मी सकाळ ह्या मराठी वृत्तपत्राची वाचक आहे. फक्त शनिवार आणि रविवारी मी वर्तमानपत्र घेते आणि पोटभर वाचते. "महा ब्रँड" नावाची एक पुरवणी किंवा खास पण छापतात सकाळ मधे शनिवारी / रविवारी म्हणजे बहुतांशी वाचकांना वाचता येईल, माहिती मिळेल आणि फायदा होईल म्हणून असेल कदाचित. ५ फेब्रुवारी च्या "महा ब्रँड" मधे आलेला लेख वाचून मी निःशब्दच झाले, दाही बोटं तोंडात गेली आणि अंगावर काटे आल्याशिवाय राहिले नाहीत. माझ्या अर्धशतकी आयुष्यात मी जे असंख्य व्यक्ती बघितले आहेत, अनुभवले आहेत आणि वाचले आहेत त्या मधे अगदी छोटीशी उपलब्धी मिळाली, कामगिरी फत्ते झाली कि लगेच उंच भरारी घेतात. इतक्या उंचीवर पोचतात कि तेथून बाकी सगळे ठेंगणे नाहीतर बुटके भासू लागतात. विद्यावाचस्पती साठी प्रवेश मिळाला रे मिळाला कि काय होतं कोणास ठाऊक, फक्त एक उदाहरण.
माझ्या सारखी एकदा विद्यावाचस्पती झाली कि तेथेच शिक्षण थांबवते, पण काही दिज्जग असतात / आहेत ह्या जगात जे सातत्याने विविध क्षेत्रातल्या पदव्या घेत राहतात. अश्याच एका अवलियाची गोष्ट / माहिती दिली आहे सकाळने त्यांच्या वाचकांसाठी. त्या अवलियाने एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच विषयात पी एच डी केली आहे. ते आज एक प्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार आहेत, सिद्धी असोसिएट्स नावाची संस्था चालवतात ज्याचे २३ हजार ग्राहक आहेत आणि अश्या बऱ्याच उपलब्धी प्राप्त केल्या आहेत. ह्या शिवाय त्यांची अजून एक सेवाभावी संस्था देखील आहे ज्याच्या अंतर्गत असंख्य मुलींना, जेष्ठ नागरिकांना लाभ मिळतो आहे. हे आणि अश्या पद्धतीची बातमी वाचल्यानंतर आपण किती शुल्लक आहोत ह्याची कल्पना येते, अर्थात कुठलीही तुलना नाहीच. पण एक मात्र आहे कि "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे". सातत्याने करत राहा, आपल्या ऐपती प्रमाणे आणि पेरत राहा. छोट्याश्या उपलब्धीमुळे दुसऱ्याला दुखावू नका, फक्त मी तोच मोठा असे अजिबात नाही हे मात्र ध्यानात असू द्या नेहेमी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा