मला समजायला लागल्यापासून मी माझ्या आईचा एक नित्यक्रम बघितला आणि अनुभवाला आहे. नित्यनियमाने ती सगळी स्तोत्र दोनदा तरी म्हणायची. सुट्टीच्या दिवशी दोन्ही वेळा कानावर पडायची. आणि दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळा निश्चितच. बाकी सगळी स्तोत्र छोटेखानी अशी होती पण श्री. विष्णू सहस्त्रनाम हे मात्र मोठं आणि किंचित अवघड. इतकी वर्ष सातत्याने कानावर पडल्यामुळे आत्मसात झालं, कधी ते आपोआप तोंडपाठ झालं हे कळलं देखील नाही. इतकं मोठं प्रात्यक्षिक माझ्या समोर होत होतं बरीच वर्ष.
त्या नंतर मी वसतिगृहात राहत होते पण तरी देखील तोंडपाठ असल्यामुळे सहज श्री. विष्णू सहस्त्रनाम म्हटलं जायचं.
अमेरिकेत देखील एक श्री. सत्यसाई बाबांची भक्त माझी मैत्रीण, ती देखील दर गुरुवारी श्री. विष्णू सहस्त्रनाम पठण ठेवायची तिच्या घरी, मी आवर्जून जायचे म्हणायला.
पुण्याला आल्यावर अधेमधे आणि ४-५ श्रावण शुक्रवारी म्हटलं जायचं माझ्या घरी सामूहिकरीत्या श्री. विष्णू सहस्त्रनाम.
त्या नंतर अचानक एका सोशल मिडिया संघाचा मी भाग झाले, आणि दर एकादशीला श्री. विष्णू सहस्त्रनामचं पठण सुरु झालं, कोणाच्या तरी कोणाच्या घरी, नाहीतर मध्यंतरी ऑनलाईन माध्यमातून.
परवाच अचानक एक व्हिडिओ आला माझ्या पुढ्यात नकळत. त्यात एका सुवर्णपदक विजेत्या अभियंत्याने संशोधन करून प्राचीन ग्रंथात नमूद केलेले अनेक संदर्भ दिले श्री. विष्णू सहस्त्रनाम ह्या स्तोत्राबद्दल आणि त्याचा प्रकृती स्वास्थ्याशी असलेल्या निगडीत संबंध दर्शवण्यासाठी. हजारो वर्षांपासून वैद्य श्री. विष्णू सहस्त्रनाम हे प्रिस्क्रिप्शन / महत्वाची औषध योजना म्हणून लिहून देत होते म्हणे. असंख्य संदर्भ त्यांनी वाचून दाखवले, समजावून सांगितले आणि वैविध्य घडलेले प्रसंग, आलेले अनुभव कथन केले. खुपश्या प्रकृतीच्या तक्रारींच निवारण करण्याची प्रचंड ताकद ह्या स्तोत्रात आहे, अगदी रामबाण ईलाज जसा.
बघा म्हणजे "त्याने" मला अनेक वर्ष प्रात्यक्षिक करून दाखवलं, सामूहिक पठण करण्यासाठी वेगवेगळे संघ निर्माण करून दिले ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने, ऑडिओ ऐकवला आणि सरते शेवटी संशोधन आणि व्हिडिओ करण्याची सद्बुद्धी दिली, केवळ माझ्यासाठी, मला आठवण करून देण्यासाठी. "काखेत कळसा आणि गावाला वळसा" अशी गत झाली माझी. मी "पिलर्स तो पोल्स" सारखी ह्या वैद्यकिय तज्ज्ञाकडून त्या माहीर डॉक्टर कडे ४ वर्ष सलग पळते आहे, फेऱ्या मारते आहे, भरमसाठ औषधं घेते आहे, पथ्य पाळते आहे, व्यायाम करते आहे आणि अर्थात ह्या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे गूण येतोय पण बरं होणं किंवा पूर्णपणे बाहेर पडणं / नेहेमी करता ठणठणीत वाटणं होतं नाही आहे अजून. अजून कित्ती "टेकनो स्याव्ही" व्हावं "त्याने" केवळ माझ्यासाठी. माझ्यासाठी कित्ती प्रकारे माझ्या पुढ्यात उभं केलं सोल्युशन / तरणोपाय / रामबाण ईलाज. आणि मी मात्र वेडी, मला ते कधीच ध्यानात आलं नाहीच. खूप उशिरा प्रकाश पडला. इतकी करोडो "त्याची" लेकरं जगभर पण माझ्या कडचं लक्ष त्याने ढळू दिलं नाहीच. सातत्याने, ह्या ना त्या मार्फत मला खुणावत राहिला, पण सोडून दिलं नाही मला. "भिऊ नको मी तुझ्या पाठिशी आहे" अगदी असेच. आता ह्यापुढे आधुनिक उपचाराला जोड म्हणून, उगाच सैरभैर न होता हाच आता रामबाण ईलाज म्हणून त्यानेच माझ्या कडून हे दररोज म्हणून घ्यावं हि विनंती. आता तरी मी खात्री पल्याड गेले आहे कि मी अजून ठणठणीत होणारचं. "तो" पाठिशी असतांना काय अशक्य आहे? बघा म्हणजे माझ्यासाठी "त्याला" आधुनिक तंत्रज्ञान शिकावं लागलं, वापरावं लागलं, लोकांना सद्बुद्धी देऊन सहभागी करून घ्यावं लागलं आणि माझ्या पुढ्यात मांडावं लागलं. मी तर अक्षरशः निःशब्द झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा