मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

नात्यांचे पदर

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीकडे माझं राहायला जाणं झालं. माझा स्वभाव आणि बरं दिसत नाही फक्त आळश्यासारखं बसून राहणं आणि आधाश्यासारखं फक्त खाणं म्हणून तिला मदत करायला गेले. त्या दिवशीच्या सकाळच्या जेवणात भरीत करण्याचा बेत होता तिचा आणि ते देखील नागपूर स्टाईल स्पेशल. आम्ही त्याला कच्च भरीत म्हणतो. कारण वांग ऐवी तैवी भाजलेलं असतंच त्यात मग कांदा घालून फोडणी द्यायची, चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर साखर पेरायची. बास, भन्नाट भरीत तय्यार. काही जण त्यात दही घालून पण खातात, काही बारीक टॉमेटो पण आवडीने वापरतात. माझ्या मैत्रिणीने कांदा पात घालण्याचं ठरवलं होत. कांदा पात चिरायला थोडासा वेळ लागतो आणि तिच्या अहोंना जरा घाई होती त्यामुळे मी चिरायला घेतली पात. पातीचे एक वैशिष्टय आहे त्यात अनेक अतिसूक्ष्म थर असतात आणि काही थर काढूनच टाकावे लागतात कारण ते नीट चावले जात नाहीत. एकावर एक थर असल्यामुळे आणि धुतल्यामुळे थोडासा गुळगुळीत पणा पण आलेला असतो पातीला. चिरताना मज्जा तर येतेच पण थोडसं लक्ष द्यावाच लागत. संपूर्ण पात अगदी बारीक चिरून झाल्यावर मग पुन्हा एकदा मी अक्षरश: निवडल्यासारखे केले आणि न चावता येणार पण चिरला गेलेला पातीचा भाग काढून टाकला. इतक्या मेहेनतीने केलेलं स्पेशल भरीत खातांना मज्जा आली पाहिजे त्यामुळे नको ते पातीचे भाग काढून टाकणंच योग्य, नाही का?

अगदी नात्यातल्या नाजूक थरांसारखे, नको असलेले, गुळगुळीत झालेले अतिसूक्ष्म जरी असले तरी ते थर वेळेत काढून टाकणे / बाजूला सारणे च योग्य. म्हणजे कचरा आणि उपयुक्त भाग मग तो विचारांचा का असेना वेगळा करत राहिला पाहिजे सर्वतोपरी नातं टिकवून ठेवण्यासाठी आणि हे सर्वांनी वेळोवेळी करणं आवश्यक आहेच. जरड, लवचिकता नसलेले भाग जर सांभाळले आणि वापरले सुद्धा तर मग पंचाईत होते. इतक्यांदा ह्याच्या आधी मी पात चिरली आहे पण त्याच दिवशी संपूर्ण वेळ फक्त असेच विचार माझ्या मनात घोळत होते आणि ते फार योग्य वाटत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...