचे पदार्थ. किंवा मुलं घरी आली, भूक / काहीतरी दे  म्हटलं कि चट्टाकिनी थालिपीठ तय्यार, पौष्टिक आणि पोटभरीचे. माझी आई नेहेमी म्हणायची कि थालिपीठावर जी बोटे उमटतात थापतांना ती दिसायला तर खूपच उत्तम दिसतात, जशी कि एक वेगळ्या प्रकारची रांगोळी आणि तो आशीर्वाद असतो, मुलांनी पोटभर खावं, त्यांच्या वाढीला ते उपयोगी पडावं ह्या करता. 


काल मी लाल भोपळ्याचे पराठे करण्याची तय्यारी केली, पीठ मळले आणि कुकर लावायला थोडासा वेळ लागला. तो वर बघते तर काय घट्ट मळलेले पीठ थोडेसे सैलसर झाले होते. मला अजून वाढ करायची नव्हती पिठात त्यामुळे मग गोळा केलेला आधी थापल्यासारखा केला, तो एक गोल फुलक्याच्या आकाराचा  झाल्यावर मग हलक्या हाताने लाटून पराठा पूर्ण तय्यार केला. त्यामुळे दोन्हीचा आनंद घेता आला, थापण्याचा आणि लाटण्याचा सुद्धा. हे सगळं करायला थोडा वेळ गेला पण मळलेले तेवढेच पीठ वापरले गेले, भर घालायची जरुरत नाही पडली. 


दिवाळी संपल्यावर जर चकलीची भजनी शिल्लक राहिलीच तर आई त्याचे पण थालिपीठ करायची. किंवा कधी आमटी, भाजी उरली असल्यास, ते खपवण्याचं साधन म्हणजे हमखास थालिपीठ. आणि अश्या थालीपीठात मग कणिक, भाकरीचे पीठ, डाळीचे पीठ, भाजणी, तांदुळाची पिठी, काहीही ढकललं जायचं.  पण असे साग्रसंगीत केलेला पदार्थ फार म्हणजे फारच चविष्ट होत असे. 


ह्या अश्या सगळ्या अनुभुवनची मस्त उजळणी झाली काल. धन्यवाद त्या पीठाला. ते घट्ट च राहिलं असतं तर कदाचित मी पट्टापट लाटून, करून मोकळी झाले असते, थापून लाटण्याची किंवा थापलाट करण्याची वेळ आली नसती, काहीही आठवलं नसतं, जुन्या दिवसांचा फेरफटका मारता आला नसता आणि हा पंक्ती प्रपंच पण साधता आला नसता. 

रविवार, २ जून, २०२४

ऍक्युप्रेशर

 असं ऐकिवात आहे कि तळहातावर म्हणे सगळे ऍक्युप्रेशर पॉईंट्स असतात. म्हणजे शारीरिक काहीही दुखणं असलं तरी तज्ज्ञ मंडळी फक्त हातातले काही ठिकाणी दाबून बरे करतात. आधीच्या काळी जेव्हा कुठलीही अत्याधुनिक साधने नव्हती तेव्हा पाट्यावर वाटणे, रवीने घुसळणे, पोळ्या लाटणे, खलबत्यात कुटणे अशी कामे घरीच केली जात. त्यामुळे नैसर्गिकरित्या सगळे पॉईंट्स अगदी नित्य नियमाने दाबले जायचे, जसे कि प्रतिबंधात्मक उपाय. अर्थात तेव्हा घरची लक्ष्मी घरच्या कामाकडे बघायची, प्रदूषण नव्हते, अंगणातले / शेतातले सगळे ताजे जिन्नस खायला मिळत होते त्यामुळे तब्बेती मस्त होत्या सर्वांच्या. पण स्वयंपाक घरात आपसूक होणारे ऍक्युप्रेशर खूपच महत्वाचे होते, सर्वांपेक्षा, माझ्यामते. ह्याचा आज मला अद्भुत प्रत्यय आला आणि अनोख्या पद्धतीने जाणवले, उमगले. 


माझी स्वयंपाकात मदत करणारी मदतनीस एक संपूर्ण आठवडा सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे सध्या स्वयंपाक घर माझ्या ताब्यात आहे, संपूर्ण. त्यामुळे सगळी अवजारं जेव्हा मी वापरायला सुरवात केली तेव्हा नव्याने त्याचा महत्वाचा वापर नजरेस पडला. उगाच नाही "तो" काम करणाऱ्या मावशींना सुट्टी घेण्याची सद्बुद्धी देतो, ते देखील काही ठराविक दिवसानंतर. काही ठिकाणी अगदी ऑफिस असल्यासारखे मावशी रविवारी सुट्टी घेतातच. त्यामुळे आठवड्यातून एकदा त्या घरच्या स्वयंपाक करणाऱ्याला ऍक्युप्रेशर मिळत असेल, आणि अर्थात नकळत त्याचा फायदा देखील. 


मला बाकीच्यांचं ठाऊक नाही पण मी जे बघितलं लहानपणीपासून ते असं होतं कि आई ताक घुसळून लोणी काढतांना किंवा लोण्याचे तूप काढवतांना "राधा कृष्ण गोपाळ कृष्ण" असे सात्यत्याने म्हणत असे. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जाई त्यामुळे. मला पण नकळत तशीच सवय लागली. रवी हातात घेतली कि मनात जप आपोआप सुरु होतोच. किंबहुना काहीही हलवतांना, दुधाच्या पदार्थांना हाताळतांना देखील सुरु होतो जप. सवयीचा परिणाम, अजून काय. शारीरिक,  थोडक्यात अध्यात्मिक आणि मानसिक स्वास्थ मस्त सांभाळले जाते त्यामुळे. म्हणजे बघा घरी स्वयंपाक करण्याचे फायदे, असंख्य असे. अर्थात सद्यपरिस्थित सर्वांना सहज जमणे आणि त्याचा लाभ घेणे अशक्य आहे. पण जमेल तेव्हा "चेंज ऑफ वर्क इज रेस्ट" असं म्हणून करून बघा, मस्त वाटेल, आनंद मिळेल, सर्वतोपरी.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...