शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

काळजीच्या पल्याड


सध्या मी घरची शेफ आहे. कारण माझी मदतनीस फारच मस्त आहे. अगदी वेगाने सगळं मला हवं ते, हवं तस्स मस्त चिरून देते, वाटण लागलं तर करून देते आणि इतर काही तय्यारी जशी लागेल तशी करते. त्यामुळे मग दोघींचं काम सोप्पं होतं. तिला हातभार लागतो, तिच्यावरच सगळं पडत नाही आणि मला पण मस्त मज्जा येते, एक वेगळे समाधान मिळते, दोघींच्या गप्पा पण होतात, अनेकदा हास्य विनोद पण होतात. तर अशी हि, मला सवय झालेली मदतनीस अचानक म्हणाली कि मला गावाला जायचे आहे, एक नाही दोन नाही तब्बल ११-१२ दिवस. माझ्या पायाखालची जमीन हादरलीच. मला एकटीला चार वेळेचा स्वयंपाक अशक्यच आहे. सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळचे खाणे आणि रात्रीचे जेवण पुन्हा, दोनदा चहा, उन्हाळा म्हणून शीतपेय, फळं ई. काही विचारू नका. तिची मदत मला फारच मोलाची आहे. त्यामुळे दोन्ही वेळेला मला जमतं सगळं करायला. हि सुट्टीवर जाणार म्हणजे खूप मोठा यक्ष प्रश्न होता मला. त्या मला काम त्याच दरम्यान, त्यामुळे बाहेर जाऊन काम करायचं आणि शिवाय घरचं, त्यात मुलीची परीक्षा. त्यामुळे ती एक माझी मोट्ठी सगळ्या बाबतीत धावून येणारी आहे. आता ते देखील शक्य नाही. खूप म्हणजे खूप दमले विचार करून. आणि मग सरते शेवटी एक दिवस हातात घ्यायचा ठरवला. रात्रीचे जेवण घरगुती बाहेरून आणायचे मी निश्चित केले. आणि सहज माझ्या कडे काम करणाऱ्या ताईला विचारले तू किती वाजता निघणार आहेस, कोणत्या दिवशी नक्की येणार आहेस? तर म्हणते कशी, नीट ऐका, "आम्ही फक्त दोन दिवसा करताच जाणार आहोत. आमच्या एका नातेवाईकांची सून बाळंत झाली, तिला मुलगी झाली, त्यामुळे सव्वा महिना तरी काहीच पूजा करता येणार नाही. पुढील महिन्यात बघू काय ठरतंय ते." मी नाचू, का गाऊ, का उड्या मारू, का ओरडू, का शतशः "त्याचे" धन्यवाद मानू हे समजलंच नाही मला काही क्षण. मला माझ्याच कानांवर विश्वास नाही बसला. म्हणजे माझी "त्याला" कित्ती पराकोटीची काळजी आहे बघा. त्याने मला अडचण होऊ नये म्हणून एका बाळाचा जन्म ठरवला, तो ह्याच कालावधीत झाला, आणि ह्या मंडळींनी ठरवलेला कार्यक्रम बारगळला किंवा पुढे ढकलला गेला. पुढील महिन्यात ती गेली तर मला चालणार आहे, कारण सासरे तेव्हा नसतील ज्यांना खूप साग्रसंगीत सगळं लागतं सतत आणि हे पण गावाला जाणार आहेत, त्यामुळे आम्ही दोघी मस्त मज्जा करू उलट. माझ्या सारख्या एका कुठल्यातरी कोपऱ्यात राहणाऱ्या छोट्या व्यक्तीचे तो जाणतो, मदतीचा हात देतो न विचारात ह्याला काय म्हणावे? बरं मी ऋषी मुनींसारखी त्याची आराधना पण नाही करत हो, फक्त जमेल तशी पूजा, ध्यान आणि दररोजचे नेमलेले कार्य, एवढेच. तरी देखील त्याची मदत मिळणं हे अप्रूपच आहे माझ्या साठी. असेच आशीर्वाद, अशीच कृपा आणि असेच लक्ष सदोदित राहू दे हि विनंती. मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्या कडे "त्याच्या" ह्या कृतीकरता शब्दच नाहीत. असा हा माझा पाठीराखा, दणकट सखा आणि काय म्हणू. प्रत्येक वेळी श्रद्धा अजून दृढ होते अश्या प्रसंगामुळे. कित्ती महिन्यांपासून कष्ट घेतलेत त्याने माझ्यासाठी, माझ्या सुखसोयीसाठी, माझ्यावर ताण येऊ नये ह्या साठी. म्हणजे तो देखील जाणतो माझ्या पायांची स्थिती. अजून काय हवं?  

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

गाऊन


सकाळी, संध्याकाळी, रात्री कुठल्याही प्रहरी चालत चालत, फेर फटका मारता मारता, दूध आणता आणता गाऊ कसे शकतात? आणि गाता गाता चालू कसे शकता? किंवा दूध कसे विकत घेऊ शकता? मला तर हे प्रश्न नेहेमीच पडतात आणि महाड आश्चर्य वाटतं. एकावेळी एक काम करूच नये, अनेक कामं करत राहावीत ह्या मताची मी पण आहे. तरी देखील माझी बोटं तोंडात जातात. आणि मुख्य म्हणजे काय गरज आहे? ते चांगलं नाही दिसत? सकाळी बघितलं कचेरीत, विद्यालयात, महाविद्यालयात आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या लोकांनी कि खूप निस्तेज वाटतं आपोआप. कधीही प्रयन्त असावा कि स्वतः साधं पण व्यवथित राहावं म्हणजे स्वतःला आणि इतर बघणाऱ्यांना ऊर्जा मिळते, आनंद होतो. 


दिवसाच्या प्रत्येक वेळेनुसार वैविध्यता उपलब्ध आहे कपड्यांमध्ये. सर्वांकडे बहुतांशी इतके आहे कि ते असं सगळं घेऊच शकतात.  मग जेव्हा पाहावं तेव्हा गाऊन घालून सर्वत्र भटकत का असतात बायका, आज्ज्या, काकवा, काय हे, कित्ती भोंगाळ दिसतं ते. घरी काहीही करा हो, पण दारा बाहेर पडतांना जरा तरी विचार नको का? विचित्र आणि निरुत्साही असा कारभार. काही तरी विचारपूर्वक कार्य करावे, स्वतःला आणि बघणाऱ्यांना त्याचा फरक पडतोच. प्रत्येक वेळी मल्टि टास्किंग नकोच. दररोजचं माहिती आहे कि आपल्याला बाहेर पडावं लागतं तर मग तशी तय्यारी करावी, करावीच. आपण सोसाटीईत राहतो ह्याच भान असलंच पाहिजे. 

रविवार, २१ एप्रिल, २०२४

ती तरुण जोडी


माझ्या घरासमोर एक छोटेखानी साधं हॉटेल / खानावळ आहे. तेथे अगदी सकाळी लवकर चहा, नाश्ता मिळायला सुरवात होते ते थेट रात्री उशिरा पर्यंत घरगुती जेवण देखील मिळतं. आजूबाजूला अनेक दुकानं आहेत, एक छोटसं वसतिगृह देखील आहे, भरपूर वर्ग सुरु असतात, आणि शिवाय ऑटो थांबा आहे, त्यामुळे भरपूर वर्दळ असते त्या खानावळीत. मी स्वतः हे २००५-०६ पासून अखंड सुरु असलेलं बघितलं आहे. दोघी माय लेकी ते अत्यंत आनंदाने चालवतात. अगदी दोघी सारख्याच दिसतात जश्या कि सख्याच जणू. २००५ पासून ची जी ऊर्जा त्यांनी टिकवली आहे ती आज तागायत तसूभरही कमी झालेली नाही. आणि शिवाय कणभर देखील वजन वाढलं नाहीच. कसं काय जमवतात कोणास ठाऊक? सातत्याने तेच दुकानं, तेच बेंचेस, तीच दोन तीन झाडे, त्याच पायऱ्या, तोच स्वयंपाक आणि बहुतांशी तेच गिऱ्हाईक किंवा त्याच त्याच पदार्थांच्या मागण्या / ऑर्डर्स, सगळं तेच पण त्या दोघी उत्कृष्ट रित्या किंवा त्या पेक्षा हि सुरेख रीतीने सर्व सांभाळत आहेत, हसतमुखाने. २००५ साली माझ्या मते फक्त ह्या लेकीचं लग्न झालं होतं. मग एक छोटसं पिल्लू झालं, ती आता आजी ला गाडीवर भन्नाट घेऊन जाते. म्हणजे बघा. ती पिल्लू सुद्धा तेथेच मोठी झाली. क्या बात है? ह्या जोडी बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. तेच तेच काम करून, तेच एक छोटेखानी हॉटेल बघून किंवा तेच पडद्यामागे पदार्थ तय्यार करून, देऊन, मग पुन्हा बाकी स्वयंपाकाची तय्यारी ह्याचा कंटाळा न त्यांना कधी आला ना कधी येवो, हीच प्रार्थना. खूप म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या सासू सुनांच्या जोडी कडून. दिसायला पण इतक्या सुरेख आहेत, राहतात पण मस्त आणि सतत कार्यरत. बघावे ते नवलच. जे आहे ते स्वीकारलं हसतमुखाने, अत्यानंदाने कि मग असा परिणाम साधता येतो. कधी तरी अधे मध्ये त्या काकूंना मुलगा दिसायचा पण क्वचितच. स्वछता, चव, चेहेऱ्यावर हास्य राखलेले असे ते ठिकाण. 

