आधी आम्ही ब्राह्मणी स्वयंपाक करत होतो घरी, पूर्ण थाळी, डावी उजवी बाजू, मधली जागा आणि सगळेच साग्रसंगीत. त्या नंतर चौघांच्या आवडी निवडी वेगळ्या, बदलल्या, डाएट डोकवायला लागलं मधेच, काहीच कारण नसतांना. गूगल बाबानी डोकं काढलं, लेख लिहिले गेले, व्हिडिओ तय्यार झाले, ज्यांना जे अनुभव आले ते त्यांनी सांगितलं. पण तो जगाचा शेवट नाही ना, फक्त सुरवात आहे किंवा एक भाग आहे किंवा फक्त एक छोटासा अनुभव आहे. तो व्यक्ती जो हे लिहितो आहे किंवा रेकॉर्ड करतो आहे त्याची पार्श्वभूमी पण ठाऊक नाही तरी आपण सगळं म्हणजे अगदीच सगळं नाही पण कधी हे तर कधी ते करण्याचा प्रयन्त करतो, अथक असा. आता ह्या बदलांमधे आधी भात पानातून नाहीसा होतो, मग तेलाची बारी येते, कोशिंबिरींच्या ऐवजी साधी काकडी पानात लवंडते, दाट लस्सीची जागा पातळ ताक घेते, फोडण्या, शेंगदाणे, गोड, पोळी ह्यावर गदा येते. आमटी आवडली तर अर्ध्या - एक वाटीवर पिण्यास बंधने घातली जातात आणि असे इतर अनेक. अर्थात पोळीच्या ऐवजी भाकरी, जी कि फारच पौष्टिक आहे, शारीरिक स्वास्थ्याला उपयोगी आहे, पण तरी देखील होत आहेत हे बदल.
तर आताशा माझ्या घरच्या कुकरमधे फक्त डाळ शिजवली जाते. आलू पराठा पण बॅक सीट वर गेला ना, त्यामुळे वरण एके वरण, बदल म्हणजे ह्या च्या ऐवजी ती डाळ, इतकाच. आणि हो भातच नाही त्यामुळे खिचडी पण नाहीच कि. पण आज आम्ही ठरवलंच आणि बेत किंचित बदलला. आज खिचडी रस्सम असे करायचे ठरवले. दोघींना कामं होतं त्यामुळे खिचडी डायरेक्ट शिजवत बसणं शक्य नव्हतं. म्हणून मग कुकर जिंदाबाद. त्याला काय आनंद झाला म्हणून सांगते, अत्यानंदाने अगदी पटापटा शिट्ट्या मारल्या अगदी वेगळ्या ढंगातल्या होत्या त्या. आणि खरंच आज जरा शॉर्टकटच मारला होता मी. नाहीतर साग्रसंगीत खिचडी करते ना, वेळ असला कि तेव्हा मस्त पैकी डाळ तांदूळ धुवून तुपावर भाजून घेते. पण आज म्हटलं छे. झट कि पट वाली खिचडी करूया. आणि केवळ कुकर साहेब सामग्री बदलल्यामुळे खुश होते त्यामुळे त्या खिचडीची रंगत फारच वाढली कि. तो पण बिचारा कंटाळा फक्त दाली शिजवून हो इतके दिवस. पण काय बोलणार ना? त्यामुळे गप्प गुमान कधी व्यवस्थित शिजव तर कधी अर्धवट असं काहीस चालू होते त्याचे चाळे. डाळ आणि खिचडी दोघी स्त्रीलिंगी, खिचडीत पण डाळच पण दोघींमधला फरक जाणवला पठ्याला, हुशार आहे. दिसत नाही अजिबात पण छुपा रुस्तम निघाला.
त्यामुळे आज मला समजलं आहे कि आपल्या पोटाला, प्रकृतीला आणि कुकरला खुश ठेवणे अत्यंत महत्वाचे आणि त्या करता अधेमधे विविध जिन्नस ठेवायचे कुकरमधे, म्हणजे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा