अगदी ताजी आज सकाळची गोष्ट, अनुभव, पिटुकला पण महत्वाचा. मला आज दुपारी आणि संध्याकाळी बाहेर जायचे आहे काही कामानिमित्य. त्यामुळे सकाळची ताजी हवा खायला, मित्र मैत्रिणी, आप्तस्वकियांशी भेटायला मिळणार नाही, खाली चक्कर मारायला जाता येणार नाही हे त्रिवार सत्य होतं. इतक्यांदा खाली वर करायला आता माझे पाय मला परवानगी देत नाहीत. हरकत नाही. इतकी वर्ष दिली हे खूप झालं. बऱ्याचश्या गोष्टी मार्गी लावल्या त्याने. मग पर्याय काय. सकाळची ताजी हवा तर हवी होती. लांब श्वास, खोल श्वास आणि त्या प्रदूषण-विरहित, शुद्ध हवेशी संवाद साधायचा होता. भली मोठी खिडकी ची जाळी ची बाजू उघडी होती, मी अगदी जाळीजवळ जाऊन खात्री करून घेतली तरी हवा जाणवत नव्हती. म्हटलं काय करावं? मग ती जाळीची बाजू सताड उघडली तर जादूच झाली जणू. ती शुद्ध हवा जशी काय वाटचं पाहत होती कि कधी मी ती जाळी उघडते आणि तिला आत घेते, तिचं स्वागत करते, तिला अनुभवते, पूर्णपणे, मनसोक्त. तो जगावेगळा अनुभव घेण्यात मी इतकी गुंग झाले कि ज्याचं नाव ते. मग विचार केला काय घडलं नक्की. तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. ती जाळी, इतक्या बारीक आकाराची आहे आणि मी स्वतःच आता घरी असल्यामुळे जमेल तशी साफ करत असते. माझा हात नेहेमीच फिरत असतो त्यामुळे धूळ बसत असली तरी जाळ्या नाहीत किंवा खूप धुळीने माखली नाही ती जाळी. तरी पण बघा ना, साधी हवा यायला तिने अडथळा निर्माण केला.
थोडक्यात काय माझ्या चार डोळ्यांना ती अतिसुक्ष्म जमलेली धूळ नजरेस पडली नाही. किंवा असे धुळीचे कण देखील जाळीचे चौकोन बंद करू शकतात हे ध्यानात नाही आलं माझ्या. पण बघा जे दिसतं नाही ते उभं असतं प्रत्यक्षात.
ह्या कथेचा गमक असा कि १. सातत्याने न चुकता जाळे, जळमटं, अतिसुक्ष्म धुळीचे कण, अडथळे दूर करा, दूर सारा. ते दूर सारण्यासाठी देखील वेळ द्या, कष्ट करा. २. हे असं नाही केलं तर तुम्ही शुध्दते पासून दूर राहाल. ३. जगावेगळे स्वानुभव मिळणार नाहीत. जे स्व-प्रगती करता, सुधृढ राहण्याकरता बहुमूल्य ठरतात.
तर चला उठा आणि लागा कामाला पदर खोचून ताबडतोब.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा