मी माझे स्नातकोत्तर शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहात राहत होते. एका मुक्त विद्यापीठात नोकरी पण करत होते. त्या वेळी माझ्या मनगटावर एक साधे दिसणारे पण योग्य वेळ दाखवणारे घड्याळ होते. तेवढ्यातच माझे लग्न ठरले आणि माझे ते जुन्या पद्धतीचे योग्य वेळ दाखवणारे घड्याळ बदलले गेले. आम्ही दोघे नवीन घड्याळ खरेदी करण्यासाठी एका नामवंत दुकानात गेलो. बरीचशी घड्याळे बघितल्यावर एक पसंद केले. तिथल्या नेहेमीच्या पद्धती प्रमाणे मी घड्याळ घालून बघते तर काय बरेच मोठे होते ते, म्हणजे जवळपास ४ कड्या काढाव्या लागल्या व्यवस्थित मनगटावर विराजमान होण्यासाठी. तेव्हा ते दुकानातले काका म्हणतात कसे, "ह्या कड्या सांभाळून ठेवा. पुढे कामात येतील. लग्न झाल्यावर वजन वाढते.... ई. ". का कुणास ठाऊक पण घड्याळ्याचे पट्टे वाढत्या अंगाचे तय्यार करतात. अर्थात मी माझ्या वेळेचा हा किस्सा सांगते आहे जेव्हा दहावीत परीक्षेत वेळ कळवा म्हणून आधी आईचे घड्याळ मिळायचे घालायला, जुने. मग काही वर्षांनी आपले नवीन, अशी पद्धत होती, अलिखित नियम देखील होता.
परवा मला एक साधे घड्याळ बक्षीस म्हणून मिळाले. प्रेमाने दिले आहे मला. खूप दिवस झाले म्हटलं आज घालावे, म्हणून उघडले तर काय, ते देखील ह्या जमान्यात वाढत्या अंगाचेच निघाले. आता मला त्याच्या कड्या काढून आणाव्या लागतील नाहीतर ते गळून पडेल, समजणार पण नाही.
अजूनही मनगटाने त्याचा आकार सांभाळा आहे तब्बल २५ वर्षांनी ह्याची कमाल वाटली. मज्जा आली. काही घड्याळ्यांचे डिझाईन वेगळे केले आहे ज्यात कड्या तश्याच राहतात आणि हूकने मागे पुढे करून कोणत्याही मनगटाची शोभा वाढवता येते. प्रगती आहेच. काही सांगता येत नाही काही वर्षांनी आपोआप जुळवून घेणारे पट्टे देखील निघतील. पण माझी पहिली ह्या पट्ट्याची आठवण तरी देखील ताजी तवानी राहिलाच ह्याची खात्री आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा