किसमिस आजी आणि नात बोलत होते. गप्पांमध्ये दोघीही रंगून गेल्या होत्या. आजी मस्त मस्त गोष्टी सांगत होती आणि नात मन लावून त्या ऐकत होती. अधेमधे प्रश्नांची सरबत्तीही सुरू होतीच. एकंदरीत आजीला समाधान मिळत होतं आणि नातीला काहीतरी नवीन, अनोखं कळत होतं.
आजीने नेहमीप्रमाणे, पण यावेळी जरा जास्तच उत्साहात सांगायला सुरुवात केली,
"माहिती आहे का?, माझ्या वेळी, म्हणजे मी लहान असताना, शेतकरी बहुतांश कुटुंबापुरतंच उत्पादन घ्यायचे. फार मोठ्या प्रमाणावर नाही. त्यामुळे घरची द्राक्षं खाता यावीत, या दृष्टीने सगळं होतं. हे मला अनुभवता आलं किंवा ऐकिवात आहे.
मग द्राक्षं काही दिवसच मिळतात, म्हणून ती साठवून ठेवूया अशी कल्पना आली. आणि त्यातून एक वेगळाच अनुभव मिळाला गं. सूर्याच्या किरणांचा सुंदर उपयोग करून, त्याची ऊर्जा जणू प्रत्येक फळात साठवली गेली. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचं तर शेल्फ लाईफ वाढलं. द्राक्षांचा मौसम संपल्यानंतरही ती सुकामेवा म्हणून उपलब्ध राहू लागली. पदार्थांमध्ये तिची उपस्थिती वाढली.
नंतर ती इतर सुकामेव्यांसोबत मिसळून लोकांपर्यंत पोचवली जाऊ लागली. पण मग काय, सूर्य बाप्पाला बाजूला केलं आणि क्षणार्धात मशीन वापरून सगळं सुकवलं जाऊ लागलं. ते चटके कुणालाच आवडले नाहीत, म्हणून ते सगळेच जणू रुसले गं.
आधी कसं नैसर्गिकरित्या वाळल्यावर, एखाद्या आजीच्या डब्यात स्थान मिळायचं. आणि तो डबा किती वेळा उघडला जायचा. पण आता काय, तर आपल्याला वेगळं केलं जातं. कुठल्याही बागेतलं, मशीनने सुकवलेलं, प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबून ठेवलं जातं. मग ती पिशवी दुकानात आणि नंतर घरच्या कपाटात बंद.
आधी शेतात, उन्हात, डब्यात आणि मग सरळ तोंडात आनंदाने फस्त केलं जायचं. परसातल्या पानांत बघण्यातच अप्रूप होतं. आणि आता आधी काचेच्या तुकड्यावर, फोटोत बघायचं, आणि मग कधी तरी त्याच काचेच्या तुकड्याकडे बघत बघत खायचं. नुसती ढकलाढकली. आनंद नाहीच.
हे सगळं सांगण्याचं कारण एकच, आता सगळं बदललंय. त्याची सवय करून घे, नाहीतर मला झाला तसा त्रास होईल.
जरी उन्हात किंवा मशीनमध्ये सुकवलं, तरी आपल्यात जीव असतो गं. आपल्या सेवनाने माणसांचं जीवन सुधारतं. मग असे वेगवेगळे प्रकार का वापरतात, कोण जाणे.
द्राक्षांचा मौसम आला की एखाद दोन शेतात जावं, ताजी द्राक्षं खावीत. आणि मौसमाच्या शेवटी, त्याच शेतकऱ्याकडून उन्हात वाळवलेली घ्यावीत. कुटुंबासोबत आनंदाने खावीत. आहे ना सोपं?.
आपल्यापुरतंच नाही गं, बाकी सगळ्या सुकामेव्यांचंही काहीसं असंच झालंय. सगळेच जणू एकाच होडीत.
पण त्या काचेच्या तुकड्याला बाजूला सारलं तरच ना प्रकाश पडेल या बुद्धिजीवी जगात.
जाऊ दे, ते बुद्धिजीवी आपल्याला स्वीकारोत किंवा नाही. तू मात्र हा बदल स्वीकार. कपाटात बंद राहायची सवय कर. वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या बांधवांसोबत राहा. विविध सुकामेव्यांसोबत मिसळून राहायला शिक. आणि मोठ्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या शोकेसमध्ये, दुकानात निमूटपणे पडून राहा".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा