वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
हा माझ्या सारख्या मराठी मुलीला फारच महत्वाचा श्लोक आहे, रोज न चुकता जेवणाआधी न कळत म्हटला जातोच, आपोआप हात जोडले जातातच. आणि जावेच, कारण अनेक शेतकरी, आणि बाकी सगळे जे सप्लाय-चेन-मॅनेजमेंट मधे असतात त्यांना धन्यवाद देणं आवश्यक आहेच. असो.
आज हा श्लोक आठवण्याचं कारण विचारताय मंडळी? हो हो सांगते, थांबा.
पुण्यात मला खालील नावांचे उपहारगृह / रेस्टॉरंट आढळले म्हणून हा पंक्ती प्रपंच आणि ते असे:
- वदनि कवळ
- सहज हवन
- पूर्णब्रह्म
- उदरभरण
- यज्ञकर्म ई.
आणि ह्या सगळ्या उपहारगृहत / रेस्टॉरंट मधे दोन्ही प्रकारचे भोजन मिळते असं त्यांच्या जाहिरातीत लिहिलं आहे (शाकाहारी आणि मांसाहारी). कारण दोन्ही प्रकारचे भोजन व्यवस्थित पचन होणं अतिशय महत्वाचं आहेच, नाही का?
कोठेही आणि कुठलंही भोजन करा, पण हात जोडा आणि हा श्लोक म्हणत धन्यवाद माना सगळ्यांचे म्हणजे झालं. "अन्नदाता सुखी भव...."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा