काही दिवसांपूर्वी मी एक कार्यक्रमात भाग घेतला, एक प्रेक्षक म्हणून, फक्त श्रवणभक्ती केली. फार मोठ्ठे दिग्गज व्याख्यान देत होते. ते मानसशास्त्राचे बडे व्यक्तिमत्व, माणूस पुरता ओळखणारे, प्रचंड अभ्यास आणि पदव्या देखील, मग काय विचारात. त्यांचं फक्त भाषण नव्हतं तर त्यानंतर मुलाखत पण होती. त्यात एक प्रश्न विचारला गेला तो असा कि "विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कसं मार्गदर्शन करता तुम्ही, म्हणजे सर्वसाधारणपणे काय वाट निवडायची हे समजत नसतं मुलांना वयोमानाप्रमाणे आणि खूप प्रकार उपलब्द असल्यामुळे". त्यावर त्या एक्स्पर्ट च असं म्हणणं पडलं कि त्या विद्यार्थ्यांचा कल काय आहे हे विचारात घेणं फार आवश्यक आहे. त्याला काय करायचं आहे, त्याला कशाची आवड आहे, त्याच्या घरचं वातावरण / पार्श्वभूमी कशी आहे हे दिशा दाखवू शकतं सहज. अगदी मान्य आहे हे, पण मग जर हे इतकं सहज असतं तर सगळंच सोप्प झालं असतं. असो.
माझ्यामते ह्या व्यतिरिक्त जो सल्ला देणारा आहे त्याची पार्श्वभूमी, त्याचा कल, त्याच्या समाधानाची पातळी, स्वभाव, जडणघडण, विचारसरणी ई. वर खूप अवलंबून असतं. विद्यार्थी हि नाण्याची एक बाजू पण सल्लागार हि दुसरी माझ्या दृष्टीने. त्याची योग्य सांगड घालुन मार्गदर्शन होणं आवश्यक आहे.
प्रत्येक पदवी हि महत्वाची आहे, प्रत्येक क्षेत्रात भरपूर काम आहे आणि असंख्य माणसं लागणार आहेतच. हळूहळू नैपुण्य गाठणं आवश्यक आहे, झोकून देऊन अतिशय आनंदाने आणि उत्साहाने शिक्षण, कामं झालं पाहिजे म्हणजे गड सहज सर केला जातो. खाचखळगे येणारच आणि यायलाच हवेत. त्यांना पार करत पुढे जाणं हि देखील एक कला आहेच. त्यामुळे तश्या पद्धतीची जडणघडण होऊ द्या, आज पासून सुरुवात करू यात, अजूनही उशीर झालेला नाही, आणि असेच सल्ले देखील देऊन मार्गदर्शन करा नवीन पिढीला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा