आदरणीय जिजामातांच्या हातचं एक बांधकाम म्हणजे आमच्या सोमेश्वरवाडीचं देऊळ / संस्थान. अर्थात मी असं ऐकलं आहे त्या संस्थानाबद्दल, कि ते कित्ती पुरातन आहे ते. अनेक वर्षे मी त्या देवळात जाते येते आणि ते संपूर्ण दगडी बांधकाम बघते देखील. म्हणजे भिंती, पायऱ्या, आजूबाजूचा परिसर, वृक्षांभोवती बसण्यासाठी किंवा त्यांच्या संगोपनासाठी बांधलेले कट्टे देखील दगडांचे आहेत. एक एक दगड भला मोठ्या आकाराचा आहे आणि अर्थात जड देखील असणारच. त्यामुळे कदाचित आणि मागे नदी वाहात असल्यामुळे, झाडं झुडपं असल्यामुळे देखील एक अनोखा थंडावा आहे देवळात, गाभाऱ्यात आणि संपूर्ण परिसरात. आज दर्शनाकरता गेले असतांना एक नवीन अनुभव आला, किंबहुना जागृती झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज नव्याने समजलं मला कि देवळात अनवाणी का जायचं आणि हे देऊळ इतक्या सुंदर संकल्पनेवर का उभारलं आहे ते, म्हणजे दगडांचा सदुपयोग सर्वत्र. माझ्या दृष्टीने अक्युप्रेशर अक्का सर्व मर्मबिंदू यथोचित दाबले जावेत म्हणून. आणि अर्थातच हे घडल्याने मग सगळेच सुदृढ राहणार ह्यात शंकाच नाही. केवढा तो पुढचा विचार, काय ती दूरदृष्टी, अद्भुतच.
देवाचं वास्तव्य आहे, तेथील लहरी जगावेगळ्या आहेत, एक भक्तिमय वातावरण आहे आणि चुंबकीय परिणाम देखील, ह्या सर्वांच्या परे, आणि जास्तीचे ते विचारपूर्वक केलेले बांधकाम. दररोज किंवा नेहेमी जाऊन, प्रदक्षिणा घालणे स्वास्थ्याचे नक्की ठरणार. त्यावेळी बरं झालं सिमेंट ने जोडणाऱ्या आधुनिक गुळगुळीत फारश्या नव्हत्या ते. आताशा अंगण नाही, घरी दारी सातत्याने पायात वहाणा, आणि अत्याधुनिक गुळगुळीत फारश्या मग पायांचे काही प्रमाणात आजार होणारच, परिणाम / दुष्परिणाम दिसणारच / दिसत आहेत. म्हणून जमल्यास ह्या आमच्या देवळात या, जेथे कोठे असे दगडी बांधकाम आहे तेथे जा, थोडेसे अनवाणी फिरा, जे देवळाचा परिसर आरशासारखा लख्ख ठेवतात त्यांना मनापासून धन्यवाद द्या, कदाचित फायदा होईल. आणि हो, सोमेश्वरवाडी देवळात तर याचं पण माझ्या घरी गप्पा मारायला / टेकायला यायचं विसरू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा