हे माझ्या बाबतीत अनेकदा झालंय प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रित्या. म्हणजे मी अनुभवलं पण आहे, वाचलं / ऐकलं आहे. माझ्या एका अगदी खास आणि अत्यंत जवळच्या मैत्रिणीचं लग्न ठरलं. अर्थात मी आमच्या काळातली हि पिटुकली गोष्ट सांगते आहे. तेव्हा ते अरेंज्ड केलेलं असं लग्न, होत. लग्न ठरलं, बोलणी झाली, साक्षगंध देखील झालं आणि एक दिवशी होणारे नवरा बायको आले समोरासमोर अतिशय व्यवस्थित ठरवून, वेळ, काळ, स्थळ ई. बूट/ जोडे घराबाहेर काढून आत यायची त्या वेळची पद्धत / अलिखित नियम होता. तसेच केले ह्या नवरदेवाने देखील. पद्धतशीर स्टाईल मधे पायात मोजे आणि एका पायावर दुसरा पाय अश्या पद्धतीने म्हणे तो बसला होता, इति माझी मैत्रीण. आणि मग तिला म्हणजे माझ्या मैत्रिणीला पेचात पडल्यासारखं झालं हसावं का रडावं ते कळत नव्हतं. विचारांचा कल्लोळ माजला तिच्या मनात. आज अगदी तस्साच नाही पण तत्सम प्रसंग माझ्या समोर घडला आणि माझी मैत्रीण अधिक अनेकवेळा वाचलेले / ऐकलेले प्रसंग डोळ्यासमोर झर्रकन उभे ठाकले.
आज मला भेटायला एक अतिशय तरुण, तडफदार, वित्त सल्लागार, भल्या मोठ्या जगविख्यात संस्थेतून शिकलेला ई. असा भेटायला आला, एक नाही, दोन नाही तीनदा विविध वेळा सांगून, ठरवून. आणि पुन्हा तेच, मी काहीही बोलण्याच्या आत एक चांगली सवय म्हणून व्यवस्थित बूट घराबाहेर काढले त्याने, आणि मला माहिती सांगणार तोच माझं लक्ष त्याच्या मोज्या बाहेर डोकावणाऱ्या पायाच्या अंगठ्या कडे सहज नकळत वेधलं गेलं. मग आमचं ठरल्या प्रमाणे बोलणं झालं ज्या करता आम्ही भेटायचं ठरवलं होत. पण मला अनेक वर्षांपासूनचे भरपूर प्रश्न पडले कि
- हा वेंधळा आहे का जास्त हुशार
- कामात इतका झोकून देत असेल कि मोज्यांकडे लक्षच नाही
- का कंटाळा
- का एकटा असेल, वेळ मिळत नसेल, पैसे नसतील, नवीन मोजे घ्यायला वेळ नसेल
- का नवीन मोजे फाटले असतील....
सरते शेवटी मला काही म्हणजे काहीच पटलं नाही.
वेळ काढलाच पाहिजे, वेळेचं व्यवस्थापन जमलंच पाहिजे, तरुण आहेत तर तरुणांसारखं शिस्तीत वागलं पाहिजे, आणि हि जरी फारच पिटुकली गोष्ट असली तरी व्यक्तिमत्वार घाव घालणारी आहे / ठरू शकते. घराबाहेर पडतांना पहिल्यांदा स्वतःसाठी शिस्तीत बाहेर पडणं अत्यावश्यक आहेच. शिवाय बाकीचे देखील तुमच्याकडे बघतात, शिकतात, प्रेरणा घेतात ई. तर चांगलं उदाहरण म्हणून जगा, नवा रुपाला या. फाटलेला मोजा बरंच काही सांगून जातोय, त्यामुळे हातातून एखादी सुवर्णसंधी निसटू शकते सहज आणि हा स्वभाव जर घडला तर महागात पडेल, अजून अश्या अनेक सवयी / दार्शनिक गोष्टी घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. "असे अंगठे दिसती आणि स्मृती ठेवुनी जाती".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा