खरं तर भक्ताने देवाकडे, देवदर्शनाला जायला हवं. पण जेव्हा देवाला स्वतःच दर्शनाचा योग जुळवून आणायचा असतो, तेव्हा हे असंच घडतं. तोच येतो, वेगळ्या रूपात, स्वरूपात. "त्याला" किती काळजी बघा हो कमालच आहे.
असं वाटतं, सरतेशेवटी सगळे एकच. त्या त्या वेळी, वेगवेगळ्या रूपात अवतार घेतलेले. कुठल्याही देवळात जाणं तितकंच योग्य.
जयंतीच्या दिवशी तरी ठराविक देवळात जावं, ही भाबड्या भक्ताची आशा… आणि ती अशी पुरवली आज त्याने.
आज श्री नृसिंह जयंती. आमचं कुलदैवत, माहेर आणि सासर दोन्ही कडून. आईकडे मोठ्या प्रमाणावर, पण घरच्या घरीच, शास्त्रोक्त पद्धतीने साजरी होत असे आणि अजूनही होते. त्यानंतर अनेकदा श्री नीरा नरसिंहपूरला दर्शनाला जाण्याचा योग आला. दरवर्षी मग पूजा आणि उपवास एवढंच साधलं जायचं. श्री नृसिंहाची देवळंही फार ठिकाणी नाहीत.
म्हणूनच जेव्हा ह्या वर्षी अगदी माझ्या घराजवळच एक वैशिष्ट्यपूर्ण पूजा संपन्न होणार आहे हे समजलं, तेव्हा जावंसं वाटलं. आणि योग आला जाण्याचा, महाप्रसाद घेण्याचा आणि एका वेगळ्या अनुभूतीचा.
ते खरं चतुर्भुज श्रीराम मंदिर आहे. पण एका मूर्तिकाराने, कलाकाराने इतकं अभूतपूर्व नक्षीकाम केलं होतं की त्याच चतुर्भुज रामाचं रूप आज श्री नृसिंहाचं झालं होतं. इतकं अभूतपूर्व काम मी आजतागायत पाहिलं नव्हतं. कधीच वाटणार नाही की ती मूर्ती मूळतः श्रीरामांची आहे, पण बाह्यरूप मात्र आज श्री नृसिंहाचं होतं.
खूप तास लागले ते करायला त्या कलाकाराला. मी जेव्हा त्यांच्याशी बोलले, तेव्हा ते म्हणाले की ते खरं तर पेंटिंग केलं आहे. मला पाहताना तो चंदनलेप असल्यासारखं भासत होतं. जादूच आहे त्यांच्या हातात. "त्याने" करवून घेतलेलं हे सर्वोत्कृष्ट काम.
माझ्याकडे तर शब्दच नाहीत वर्णन करण्याकरता. इतकं ते विलोभनीय दृश्य होतं. श्री नृसिंह इतक्या जवळ येऊन मला दर्शनाचा लाभ देतील, हे स्वप्नवतच वाटतं खरं.
मला केवळ दूर जायला नको म्हणून कीर्तन, आरती, महाप्रसाद, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळ मूर्ती श्रीरामांची, मंदिर श्रीरामाचं आणि स्वरूप मात्र श्री नृसिंहाचं कमाल आहे "त्याची".
मी लग्नाआधी कीर्तन ऐकलं होतं. आता बघा, किती वर्षं उलटून गेलीत. कीर्तन म्हणजे शेवटी काय कथाकथन, गोष्टीरूपी त्याचं दर्शन, त्याला संगीत आणि वाद्यांची साथ. पण ते "ह्याची देही ह्याची डोळा" अनुभवणं म्हणजे एक पर्वणीच. आणि तिचा लाभ मला आज, आपोआप झाला.
"तो" फक्त आला नाही अगदी जवळच्या ठिकाणी, तर गाडी घोडे धाडले घ्यायला, प्रसाद घरपोच आणून देण्याची सोय केली. फक्त उपस्थिती अपेक्षित होती माझी तेथे आणि घडवून आणलं सगळं. खूप वर्षांनी, अगदी शांतपणे कुठलीही घाईगडबड नाही, उद्या कचेरीत जाण्याची घाई नाही, पहाटे उठून डबे नाहीत असं पोटभर दर्शन आणि सगळे विविध कार्यक्रम साधता आले, याबद्दल त्याचे मनःपूर्वक आभार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा