मी किती वेळा मसाल्याचा डबा हाताळला आहे, त्याची गिनतीच विसरले आहे. कितीतरी वर्षे झाली, दिवसातून कमीतकमी तीन वेळा स्वयंपाक करताना; फोडणी देताना, मीठ-मिरची घालून चव निर्माण करताना आणि ती वाढवताना, प्रत्येक पदार्थासाठी कमीतकमी तीनवेळा त्या डब्याचा वापर होतोच.
असे असतानाही आज इतक्या वर्षांनी एक गोष्ट माझ्या 'चार डोळ्यांनी' टिपली, म्हणून हा लेख प्रपंच. आज कदाचित संपूर्ण डबा पुन्हा भरण्याचा योग होता, सगळे संपलेले जिन्नस भरून काढण्याचा आणि त्या रंगबिरंगी दृश्याचा अनुभव घेण्याचा.
सहज हाताळताना, नकळत माझ्या हातून हळद आणि हिंग अत्यंत कमी प्रमाणात भरले गेले, मात्र तिखट आणि मीठ भरपूर गच्च भरले गेले. डब्यात कप्पे एकसारखेच आहेत, पण बघा ना, कामाला लागलेल्या माझ्या हातांना आणि अवयवांना किती नेमके लक्षात आहे की हळद आणि हिंग फक्त फोडणीसाठी लागतात, तेही अगदी किंचित प्रमाणात! म्हणून भरण्यात हा वेगळेपणा आला.
आई म्हणून किंवा आई असलेली शिक्षिका म्हणून, विद्यार्थी घडवताना मी हेच तर करत आले. हवे तेवढेच, लागेल तेव्हाच रिफील करायचे आणि 'रेसिपी'मध्ये (जीवनात) मिसळायचे. उगाचच आहे म्हणून ओतत बसायचे नाही. मग माझ्या लक्षात आले की, फक्त शिक्षकच का, सगळेच तर हेच करतात, प्रत्येक वेळी, कळत-नकळत.
जेव्हा हवे तेव्हा हवे तेच 'शस्त्र' बाहेर काढायचे. (येथे 'शस्त्र' म्हणजे भांडण नव्हे!) 'शस्त्र बाहेर काढणे' म्हणजे योग्य वेळी योग्य मार्ग दाखवणे, उपाय सुचवणे, अशक्य ते शक्य कसे होईल हे सांगणे, किंवा नाण्याची दुसरी बाजू दर्शवणे. हे अनुभवाने येते. काहीही जास्तीचे करावे लागत नाही; यालाच 'अंगवळणी पडणे' म्हणतात. मसाल्याचा डबा पुन्हा भरण्याचा हा छोटासा अनुभव मला खूप काही नव्याने शिकवून गेला, निश्चितच!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा