आपल्या भारतीय परंपरेनुसार किंवा पिढी दर पिढी जे ऐकिवात आहे त्या नुसार घर विकत घेतांना, नवीन ऑफिस / बसायची जागा निवडतांना दिशा दर्शक वापरला जातो, दिशेचा अभ्यास केला जातो. हे झालं एका व्यक्तीबद्दल. पण जेव्हा बांधकाम व्यावसायिक / बिल्डर जेव्हा भली मोठी सोसायटी बांधायला घेतो तेव्हा पण वास्तुशास्त्राचा संपूर्ण अभ्यास केला जातो. वस्तू तज्ञ् पॅनल वर असतातच माझ्या मते प्रत्येक बिल्डर कडे. असो. तसेच चारचाकी घेतांना देखील रंग बघण्याची पद्धत आहे काही जणांची. कपडे खरेदी करतांना सुद्धा. नवीन जन्मलेल्या बाळाचं नाव ठेवतांना सुद्धा अक्षर, त्यानंतर स्पेलिंग ई. बघितलं जातं. ते बाळ मोठं झालं कि त्यात बदल पण घडून येतांना आपण बघतो. काही जणं बाळाचा जन्म कधी होणं जास्त योग्य आहे हे देखील ठरवता, म्हणजे तारीख वार ई. आणि मग ऑपरेशन करतात. काही जण वाराप्रमाणे काम करतात किंवा करत नाहीत. त्या पुढे वाराप्रमाणे किंवा त्या वारी ठराविक वेळेआधी किंवा नंतर मुहूर्तावर सगळी कामं करतांना आढळतात.
मी एवढ्यातच काही मोठ्या व्यक्ती बघितल्या ज्यांनी बरेच ठिकाणी कामं केली आहेत. खूप शहरं बदलली, बऱ्याश्या संस्था देखील बदलल्या आणि बरेच काही. ती मंडळी म्हणे दिशा बघूनच सगळं करतात गेली अनेक वर्ष, मग एकाच ठिकाणी स्थिर का नाही राहिली? सगळंच जर दिशेवर अवलंबून असेल तर एकाच संस्थेत उच्च पदावर जाणं जास्त योग्य, विविध जागा सतत बदलत राहण्यापेक्षा, नाही का?
कितीही तंत्रज्ञान पुढे गेलं, आधुनिक झालं तरी प्रत्येक व्यक्तीच जाणं - येणं, पाऊस सुरु करणं -थांबवणं, सूर्याचं तापमान कमी-जास्त करणं ई. अजून माणसाच्या हातात आलं नाही. काही अंशी जन्म साधला आहे, पण काहीच अंशी, सगळ्यांसाठी / प्रत्येकासाठी आणि खात्री नाहीच. त्यामुळे माझ्या सुबुद्धीला जे पटतंय ते असं कि प्रत्येक दिशा, प्रत्येक वार, प्रत्येक क्षण हा सर्वोत्तमच प्रत्येकासाठी. तो मिळाला आहे ह्यात सार्थक माना. झोकून देऊन काम होऊ दे, सातत्याने, हे सर्वात महत्वाचं. तोलामोलाने करा प्रत्येक गोष्ट, "त्याच्या" वर विश्वास आणि भरोसा ठेवा, "तो" करेल ते, करेल तेव्हा आपल्यासाठी योग्य हे आत्मसात करा, म्हणजे मिळवलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा