माझ्या लहानपणी एक बाबांचे स्नेही होते ते प्रत्येक वेळी आमच्या घरी येतांना मला नक्की खाऊ घेऊन येत असतं. तो खाऊ म्हणजे पर्वणीच असायची. एका छोटेखानी पुडीत कित्ती प्रकार सामावून आणायचे ते, आणि ते देखील फक्त माझ्याच साठी, कारण त्यावेळी आमच्या घरी मी एकटीच शेंडेफळ होती. त्यावेळी फक्त ती एक गम्मत होती कारण त्या पल्याड काहीही समजायचं नाही.
इतक्या वर्षांनंतर काल पुन्हा मला खाऊ मिळाला, माझ्या माहेरहून पाठवलेला, उत्कृष्ट देखण्या पद्धतीने अगदी मनापासून घरी तय्यार करून, पॅक करून प्रेमाने पाठवलेला. कित्ती विविधता होती / आहे त्यात, गोड, किंचित आंबट, मस्त झणझणीत तिखट आणि बरेच काही. माझी सहपाठी, संशोधन करणारी, विद्यावाचस्पती च्या मार्गावर अग्रगणी अशी अप्रतिम काम करणारी श्रद्धा, तिच्या आईने माझ्यासाठी खास, आठवणीने पाठवलेला हा खाऊ. अगदी माझी पसंद लक्षात ठेऊन पाठवला. काकूंच्या मागे प्रचंड गोतावळा आहे आधीच, काकांच्या ऑफिस च्या वेळा, मुली, जावई, त्यांचा प्रचंड मोठा आणि उत्साही मैत्रिणीचा समूह, त्यांचे लाड, भरपूर येणार-जाणारा, नातेवाईक आणि बरेच असे. ह्यात माझी आवड लक्षात ठेऊन घरचा खाऊ आठवणीने पाठवणे म्हणजे एक फार फार मोठी गोष्ट आहे, शब्दांच्या पलिकडली अशी.
सध्याच्या काळात प्रत्येकाला त्याचंच झालंय पुरे अशी परिस्थिती आहे सर्वत्र. आपलीच कामे आटपत नाहीत त्यामुळे दुसऱ्यांसाठी काहीच करणं शक्य नाही, बऱ्याचदा इच्छा असून देखील. आपलेच व्याप भरपूर पुरतात दिवसभर. त्यात काकूंसारखा मस्त उत्साहाने खळखळणारा झरा खूप काही शिकवून जातो.
माझ्या मुलांच्या वेळी तब्बल ९ महिने + पुढचे ४ महिने मला माझ्या सर्व मित्र-मैत्रिणी-आप्तेष्ट-शेजारी ह्यांनी अगदी पौष्टिक घराचा पोटभर आहार खाऊ घातला. खूप विविधता होती त्या संपूर्ण काळात आणि प्रचंड प्रेम झळकत होतं ते वेगळंच. त्यावेळी मी माझ्या आईला विचारलं होतं कि ह्या सर्वांची परतफेड कशी करायची? त्यात प्रत्येक जण काही बाळंतीण होणार नव्हतं, मग कधी, कसे, काय मी त्यांच्या साठी करू? तेव्हा तिने दिलेले उत्तर आज पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवले मला. परतफेड तर व्हायलाच हवी, पण त्यासाठी बाळंतीण होणे गरजेचे नाही, किंवा त्याच व्यक्तीला काही ताबडतोब देणे शक्य नसेल तर कुठल्यातरी प्रमाणात कोणाला तरी, कुठल्यातरी स्वरूपात ते देणं अत्यावश्यक आहे. सातत्य ठेव, काही तरी नेहेमी करत रहा. आणि आता काकूंनी पण तेच प्रात्यक्षिक करून दाखवलं. आणि हे पहिल्यांदा नाही करत आहेत बरं का, हे ह्या आधी पण त्यांनी केलंय, अगदी गरमागरम पदार्थ पोटभर खाऊ घालण्यापासून.
गिफ्ट / भेट म्हणजे काय हे माझी आई खूप सुंदर समजावून सांगायची मला. त्या व्यक्तीला काय आवडेल, काय दिल्याने आनंद मिळेल, कुठली भेट उपयोगी ठरेल ई. आणि ती व्यक्ती विचारात ठेवणे ह्या सगळ्या प्रोसेस लाच खरी भेट म्हणतात. त्या नंतर घेतलेली वस्तू म्हणजे फक्त एक जिन्नस.
आमच्या नागपूरचं पाणी काही वेगळंच आहे ह्यात शंकाच नाही.
काल पासून त्यांच्या हातचे खाऊन खूपच तृप्त झालंय आणि अशीच पर्वणी पुढचे अनेक दिवस मला अनुभवायला मिळणार आहे.
लहानपणीचा खाऊ फक्त काही मिनिटे पुरायचा मला, पण हा खूप दिवस आणि आत्ता जाऊन कुठे मला खाऊचं महत्व प्रकर्षाने जाणवलं. असं कोणासाठी करण्यात काय परमानंद मिळतो ह्याची जाणीव झाली.
काकूंच्या हातून असेच असंख्य जणांना पोटभर खाऊ घालणं घडावं, त्यांना पण त्यांच्या आवडीचं आणि चव बदल म्हणून मस्त चाखता यावं आणि माझ्या हातून पण असं कार्य घडो हि सदीच्छा. खूप मनापासून धन्यवाद काकूंना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा