माझी एक सख्खी मैत्रीण मला तिच्या नवीन सखी बद्दल सांगत होती. अगदी आदराने बरं का मंडळी. अगदी कोणताही किंतु परंतु न ठेवता, न बाळगता किंवा कुठलीही तुलना ना करता.
तर तिच्या हाती लग्नाच्या जवळपास ३ दशकानंतर एक नवीन गोष्ट विराजमान झाली. अर्थात सर्वांनीच त्या बद्दल विचारले. मला सांगतांना म्हणाली कि हि एक बांगडी माझ्या आज्जे सासूबाईंची आहे. माझ्या वाट्याला आली. आदरपूर्वक ती फार साधी दिसले सर्वांना, अगदी गोल होती म्हणून बांगडी आणि तिची जाडी एक केसा एवढीच होती. फार फार कमी वजनाची, किंबहुना मोरपीस जास्त वजनाचे असेल अशी.
ह्या माझ्या मैत्रिणीला आम्ही सर्वांनीच फार फार जवळून बघितले आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती आहे. आणि त्या काळी बहुतांशी सर्वत्रच एकसारखे वातावरण होते. स्त्री घर सांभाळायची आणि पुरुष बाहेर कामाला जायचे. स्त्रीला मान सन्मान होता. त्या पै न पै गोळा करून अंगभर सोने, दागिने ई. परिधान करत होत्या. त्या वेळी भरपूर सुरक्षा होती, स्त्रिया घरीच असायच्या आणि बरकत होती, जरी कमाई सगळ्यांचीच नगण्य होती. पण माझ्या मैत्रिणीच्या माहेरी तिच्या आजीच्या पाटल्या, बांगड्या, इतर दागिने, चांदीची ताटे, वाट्या आणि इतर खूप काही होते. सगळीकडे जर परिस्थिती सारखीच होती मग इतकी तफावत का? हा मला पडलेला प्रश्न. म्हणजे एकीकडची आजी त्याच वयाची ६-८ वजनदार बांगड्या मिरवते आणि दुसरीकडे जेमतेम सोन असलेली फक्त एक बांगडी? माझ्या मते हा फरक ताळतंत्र सांभाळण्याचा आहे, दूरदृष्टीचा आहे, भन्नाट नियोजनाचा आहे आणि अर्थातच आवड. त्या स्त्रीला ह्या सगळ्यांची पुढील पिढ्यांकरताची गरज, किंवा साठवणूक ह्याची असलेली जाण, तिच्या विचारांना मिळालेला सन्मान, आदरपूर्वक वागणूक आणि शांतता, दृश्य समृद्धी आणि असेच बरेच कंगोरे. कुटुंबातल्या स्त्रीला सन्मान दिला, मुभा आणि मोकळीक दिली कि जमीन आस्मानचा फरक पडतो. हे इथे दागिने किंवा पैसे ह्या बद्दल बोलणं नाहीच, पण एक भरभराट पण अत्यंत महत्वाची असते आणि मग ती पिढ्यानपिढ्या आशिर्वादात्मक रित्या सुरु राहते. अविचारी माणसे असली कि काहीच साध्य होत नाही हे ह्या साध्या एका उदाहरणावरून सिद्ध होते. त्यामुळे मस्त राहा, सन्मान द्या आणि घ्या, तदनंतर भरभराटीचा विजय हा नक्कीच होणार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा