काही दिवसांपासून मी एक जाहिरात बघते आहे आणि तिच्या प्रेमात पडले आहे. प्रेमात ह्याच्या साठी कि त्यात एक फारच गोड, अतिशय हुशार आणि उत्सुक, चौकस, जिज्ञासू असा मुलगा दाखवला आहे. त्याचे कुरळे केस, चेहेऱ्यावरचे भाव प्रचंड भुरळ पडणारे आहेत. ती जाहिरात फारच मोठा संदेश देऊन जाते, अर्थात माझ्यासाठी, ह्या सगळ्या कारणांमुळे मी तिच्या आणि ज्याने अशी जाहिरात करावी ह्याबद्दल विचार केला त्यांच्या देखील प्रेमात पडले आहे.
आई डेटॉल चा सर्वत्र वापर करत असते, उपयोगात आणत असते, त्या जाहिराती मध्ये आणि हा पठ्या तिच्या मागे मागे, सतत एक प्रश्न विचारात असतो. "असं डेटॉल सगळीकडे लावल्याने काय होतं?" आणि आई सांगते "काहीच नाही". तो पुन्हा विचारतो आणि आई पुन्हा तेच सांगते. सरते शेवटी आई म्हणते कशी डेटॉल लावल्याने कधीच कोणाला काही होतं नाही, कुटुंबातले सगळे सुरक्षित राहतात, किटाणू निघून जातात ई. आणि मग त्या पठ्ठ्याच्या डोळ्यातील चमक वाखाणण्यासारखी आहे. इतक्या लहान वयात इतकं अप्रतिम काम. क्या बात है?
अजून एक कारण:
मी अगदी न कळत्या वयापासून एक निरीक्षण केलं आहे माझ्या घरी कि आई प्रत्येक तय्यार केलेला पदार्थ देवासमोर आधी ठेवायची आणि मग सर्वांना खायला द्यायची, अगदी न्याहारी सुद्धा. त्यावेळी कधीच विचारलं नाही पण माझ्या हातून पण ते घडत गेलं आपोआप. माझ्या मुलांनी आणि एका सोशल मीडिया वर आलेल्या लेखात विचारलं होतं कि "हे केल्याने काय होतं?" आणि त्यावर अर्थात उत्तर होतं कि "काहीच नाही". देव कुठे खाणार हो फोटो आणि मूर्तीतून बाहेर येऊन. पण त्यामुळे अर्पण करण्याची भावना येते, "तो" सर्वश्रेष्ठ पहिल्यांदा आणि मग सगळे, ज्याने दिलं त्याला आधी समर्पण, सर्व मोठ्यांना आधी देण्याची, त्यांचा मान राखण्याची सवय होते, नतमस्तक व्हायला होते, हात जोडले जातात, त्याच्या समोर काही सेकंद उभे राहिले जाते, त्याचा आशीर्वाद मिळतो सातत्याने, ह्या सगळ्यांमुळे मग स्वस्थता, स्तभता, शांतात लाभते. ह्या सगळ्यांमुळे मग कोणाला काहीच होतं नाही. हो कि नाही. असं आहे त्या मागचं गमक.
माझी माउली तर नवीन आणलेला प्रत्येक घटक "त्याच्या" समोर ठेवायचीच, मग ते कपडे असोत, फळं, बक्षिसं आणि औषधे सुद्धा. त्यामुळे ह्या सगळ्या संस्काराबद्दल फक्त एवढंच म्हणू शकते "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण".
https://www.youtube.com/watch?v=eKCA5cYx7EM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा