हे बरेचदा ऐकलं होतं किंबहुना मराठी पुस्तकात देखील होतं कि "एक चक्र इथेच पूर्ण केलं जातं", आपोआप. अर्थात तुम्ही बघाल तसे असते सगळ्याच बाबतीत. "लहानपण देगा देवा" असं सगळेच मनातल्या मनात म्हणत असतात, इच्छित असतात. अगदी दूर कशाला जायचे, परवाच माझी लेक शाळकरी मुलांना यथेच्छ खेळतांना बघून म्हणाली कशी, "शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे बघ ना कशी मनसोक्त खेळात आहेत खाली. शाळा म्हटलं कि मोजकाच अभ्यास आणि बाकी वेळा मित्र, बास. कित्ती मस्त आयुष्य आहे नाही? मी म्हटलं अगं आपण सगळेच जगलो ना ते आधी, मग? काही का असेना पण सर्वांना ते मुक्त बागडणं फारच आवडतं. अर्थात त्या लहानपणी मोठा व्हायची प्रचंड घाई झालेली असते ती वेगळी गोष्ट. असो.
तर लहानपणी धडपडत पाय फुटले कि पांगुळगाडा अत्यानंदाने वापरला जातो. मग तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला असो नाही तर अत्याधुनिक असा, तो त्रिकोणी सारख्या आकाराचा असो नाही तर गोल, पण तो चांगलाच वापरात येतो. एक मस्त आधार मिळतो, आकाश ठेंगणं वाटायला लागतं, अगदी जग पादाक्रांत केल्याचा आभास होतो आणि एक मोकळीक मिळाल्याची जाणीव देखील. इथून तिथे आणि तिथून इथे, सर्वत्र विहार सुरु. मोठ्यांना लहानांनी उच्छाद मांडल्या सारखं वाटतं पण वाढतं वय देखील लक्षात येतं, प्रगती दिसते आणि मज्जा येते. पांगुळ गाडा ह्या करता कि आधार असला तरी पांगल्यासारखं होऊ शकतं, म्हणजे चालता चालता तोल जाणे, मध्ये काही आलं तर सांभाळता न येणे आणि ह्या सगळ्यातुनच शिकणे, अर्थात त्या पायात बळ मिळवणे सरावाने, पुढची पायरी गाठणे ई.
हे असं गोंडस लहानपण झर्रर्रकिनी कधी निघून जातं समजतच नाही. मग काय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, नोकरी, चार हात ई. करता करता काही जणांच्या हाती अजून एक मोठ्या आकाराचा पांगुळगाडा विराजमान होतो. वॉकर असे त्याचे गोंडस नाव. प्रत्येक पाऊल टाकते वेळी त्याचा आधार वाटतो. त्याला दिवा लावण्याची सोय असते, चाके दिली असतात, आणि प्रत्येकाच्या उंचीनुसार बदल करता येतात. त्या आजी आजोबांना देखील मोकळीक, स्वातंत्र जे गेले अनेक वर्ष अनुभवलं होतं आणि जे अश्याच काहीश्या रंगीबेरंगी पिटुकल्या पांगुळगाड्यामुळे शक्य झालं होतं / सुरु झालं होतं ते. पाय मोकळे होतात ते वेगळंच. आणि काय हरकत आहे?. आयुष्यभर, जागोजागी, पदोपदी आपण मनुष्य प्राणी असल्यामुळे कुणाचा ना कुणाचा आधार घेतला आहेच. स्वरूप वेगवेगळे असेल कदाचित पण आधाराशिवाय अश्यकच मार्गक्रमण करणं. बघा म्हणजे इथेच एक चक्र पूर्ण होतेच हे कित्ती सत्य आहे.
सगळेच पिल्लं लहानपणी असा गाडा घेतातच असे नाही,काही चपळ असतात आणि इथे तिथे धरून पट्टदिशी चालू लागतात. अगदी तसेच प्रत्येक आजी आजोबा नाही वापरात गाडा, पण कोणी काठी, तर कोणी मित्राचा खांदा, तर कोणी काही वापरतोच, सजगता म्हणून. ते देखील उपभोगता आलं पाहिजे उंच मानेने.
काय विचारपूर्वक "त्याने" सगळं घडवलं आहे, बऱ्याचश्या गोष्टी आपल्या सुपूर्त केल्या आहेत आणि काही ठिकाणी स्वतःच्या हाती सत्ता ठेवली आहे आपल्याला पांगळा करून. सगळंच मानवाच्या हाती देऊन टाकलं तर काय होईल ह्याची कल्पना देखील करवत नाहीच.
कधी लागलाच तर आधार घेऊन किंवा देऊन एक एक पाऊल पुढे टाकूया. एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.