अगदी न कळत्या वयापासून मी माझ्या आईला प्रत्येकाला पोटभर खाऊ घालतांना बघितलं आहे, मग ते घरी येणारे पाहुणे असो, मित्र मॆत्रिणी, नाहीतर रोजच्या मावशी. मला देखील मग तशीच सवय लागली. जमेल तेव्हा जमेल तसं मी पण फुल-ना-फुलाची पाकळी खिलवू लागले. "वर्क इज वर्शीप" / "काम हीच पूजा" ह्या प्रमाणे चाकरमाने ८-१० तास दररोज घराबाहेर असतात. त्यात माझी कचेरी हि गावाबाहेर. त्यामुळे आणि ह्या म्हणीच्या संदर्भातून मी कचेरीत बोलावलेले पाहुणे देखील कधी विन्मुख गेले नाही, काही तरी खाऊनच गेले नेहेमी. शिवाय मला माझ्या PhD च्या गुरूंनी नेहेमी खाऊ-पियू घालून खूप काळजी घेतली मग मी पण मागे राहते काय. माझ्या फड च्या तरुण विद्यार्थ्यांसोबत मी मस्त मेस मध्ये जाऊन भरपेट / यथेच्छ खाऊन येत असे, अनेक वेळा. आमच्या मीटिंग तेथेच होतं बऱ्याचदा.
मग माझे पाय सूचित करते झाले कि आता जरा हळु मार्गक्रमणा करावी. पण त्यावेळी देखील पाहुणे येणं, PhD मीटिंग ई. सुरु होतंच. मी त्यातून सुवर्णमध्य काढले. एक म्हणजे मी कोणाला दुसऱ्याला पाहुण्यांसोबत जेवण करायला विनंती करत असे. नाहीतर दुसरं म्हणजे जर पाहुणे मस्त ओळखीचे असतील, काही मानणारे नसतील तर उत्तम बेत आधीच आखून घरून अप्रतिम चविष्ट असे त्यांच्यासाठी पण डब्ब्यात घेऊन जात असे. ताटल्या, वाट्या, चमचे ई. सगळे साग्रसंगीत. कधीतरी आणि आधी माहित असल्यावर सहज शक्य होतं ते मला. माझ्या पायाने जाऊन मेस मध्ये खाण्यापेक्षा खूपच चांगला पर्याय.
मी आताशा अनेक संस्थांमध्ये विविध विषयांवर बोलायला जाते आहे. काही ठिकाणी माझ्या PhD च्या विद्यार्थिनी असल्यामुळे त्यांना ठाऊक आहे माझी सवय. त्या मस्त डब्बा घरून घेऊन येतात माझ्या करता. पण इतर ठिकाणी माहिती असून आणत नाहीत, जेवायची वेळ असतांना सुद्धा, हक्काने खाऊ घालणं ते देखील ओळखीच्या मैत्रिणीला हि साधी माणुसकी झाली, नाही का? असो. मी नेहेमीच माझी सोय करून जाते म्हणून वाईट वाटत नाहीच. हसू येतं. माझा दृष्टिकोन असा झाला आहे हे कदाचित मला बदलावं लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा