"श्री गजानन विजय" ह्या पवित्र ग्रंथाची पानं किंवा काही ओळी माझ्या नित्य वाचनात असतात. त्यात एका अध्यायात एका भक्ताची कथा नमूद केली आहे. त्या भक्ताला एक दुर्धर आजराने ग्रासलं असतं, तो शेगावला वास्तव्याला येतो, महाराज जेथे स्नानाला जातात तेथील माती अंगाला लावतो. हा त्याचा दिनक्रम खूप दिवस चालू राहतो आणि तो पूर्णपणे बरा होतो / मुक्त होतो आजारातून. अर्थातच एक अतिशहाणा त्या भक्ताला अनाहूत सल्ला द्यायला हजर होतो, त्याला हटकतो, वैद्याकडे जायला सांगतो, ई. त्यावर भक्त सांगतो कि हि माती जेथे महाराज स्नान करतात नदीकाठी म्हणजेच माझ्यासाठी जगातली उत्कृष्ट औषधी आहे. त्या मातीला एक वेगळा सुगंध आहे कारण त्यात वैविध्य औषधं ओतप्रोत भरली आहेत जी माझ्या आजारावर रामबाण इलाज आहेत. तू स्वतः अनुभव घे म्हणजे समजेल. दुसऱ्या दिवशी भक्त आणि अतिशहाणा दोघे नदीकाठी पोचतात आणि अतिशहाण्याला त्याच मातीचा दुर्गंध येतो कारण ती माती त्याच्या साठी नसतेच, त्याच्या उपयोगाची नसते आणि शिवाय संपूर्ण शरण गेल्याशिवाय अनुभव येणं अशक्यच, नाही का? पण तीच माती जेव्हा भक्ताचा हातात येते तेव्हा त्याला औषधाचं स्वरूप प्राप्त होतं.
२०१८ - १९ च्या दरम्यान मी परतफेड नावाची श्रुंखला लिहिली होती त्याची सुरवात शहाळ्यांपासून झाली होती. प्रत्येक वेळी चाखलेलं शहाळं वेगळ्या चवीचं भासायचं मला. मला त्या वेळी असं सुचलं होतं कि ज्यांनी नारळाचं झाडं लावलंय ते दुसऱ्याच्या उपयोगी पडावं, त्यांची प्रकृती लवकर ठणठणीत व्हावी ह्या उद्देशाने लावलं असेल त्याची चव सुमधुर, बाकी नाही. पण आज एक वेगळा दृष्टिकोन जाणवला. कि सगळ्याच नारळाचं पाणी हे औषधीच असतं. जे गोड लागलं नाही माझ्या जिभेला तेच कदाचित त्या वेळी माझ्या प्रकृतीला जास्त योग्य होतं, हवं होतं म्हणून त्यावेळी बरोबर माझ्या हाती तसं थोडसं तुरट पाणी पुढ्यात उभं ठाकलं. किती उत्कृष्ट, जगावेगळा आणि न कळत संबंध स्थापित झाला बघा. आणि आणखी एक शिकवणूक देऊन गेला कि निरपेक्ष राहा, शहाळं म्हणजे गोडच असं नाही. तुमच्या व्याधीला बरं करण्यासाठी किंवा हे सांगण्यासाठी कि शहाळ्याचे पाणी कधी कधी अगोड देखील असू शकतं, किंबहुना असतंच. "त्याला" कित्ती काळजी बघा माझी. इतकी जगभर त्याची लेकरं असून देखील माझ्यासाठी वैयक्तिक लक्ष ठेवून राहणं म्हणजे ........ त्यात माझी योग्यता नसतांना, मी नाही ऋषी मुनी, नाही हि देवळातली गुरुजी, ना हि गोरगरिबांची सेवा करणारी. माझ्या कडे त्याच्या साठी शब्द अपुरे आहेत. अशीच कृपा दृष्टी माझ्यावर आणि सर्वांनवर सदोदित राहो हि ईशचरणी प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा