अगदी मला समजायला लागल्यापासून विविध माध्यमातून कुटुंब-प्रमुख हि संज्ञा ऐकली आहे, त्याबद्दल वाचलं आणि पाहिलं देखील आहे अनेकदा. त्यावेळी कुटुंब-प्रमुख म्हणजे बहुतांशी पुरुष, सर्वात मोठे वयाने, मानाने, अधिकाराने, अनुभवाने ई. ते म्हणतील ती पूर्वदिशा. असो. काही कुटुंबात स्त्रिया देखील ह्या पदावर असायच्या, असतील देखील. कारण कुठल्याही पातळीवर स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे नाहीतच, कणभर पुढेच आहेत असं म्हणायला हरकत नाही.
माझ्या शैक्षणिक किंवा कुठल्याही क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी हे सर्वार्थाने श्रेष्ठ असतात, वयाने मोठे असतात, अनुभवी असतातच. त्यावेळी तसे ढोबळमानाने तसे नियम असायचे. आता आमूलाग्र बदल झालेला आढळतो आहे, दिसतो आहे स्पष्ट. अर्थात कार्यक्षमता, कार्यकुशलता बघून सर्वात तरुण, सळसळते रक्त असणाऱ्या व्यक्तीला भलीमोठी जबाबदारी दिली जाते. हा बदल एकदा, दोनदा आणि अनेकदा झालेला बघितल्यावर मग मी माझ्या लेकीशी खास संवाद साधला आणि विचारलं तिचं मत ह्या बद्दल, एक नवा, ताजा आणि अप्रतिम दृष्टिकोन दिला / सांगितला, ती म्हणते कशी "खूप योग्य पाऊल आहे हे, कारण कामाचा डोंगर एवढा मोठा आहे, त्यात इतके वैविध्य पैलू आहेत कि योग्य तरुणच तारून नेऊ शकणार, हि नय्या पार करणं दिसतं तेवढं सोप्पं नाहीच, त्यामुळे आणि योग्य तरुणाला खूप काही करून दाखवायचं असतं, सळसळता उत्साह असतो, ताज्या कल्पना अमलात आणता येतात न थकता, आणि हे "लांबी रेस का घोडा" अश्या पद्धतीने बघितलं जातं / जावं. अर्थात अनुभवी, थोर, मोठे ई. असतातच जेव्हा लागतील तेव्हा सल्ले द्यायला, देवाण-घेवाण करायला. त्यामुळे हा सध्याचा बदल आहे, हा यशस्वी नक्की होणार ह्याची संपूर्ण खात्री आहेच".
कचेरी हे देखील एक कुटुंबच नाही का?, मग कचेरीत जर सर्वात तरुण प्रमुख म्हणून काम पाहू शकतो तर आता हा बदल घरी देखील नक्कीच दिसू लागणार ह्यावर माझा विश्वास आहे. बाहेरचे जग जर इतका मन-सन्मान बहाल करतोय, तुम्ही हवेहवेसे आहात त्यांना, तुमची किंमत आहे, त्या साठी फक्त मान देत नाहीत तर त्याचा मोबदला, शाबासकी, प्रमाणपत्र देखील देतात वेळोवेळी, काळजी घेतात ई. हे च चित्र आता घरी देखील दिसायला हवं सर्वत्र. मोबदला नको, शाबासकी आणि प्रमाणपत्र तर नकोच नको पण माणुसकी फक्त हवी. वयानी / शरीराने मोठे होणे म्हणजे सर्व काही नाही ना? नवीन तरुण पिढीच्या कुटुंब प्रमुखांकडे धुरा देऊन तर बघा, त्याचा देखील आनंद चाखा, अर्थात हे सर्व करण्यासाठी "त्याचे" भरभरून आशीर्वाद लागतात, सद्बुद्धी मिळावी लागते आणि सोडून द्यायची वृत्ती, आनंदी / समाधानी राहण्याची, कारण नसतांना ढवळाढवळ न करण्याची सवय असावी लागते नाहीतर अंगीकारावी लागते प्रयत्नपूर्वक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा