गेले काही दिवस जेवताना मला एक वेगळीच 'मज्जा' येते आहे. असा काही गोडवा अनुभवायला मिळतोय, जो शब्दांत मांडणे माझ्यासाठी खरंच कठीण आहे. थोडा विचार केला तेव्हा लक्षात आले की, हे सर्व त्या ताज्या पिठाचे प्रताप आहेत. डबा हाहात धरता येत नव्हता इतके ते ज्वारीचे पीठ दळून आणताना ताजे आणि उबदार होते.
त्या पिठाच्या भाकऱ्या करताना अक्षरशः माझी 'ब्रह्मानंदी' लागली होती. तो अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा आणि समृद्ध करणारा होता. जेव्हापासून ते ताजे पीठ घरात आले आहे, तेव्हापासून हा सिलसिला सुरू आहे. त्या ज्वारीला काय सांगावी इतकी अवीट चव आहे! टम्म फुगलेली भाकरी जेव्हा पाटात येते आणि तिथून मनामार्फत पोटात जाते, तेव्हाचे समाधान केवळ अवर्णनीयच.
ह्या उत्कृष्ट ज्वारीच्या निर्मात्याला - म्हणजेच त्या शेतकऱ्याला - माझे मनःपूर्वक धन्यवाद. त्याच्या कष्टामुळेच मला आज इतकी 'भन्नाट' भाकरी चाखायला मिळत आहे. ती भाकरी माझ्या ताटापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या हातांनी कष्ट घेतले आहेत, त्या सर्वांचे मी शतशः ऋणी आहे.
भाकरी इतकी जगावेगळी होती की, ताटात दिमतीला असलेले इतर सर्व पदार्थ अधिकच चविष्ट भासू लागले; किंबहुना जिभेला ते कणभर जास्तच भावले. मी अगदी तन्मय होऊन गेले काही दिवस पोटभर जेवत आहे. आधीचे दिवस वाईट होते असे नाही, पण या वेळच्या ज्वारीचा गोडवा काही 'औरच' आहे, ज्याने माझ्या संपूर्ण जेवणाला एका तृप्तीची झालर लावली आहे.
माझी जेवणानंतर कोमट पाणी आणि लिंबू घेण्याची जुनी सवय आहे. विशेष म्हणजे, ते लिंबू सुद्धा माझ्याच परसातले आहे. "काय गोड लिंब आहेत?" असं म्हणते आहे सध्या मी, बघा म्हणजे गोडवा कणाकणात भिनला आहे. आता यावर अधिक काय बोलायचे?
तृप्ती ही पदार्थात नसते, ती त्यातील ताजेपणात आणि कृतज्ञतेत असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा