अनेकदा माझ्या लिखाणात आलं आहे आज पर्यंत असंख्य वेळा कि "माझे बाबा म्हणजे एक अक्षरश: विद्यापीठ होते". ते फारच सोप्पे आणि साधे वाक्य / शब्द / क्लुप्त्या ई. सहज सांगून जायचे. त्यातलच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबा नेहेमी सांगायचे कि "घरात शांतता हवी असल्यास एकाच्या विचारानं चालावं, आणि नेहेमीच. विचारलं तरच सल्ला द्यावा". हे वाक्य माझ्यात इतकं भिनलं आहे ना, आधी मला नव्हतं प्रॅक्टिकली नव्हतं जमत पण आता अगदी मनापासून आणि न-कळत जमतंय, शिस्तीत आणि त्याची फळं मला चाखायला मिळताहेत. का आणि कसं झालं हे मला माहित नाही, मला त्यात पडायचं पण नाही, पण जे झालं ते खूप च शांतपणे झालं, आनंदात आणि समाधानाने झालं ह्यात वादच नाही. विश्वास होताच, पण तो प्रत्यक्षात उतरला आणि काम अगदी एकाच्या डोक्याने पट्टाकिनी झालं. ते म्हणतात ना "मोर कूक स्पॉईल द फूड", तस्स काहीस.
माझी बदली झाली होती ५ महिन्यांकरिता. त्याच वेळी राहत्या घराचा विक्रीचा व्यवहार झाला आणि तो होणं अत्यावश्यकच होत मुलाच्या फीची सोय झाली. त्यामुळे आम्हाला आमच्या जुन्या घरात राहायला जाणं आलं. ते अनेक वर्ष भाड्याने देण्यात आलं होत, जुनं झालं होत, त्यामुळे डागडुजी करणं फारच महत्वाचं होत. माझ्या ह्यांनी उचलला विडा आणि लागले कामाला. मी एक गड आणि ते दुसरा सांभाळत सुरु झाली कामं दोन्ही एकदम. संपूर्ण घराचं काम त्यांच्या इच्छे प्रमाणे, त्यांना हवं तस्स, अगदी त्यांच्या आवडीचं सुरु झालं. आणि हो त्यांची आवड सर्वांना माहित आहेच, नाही का?. हो बरोबर ओळखतलं. तर आज आता जवळपास काम संपत आलं आहे. सकाळी हे म्हणतात कसे कि ज्याने आमच्या घरचं काम केलं तो म्हणतो कसा "मॅडम अधेमधे आल्याचं नाहीत, हे जगावेगळं आहे हो, खरं तर हे उलट असतं. मी इतकी वर्ष ह्या व्यवसायात आहे, असं मी कधीच नाही बघितले". अहाहा मला इतका आनंद झाला म्हणून सांगते, मी कधी नव्हे ते पोटभर अगदी आनंदात रमत हासले. अहो आयतं घर मिळतं आहे ह्या पेक्षा अजून काय हवंय मला, जबरदस्तच. माझ्या डोक्याने केलं असतं तरी देखील ते मलाच सांभाळायचं असतं, आता देखील मीच राणी, नाही का? मग... घराला घरपण देण्याचा प्रयन्त अजून मनापासून होणार आता ह्यात काहीच दुमत नाही. पण माझी ढवळाढवळ नसल्यामुळे आणि कटकट कदाचित म्हणता येईल त्यामुळे कामाला वेग आला, कुठलाही गोंधळ न होता. आमच्यातला हा बदल वाखाणण्यासारखा आहे, आमच्यासाठी. अलिप्त राहता आलं, भन्नाट. आवडलं फार मला, त्या डिझाईनर ला देखील.
"कभी कुछ ना कर के भी देखो..." हि अशी कॅडबरी ५-स्टार ची जाहिरात आहे, अगदी त्याचं काटेकोर पालन मी केलं घराच्या पुनः निर्माणाच्या वेळी आणि बहुतांशी त्या नंतर नेहेमीच. गरज असेल तेव्हाच माझी बहुमूल्य ऊर्जा मी खर्चते. कारण माझं असं ठाम मत आहे कि "काहीही न करणं / शांत राहणं / अधेमधे न करणं" देखील खूप महत्वाचं आणि उपयोगी आहे, ती एक फार मोठी मदत आहे. त्यामुळे मंडळी "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" अस्स अजिबातच करू नका कधीच. आपल्यापुरतं बघा, जेथे आवश्यक आहे तेथे मदतीचा हात द्या, अत्यानंदाने जगा आणि परमानंदाची अनुभूती घ्या, सदोदित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा