माझे वडिल नेहेमी म्हणायचे कि झाडासारखं व्हा, देत राहा, कार्यरत राहा आणि फळाच्या / अभिप्रायाची / शाबासकीची वाट न बघता पुढे चालत राहा, मार्गक्रमण करत राहा. मी अनेक वर्ष चारचाकी चालवते आहे, त्यातून चक्कर मारते आहे, अनेक कॅब्स मधून प्रवास केला आहे आणि घरी सुद्धा हे अनुभवलं आहे ते म्हणजे अनेकदा एखादी माशी गाडीत, किंवा खोलीत अडकते. मग ती बाहेर पाडण्यासाठी धडपडते, आवाज करते. इतकास जीव तो पण आपल्यासारख्या माणसाला तिचा आवाज नकोसा करून टाकतो. मग आपण शर्थीचे प्रयत्न करून तिला मोकळे करतो. ती कुठून आत येते आणि का येते हे अजूनही माझ्यासाठी गूढच आहे बरं का मंडळी. आज मला इतक्या वर्षांनंतर एक प्रश्न पडला कि ती बाहेर पडते घराच्या किंवा गाडीच्या तेव्हा कुठे जाते? तिच्या कुटुंबियांना किंवा आप्तेष्टांना कशी गाठते किंवा ओळखते? कारण हे सर्वांनी अनुभवलं असेलच अनेकदा कि एका पिटुकल्या माशीला चालत्या गाडीतून बाहेर काढणं म्हणजे एक लढाई असते सर्वांसाठीच, आणि नेहेमीच. ती गाडी खूप दूर कुठेतरी गेल्यावर मग जर तिला मार्ग मोकळा मिळाला तर ती बाहेर पडते आणि मग उडत कुठे जात असेल बरे? तिला नेहेमीच तिचा मूळ ठावठिकाणा मिळतं असेल का? कि ती मग मिळतील त्या माश्यांशी दोस्ती करते का एकटीच राहते?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न मग मी सुरु केला. ते थोडसं सोप्प होतं माझ्यासाठी कारण मी ह्या आधी "जैव-प्रेरित अल्गोरिदम" ह्या वर काम केले आहे. मी अजूनही वाचतेच आहे, समजावून घेते आहे पण एक ठळक बाब लक्षात आली कि ती इतकीशी पण कधीच थांबत नाही कि "अरे आता मी काय करू? कुठे जाऊ? माझे सगळे लोक कुठे असतील? हि मी कुठे आली अचानक?" ई. हे सगळं मागे सोडून ती नवीन मित्र शोधते, नवीन दोस्ती करण्यावर भर देते, ती तिचे / तिला बहाल झालेले सगळे वापरून नव्याने सुरवात करते प्रत्येक वेळी. मग आपण धडधाकट माणसे हे का नाही करू शकत? आपण का थांबतो? का दुसऱ्यांनीच हे करावं ह्या साठी वाट बघतो, अपशब्द वापरतो, दोष देतो? ह्या छोट्या जिवाकडून कित्ती शिकण्यासारखे आहे. सर्वांनी ते आत्मसात करणे अत्यावश्यक आहे असं माझं मत आहे. प्रयोग म्हणून एकदा करून बघा कशी मज्जा येते ते. असं म्हणतात ना "sky is all yours, fly high".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा