माझ्या लहानपणी साबुदाणा खिचडी म्हणजे पर्वणीच होती माझ्यासाठी. अत्यंत आवडीचा पदार्थ, किंबहुना अत्यंत च्या पल्याड जर काही उपमा असेल तर ती देखील योग्यच राहील इतकी जास्त मनापासून मला ती आवडायची. कधी आई बाबांचा उपवास असेल त्याची आतुरतेने मी चातकासारखी वाट बघायची. अर्ध्या रात्रीतून जरी फक्त "साबुदाणा खिचडी खाणार का?" एवढं म्हटलं तरी देखील पट्टाकिनी उठून ती फस्त करणार म्हणजे करणारच. उत्कृष्ट, चविष्ट, जगावेगळी, भन्नाट, आणि देऊ तेवढ्या उपमा अपुऱ्याच आहेत ह्या पदार्थाला. त्यावेळी फक्त जाड साबुदाणाचं ठाऊक होता आणि उपलब्ध पण. त्यामुळे आधीपासून तय्यारी होत असे दुसऱ्या दिवशी खिचडी करण्याची. साबुदाणा भिजवणे, दाणे भाजून दाण्याचं कूट करून तय्यार ठेवणे, नारळ खवणून ठेवणे, कोथिंबीर शिस्तीत निवडून ठेवणे, मिरच्या, दही, बटाटे / काकडी असण्याची खात्री करणे ई. बटाटे सकाळी आई उकडून घ्यायची, म्हणजे झटकीपट खिचडी तय्यार. साबुदाण्याचा पांढरा शुभ्र रंग टिकून राहावा ह्या साठी एकतर व्यवस्थित हिरव्या मिरच्यांचे तुकडे किंवा कुटून घातली जायची, शिवाय त्यात होत आली कि चमचाभर (अगदी थोडेसे) दही फेटून लावले जायचे, शिवाय वरून आणि पोटात नारळ घातला / पेरला जायचा. ह्या सगळ्या साग्र संगीतामुळे ती खिचडी इतकी मऊ व्हायची कि ज्याचं नाव ते, उत्कृष्ट लागायची पहिल्या वाफेची आणि थंड खाल्ली तरी देखील. अहाहा च. अप्रतिम. पांढऱ्या त्या मोत्यांमध्ये हिरवी कंच मिरची, कोथिंबीर पेरलेली प्रेमाने, त्यात डोकावणारे बटाटे किंवा काकडीच्या पिटुकल्या फोडी, नारळ, दही किंवा दुधाचा मारलेला हबका (क्वचित, काही घरात) ई. मुळे पंचपक्वान्नांचा दर्जा आणि साठवण माझ्यासाठी / माझ्यासारख्या तिखट खवैईला लाभत असे. हे सगळं कदाचित त्यावेळच्या घरगुती वातावरणामुळे, आई संपूर्णवेळची गृहिणी असल्यामुळे सहज साध्य झालं असेल. आताशा इन्स्टंट चा जमाना, साबुदाणा बारीक, काही मिनिटात भिजणारा / फोडणीस तय्यार आणि लगबग कचेरी गाठण्याची. ह्या सर्वांमुळे सोप्प झालं आहे सगळं आणि चवीत विविधता देखील आली आहे त्यामुळे. दोन्ही पद्धतीने केली तरी "ती" मऊच होते, पण आईची माया थोडीशी वेगळी लागतेच जिभेला, कितीही आटापिटा केला तरी. त्यात अजून एक म्हणजे आधी एकच किराणा दुकानदार पिढ्यांपिढ्या, हात बसलेला, साबुदाण्याचा स्वभाव माहिती असलेला, त्यामुळे देखील त्या मऊपणात भर पडायची. आता म्हणजे असंख्य कंपन्या साबुदाण्याच्या, त्यामुळे ठावच लागत नाही साबुदाण्याच्या स्वभावाचा. त्यामुळे खूपदा वेगळ्या चवीची खिचडी चाखायला मिळते. जेव्हा ती थोडीशी चिकट होते, भांड्याच्या बुडाला थर निर्माण करते तो फस्त करण्याची मज्जा काही औरच. आणि जर यदाकदाचित खिचडी उरलीच तर थोडेसे जास्त दही टाकून, किंवा उपवास भाजणी कालवून, किंवा बटाटा शेंगदाणे कूट मिसळून केलेले मऊसर थालीपीठ देखील जगावेगळं लागतं, आई ला केल्याचं, आणि पोरांना खाल्याचं पोटभर समाधान.
आत्ता प्रकाश पडला "ती" ला खिचडी का म्हणतात ते? काय काय जिन्नस मिळून हि तय्यार होते, करण्यास तय्यारी देखील लागते, असंख्य वेळा खाल्ली तरच पोटभर समाधान लाभते, प्रत्येकाला खाता येईल अशी मायाने ओतप्रोत अशी मऊसर, सौंदर्यवती . . . . . . . . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा