माझी आई खूपच तत्वाने जगली. माझ्यासाठीचं तिचं एक खास तत्व म्हणजे तिने कधीही मला स्वयंपाक शिकवला नाही. ती म्हणायची बघ, चव घे आणि कर. बास. निरीक्षण क्षमता त्यामुळे माझी खूप वाढली. काही महत्वाच्या बाबी अश्या होत्या कि तिचा स्वयंपाक फार साधा असायचा, आणि भाजी शिजण्याकरता किंवा रस्सा करण्याकरता ती भाजीच्या कढईवर एक भांड ठेवायची आणि त्यात पाणी ठेवायची. काही वेळात ते पाणी गरम व्हायचं आपोआप आणि मग तेच पाणी रस्सा होण्यासाठी उपयोगी व्हायचं. पाणी उरलं तर आमटीत घातलं जायचं. कित्ती मस्त सदुपयोग होता तो गॅस / ऊर्जा वाचवण्याचा. अश्या तिच्या सवयीं मुळे वेगळं पाणी तापवण्यासाठी गॅस, भांड लागायचं नाही. किंबहुना माझ्या बघण्यातल्या काही अजून मावशी, काकू, मामी पण त्या काळी अश्याच होत्या. सगळं साधं सोप्पं शिजवलं जायचं, जाणीव होती, छोटी छोटी घरं होती, बहुतांशी एकत्र सगळ्यांचा स्वयंपाक होत असे एकाचवेळी. फ्लॅट्स किंवा विभक्त कुटुंब नव्हती. बहुतांशी सगळ्या घरी आई स्वयंपाक करायची, मावशी / बाई नाही. ह्या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे उपलब्ध असलेल्या गॅस सिलेंडर मध्ये भागायचं, जास्त ताण यायचा नाही व्यवस्थापकांवर, सरकारवर आणि बाकी यंत्रणेवर. आता तसं नाही. कालमानाप्रमाणे सगळंच फारच बदललं. सर्वत्र फ्लॅट्स, खूप कुटुंब, भाडेकरू, नोकरदार वर्ग शहरात आलेला, आणि फ्रिज चा अतोनात उपयोग. गारेगार सगळं शिवायचं म्हणजे जास्त गॅस लागणारच. पाणी गरम हवे असल्यास आणि वेळेअभावी मिक्रोवेव्ह किंवा अजून उपकरणांचा उपयोग. त्यामुळे सगळंच मोठ्या प्रमाणात वापरात आलं, मागणी वाढली, आई सारखं स्वयंपाकातील लक्ष नाही राहिलं. असो. कालाय तस्मिन नमः. आज खूप वर्षांनी मी आईच्या पद्धतीने साधी उसळ केली आणि सगळं चित्रफितीसारखं डोळ्यासमोर उभं ठाकलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा