खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हि. त्यावेळी माझ्या मते सर्वांच्याच घरी आंगण होतं. त्या अंगणात म्हणजे घराच्या समोर आणि मागे दोन्ही कडे
- घरची-दारची मुलं खेळायची, छोटेखानी खेळ
- लहान मोठ्या रांगोळ्या काढल्या जायच्या
- प्रत्येकाची गाडी त्यांच्याच घरासमोर उभी राहायची
- सुंदर छोटा बगीचा असायचा, त्यावर भरपूर पक्षी राहायचे
- सडा सारवण होत असे
- उन्हाळ्यात बाहेर अंगणातच बाज / खाट टाकून झोपायची पद्धत होती
- त्यामुळे उन्हाळ्यात संघ्याकाळी त्या खाटांवर बसून पत्त्यांचे डाव रंगात असतं
- मागच्या अंगणात प्रामुख्याने उन्हाळ्यात वाळवणं ठेवलं जायी
- शिवाय लाल कोरड्या मिरच्या सुकल्या जायच्या
- लोणचं करण्यासाठी किंवा पापड लाटण्यासाठी मस्त बैठक बसायची ते आंगणात
- कपडे सूर्याच्या ऊर्जेत वाळले जायचे
- घामोळ्या, आणि बाकीचे विकार होऊ नयेत म्हणून मागील अंगणात गरम पाणी तयार व्हायचं
- पाळीव पक्षी शिस्तीत ठेवले जायचे
- ती दोन्ही अंगणं घराचाच भाग होते, अविभाज्य असा
- अगदी मोजक्या घरांमधे गाई, म्हशी, चुली ई. चं हक्काची जागा म्हणजे आंगण च ना?
- बाळाला मालिश, आंघोळ घालणे, मग कोवळ्या उन्हात थोडसं शेकल्यासारखे करणे हे
- आजी आजोबा जेष्ठ नागरिक मस्त चहाची लज्जत घेत बसायचे, येणा जाणाऱ्यांशी गप्पा / गुजगोष्टी होत असतं
सध्या ह्या पैकी काहीच होत नाही,व्हायची गरज नाही आणि त्या करता वेळ नाही, सगळंच विकत मिळत, एका क्लिक मधे मग अंगणाची काय गरज आहे. असलेली पिटुकली बाल्कनी पण काहींच्या घरी अडगळीची जागा म्हणूनच वापरतात, किंवा जास्तीत जास्त कपडे वाळत घालायला किंवा बेशिस्तीत कुंड्या ठेवायला, बास. अर्थात आऊट लायर आहेत. काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या घरी सगळं जैसे थे, मस्त मांडून ठेवलं असतं. आंगण संस्कृती लोप पावतांना दिसते आहे. जमिनीवर पाय घट्ट रोवून उभं राहण्यापेक्षा गगनभरारी घेणं किंवा त्रिशंकूसारखं अधेमधे लटकून राहणं जेथे जमीन पण आपली नाही आणि छत देखील, हे जास्त सोईस्कर वाटत आहे लोकांना. त्यामुळे आता समोर मागे वर खाली आपलं काहीच नाही, तरी देखील गर्व मात्र सर्वोच्च थराचा. अहाहा च.
मी भले मोठे आंगण, झाडं, फळं, फुलं, भाज्या, पक्षी, त्यांची घरटी, त्यांचे सुमधुर संवाद ई. सगळं पोटभरून जगले आहे, अनेक वर्ष, आता फ्लॅट संस्कृती सही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा