जुन्याकाळी घरोघरी बंब हि वस्तू असायचीच. कारण तेव्हा समोर आणि मागे आंगण हि अशी वास्तू रचना होती. आधी तो बंब लाकडाने / कोळश्याने पेटवला जायचा आणि त्याचा धूर होत असे. बंब पेटवणे हि देखील एक कला, त्यातून पाणी काढणे म्हणजे पण एक वेगळी कलाच, तर अशी कलाकारी दररोज सकाळी होत असे. पण काय पाणी तापायचं म्हणून सांगते त्यात, वेगळीच उब होती त्यात, उत्साही वाटावं अशीच अंघोळ होत असे, थोड्याश्या पाण्यात. एका बंबात संपूर्ण कुटुंब सामावत असे, आणि त्यामुळे शिस्त, कारण एका पाठोपाठ एक आंघोळी उरकल्या जायच्याच. अहाहा काय ते दिवस होते. त्या तश्या बंबा नंतर आले इलेक्ट्रिसिटी वर चालणारे हिटर, भले मोठे आणि जाड च्या जाड आवरण असणारे. त्यात देखील एक तर पाणी फार वेळ गरम राहायचं आणि सगळ्यांसाठी पुरेसं देखील. इतकं कि सगळ्यांच्या आंघोळी आटोपल्या कि कपडे भिजवण्यासाठी देखील गरम पाणी शिल्लक राहातं असे. आज हे बंब पुराण का म्हणताय, सांगते, परवा मी माझ्या जिवश्य-कंठश्य मैत्रिणीकडे राहायला गेले होते दोन दिवस आणि बघते तर काय तिच्याकडे अजूनही बंब आहे. वा, इतक्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या ना. कि ज्याचं नाव ते.
तर आपण सगळे देखील असेच राहुयात, आतून जरी तापलेलं पाणी साठवून ठेवायची क्षमता असली तरी देखील बाहेरून गार, जाड आवरण आणि सगळ्यांना पुरेसा साठा. बंब गरम पाण्याचा साठा उपलब्ध करून देतो तुम्ही आठवणींचा द्या, प्रेमाचा द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा