माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढीला एक ठराविक पद्धतीची, वेगळी वागणारी अशी सासू माहिती होती. आणि त्यावेळी सासू म्हणजे खाष्ट असायच्या, खूप म्हणजे खूप कडक, सर्वार्थाने. बाकी सगळे लोक ठिक असायचे. सासू संपूर्ण आयुष्य तशीच ठसक्यात राहणार अशी. अर्थात सगळीचकडे आउट्लायर्स असतातच, मस्त आणि वेगळी माणसं असतात. पण बहुतांशी असंच बघायला मिळायचं.
काही प्रत्यक्ष अनुभव बघितले, वाचले, ऐकले आणि थक्क झाले, म्हणून हा पंक्ती प्रपंच. वर थोडक्यात नमूद केल्याप्रमाणे आधीच घरी वेगळ्या पद्धतीची सासू, त्यात जर सासूच्या वरचढ जर नवरा मिळाला तर? सासू तरी कधीतरी काही तरी बोलणारी, पण उठता बसता, प्रत्येक श्वासाला चुका काढायला कोणी सुरवात केली तर? आणि ते देखील आपल्या सगळ्यात जवळच्या माणसाने, हो नीट वाचा, माणसाने, ज्याला हे शोभा देखील देत नाही, मग त्या मुलीने / सुनेने कुठे जायचं?काय करायचं? ऐकून घेण्या पलिकडे काहीही पर्याय नाहीच? काय म्हणायचं जेव्हा दोन वेगळ्या वयाच्या, दोन वेगळ्या गणाच्या सासवा एकाच घरी मिळाल्या कि? किती आणि काय काय सोडून द्यायचं? जगायचं कसं?
अर्थात हे सगळे अनुभव मी फक्त ऐकले आणि वाचले आहेत, तेव्हाच एवढं मला वाईट वाटतंय, त्रास होतोय, जी प्रत्यक्षात ह्या सगळ्या दिव्यातून जात असेल तिचं काय होत असेल? तिच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक स्वास्थ्याचं काय? ती कशी सगळं सांभाळत असणार? किती हा अपमान आणि त्रास? इतकं सारखं बोलून कंटाळा येत नसेल त्या सासवांना?
सर्व सुनांना साष्टांग नमन ज्या दुहेरी सासुरवास सहन करत आहेत गेली अनेक वर्ष. त्यांना सर्वार्थाने ताकद मिळो आणि त्या स्वस्थ राहोत हि मनःपूर्वक प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा