माझ्यावेळी शाळेत शिकवले होते विज्ञानाच्या संदर्भात आणि त्या नंतर बऱ्याचदा वाचनात देखील आले कि शक्यतो ज्ञानेंद्रिय/ संवेदना अवयवांवर जास्त भार द्यायचा नाही. अनेकवेळा सर्वजण छोटासा प्रयोग करतात आणि तो खूप उपयोगी ठरतो. ज्यांना सततचा चष्मा आहे त्यांनी तो थोडावेळ काढून ठेवला कि अतिशय हलकं आणि ओझं उतरल्यासारखं वाटतं, हायसं वाटतं. हा अनुभव बहुतांशी सर्वांनीच घेतला असेल कधी ना कधी. चष्मा काढला कि फक्त कानालाच नाही तर नाकाला आणि डोळ्यांना देखील हायसं वाटतं. दररोज वापरात असल्यामुळे आणि सातत्याने कामाकडे लक्ष असल्यामुळे चष्म्याचे वजन जाणवत नाही. पण खूप वेळ काम झाल्यावर किंवा कचेरीतून घरी पोचाल्यावर, म्हणजेच त्या दिवसाचे काम संपल्यावर ते पिटुकले का होईना ओझे जाणवते निश्चित. म्हणूनच असेल कदाचित काही जण एक तर शश्त्रक्रिया करून घेतात, किंवा लेन्स आत घालून घेणे पसंद करतात शक्य असल्यास किंवा लेन्स वापरतात. म्हणजे डोळ्यांना मस्त दिसेल आणि कान + नाकावर भार येणार नाही. बरेच फ्रेम्स आता पिसासारखे हलके पण उपलब्ध आहेत, खूप महागडे पण आहेत. असो.
अनेकदा मी छोट्या मुलांना पालक शाळेत सोडतांना बघते. छोटे म्हणजे नुकतीच शाळा सुरु केलेले असे. दुचाकी वर स्वार होऊन जातांना नजरेस पडतात हे पालक आणि मुले. बहुतांशी सर्व मुले देखील काळा चष्मा परिधान केलेले असतात. इतक्या लहान वयात काय गरज आहे चष्म्याची? माझ्या तरी आकलनाच्या पल्याड आहे हे. दररोज ते देखील दुचाकीवर जातांना तो वयाच्या आणि चेहेऱ्याच्या मानाने अवजड चष्मा टाळणे सहज शक्य आहे. रस्त्यावरून जातांना खाच खळगे लागणार, त्यामुळे कदाचित तो चष्मा अजूनच किंचित आपटला जाणार. आणि होऊ नये पण दुखापत होण्याची शक्यता किंवा मार लागण्याची शक्यता नाकारता येणार नाहीच. कारण नसतांना अवेळी हे उगाच ओझं कश्यासाठी मग? बघा जमल्यास टाळा. नंतर मग सगळे तज्ज्ञ डोक्याचा भुगा करतात कि नक्की कारण काय काही आजार उद्भवले तर. मूळ अनेक वर्षांपूर्वी पण पेरलेले असू शकते अश्या काही कारणांमुळे.
आमच्या वेळी तर इतकी कडक शिस्त होती म्हणून सांगते कि शाळेत उपयोगी अश्याच गोष्टी दप्तरात किंवा स्वतः सोबत बाळगायच्या, अवांतर नाहीच. अर्थात खूप वर्ष निघून गेलीत मधे. तरी मनाला ते पटत नाही कारण ते अवास्तव आहे, निरूपयोगी आणि उपद्रवी असे आहे म्हणून.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा