आता भरपूर बदल घडत आहेत, नजरेस पडत आहेत. पण आधी तसे नव्हतेच मुळी. मुलींच्या अर्थात सुनेच्या हातून चूक घडताच कामा नये असा दंडक होता. सून जी मुलगी म्हणून घरी आणली जाते पहिल्या दिवशी फक्त, मग जेव्हा ती आई होते आणि कुठल्याही रोल मधे तिच्या चुकीला माफी नाहीच. चूक न करता सुद्धा जिला सातत्याने ऐकावेच लागते कारण एकदा आई वडिल मुलाचे सासू सासरे झाले कि आरडा ओरडी ठरलेलाच आणि त्यांच्या सातत्याला दाद द्यावी तेवढी थोडीच. अर्थात काही घरात हे होत नाही पण त्याचे प्रमाण नगण्यच आहे. सर्वत्र हेच वारं वाहतांना दिसायचं.
मग अनेक पर्याय निघत गेले हळूहळू. काही सासू सासरे कधी कधी बदलेले आढळले, तर कुठे मुली थोड्याश्या कवचातून बाहेर पडल्या आणि बोलतांना दिसल्या. समाजात किंचित बदल झाले, बाहेर खाणे सुरु झाले आणि रेडी-मिक्स बाजारात आले. ह्या रेड़ी-मिक्स च्या प्रवेशामुळे खूप म्हणजे खूप काही बदललं खरं. किंबहुना रेडी-मिक्स का आले ह्याचे प्रमुख कारण आज मला समजले. रेडी-मिक्स मध्ये सगळंच आधीच घातलेलं असतं, अगदी तिखट मीठ पासून. त्यांच्या चमूत तज्ज्ञ मंडळी असतात, आता तंत्रज्ञाची पण मदत घेतली जाते आणि ते परिपूर्ण असे मिक्स तय्यार होते. समजा ते डोश्याचे मिक्स आहे, आणि काही अंशी मीठ कमी वाटले कोणाला तर चटणी, भाजी, सांबर असे अनेक तोंडी लावण्याचे पदार्थ असतात. त्यामुळे मग काहीच फरक पडत नाही. अर्थात मिक्स च्या आधीचे दिवस पण तसेच होते, वरून मीठ लावून घेणं तेव्हा देखील शक्य होतं. पण असो. त्या रेडी मिक्स कंपन्यांना पण फायदा आणि सर्वात म्हणजे सुनांना / आयांना देखील. सुगीचे दिवस आलेत जणू.
एक आंचल नावाची प्रसिद्ध कवयत्री आहे, तरुण आहे पण फार मोठे नाव झाले आहे तिचे. तिची एक कविता म्हणते ना कि आईला फक्त एक माणूस म्हणून जगू द्या. तिला पण चुकायचा हक्क आहे. तिनेच सर्व आणि नेहेमीच सुंदर, योग्य, उत्कृष्टच करण्याचा आग्रह का? आणि असे अनेक कवी त्यांच्या शब्दातून व्यक्त झालेत ह्या आधी सुद्धा. आपण १००% नसून "उचलली जीभ लावली टाळ्याला" असं का वागतात मंडळी कोणास ठाऊक. का, फक्त दोष देण्यासाठीच सुनेला घरी आणतात? आज बऱ्याच प्रश्नांची अचूक उत्तरे आढळतात आहे मला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा