आमचं छोटंसं चौकोनी कुटुंब. त्यात आम्ही तिघे चारीठाव जेवणारे. पण माझा थोरला भाऊ मात्र फक्त पोळी भक्त. भात तो बघायचा पण नाही. मला लहान असल्यामुळे असेल किंवा मी भात भक्त असल्यामुळे असेल, समजायचंच नाही की हा भात का खात नाही?
त्याचं खरं कारण मग लक्षात आलं.
आम्ही जेवायला बसलो आणि मी भात कालवला. मस्त साग्रसंगीत. भरपूर तूप, मीठ, आमटी वगैरे. की मग तो माझं ताट काढून घ्यायचा. म्हणायचा कसा, तुझ्या सारखा भात कोणीच कालवत नाही. मी म्हणायचे की मी माझा खाते आणि तुला दुसरा कालवून देते. पण नाही. पहिला वहिला कालवलेलाच मस्त असतो म्हणायचा. काय त्यात अप्रूप वाटायचं कोणास ठाऊक. पण भात खायचा तर मी कालवलेलाच. हे जणू एक समीकरणच झालं होतं.
हा सिलसिला बरेच वर्ष सुरू राहिला. आणि मग थोडा काळ पुढील शिक्षण, दोनाचे चार, नवीन ठिकाणी रुळवून घेणं यात गेला. आणि मग काय विचारता, माझ्या पिल्लांनाही माझ्या हातचा भात फार आवडायला लागला. कुणाला खाऊ घालायला आवडणं, हीच एक वेगळी भाषा आहे हे तेव्हा कळलं.
माझे बाबा पार रस्त्यावर उभे असायचे माझी वाट बघत. मी कधी ऑफिसमधून येते ते. हे बहुतांशी रोजचंच. पण ते खरी वाट बघायचे ती शनिवार रविवारची. किंबहुना शुक्रवारची.
मी आले की संध्याकाळी सुरू त्यांचे प्रश्न. उद्या काय करणार? कुठला पदार्थ? सुट्टी आहे तुला? मला फक्त पदार्थाचं नाव सांग. आणि मग सगळं लागणारं साहित्य आणून, धुवून, चिरून, अगदी साग्रसंगीत तयार करून ठेवायचे. आणि म्हणायचे आता कर.
मी काही फार उत्तम शेफ नव्हते. पण ते सर्वोत्तम कौतुक करणारे होते. उत्साह वाढवणारे होते. घरी वैविध्य पदार्थ करून खाऊ घालते माझी लेक याचं त्यांना खूप कौतुक होतं. प्रोत्साहन द्यावं तर त्यांनीच. कधीच नावं ठेवली नाहीत. कधी फटकारलं नाही. ते सगळं गोड मानून घ्यायचे.
आज मी असाच एक खिचडीचा भन्नाट प्रकार करून फस्त केला. कालवताना हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं डोळ्यांसमोर उभं राहिलं.
अशा तुमच्याही काही साध्या पण खास आठवणी असतील, तर नक्की शेअर करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा