सगळ्या निवृत्या एकसाथ येतात नाही?, आणि तय्यारी असते आपली असं वाटतं पण प्रत्यक्षात अनुभव वेगळा असू शकतो. होणारे बदल आणि अपेक्षा किंवा माहिती ह्यात तफावत जाणवायला लागते. अनेक बदल एका वेळी घडायला लागतात एका पाठोपाठ एक. आधी आलेख चढता असतो अनेक वर्ष सातत्याने आणि मग स्थिरता अधिक उतरता आलेख तय्यार होत जातो. वय वाढतं, सगळ्या निवृत्या येतात, रिकामपण पण जाणवतं कारण घरची ह्या ना त्या ठिकाणी पसरलेली असतात, अवलंबुन राहणे संपते आणि नकळत आपण दुसऱ्यांकडून खूप जास्त अपेक्षा करायला लागतो आणि निवृत्तीच्या आव्हानात मग भर पडते, एकातून नाही तर अनेक प्रश्नातून बाहेर पडावे लागते. "कळत पण वळत नाही" हेच होतं खरं.
कोणकोणत्या निवृत्तीतून स्वतःला तय्यार आणि उभं करायचं, पगार थांबतो, अर्थात गंगाजळी असते पाठीशी पण त्यासोबत "पुरेल कि नाही?" हा यक्षप्रश्न उभा करूनच. शारीरिक बदल मोठ्या प्रमाणात होत असतात आणि ते सांभाळणे बऱ्याचदा वेगळी आव्हाने निर्माण करून. अर्थात सध्याची पिढी निवृत्तीचे आयोजन जरी आधीपासून करायला सुरवात करते पण तरी देखील भर जास्त पैश्याकडे असतो आणि किंचित असा "पुढे काय?" ह्या कडे. पूर्णवेळ धावपळ ते अर्धवेळ किंवा कधी कधी पळापळ येथे येऊन गाडी थबकते.
सर्वात महत्वाचे म्हणजे कुठल्याच संस्थेत ह्या बद्दलची माहिती पुरवली जात नाही, कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही, कोणीपण तय्यारी करून घेत नाहीच, कुठल्याच अभ्यासक्रमांत नाही कि निवृत्ती म्हणजे काय, कधी येणार, तेव्हा काय करायचे? ई. कदाचित त्यांना वाटत असणार कि आत्ताच कशाला त्या बद्दल बोलायचे, काय समजणार ह्या पिटुकल्या मुलांना? आणि गरज आहे का? येईल ते दिवस तेव्हा माणसे प्रगल्भ झालेली असणार ती घेतील सांभाळून. पण छे हो, असं घडतंच असे नाही ना प्रत्यक्षात.
हा, पण सॉफ्टवेअर सिस्टीम च्या संदर्भात मात्र अभ्यासक्रमातच शिकवतात कि सॉफ्टवेअर रिटायर पण होते, तेव्हा काय करायचे, कधी साधारण तो फेज येणार, आणि असे बरेच काही. म्हणजे बघा ना अदृश्य पण उपयोगी सिस्टीम बद्दल जागरूकता आहे पण दृश्य नाही. काय हे? मूलतः अभ्यासक्रमात किंवा बाकी अजून विविध पातळीवर बदल घडणे अत्यावश्यक आहेत निवृत्ती नियमांच्या बाबतीत, तय्यारी साठी ई.
सर्वतोपरी नियोजन करा एक तर नाही तर सोप्पा मार्ग म्हणजे "उगवलेला दिवस माझा", "एक दिवस हातात घ्या" आणि मार्गक्रमण करा बिनधास्त, अतिविचार सोडून बरं का मंडळी. आणि मग बघाच सगळ्या प्रकारच्या उभ्या थकलेल्या निवृत्या कश्या निवृत्त होतात, गायब होतात आणि एक सुंदर विश्व, तुमचे स्वतःचे असे, वेगळे असे... कसे निर्माण करतात ते, जे खूप उत्सहाने भरपूर असे, ठणठणीत प्रकृती ठेवणारे असे निश्चित असणारच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा