लहानपणी पासून कानावर पडलेली एक म्हण "पाणी हेच जीवन". ह्या म्हणीला, वाक्यांशाला एक सुंदर आणि गहन अर्थ आहे. अनेक पैलू आहेत ह्या वाक्याचे. मला गवसलेला नावीन्यपूर्ण अर्थ असा.
थोडक्यात नमूद करायचं झालं तर आज माझे फारच जवळचे जिगरी दोस्त त्यांची उपस्थिती दर्शवत होते, जाणीव करून देत होते. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव हे सातत्याने करून देत होते आणि माझी कामं नेहेमी प्रमाणे गोगल गाईच्या संथ गतीने पुढे सरकत होती. प्रत्येक दिवस वेगळा आणि नाविन्याने भरपूर आणि परिपूर्ण असा असतो माझ्यासाठी. आज देखील होता. इतका मस्त कि ज्याचं नाव ते. माझ्या मार्गावर आज एका भलत्याच ठिकाणी गाडी लावणं होतं. मग एक उंच चढाव चढावा लागला, रॅम्प हो, तदनंतर कोणासाठी तरी खास अशी भेटवस्तू घेण्याची धडपड होती. त्या ठिकाणी पोचण्याकरता १० एक पायऱ्या चढाव्या लागल्या. पट्टदिशी भेटवस्तू घेतल्यावर मग पुन्हा रॅम्प पुन्हा चढून उतरून, भलामोठा वळसा घालून गाडी गाठली. त्या नंतर पुन्हा एक मजला चढावाच लागला कारण उद्वाहक अक्का लिफ्ट बंद होती. मग काय सुरु झाले माझे घट्ट मित्र बोलायला.
आधी दुपारी लिंबू पाणी सेवन केलं, मग पौष्टिक जेवण, त्यानंतर ताक. संध्याकाळी गवतीचहा युक्त वाफाळलेला चहा. रात्री नारळ पाणी आणि मग कडत पाण्याने शेक असा प्रवास झाला तेव्हा कुठे दोघे जरा नरमले. पाण्याचे महत्व पुन्हा एकदा नजरेस पडले आज. त्याच्या वैविध्य छटांमुळे त्याची उपयुक्तता वाढवली, वृद्धिंगत केली. हे सगळे माझ्या पायांना फार फायदेशीर ठरले आज. सर्वांना शतशः धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा