मी एकंदरीत मराठमोळ्या वातावरणात अनेक वर्ष सुखाने नांदले, इंग्लिश चा किडा कामापुरता चावला कारण पर्याय नव्हता म्हणून. त्यामुळे अगदी लहानपणी पासून घरा दारात असंख्य म्हणींशी दोस्ती झालीच नकळत, कधी कोणास ठाऊक. प्रथमदर्शनी नको वाटायचं त्या सगळ्यांशी खेळायला, किंबहुना त्यांचा वाक्यात प्रयोग करायला, कारण कदाचित तेवढी प्रगल्भता आली नव्हती, किंवा तो दुर्ष्टीकोन जागृत झाला नव्हता. का कुणास ठाऊक पण गेले अनेक वर्ष माझ्या लेकरांसोबत मोठं होतांना मज्जा आली, खूप शिकता आलं आणि म्हणी ह्या त्यातला एक प्रकर्षाने उपभोगलेला भाग नक्की होता आणि आहे.
तर त्याचं आज असं झालं, मी बऱ्याचदा सांगितलं आहे कि पिटुकले विषय माझ्या समोर सहज उभे ठाकतात, का? कसे? ई. ना सारून मग माझी आधुनिक तंत्रज्ञानाने लाभलेली लेखणी काम सुरु करते. अर्थात फक्त आज झालं असं नाही, आज झाल्यावर मग लक्षात आले ह्या आधी घडलेले तत्सम प्रसंग. वा, भन्नाट मज्जा आली. तर एक कोणीतरी मुलगी आज माझ्या समोरून गेली, एकदा, दोनदा, तीनदा अख्या दिवसभरात वेगवेगळ्या वेळी. तिच्या पायांनी माझं लक्ष वेधलंच. कारण ती उंचीला थोडीशी कमी, साधारण बांध्याची सामान्य, सर्वसाधारण दिसणारी भारतीय तरुणी होती. मी तिला ओळखत नाही, त्यामुळे तिच्या दृश्य तपशीला पेक्षा जास्त मला कुठलीही कल्पना नाही तिच्या बद्दल. गणवेश घातला होता तिने आणि अती-उंच / विचित्र-आकाराने-अती-उंच टाचेचे बूट परिधान केले होते. त्या व्यतिरिक्त ते दिसायला इतके मोठ्ठे होते कि ज्याचं नाव ते. रंग-संगती पण विसंगत होती, जगावेगळी हो. प्रथमदर्शनी तरी वाटलं कि "दादाचे घातलेत चुकून झोपेत, घाईत, आपत्कालीन स्थितीत" ई., पुनः दर्शनी जाणवलं कि फॅशन च्या नावाखाली असेल, पुनःपुन्हा दिसली तेव्हा ते मिसफिट, विजोड, अनावश्यक वाटले, माझा अर्थाअर्थी तिच्याशी, तिच्या जोड्यांशी / बुटाशी कुठलाही संबंध नाही, गरज देखील नाही, पण पुन्हा पुन्हा चार डोळयांना दिसली, दृष्टीस पडली म्हणून विचार उत्पन्न झाले मनात, एवढंच ते काय.
बाब तिथे थबकली नाही हो, मला एक नवीन अर्थ देऊन गेली "नाका पेक्षा मोती जड" ह्याचा. मी शेवटचं वाक्य तय्यार केलं होतं किंवा वारंवार ह्या म्हणी बद्दल ऐकलं होतं ते नवरी जास्त शिकली असेल नवऱ्या पेक्षा तर सगळेच जण उच्चारायचे. किंवा त्या लग्नोत्तसूख मुलीला नकार मिळायचा, कारण जड मोती नाजूक नाकाला सांभाळणं प्रचंड अवघडंच नाही तर अशक्य, त्याचे दुष्परिणामच जास्त, उपयोगापेक्षा म्हणून. अगदी त्या सगळ्या प्रसंगांची प्रकर्षांने आठवण झाल्याशिवाय राहिलं नाहीच मला, "पायांपेक्षा जोडे जड". ना आपण सीमेवर भारताची / देशाची रक्षा करण्याची जबाबदारी घेतलेले, त्यांना हे असे बूट शोभतात आणि गरजेचे असतात. त्यांची शरीरयष्टी पण जगावेगळी असते, त्यांना शिक्षण दिले जाते ते तसे बूट बाळगायचे. त्या व्यतिरिक्त अजून असे जबाबदारीचे खूप व्यवसाय आहेत जेथे असे जोडे अत्यावश्यक असतातच. कुठलीही तुलना नाही, पण मला कणभर कारण समजलं नाही तिने का असले बूट परिधान केले होते ते? आत्ता देखील ठीक नाहीच, पण मग नंतर त्याचा कुठल्याही शारीरिक भागावर दुष्परिणाम व्हायला नको म्हणजे मिळवलं. स्वतः खड्डा खणण्यासारखं आहे हे. जपा स्वतःला कृपया. कुठलेही ओझं बाळगू नका, शारीरिक, मानसिक, सामाजिक...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा