माझ्या लहानपणी जसे बैठे घर होते, मोठा बगीचा होता, फुलं आणि फळांची विविध झाडे होती, शिवाय मस्त भाज्या पण लावल्या जायच्या. घराचा बगीचा सांभाळणे हा नित्यनियम होता, माझा आणि माझ्या बाबांचा. आम्हा दोघांना खूप आवड हे सर्व करण्याची. ती बाग बहरली कि काय तृप्त करून जाते, सुखावून जाते म्हणून सांगू. आणि आणखीन एक म्हणजे जागा मोठी होती, खूप वाव होता प्रयोग करत बसायला, सर्वात महत्वाचे म्हणजे बघणाऱ्यांच्या डोळ्यात जे कौतुक दिसायचं ते खूप काही सांगून जायचं. त्यामुळे मस्त जोमाने काम होत असे बगिच्यात. अर्थात तेव्हा हे असे दृश्य सर्वत्रच बघायला मिळत असे. बहुतांशी सर्वांचीच बैठी घरे त्यामुळे अंगण आणि बगीचा असायचाच. माझ्या सासरी पण उपवाद नव्हताच. बाग मस्त होती, कारण आता ती नाही. नवीन पद्धतीने तेच घर पडून बांधल्यामुळे सगळी झाडे गेली. लावली आहेत थोडीफार पुन्हा. ह्या सगळ्या प्रकारामुळे असेल कदाचित आमच्या छोट्याश्या फ्लॅटच्या बाल्कनीत माझ्या ह्यांना ते जुने त्यांच्या अंगणातले नंदनवन पुन्हा उभे करावेसे वाटले. त्यामुळे तेव्हा जी जी म्हणून झाडे होती ती ती सर्व आणून कुंडीत लावली. ह्यांची दिनचर्या म्हणजे सकाळी भरपूर पोटभर व्यायाम, मग नाश्ता, पूजा, कचेरी दिवसभर. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा काही तर तोंडात टाकायला, आणि मग जी मिटींग्स जी सरबत्ती सुरु व्हायची ती संपण्याचे नावाचं नसायचे. त्यामुळे कित्येक वेळा रात्रीचे जेवण हे कामाच्या टेबलावरच. मी पण संपूर्ण वेळ नोकरी करणारी, मुलं आपल्या क्षेत्रात व्यग्र, आणि बाल्कनीलाच लागून ह्यांची कामाची खोली त्यामुळे त्या बागेकडे दुर्लक्षच झाले खूप म्हणजे खूपच दिवस. अगदी विद्रुप झाली होती एकंदरीत झलक. आताशा हे नाविन्यपूर्ण कामानिमित्य वेगळ्या शहरात गेले आहेत. काही महिने तेथेच मुक्काम करावा लागणार दिसतोय. मी पण स्वेच्छा निवृत्ती घेतली. मग काय विचारात, बाल्कनी आली माझ्या हातात. जी स्वच्छता मोहीम राबवली म्हणून सांगते, कि हात दुखायला लागला, ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि ८ दिवस लागले. कालच माझ्या मैत्रिणी म्हणतात कश्या मला बघितल्या बघितल्या, बरं झालं गं तू बाल्कनी स्वच्छ केलीस, आता मस्त दिसते आहे. हे सगळं करते वेळी मी आधी माझ्या घरी काय काय झाडं ठेवायची, काय देऊन टाकायची हे आधी ठरवलं, जागा बघून, हालत बघून आणि अक्षरशः तुलशीबाग अवतरली होती ती बघून देखील. एक निरोप धाडला सोसायटीच्या ग्रुप वर आणि बास द्यायची ठरवलेली झाडे, कुंड्या वाटून मोकळी झाले. उरलेल्या किंवा ठेवलेल्या झाडांना नवं संजिवनी दिली, नवीन वेगळ्या आकाराच्या, बारीक, नावीन्याने भरपूर तरुण दिसणाऱ्या कुंड्यांमधे रवानगी केली. त्यामुळे उत्कृष्ट डिझाईनर फारशी, झाडे, कुंड्या आणि संपूर्ण बाल्कनींनी जणू कात टाकली म्हणायला हरकत नाहीच. पावसाळा संपला कि तेथे मी कृत्रिम गवत पण आणून लावणार आहे.
हे सगळं मी केलं खरं पण आता एक प्रश्न उभा ठाकला माझ्या समोर. जेव्हा हे नवीन काम संपवून येतील तेव्हा काय? ओरडा बसणार, तो कोण खाणार? मग त्यावर माझ्या डोक्यातून सुपीक कल्पना सुचली. मी ते जेव्हा येणार असे समजेल तेव्हा काही दिवसांकरता देऊन टाकलेली झाडे भाड्याने आणेन आणि सजवून ठेवीन. बास. मग हळूच सांगून बघू काय होतंय ते? नाहीतर ज्यांना दिली ते माझ्याच आजूबाजूला आहेत, त्यांच्या कडून आणून सजवून ठेवू जसेच्या तसे पण मस्त स्वच्छ हटके पद्धतीने. आहे कि नाही मज्जा? ते येतील तेव्हा बघू. आता तर मोकळा श्वास घेताहेत सगळे. माझ्या कचेरीत जेव्हा काही कार्य असायचं तेव्हा मी बघितलं आहे, निरीक्षण केले आहे, हवी तशी, हवी त्या आकाराची, प्रकारची झाडे आणून सजवतात. "बदल हाच स्थिर असतो" असं म्हणतात हे कित्ती खरं आहे नाही.
माझ्या दृष्टीने झाडांना जीव असतो, त्यांना पण मुलांसारखं सांभाळावं लागतं, नुसतं पाणी घालून चालत नाही, मस्त वेळ द्यावा लागतो, गप्पा माराव्या लागतात, वाळलेली पाने, फांद्या काढून टाकाव्या लागतात आणि बरेच काही. आपल्याला असं सांभाळणं जमत नसेल तर त्या भानगडीत पडूच नये आणि काही तरी भलतं करू नयेच. कामाचे स्वरूप बघून, आवड निवड लक्षात घेऊन पावलं उचलावीत माणसाने नेहेमीच. लहानपणीची बाब वेगळी होती, त्यावेळचं वातावरण पण भिन्न स्वरूपाचं होतं, वेळ होता, जागा होती, इतक्या पद्धतीचे अनावश्यक कीड प्रकार उदयास आला नव्हता, क्रतू ठराविक असतं, त्यामुळे शक्य होतं बगीचा असणं, राखणं, सांभाळणं आणि आनंद उपभोगणं. सद्य परिस्थितीत सगळ्यांना जमेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक देऊन टाकलेल्या झाडांना क्षमस्व. पण मी त्यांच्या साठी खुश पण आहे एका अर्थी कि त्यांना प्रेम करणारी माणसे मिळाली, नवीन जागा राहायला / बागडायला लाभली, कित्ती मस्त ना? माझ्या बाल्कनीत आता मला सांभाळता येतील एवढीच मोजकी झाडे मी जपली आहेत. त्यांच्याशी गप्पा सुरु आहेत, दररोज सकाळी वेळ घालवणं आणि चहा पिणं देखील. अहाहा च.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा