काल परवाचीच गोष्ट आहे, आमच्या समोर राहणाऱ्या काकांनी त्यांच्या अंगणातल्या झाडांच्या मोठ्या झालेल्या फांद्या कापल्या, स्वतः. कापल्यावर शेजारी प्लॉट रिकामा आहे तेथे सहज फेकून दिल्या सुद्धा. हे कार्य त्यांचं बराच वेळ चाललं होत, तेव्हा सहज मनाला शिवलेला विचार येथे मांडत आहे.
शेजारी पण बांधकाम असतं तर? मग त्यांनी त्या कापलेल्या फांद्या कोठे टाकल्या असत्या?
त्यांच्या समोरचा पण प्लॉट रिकामा आहे, कदाचित तेथे टाकल्या असत्या.
बरं, जेव्हा त्या समोरच्या प्लॉट पण घर बांधलं जाईल तेव्हा? हा सगळा माझा माझ्या एकटीच्या मनाशी चालेल संवाद आहे हो.
मग ते त्यांच्याच अंगणात त्या फांद्या ठेवतील, पान वाळली कि खत म्हणून वापरता येईल आणि फांदी जाड असेल तर जे चुलीवर पाणी गरम करतात त्यांना देता येतील, किंवा सांभाळून ठेवायला जागा असेल तर काही फांद्या वाळल्यावर होळी साठी जपून ठेवता येतील.
ते पण अशक्य असेल तर कचरेवाल्याला थोडे पैसे देऊन घेऊन जा म्हणायचं.
सरते शेवटी, कशाला हवेत असले मोठे वाढणारे झाड अंगणात, उगाच उपद्वाप. बोन्साय प्रकारात सगळी म्हणाल ती झाड मिळतात. जर फारच आवड आहे तर अश्या अवाक्यातल्या उंचीच्या झाडांचं संगोपन करावं ना? असो, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात त्याच्या कडे अजून एक भलं मोठं झाड आहे आणि त्या करता ते बाहेरची माणसं बोलावतात आणि झाडांचे असंख्य फायदेच आहेत, पण डोंगरा एवढं काम पण.
त्या काकांना स्वतः शेजारच्या मोठ्या झाडावर चढलेलं बघून मला जरा धस्स झालं, अनेक उपाय पण सुचले मला, उगाचच, ना ते झाड माझं, ना हि त्या काकांनी मला सल्ला विचारला पण का कुणास ठाऊक "मन उधाण वाऱ्याचे..." म्हणतात ना ते काही चुकीचं नाहीच. असो. मज्जा आली, काही तरी वेगळं छोटं खाद्य मिळालं मला लिहायला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा