गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

वॉर्निंग

सहसा मी, माझा संगणक, माझं काम, एवढाच माझा काय तो आवाका आणि दिनचर्येचा भाग. आणि एवढंच पुरून उरतं मला त्यामुळे माझ्याच कचेरीत काय घडामोडी होतात हेच ठाऊक नसतं तर अजून कुठे काय चाललंय हे मला कळण्याचं काही कामंच नाही. पण तरी देखील अवांतर वाचन करतांना एका कामगाराचा अनुभव / सत्यकथा समोर उभी ठाकली, ती मी वाचली आणि गार पडले. अर्थात त्या संस्थेशी / ऑफिसशी / कामगाराशी माझं काही घेणं देणं नाही. खरं खोटं काही माहित नाही मला आणि माहिती करून घायची पण नाही, कारण तो माझा स्वभाव नाही, क्षेत्र नाही आणि मला तसं करून काहीही मिळणार नाही.   

माझे विचार त्या घटनेसंदर्भात मी येथे मांडते आहे. 

एक कर्मचारी एका कंपनीत अनेक वर्ष कामाला होता. त्याने पोटतिकडीने म्हणे वेगवेगळ्या पदावर कामे केली आहेत त्या कंपनीत. काही कामे तर त्याच्या आवाक्या बाहेरची होती, पहिल्यांदा भली मोठी जबाबदारी दिली गेली होती, पण ती त्याने धैर्याने निभावली आणि त्यात उत्तुंग यश प्राप्त केले. अशी नवनवीन कामे आणि टप्पे तो पार पाडत गेला आणि दररोजचे कचेरीचे काम देखील करत राहिला निमूटपणे. 

माणूस म्हटला कि चूक होतेच, तशी त्याच्या हातून पण झाली. त्याने माफी मागितली आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. माणूस म्हटला कि त्याचं कुटुंब देखील आलंच आणि ह्याच्या कुटुंबात देखील सर्वांप्रमाणे काही तरी आव्हानं उभी राहिली. ती स्विकारुन पुढे जाणं आवश्यक होतं. हे करतांना त्याची दमछाक होत होती, कारण घर, कचेरी आणि आव्हानं अश्या तीन समांतर गोष्टी सांभाळायच्या होत्या. पुन्हा एकदा कचेरीत चूक झाली आणि त्या व्यक्तीला नोकरी गमवावी लागली.  

मी आधी म्हटल्या प्रमाणे खरं काय झालं हे माहित नाही, हि फक्त छापील गोष्ट आहे. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, सध्या जगभरात मानसिक स्वास्थ्याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे आणि ते महद गरजेचे आहेच. बहुतांशी प्रत्येक मोठ्या लहान कंपनीत मानसिक आरोग्याचे तज्ज्ञ हजर असतातच. मग ह्या कंपनीत नव्हते का? नसतील तर वरिष्ठ काय करत होते? ते ह्यात जातीने लक्ष घालू शकले असते, त्या कर्मचाऱ्यांची बाजू समजावून घेतले असते, आजवर ज्याने इतकं अप्रतिम काम केलं त्याला मदत करू शकले असते, काढून टाकणे ह्या पायरी आधी. आणि हे सगळं जर त्याच्या कंपनीने केलं असेल तर त्यांना साष्टांग नमन. पण नसेल तर मात्र निश्चित करायला हवं. समुपदेशनाची गरज, पाठीवर थाप, कुरवाळणे हि प्रत्येकाचीच गरज आहे, मग तो / ती कुठल्याही हुद्द्यावर असो, कितीही वयाची असो. चला तर मंडळी फक्त वार्निंग न देता, टोकाची भुमिका न बजावता शाब्दिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, सर्वार्थीक अशी एक छोटेखानी थाप देऊन बघूया. चांगला परिणाम निश्चित होईल हे खात्रीशीर.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...