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

ते कारण


शारीरिक वजन आटोक्यात ठेवण्याचे सर्वच जण अथक आणि आटोकाट प्रयत्न करत असतात. काही जण मग खाण्यावर नियंत्रण ठेवून, तर काही व्यायामावर भर देऊन आणि बाकीचे दोन्ही एकत्र करून, श्रम करत असतात. काहींना फळ मिळतं काहींना नाही. वजन आटोक्यात ठेवण्या मागे अनेक करणे आहेत, एक म्हणजे तंदुरुस्ती, आजारपणांना आमंत्रण न देण्यासाठी, काळाची गरज, स्वतःची गरज, नोकरीच्या ठिकाणी आवश्यक, सुंदर दिसण्यासाठी, तरुण राहण्यासाठी आणि भासण्याची, वय लपवण्यासाठी आणि अशी इतर बरीचशी करणे आहेत. 


सध्या माझी अर्धवेळ काम पद्धतीमुळे माझ्या हाती बराच वेळ शिल्लक राहतो. तो मी करणी लावते, सदुपयोग करते. वैविध्य लोकांना भेटते ज्यांना अनेक दिवसात, महिन्यात किंवा वर्षात भेट झाली नाही, अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते, लिहिते, गप्पा मारते, पिटुकल्या बऱ्याच मैत्रिणी आहेत त्यांच्याशी खेळते आणि असे अनेक गोष्टी करत राहते. त्यातली एक महत्वाचा बदल म्हणजे सध्या बहुतेक ठिकाणी मी साडी परिधान करून जाते. अनेक वर्ष ज्या कपाटात विराजमान आहेत, सणासुदीलाच बाहेर पडतात त्यांना प्रकर्षाने हवा दाखवण्याचे काम सध्या मी करते आहे. तीच गत अनुरूप दागिन्यांची. म्हणून मला ते जे आरामामुळे वाढलेली चरबी मूळ पदावर आणायची आहेच, ती विरघळली पाहिजेच. संपूर्ण आराम, त्यात अत्यानंद खूप म्हणजे खूप काही करायला मिळतंय म्हणून, यथेच्छ, घरचं आणि गरमागरम दोन / चार वेळचं खायला मिळतंय त्यामुळे मिळालेलं समाधान हे सगळं दृश्य आहे, सर्वत्र, सर्वांना. मला सर्व साड्या मस्त मिरवायचा आहेत. मी मिरवायला मिळणार म्हणून एक दोन नवीन साड्या अवेळी, करण्याव्यतिरिक्त विकत घेतल्या आहेत. आता त्यांची बारी. आत्ता पर्यंत त्यांनी माझी खरंच खूप वाट पहिली, फोन केले, विनवण्या देखील करून झाल्या पण छे. मला काय त्यांना तेव्हा न्याय देता आला नाहीच. म्हणून वजन कमी झाले कि त्यांचीच शोभा वाढणार आहेत. सध्या त्या मार्गावर काम सुरु आहे. मला मनापासून मदत करण्यासाठी डॉक्टर ज्ञानदा खुद्द, आणि त्यांची संपूर्ण चमू झटत आहेत, अथक मेहेनत घेत आहेत, विचारपूर्वक असे खाणे सुचवत आहेत आणि वजन पण अणुरुपात बहिर्गमन, निर्गमन करत आहे. असो, जशी मी तशीच माझी चरबी, दोघीपण गोगलगायीच्या वेगाने पुढे मार्गक्रमण करत आहोत. "हम होंगे कामयब एक दिन नक्की च". डॉक्टर ज्ञानदा म्हणत असतील काय हे कारण वजन कमी करण्याचं? पण असो, असे व्यक्ती येति आणिक स्मृती ठेवुनी जाती. 

उपवर्ग


अगदी लहापणीपासून नातेवाईकांमध्ये, शेजार पाजारी, मित्र मैत्रिणींचे मोठे भाऊ बहीण आणि बरेच जणांची लग्न जुळवतांना पत्रिका, नाडी, गण, गोत्र, गूण असे काही सूचनक शब्द सातत्याने कानी पडले. त्यामुळे ते किवर्ड्स, सूचनात्मक शब्द आपलेसे वाटू लागले, ओळखीचे झाले, त्याचा मतितार्थ समजायला लागला थोडक्यात आणि सध्या इतक्या वर्षांनी उमजायला देखील लागले त्याचे गूढ. एक उपवर्ग समोर आला आहे नव्याने, अर्थात तो होताच कधी पासून पण काहीसा दडून बसला होता, आता दृश्य झाला आहे. त्यामुळे ह्या पुढे जे सोयरीक जुळवणार त्यांनी हे नक्की ध्यानात ठेवा, कदाचित उपयोग होईल, गरज भासल्यास. 


देव, मनुष्य, राक्षस गण असे तीनच गण म्हणे शास्त्रात लिहिले आहेत, किंबहुना त्यामुळे ते पत्रिकेत पण त्याचं पद्धतीने स्थानापन्न देखील झाले आहे, प्रचलित आहेत. हा जो उपवर्ग समोर आला आहे तो, त्याच्या कृती, वैचारिक पातळी ई. देव गणाला शोभतचं नाही, माणूस करूच शकत नाही, त्याला अजून बरीच उत्कृष्ट कार्य करायची असतात आणि राक्षस बहुतांशी चावण्यावर, भुंकण्यावर, प्रहार करण्यावर, मारण्यावर आणि अश्या विकृत कार्यात मग्न ठेवतात आवर्जून स्वतःला सातत्याने, असं केलं नाही तर त्यांना झोप / निद्रा येत नाही, अन्न पचत नाही, हाताला खाज सुटते आणि संपूर्ण वाटत नाहीच. त्यामुळेच हा नवीन गण, ज्यातील माणसांना पुरणपोळी देखील तिखट वाटते आणि ते तोंडाचा सुरर सुरर असा आवाज काढतंच ती ग्रहण करतात. "ता वरून ताक" अश्या पद्धतीने तुम्हाला समजले असेलच कि मला काय म्हणायचं आहे ते. सातत्याने तक्रारीचा सूर, अगदी वरचा सा लावलेला, सुरकुत्या, सतत उणेदुणे काढतंच राहणे, कधीही म्हणजे कधीही आनंदी राहायचे नाही, दुसऱ्याला राहू द्यायचे नाही, आणि कशातच समाधान नाहीच, नेहेमीच कॉन्फयुज्ड / गोंधळलेले, निर्णय घेतला तरी तो चुकीचाच कसा हे उगाळत बसणार आणि हे घरी जास्त दारी थोड्याफार प्रमाणात. तर असे हे नवीन  "पुरणपोळी तिखट" गण.


भावी नवरा, जावई बघायला गेलात तर पूर्ण पोळी मागवून, खायला घालून बघा तर, जसे "मुन्ना भाई ..." नावाच्या सुप्रसिद्ध चित्रपटात दाखवले आहे. म्हणजे पुढचे पाऊल टाकायचे कि नाही हे ठरवता येईल आधीच. आणि हो हा गण आजून पत्रिकेत ठळक पद्धतीने दर्शविला नाही, त्यामुळे फक्त पत्रिका काहीही ह्या बद्दल सुतवाच्य करू शकत नाही. कुटुंब शास्त्रात आहे, दररोज च्या अनुभवत सिद्ध झालेला आहे अनेक वेळा त्यामुळे ताक फुंकून प्या बरं का?

रामनवमी


माझी रामनवमी आणि संपूर्ण नवरात्र सफल झाले ह्या वर्षी. ह्याचाच अर्थ पुढील वर्ष, प्रत्येक दिवस आणि क्षण नक्कीच असाच वेगळा आणि खरोखरीच उत्सव असणार. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण", आज अगदी अशी स्थिती झाली आहे माझी. मनापासून आज मला माहेर सारखे आमंत्रण होते रामजन्म उत्सवाची. शलाका ताई आणि आनंद दादांच्या मंगलमय, चैतन्यपूर्ण वात्सुत. अहाहा च. अत्यंत नाविन्यपूर्ण, परिपूर्ण आणि उत्साहाने भरपूर आखलेला असा कार्यक्रम. त्यात खूप अशी भक्तिपूर्ण विविधता. एक लग्नसोहळ्याचे स्वरूप आले होते त्या जन्म उत्सवाला. जरी करता करविता "तो" असला तरी, शलाका ताईंच्या मार्फत हे सर्व संपन्न झाले, आयोजिले गेले आणि मी त्याचं एक भाग होते, एक श्रोती होते, म्हणजे अहो भाग्य माझे.  सजावटीपासून, प्रसादापर्यंत सर्वच वाखाणण्या जोगे आणि अप्रतिमच. नियोजनाची कमाल आहे शलाका ताईंची. त्यांच्या वानरसेनेकडून सगळे करून घेणे हि फार मोठी गदा त्या पेलतात. अशीच ताकद त्या मारुती रायने त्यांना बहाल करावी हि मनःपूर्वक प्रार्थना. १०००+ रामनाम जप तो देखील आखीव रेखीव असा, सुलभ अशी असं व्यवस्था, ऋतूनुसार पेय सर्वांना गारेगार, प्रकृतिस्वाथ्यासाठी, तदनंतर डॉक्टर दातार ह्यांचे एकनाथांना समर्पित राम चरित अनुभववादन / निरूपण, ताल सूर बद्ध जन्मसोहोळा, पुनः पुन्हा रामनाम जपसाधना आणि ह्यावेळी अनोखी लेझीम वापरून आणि फेर धरून अशी. अत्यंत नावाजलेल्या आणि रामरूप झालेल्या गायकांची भजन सेवा, सर्व सदारकर्त्यांचा यथोचित आदरपूर्वक आणि शब्दसुमनांनी केलेला सन्मान. हे सर्व अद्यावत संगीत सामग्री सहित श्रोतेहो. सरते शेवटी महाप्रसाद, तो देखील सर्वोत्तम असाच, अथ: पासून इति पर्यंत अगदी बारकाईने लक्ष देऊन, खूप वेळ घेऊन, फारच उत्कृष्ट असे प्लांनिंग करून आखलेला. "ह्याची देही ह्याची डोळा" अनुभवता आला म्हणून उभयतांचे शतशः धन्यवाद. 


एका वनरसेनेच्या वानरीला मी प्रकर्षाने सांगितले कि त्या खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत आहेत, खूप भन्नाट तय्यार झाल्या आहेत. त्यावर त्यांचे उत्तर असे होते "कि मला माझ्या मुलाचा जन्म सोहोळा च आहे असे भासते आहे, त्यामुळे मी आई अशी नटले आहे. त्याशिवाय आज माझ्या वडिलांचा देखील जन्मदिन, आणि ते हि बारा वाजताच". क्या बात है. 


अजून एक त्याचं सेनेतील तूप वाढण्याचे काम देखील अत्यानंदाने आणि रामनामाची करत होत्या. त्यांना मी जेव्हा सांगितले कि "पुरणपोळीची गोडी वाढली तुम्ही तूप वाढल्यामुळे किंवा रामनामपूर्वक तुपामुळे". त्यांचे देखील उत्तर फारच अप्रतिम होते "एक तर राम च काय तो करणारा आणि शलाका ताई मार्गदर्शक आम्ही फक्त त्यांची सेने. हे कार्य हातून घडल्यामुळे संपूर्ण वर्ष ह्याची ऊर्जा टिकते". मी तर निःशब्दच झाले हे ऐकून. 


डोळे, कान, पोट, मन तृप्त झाले. 


मंडप चमूचे, गायकांचे, आयोजकांचे, प्रासादिक स्वयंपाक करणाऱ्यांचे, खाल पासून वर पर्यंत वस्तू सुशोभित करणाऱ्यांचे आणि इतर सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार. अगदी त्या शेजारच्यांचे सुद्धा आभार ज्यांनी मनापासून घर तर दिलंच उठाबसायाला, अनेकदा खाली वर करून पिण्याचे पाणी भरलं, भरपूर बर्फ आणून ते थंडगार केलं आणि सर्वांची तृष्णा भागवली ह्या अश्या ग्रीष्म ऋतूमध्ये. भले मोठे प्रसन्नतेत भर घालणारे कुलर, अमृततुल्य असे ताक आणि हि यादी न संपणारी आहे. असे  उत्सव होती आणिक स्मृती ठेवुनी जाती. 


|| जय श्रीराम ||  

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

"माहेर"ची परिभाषा


माहेर हे एक वेगळंच समीकरण आहे. हे मुलगा आणि मुलगी दोघांनाही तितकेच प्रकर्षाने समजते ह्या विभक्त कुटुंब पद्धतीत. पण तरी देखील मला नव्याने एक आगळी वेगळी परिभाषा उमगली आहे ह्या मनाच्या अगदी जवळ असलेल्या शब्दाची, किंबहुना ह्या संकल्पनेची. 

तर त्याचं काय झालं कि माझ्या आंतरराष्ट्रीय विश्व विद्यालयात एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यात ठराविक वेळा किंवा त्या पेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालायचे होते. शिवाय काही आसने देखील करावयाची होती. baas मग काय मी झाले सुरु. आणि माझ्या न कळत कधी ती संख्या गाठली गेली हे समजलंच नाही. मी आपली नियोजलेले करत होते, करत राहिले आणि एका ठराविक पद्धतीने कळवत राहिले. मग आला निकालाचा दिवस आणि काय म्हणताय मी अख्ख्या विश्वविद्यापीठात पहिली आले. अहाहा च. माझ्या संस्थेसाठी फार मोठी कामगिरी होती ती. संपूर्ण प्रवास झकास झाला. आणि बक्षीस समारंभात कौतुक म्हणून व्यायाम सुरुच राहावा म्हणून अप्रतिम सुंदर मऊसर टी शर्ट, ट्रॉफी, योग मॅट असे दिले गेले. त्या योग मॅट वर पाठ टेकली कि ह्या जगापल्याड गेल्यासारखे वाटते जसे कि अगदी घरी आईच्या कुशीत निजल्यासारखे. माहेरची उब आहे त्यात आणि शब्दात न पेरता येण्यासारखा अनुभव. इतके भन्नाट वाटते कि योग करतच राहावे असे. बघा म्हणजे सासरी राहून माहेरचा अनुभव तो देखील दररोज. ह्या पेक्षा अजून काय हवे. हि सगळी माहेरची शिकवणच तर आहे ज्या मुळे मला वेळेचे नियोजन करून, व्यायाम करता आला. ठरवलेले पूर्णत्वास न्यायाचे, जिद्द कायम ठेवायची, पुढे मार्गक्रमण करत राहायचे हे आणि असे अनेक धडे लहानपणापासून मिळाले, महत्व कळले. त्यामुळे स्व कमाईची ती मॅट म्हणजे माझे सर्वस्व आहे. मी खूप जीवापाड जपते तिला. आज पर्यंत खूप मॅट वर व्यायाम करण्याचा योग आला. स्वतः मॅट विकत घेऊन पण आसने केली, पण ह्या जिंकलेल्या मॅट ची सर कोणालाच नाही.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...