पहाटे, माध्यान्याला आणि संध्याकाळी किंवा तिन्हीसांजेला अश्या ३-४ वेळी नियमाप्रमाणे विविध देवस्थानांमधे / घरी आरत्या होतात दररोज, न चुकता. गुरुजी पूजा अर्चा झाली कि शेवट आरतीने करतात. काकड आरती हि खास सहसा कार्तिक महिन्यात केली जाते. मी अगदी कळायला लागल्या पासून काकड आरती बद्दल ऐकलं आहे, कारण आमच्या ओळखीच्या लोकांकडे किंवा देवळात ती होतं असे. त्यावेळी जे मी ऐकलं काकड आरती बद्दल ते असं होतं कि :
१. भल्या पहाटे म्हणजे साधारण चारच्या आधी हि आरती करतात.
२. देवांना आळवून उठवलं जातं.
३. माझ्या लहानपणी कार्तिक महिना म्हणजे मस्त थंडी, मग सर्वांनाच पहाटे उठणं प्रचंड अवघड, त्या दृष्टीने माणसाचा आळस निघून जावा, त्याने आंघोळ करून देवाची आरती करावी आणि पट्टाकिनी कामाला लागावे हा उद्देश असावा.
४. एक सुरेख आणि अनोख्या पद्धतीचा दिवा लावला जातो ह्या आरती करता. मोठ्या आकाराचा आणि कपड्यासारखं काही तरी वापरलं जातं ती ज्योत तय्यार होण्यासाठी, जसे मावळे वापरायचे जेव्हा वीज नव्हती तेव्हा. अशी प्रत्येक मंदिरात जर थंडीच्या वेळी काकडा वापरून आरती केली, संध्याकाळी सर्वत्र जरा जास्त प्रमाणात पणत्या तेवत ठेवल्या तर एक प्रकारची उत्कृष्ट नैसर्गिक उष्णता / ऊर्जा निर्माण होते आणि थंडीत बहुउपयोगी ठरते. "थेंबे थेंबे तळे साचे" म्हणतात ना अगदी तस्से. शिवाय काकड आरती दरम्यानचा आवाज, भाव, आर्तता, भक्ती ई. ची पण मोठ्या प्रमाणात भर पडत असावी. आणि गोळाबेरीज म्हणजे थंडीत देखील अत्यानंद. सहज सुलभ थंडी सहन करण्याची ताकद, उत्साह, मस्त लागणारी भूक, प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेला मुबलक भाजी-पाला, फळं आणि वैविध्य पदार्थांची रेलचेल, हे सर्व आणि बरेच काही प्रत्येक सजीवाला लाभत असे, त्या वेळी.
तर असा हा काकड आरतीचा थोडक्यात महिमा. आता थोडेसे दृश्य बदलले आढळते आहे, गगनचुंबी इमारती, विविध प्रांतातून आलेले आणि स्थायिक झालेले लोकं, प्रदूषण आणि इतर घडामोडी त्यामुळे एकसूत्रीपणा हरवला आहे, थंडी नाहीशी झाली आहे, ऋतू त्यांचं स्वरूप संपूर्ण बदलले आहे आणि त्याचा (दुष्)परिणाम सर्वच अनुभवात आहोत. आपण सर्वचजण गेली काही वर्ष व्हायब्रेशन्स म्हणजे लहरी वर जगतो आहे, मोबाईल किंवा संगणक ह्यावर चालतात आणि सगळे व्यवहार देखील. त्यामुळे आपला संपूर्ण विश्वास आहे ह्या अश्या अदृश्य सिग्नल्स च्या अस्तित्वावर. तर मग जे थोडेसे उशिरा उठणारे आहेत, किंचित आळशी, पांघरूण मनापासून प्रिय असलेले असे, त्यांनी प्रयोग म्हणून, देव-धर्म-भक्ती ई. मधे न अडकता काकड आरती हे एक विज्ञान म्हणून वापरून बघायला हरकत काय. किंवा जे पहाटे उठणारे आहेत त्यांनी आवर्जून काही मिनिटे कार्तिक महिन्यात आरती म्हणून बघितली तर कदाचित त्यांना त्याचे उत्कृष्ट परिणाम नक्की अनुभवता येतील. चला तर मग उठा, आणि सुरु व्हा उद्याच पहाटे. आणि हो मला कळवायला विसरू नका तुमचे अनुभव.
https://mr.wikipedia.org/wiki/काकड_आरती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा